Tuesday, 29 September 2015

MADरास- २

एकंदरीत मद्रासमध्ये आल्याआल्या आमचे खूपच हाल झाले. पहिल्या दिवसाचं वर्णन तर यथासांग केलंच आहे. दुसर्‍या दिवशी जाऊन गॅसचं दुकान शोधणं, सिलेंडर लावून घेणं, बाजार शोधून भाज्या दूध फळं यांची सोय करणं, दूधवाला शोधून रतीब लावणं वगैरे सर्व कामं करायची होती. घरासमोरच एक आज्जीआजोबा राहत होते. आजोबांकडे तीन चार भाडेकरू ठेवलेले होते. पैके दोन घरं मारवाड्यांची होती, म्हणजे एका गोष्टीची निश्चिंती झाली. “हिंदी” बोलता येणारं कुणीतरी होतं. आज्जीआजोबा आमच्या घरमालकांचे चांगले परिचित. सकाळीच आजोबांनी येऊन काही मदत हवी असेल तर सांगा असं सांगितलं. तेव्हा आजोबांशी बोलताना अजून एक दिलासेदार बाब समजली. आजोबांना इंग्लिश व्यवस्थित येत होतं. पन्नास वर्षांपूर्वी ते मुंबईमध्ये नोकरी करत होते, त्यामुळे थोडीफार मराठी समजायची, बोलता येत नव्हतं पण त्यांचं इंग्लिश मात्र खणखणीत होतं. या अंकलमुळे आमचे मद्रासचे हे सुरूवातीचे दिवस थोडे सहज गेले. त्यांनी कामवाली शोधून दिली, तिच्याशी काय काम किती पैसे किती वाजता येणार वगैरे बाबी ठरवताना भाषांतरकार म्हणून ते हजर राहिले. नंतर पहाटे त्यांच्या घरी दूध घेऊन येणार्‍या माणसाकडे आमचा रतीब लावून दिला. इतर  दुकानाचे पत्ते वगैरे सर्व त्यांनीच दिले.


गॅसचं दुकान घरापासून अगदी जवळ. हायवे ओलांडला की  लगेच समोर. तिथं जाऊन सर्व कागदपत्रं पैसे वगैरे दिल्यावर काऊअंटरवरचा माणूस म्हणाला “चार पाच दिवसांत सिलेंडर येईल” धाबं परत दणाणलं. म्हटलं. अहो, लवकर द्या. (इथं लिहायला सोप्पंय. प्रत्यक्ष संवाद साधताना मला तमिळ येत नाही आणि समोरच्याला हिंदी इंग्लिश येत नाही अशा भाषिक करामती चालू) लहान बाळ आहे. मला स्वयंपाकाचा त्रास होइल. आम्ही इथं नवीनच आलोय  वगैरे वगैरे. शेवटी ववैतागून तो म्हणाला. “लेट्स सी वाट आय क्यान डू” तेवढ्या प्रॉमिसवर आम्ही परत यायला निघालो तर दारामध्ये एक बाई उभी होती. “शो मी युअर पेपर्स” म्हणाली. आम्ही ते बाड तिच्या हाती दिलं. तिनं कुणालातरी हाक मारली आणि काहीतरी सांगितलं. बरोबर दोन मिनीटांत रेग्युलेटर आमच्या हातात आणून दिला आणि दिवसाभरात सिलेंडर घरी पोचेल असं सांगितलं. (या बाई आपल्याला नंतर परत भेटत राहतीलच)


हुश्श! एक लढाई पार पडली. घरी सिलेंडर लागला की स्वयंपाकाची सर्व सोय झाली. इंडक्शन मायक्रोवेव्हवर कालचा आजचा दिवस पार पाडला होता, पण गॅस चालू झाल्याखेरीज जीवाला चैन पडली नसती. गॅस दुकानामधून बाहेर येऊन जवळच्याच ए्का  साध्या मेससारख्या  हॉटेकामध्ये जेवलो. तमिळ स्टाईल जेवणाची पहिलीच वेळ. केळीच्या पानावर वाढलेला भाताचा ढीग, त्यावर ओतलेलं सांबार, रस्सम आणि सोबत तीन चार भाज्यांच्या वाट्या. शिवाय दही. सुनिधीला बिस्कीट दिलं तर नक्को असं बाणेदारपणे सांगून तिनं नुसता भात खाल्ला. रस्सम वगैरे अतिजहाल असल्यानं तिला खाता येणं शक्य नव्हतं. माझी लेक तमिळनाडूमध्येच लहानाची मॊठी व्हायला किती योग्य आहे याची ही पहिलीच चुणूक. तिला जेवणामध्ये तिन्ही त्रिकाळ भात असला तरी फरक पडत नाही. दोन दिवसांपासून कोरडं सुकं काहीतरी खात होतो. गरम पांढराशुभ्र भात आणि त्यावरचं ते लालभडक रस्सम जीव तृप्त करून गेलं.


घरी येऊन पोचलो आणि आमच्या मागोमाग सिलेंडर आला (हे कसं घडलंतर सिंपल आहे. आम्ही जेवेपर्यंत गॅसवाला दुकानतच होता, आम्ही बाहेर पडलेलं पाहिल्यावर आमच्या मागून हातगाडीवर सिलेंडर टाकून घेऊन आला) मग फ्रीज चालू करणे.. दूध तापवणे, वगैरे कामे चालू झाली. किचनमधलं सामान लावून घेतलं. हळूहळू कपाट लावणं वगैरे करत घर आकाराला आणत गेलो.


झिलमिल सितारॊंका आंगन होगा रिमझिम बरसता सावन होगा सारख्या कविकल्पनांनी नटवून घरं लावणारी लोकं कुठं असतात हो? इतक्यांदा घर सोडून परत घर लावलंय पण तरी दर वेळेला नवीनच काहीतरी समस्या वाट बघत उभ्या असतात. आमच्या या घराचा हॉल प्रशस्त होता, पण किचन छोटं होतं. अर्ध्याहून जास्त सामान किचनसमोर असलेल्य बेडरूममधेय ठेवावं लागलं (त्यामूळे आजही मला स्वयंपाक करताना किचन टू बेडरूम- जी सध्या स्टोअररूम म्हणून ओळखली जाते- धावपळ करावी लागते). किचनमध्ये असलेलं सिंक हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यावर नंतर लिहेनच.



सध्या मात्र हे घर लावणं आणि एकंदरीत सेटल होणं हे सुरू होतं. हे करत असताना सर्व काही सुरळीत गोडीगुलाबीत अज्जिब्बात चालू नव्ह्तं. मद्रासमध्ये आल्यापासूनच माझी स्वत:ची प्रचंड चिडचिड होत होती. आयुष्यामध्ये कुठल्या क्षणाला तुम्हाला स्वत:विषयी कायतरी नवीन ज्ञान होइल हे सांगता येत नाही. तसं माझं इथं आल्यानंतर थोड्या दिवसांनी झालं.


मला बदल सहन करता येत नाही. बदल आवडतो, बदल हवा असतो. पण त्या एकंदरीत सेट झालेलं आयुष्य पूर्णपणे विस्कटून टाकताना  आणि त्यांची नंतर परत घडी घालताना मध्ये जो ट्रान्स्झिशन पीरीयड असतो तो मला अजिबात सहन होत नाही. मंगळूरहून मद्रासला आल्यावर हे फारच प्रकर्षानं जाणवलं. मी प्रत्येक गोष्टीची फूटपट्टी मुंबई अथवा मंगळूरची लावत होते. हे वेगळं शहर आहे, वेगळं गाव आहे हे माहित होतंच तरीही “इथं मुंबईसारखं नाही, मंगळूरसारख्या भाज्या मिळत नाहीत” वगैरे टुमणी चालूच होती. सतत चिडचिड सतत तक्रारी. एक-दोनदा अशाच कसल्यातरी फुटकळ गोष्टीवरून संताप येऊन हातामध्ये होती ती वस्तू फेकून पण दिली. राग यायला काही खास कारण होतंच अशातला भाग नाही. मद्रासमध्ये आल्या आल्या दोन तीन दिवसांचे जे काय निगेटीव्ह घडलं होतं तेच मनामध्ये घर करून बसलं होतं. “आपण इथं राहूच शकणार नाही” याची खात्री पटली होती. नवर्‍याला नवीन नोकरी होती, त्याला जास्त दिवस सुट्टी घेऊन चालणार नव्हतं. तो ऑफिसला जायला निघाला की माझी चिडचिड चालू व्हायची. विनाकारणच. काही गरज नसताना. आज मागे वळून पाहताना जाणवतंय की कदाचित “तो नोकरी करतोय आणि मी घरात बसून आहे” या भावनेनं ती चिडचिड होत असावी. इथं येतानाच ही गोष्ट स्पष्ट झाली होती, की मी नोकरी करू शकणार नाही. घरीच बसावं लागेल. मग चिडचिड होणार नाही का? आई़चा फोन आला तेव्हा दोन तीनदा रडलेसुद्धा. हा सगळा संताप कळत नकळत का होईना लेकीवर पण निघत होताच. एक तर तो इवलासा भांबावलेला जीव. इतके दिवस त्याच्या आजूबाजूला असणारे कुणीच दिसेनात. घर वेगळं. जागा वेगळी. त्यात परत आई अशी सारखी वसवस करत असलेली. बिचारं माझं लेकरू दिवसभर मला नुसतं चिकटून बसायचं. जरा दूर केली की रडायची आणि मग माझी कामं होत नाहीत म्हणून मी अजूनच चिडायचे. दोन तीनदा धपाटे पण घातले.



 एखादी गोष्ट माझ्या मनाविरूद्ध घड्ली तर चिडायची ओरडायची ही काय पहिलीच वेळ नाही. अशावेळी मी खूप बडबडते. अगदी तोल जाईल इतकी बोलते. पण ते बोलणं हेच माझ्यासाठी व्हेंट आऊट असतं. मनात खदखदत असलेली एखादी गोष्ट बोलून टाकली की तीच गोष्ट इतकी खदखदत नाही. मला इथलंच काहीच आवडलं नव्ह्तं. हवामान् चांगलं नव्हतं. खूप गर्मी होती, घरामधलं टॉयलेट खूप लहान होतं. किचनमध्ये सिंक नव्हतं. मायक्रोवेवला सेपरेट कनेक्शन नव्हतं. आधी राहणारे भाडॆकरू खूप घाणेरडे होते. फरशीवर काळे डाग पडले होते, केबलवर हिंदी चॅनल जेमतेम होते. गेटची कडी फार जोरात आवाज करते, इथं भाज्या चांगल्याच मिळत नाहीत. इथं पालेभाज्या दिसत सुद्धा नाहीयेत. इथल्या दुधावर साय येतच नाही. इथं धूळ फार आहे. इथलं पाणी खूप वाईट आहे. समोरच्या अंकलनी शोधून दिलेली कामवाली नीट काम करत नाही, ती कपडे नीट पिळून वाळत घालत नाही. एक ना दोन. हजार गोष्टी होत्या, ज्या मला पटत नव्हत्या. आणि त्या गोष्टी मला पटत नव्हत्या म्हणून माझी चीडचीड होत होती.



यापैकी कुठलीही गोष्ट बदलणं खरंतर नवर्‍याच्या हाती नव्हतं पण मी सोयीस्कररीत्या प्रत्येक गोष्टीचं खापर मात्र त्याच्या डोक्यावर फोडून मोकळी झाले होते. “त्यानं” “त्याच्या” “करीअरसाठी” ही नोकरी पकडली आणि म्हणून “माझी” अवस्था इतकी वाईट झाली असा एकंदरीत माझा निष्कर्ष होता. निर्णय घेताना दोघांनी आपापसांत चर्चा करूनच घेतलेला निर्णय होता, त्याच्या स्वभावानुसार तो कुठलीही गोष्ट धाडकन करून मोकळा होत नाही. प्रत्येक निर्णयापूर्वी चारी बाजूंनी विचार करून त्याचे फायदेतोटे काय आहेत याचा हिशोब मांडून मगच निर्णय घेतो. मेच त्याच्याउलट आहे. तो माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी घेतलेले बहुतेक निर्णय इंपल्सीव्हली अचानक घेतलेले आहेत. आधी निर्णय घ्यायचा, मग त्यानुसार वाट काढायची असा माझ्या आयुष्याचा आलेख. नंतर दोघांनी एकत्र रहायला सुरूवात केल्यावर अर्थातच दोघांच्याही आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय एकमेकांचा विचार करूनच व्हायला लागले. हे इथवर ठिक होतं. प्रश्न उभा राहतो तो निर्णय घेतल्यानंतर चुकवायच्या किमतीचा. त्याला ही किंमत फार थोडी चुकवावी लागली होती. उत्तम नोकरी,  प्रवासासाठी कमी वेळ, लेकीला सांभाळायची काहीच जबाबदारी नाही आणि रहाण्यासाठी उत्तम जीवनशैली असं चांगलं पॅकेज मिळालं होतं. माझ्याबाबतीत तसं काहीच घडलं नव्हतं. नोकरी अद्याप शोधायची होती, पण त्यासाठी दिवसाचा पाच ते सहा तास प्रवास (तीन ते चार वाहनं बदलून) करावा लागला असता, लेकीला सांभाळण्यासाठी काहीतरी सोय करावी लागली असती. इतकं करून भरभक्कम पगाराची नोकरी मिळेलच याची अजून शाश्वती नव्हतीच.


या सर्वांचा परिणाम माझ्या चिडचिडीमध्ये !! सुदैवानं माझ्यापेक्षा माझा नवरा मला अधिक ओळखून आहे. त्यामुळे माझी ही चिडचिड त्यानं समजून घेतली. त्यावर त्याच्यापरीनं करता येईल तितके उपाय त्यानं केले, पण त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे हे सगळे बदल माझ्यापद्धतीनं इंतीग्रेट होण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ मला दिला. परवाच कधीतरी अविनाश अरूणचा “किल्ला” सिनेमा बघताना नवर्‍यानं मला टॊमणा मारलाच होता, “त्या सातवीच्या पोराला समजूतदारपणा आहे, आणि आमचं ध्यान अजून चडफड करतंय!”


तरी सुदैवानं आता चडफड खूप कमी झाली. जसे दिवस पालटत गेले तशी मी या जागेशी, घराशी, गावाशी खूप कंफर्टेबल होत गेले. मला कुणीच ओळखत नाही, माझ्याशी बोलायला कुणीसुद्धा नाही म्हणून सुरूवातीला खूप वाईट वाटायचं. सशेजारी बहुतेक तमिळ्मध्यमवयीन टिपिकल गृहिणी बायका. मी यांच्याशी काय बोलणार? भाषा येत नाही आणि तसेही बोलायचे कुठलेच विषय सारखे नाहीत. टिपिकल तमिळ गृहिणींसोबत मी कशी कम्युनिकेट करू शकले असते? पण हळूहळू “अलोहोमोरा” मंत्र प्रत्येक ठिकाणी मिळायला लागला.


आम्ही रहायला येऊन तीन चार दिवस झाले असतील, सुनिधीला घेऊन गेटमध्ये उभी होती. शेजारची मुलगी दुकानामध्ये निघाली होती. सहज पुढं येऊन “घर आवरलं का? वगैरे विचारत बोलू लागली.. ही बी एडच्या शेवटच्या वर्षाला होती. संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं असल्यानं भाषेची अडचण नव्हती. मग पाच दहा मिनीटं असंच काहीबाही बोलताना म्हणाली.. “हू इज युअर फेवरेट हीरो?”

आपण सेकंदभराचाही वेळ न दवडता उत्तर दिलं “सलमान”


ती किंकाळली. “इव्हन माय फेवरेट हीरो. आय जस्ट लव्ह्ड हिम इन किक”

“मला तो खामोशीमध्ये फार आवडला.”


“खामोशी?” हा पिक्चर तिला माहित नव्हता. मग मनीषा कोईराला (दॅट हीरॉइन इन बॉम्बे) संजय भन्साळी (ओह, देवदास आं!!) वगैरे वगैरे विषय सुरू झाले. ती आणि मी आमच्या घराच्या गेटमध्येच बोलत होतो. बोलताना “व्हाय शाहरूख इज बेटर दॅन सलमान” वर परिसंवाद चालू झाला. तिची आई, पलिकडच्या भाभी, तिच्या पलिकडच्या घरातली वनिता सगळे बिनबुलाये आम्हाला सामिल झाले. हिंदी, तमिळ, इंग्लिश अशा तिन्ही भाषांमधून संवाद सुरू राहिला. गॅस एजन्सीमध्ये काम करणार्‍या शैलाआंटी (त्याच आधी उल्लेखलेल्या) दुकान बंद करून येत होत्या. त्या आमच्या गप्पांमध्ये खुशाल सामील झाल्या. मग गॅस सिलेंडरवरून विषय “आज क्या काना बनाया?”या आद्यप्रश्नाकडे वळाला. नंतरच्या गप्पा काय सांगायला हव्यात का?

गप्पा मारायला बोलायला काय विषय असं राहिलंच नाही. बॉलीवूड हा विषय भारतात कुठंही कायम हिट्ट विषय राहिलेलाच आहे.


अर्थात शेजारीपाजार्‍यांशी गप्पा चालू झाल्या म्हणून जादूची कांडी फिरल्यागत माझी मन:स्थिती ठीक झाली असं नाहीच. त्याला अजून खूप वेळ आहे. अजून माझा या गावाशी परिचय चालू आहे. इथं आल्यानंतर पंधरवड्यातच कामवाली सोडून जाणे या दणक्याला सामोरं जायचं आहे. आणि त्यानंतर मद्रासमधली सर्वात भयानक गोष्ट घडणार आहे. “इथलं पाणी बादणे!”


पण ते सर्व नंतर! तूर्तास संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी रस्ताभर इतर मुलांसोबत खेळताना धावत असणारी माझी मुलगी, हातात शेजारणीनंच आणून दिलेला फिल्टर कापीचा टंबलर आणि एकमेकांची नावं जाणून घेत ओळखी करून घेणारी मी.

(क्रमश: )


Sunday, 20 September 2015

MADरास -१

नवर्‍याला मद्रासला नोकरी मिळाली तेव्हा मी सर्वात जास्त खुश झाले होते. मंगळूर वाईट नाही, उलट मोठ्या शहराच्या सर्व सोयीसुविधा असलेलं एक निवांत शहर् आहे. शाळेच्या-कॉलेजच्या उत्तमोत्तम सोयींसाठी मंगळूर मला कायम आवडत राहील. अशा या ठिकाणी लेकीचं शिक्षण होणार म्हणून बरं पण वाटायचं.
पण... लेकीची शाळा सुरू होण्याआधीच नवीन नोकरी, नवीन शहर, नवीन भातुकली. ती पण पूर्णपणे अनोळखी शहरामध्ये.


लग्नानंतरच्या पाच वर्षामध्ये तीन वेळा शहरं बदलून झाली होती, आता परत इथलं सगळं स्थिरस्थावर सोडून नवीन कुठेतरी जायचं का अशी धाकधूक होतीच. शेवटी महिना पंधरादिवस चर्चा करून करून मी आणि नवर्‍यानं “चलो मद्रास” असा निर्णय घेतला.


मंगलूरमध्ये असलेले बहुतेक तमीळ कलीग्ज इकडे खटपट करत होते, आमची नोकरी पक्की झाली तशी मात्र बहुतेकांनी “तू अजोबात जाऊ नकोस. शहरापासून फर लांब आहे. तुम्ही ऍडजस्ट होऊ शकणार नाही” वगैरे चालू केलं. अर्थात आम्ही निर्णय घेतलाच होता. कूठंही ऍडजस्ट होऊच याची मला खात्री होती.


शिवाय काही झालं तरी मद्रास मोठं शहर आहे. तिथं मलादेखील परत जॉब सुरू करता येईल अशी आशा वाटत होती. सोबत अद्याप मतदानाचा हक्क नसलेलं पण अतिशय महत्त्वाचं असं आमचं दोन वर्षांचं टिल्लं होतं. तिच्यादृष्टीनं हा बदल फार मोठा होता, तरीदेखील जायचंच असं आम्ही ठरवलं.  मग पॅकिंग, आवराआवरी, गॅस परत देणं, बॅंक अकाऊंट बंद करणं वगैरे वगैरे सर्व खटपटी चालू झाल्या.


१ सप्टेंबरला आम्ही मंगळूरवरून मद्रासला यायला निघालो. रात्री नऊ वाजता सुट्णारी ट्रेन दुसर्‍या दिवशी दुपारे दोननंतर मद्रासला पोचली. वास्तविक मंगळूर आणि मद्रास हे भारताच्या नकाशावर समोरासमोर आहेत. एक पश्चिम किनार्‍यावर आणि एक पूर्व किनार्‍यावर. पण आमची भारतीय रेल्वे अशी सरळ येत नाही. मंगळूरवरून निघालेली ट्रेन खाली दक्षिणेला केरळात जाते तिथून तमिळनाडूमध्ये आणि मग परत वर उत्तरेला चढून चेन्नईला येते. इतकी लांबवर फिरून का येते माहित नाही...

मंगळूरात संध्याकाळी पाच वाजता सामानाचा ट्रक भरून पाठवल्यावर रिकाम्या घरामध्ये अक्षरश: करमेना. सुनिधी तर पार बावचळली. घर तर दिसतंय, पण सामान काहीच नाही... सगळीकडे धावता येतंय, पण खेळायला काहीच नाही..
रात्री आम्हीही ट्रेनमध्ये बसलो. बाय रोड ट्रक दुपारपर्यंत पोचला असता, आम्ही संध्याकाळपर्यंत. “तुम्ही येईपर्यंत ट्रक दारामध्ये लावतो आणि झोप काढतो” असं पॅकर्सवाला माणूस म्हणाला होता. त्याचे दिव्य प्रताप नंतर सविस्तर सांगूच.

आता जरा फ़्लॅश फॉरवर्ड मारते आणि मद्रासमध्ये येते.


मद्रासमध्ये सतिश जॉइन व्हायला जाणार आणि तेव्हाच घर शोधून वगैरे येणार होता, पण आम्हाला मद्रासची काहीच माहित नाही. दोन्तीन तमिळ मित्र-मैत्रीणींना “काटुपल्लीला जॉब आहे तर तिथून रहायला कुठले एरिया जवळ पडतील” असं विचारून पाहिलं तर त्यांना काटुपल्ली कुठं आहे तेच माहित नव्हतं. मग मदतीला आला तो सतिशचा एक ज्युनिअर. अतिशय अवली कॅरेक्टर आहे. बापाकडे चिकार पैसा, लहानपण सगळं गल्फमध्ये गेलेलं. कशीबशी मिळवलेली इंजीनीअरींगची डिग्री आणि नोकरीला लागेस्तोवरच महिन्यातले वीस दिवस दारूमध्ये. असा हा पंचवीसेक वर्षाचा मुलगा. म्हणे. “सर, मै आपको घर दिलवाता हू. मेरा उधर बहोत पहचान है” मंगळूरहून सतिशसोबत स्वत: आला, त्याचा एक काका इथल्या राजकारणात बराच  ऍक्टीव्ह आहे, त्याला सोबत घेतलं आणि हे घर शोधलं. “घर शोधणे” या कामासाठी (काही पूर्वानुभव लक्षात घेऊन) सतिशनं दोन दिवस ठरवले होते. पण प्रत्यक्षात दोन तासामध्ये हे घर फायनल झालं.
“हा एरीया राहण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त योग्य आहे” त्या असिस्टंटच्या काकांनी ठामपणे सांगितलं. “इथून जाणं येणं सोयिस्कर आहे, शिवाय शाळा वगैरे सर्व जवळ आहे” प्रत्यक्षात खेड्यासारख्या दिसणार्‍या या मनाली न्यु टाऊनबद्दल सतिश फारसा काही इम्प्रेस्ड नव्हता, पण आधी येऊ, आणि मग बघू असा त्यानं विचार केला.

मला घराचे वगैरे फोटो मेसेजवर पाठवले ते ठिकठाक वाटले. चेन्नईचा पहिला सणसणीत फटका आम्हाला बसला तो घरभाडं ऐकल्यावर. चेन्नई हे फार स्वस्त शहर आहे असं का म्हणतात ते आम्हाला तेव्हा समजलं. मंगळूरला  चार खोल्यांच्या फ्लॅटला जितकं भाडं भरत होतो, त्याच्या निम्मं भाडं एका स्वतंत्र बंगल्याचं. पाच मोठ्या खोल्या, पाठीमागे अंगण, पुढं छोटंसं अंगण. दोन माड आणि बाग. एवढं सर्व त्या भाड्य़ामध्ये. सतिश घर फायनल करून मंगळूरला परत आला.

तर आता परत बॅक टू ट्रेन. रात्रीचा प्रवास पॅकिंगच्या दमणूकीमुळं झोपूनच झालेला. सकाळी ट्रेन कुठल्याशा स्टेशनवर थांबली होती, तेव्हा मी सतिशला म्हटलं. “आता या क्षणी आपण रस्त्यावर आहोत. सर्व सामान ट्रकमधून रस्त्यावर आणि आपण ट्रेनमध्ये”


“ट्रॅकवर” कुठल्याही क्षणी लॉजिकची कास न सोडणारा नवरा वदला. दुसरा एखादा माणूस असता तर “कशाला घाबरतेस सर्व ठिक होइल” वगैरे धीराचे शब्द बोलला असता की नै. आमच्यात तशी पद्धतच नाही.
तर ट्रेन मद्रासला पोचली. (इथं विस्तारभयामुळे सुनिधीच्या रडण्याचे, खेळण्याचे वगैरे डीटेल्स लिहत नाहीये. पण प्लीज बी नोटेड. हा सर्व वेळ तो इवलाला जीव आमच्याच सोबत होता. तिला तेव्हा बोलतादेखील येत नव्हतं. सर्व कम्युनिकेशन खाणाखुणांनीच)


ट्रेन मद्रासला पोचल्यावर सतिश ट्रकवाल्याला फोन करू लागला. “कुठं आहेस” म्हणून विचारायला. त्याचा फोन स्विच ऑफ. धाबं दणाणणं म्हणजे काय त्याचा प्रत्यय आला. तरी त्या पॅकर्स मूव्हर्स दिलेले अजून दोन तीन नंबर ट्राय केले. सर्वच बंद. मंगळूरच्या ब्रॅंचला फोन केला तर तो म्हणे “वो तो पहुंच गया होगा, आप उधर जाना” या सर्व धांदलीमध्ये स्टेशनवर पोचल्यावर काहीतरी खाऊन घेऊ असं ठरवलं होतं ते विसरूनच गेलो. सुनिधी झोपेत होती, बाहेर येऊन फास्ट ट्रॅकची प्रीपेड टॅक्सी बूक केली आणि मनाली न्यु टाऊनकडे निघालो. टॅक्सी चालक (हा अत्यंत खडूस जमातीचा होता, वाटेत दोन मिनिटं गाडी थांबव बिस्कीटांचा पुडा घेऊ म्हटलं तर अजिबात थांबला नाही. हिंदी इंग्लिश समजत नाही म्हणे!) सूड उगवल्यासारखा शॉर्टकट म्हणून चेन्नई डंपिंग ग्राऊंडच्या रस्त्यानं घेऊन आला. त्या वासानं मला मळमळू लागलं, आणि सुनिधीला उलटी झाली. चेन्नई म्हणजे मुंबैइ सारखी मेट्रो सिटी हे चित्र कूठेच दिसेना. एरवी तमिळ सिनेमांअधून दिसणारी सुरेख चित्रासारखी चेन्नईदेखील दिसेना. छोट्या छोट्या गल्ल्या, (धारावीची आठवण देणार्‍या), खड्डेमय रस्ते यातून बाहेर एकदम हायवेलाच लागलो आणि आता हे डंपिंग ग्राऊंड.. आपल्याला जर चेन्नईमध्ये फिरायचं  झालं तर रोज या रस्त्यानं यावं जावं लागणार...


मंगळूर सोडून चेन्नईमध्ये गेलो तर मला नोकरी करता येईल. इथं माझ्या क्षेत्रासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत  वगैरे वगैरे सर्व काही धुरळयत उडून गेलं. रोज तीन ते चार तासाचा हा प्रवास (कारमधून अडीच तास, पब्लिक ट्रान्स्पोर्टने त्याहून जास्त) झेपेल का? वगैरे विचार येऊ लागले. “तुला टूव्हीलर घेऊन फिरता येईल गं” आमचे मनकवडे पतीराज म्हणाले.


आणि... मग सुरू झाला आमचा जगप्रसिद्ध एन्नोर पोर्टचा हायवे. हे भलेमोठे वीस चाकी वगैरे कंटेनर्स. शुरू कहंपे होते है और खत्म कहांपे पताही नही चलता टाईप्स. दोन तीन दिवस इथ्लं कंटेनर्सच ट्राफिक अडलेलं असतं. त्याच्या मधून अडथळ्यांची शर्यत पार केल्यासारखा कार आणि बाईक्स जातयेत असतात. इथं मी टूव्हीलर चालवणं म्हणजे अवतार समाप्तीची घोषणाच.


अजून त्या  ट्रकवाल्याचा फोन लागत नव्हता. सामानाचं काय... किंमत किती असेल ती असो, पण घराचं प्रत्येक सामान होतं त्यामध्ये. टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन, ओव्हन, कपाट, कपडॆ, बेड, अंथरूणं, लेकीची खेळणी... भांडी, बादल्या, मग, देवघर, ढीगभर पुस्तकं आणि काय नी काय... परक्या गावात येऊन सामान हरवलं अस्तं तर आमची काय अवस्था होइल...

नवर्‍याचं टेन्शन हळूहळू वाढत होतं. मी खिडकीतून बाहेर बघून अजूनच हताश होत होते, लेकरू उलट्यांनी वैतागलं होतं. शेवटी येऊन पोचलो एकदाचे मनाली न्यु टाऊनला. घरमालकांनी ओळखीच्या एकांकडे चावी देऊन ठेवली होती. सुदैवानं त्या नवरा बायकोला उत्तम इंग्लिश येत होतं. त्यामुळे व्यवस्थित बोलता आलं. कॉफी घेता घेता ट्रकवाल्याला फोन करणं चालूच होतं. अखेरीस त्यानं फोन उचलला आणि म्हणाला “रंड निमिष्गं वरो” दोन मिटांत काही आला नाही पण दहा मिनिटांनी मात्र आमच्या सामानाचा ट्रक आला आणि आम्ही चावी घेऊन आमच्या नवीन घराकडे निघालो. एव्हाना सहा वाजून गेले होते. हुश्श म्हणतच होतो तितक्यात....

... धो धो पाऊस चालू झाला. दारात सामानाचा ट्रक उभा. त्यातले तमिळ हमाल काय बोलतात ते कळत नाही. चावीनं दार उघडलं तर गुडुप्प अंधार (आमच्याकडे पाऊस आला की लोकं छत्री उघडत नाहीत, टी एन ई बी वाले लाईट मात्र काढतात) इतकावेळ कुठंतरी निवांत झोपलेल्या त्या ट्रकवाल्याला आता सामान उतरवायची काय घाई लागली होती कुणास ठाऊक. घरामध्ये आम्हाला काहीच दिसेना. घरमालकानं पेंट काढून घेतला होता, त्याचा वास अख्ख्या घरात कोंडलेला, आणि पेंटींगचं काम झाल्यावर घर झाडून वगैरे घ्यायचं असतं हे पेंटर लोकं विसरली होती बहुतेक. पायाला सगळा चिखल लागत होता. फरशी कुठल्या रंगांची ते ही समजलं नसतं. इतकी घरात घाण होती. पटकन एक झाडू मारून घ्यावा म्हटलं तर तेही होइना. भरीसभर हमालांनी बदाबदा सामान आणून फेकायला सुरूवात केली. पुस्तकांचा एक खोका आणि गादी कशी काय पण चप्प भिजलेली होती.

गॅस चालूच नव्हता, इंडक्शन होता, पण लाईट नव्हते.
घरभर सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. झोपायची गादी भिजली होती. बेड अजून जोडायचा होता.
मद्रासमध्ये रहायचं म्हणून जी काय चित्रं रंगवली होती ती आतापर्यंत सर्व पुसली गेली होती. हे आणि असं होइल अजिबात वाटलं नव्हतं. बाहेर पाऊस अजून धडाधडा कोसळतच होता. प्रचंड भूक लागली होती, पण खायला केवळ कोरडा खाऊ होता. ज्यांच्याकडे चावी दिली होती ती बाई संध्याकाळी म्हणाली होती की रात्री मी जेवण आणून देईन. साडेनऊ वाजता तिचा फोन आला की आम्ही बाहेर कुणाच्यातरी बर्थडेला आलोय, इथंच उशीर होइल. आम्हाला घरी यायला अकरा वाजतील. म्हणजे तात्पर्य रात्रीच्या जेवणाची सोय तुम्हीच करा. आधीच सांगितलं असतं तर सतिश बाहेर जाऊन हॉटेलातून काही घेऊन आला असता.



काल सकाळी पॅकिंगच्या कामापासून मी आणि सतिश दोघंही दमलो होत. सोबत सुनिधी होतीच. रात्रभर आणि दिवसभर प्रवास. खाण्यापिण्याचे हाल. आता बाहेरून जेवण आणावं तरी शक्य नाही. लाईट नाहीत. बाहेर पाऊस. अनोळखी गाव आणि भाषा माहित नाही.

सुनिधीसाठी मिल्क पावडरचं दूध बनवलं त्यात बिस्कीट कालवून खाऊ घातलं. भुकेजलेलं लेकरू तेवढं खाऊन लगेच झोपलं पण!

आम्ही प्लेटभर सुका चिवडा आणि लाडू इतकंच डिनर करायचं ठरवलं....  
देवाक काळजी!!


(क्रमश: ) 

Monday, 14 September 2015

MADरास - ०

“कम आऊटसाईड” शेजारीण मला हाक मारतेय. रात्रीचे साडेआठ वाजलेत. नवरा चारपाच दिवसांसाठी  समुद्रांत् गेलाय त्यामुळे घरात मी आणि सुनिधी दोघीच.



मी दरवाजा उघडला आणी एकदम “आं!!” केलं. आज दुपारभर लाईट नव्हते. टी एन ई बी ची लोकं काहीतरी खुसधुस करत होते. पण तेव्हा इतकं छान सरप्राईझ मिळेल असं वाटलं नव्हतं. चक्क नवीन स्ट्रीट लाईट्स. ते पण एल ई डी वाले. आमची अख्खी गल्ली रोशन रोशन झालेली.
दरवाजा उघडताक्षणी लेक बाहेर धावत गेली. शेजारीण, पलिकडची शेजारीण. तिच्या पलिकडची शेजारीण अशा सर्व रस्त्यांत उभ्या होत्या. आमचं नेहमीचं मिनिसंमेलन भरलं होतं. त्यांची मुलं रस्ताभर धावत होत्ती, माझी लेक त्यांना सामिल झाली.


“डेली मॉर्निंग वॉक!” वनिता माझ्या पाठीत गुद्दा घालत म्हणाली. “आता लाईट्स चांगले आहेत. पहाटे रोज उठून फिरता येईल.” मी मान डोलावली. या आधी पहाटेचे पाच वाजता फिरायला जायचे आमचे मनसुबे अनुक्रमे कुत्रा, गाय आणि रस्त्यात मध्येच पार्क केलेली बाईक यांनी उधळले होते. कुत्रे आमच्यामागे लागले, गायींनी केलेल्या प्रातर्विधीमध्ये वनितानं पाय घातलेला आणि त्या उभ्या असलेल्या बाईकला मी जाऊन धडकलेले. सगळं एकाच दिवशी नव्हे.  “आजपासून मॉर्निंग वॉक”करायचा असं दोन तीन महिन्यातून एकदा आम्ही ठरवतो. मग आज की उद्या की परवा अशा चर्चा घडत राहतात..मग क्वचित एखाददिवशी मी लवकर उठते, तिला फोन करते तर ती उचलत नाही, मग आम्ही परत चर्चा करत राहतो. नंतर साताठ दिवसांनी ती लवकर उठून मला फोन करते, तेव्हा मी गाढ झोपेत असते. मग कधीतरी मुहूर्त लाभतो आणि आम्ही घराबाहेर पडतो. मग आहेतच... कुत्रे, गायी आणि बाईक.



आता अशी काहीच कारणं द्यायची गरज नाही कारण रस्ता पूर्णच उजळून निघालाय. आता रात्रीअपरात्री फिरायला भिती वाटणार नाही. लाईटचा एक पोल आमच्याच घरासमोर असल्यानं आम्हाला तर आता पुढच्या अंगणामधला लाईट लावायचीदेखील आवश्यकता नाही. इतका मस्त उजेड आहे.


आम्ही लगेच गच्चीवर जाऊन सगळ्या गावाचा नजारा पाहिला. गाव काय छान दिसत होतं! इथं रहायला आलो तेव्हा मी “महिनाभर सुद्धा राहाणार नाहीय, नवीन जागा शोध” असं नवर्‍याशी भांडभांड भांडले होते. महिने जाता जाता तीन वर्षं झाली. तीन वर्षं. आणि आम्ही इकडचेच होऊन गेलो.



इथं रहायला आलो तेव्हा, रस्त्यांवर लाईट्स नव्हते. अधेमध्ये कुठेतरी एखाद्या पोलवर ट्युबलाईट होत्या. त्यांचा उजेड जेमतेम. रस्ता पण नव्हता. कच्चा लाल रस्ता. मागच्या वर्षी इथं डांबरी रस्ता झालाय. आम्ही आलो तेव्हा किराण्याची जेमतेम दीड दुकानं होती, आता “सुपरमार्केट” असा शेरा घेऊन चार पाच दुकानं उपलब्ध आहेत. सुरूवातीला “किराणा घरी पोचता कराल का?” या प्रश्नाला “चला फुटा इथून. उचलून न्यायचं तर न्या नाहीतर राहूदेत” असं उत्तर मिळालं होतं. आता या सुपरमार्केटचे मालक “फोन करदो हम घर भेजेंगा” असं सांगतात. तरी अजून गावात एकही फोनवर ऑर्डर घेणारं हॉटेल आलेलं नाही. ते चालू झालं की एकदमच झकास वाटेल.



आमचं हे गाव कागदोपत्री “चेन्नई”मध्ये येतं. पण प्रत्यक्षात आम्ही चेन्नईपासून बरेच दूर आहोत. मध्ये एक मोठा इंडस्ट्रीअल एरीया आहे. एन्नोरपोर्टला जाणारा हायवे आमच्या गावावरून जातो त्यामुळे ट्राफिक जाम हा आमच्या पाचवीलाच पूजलेला आहे. चेन्नईमध्ये जाणंयेणं अतिमुश्किल वाटावं असं इथलं पब्लिक ट्रान्स्पोर्ट आहे. पण हळूहळू चीटशीट मिळत गेल्या आणि मद्रासमध्ये एकटीनं फिरणं जमायला लागलं.



तीन वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडून टॅक्सीत बसलो तेव्हा आजूबाजूच्या गर्दीनं, धुळीनं आणि घाणीनं बेजार झालो होतो. पहिल्याच क्षणी मद्रास अजिबात आवडलं नाही. स्टेशनवरून आम्ही या आमच्या भागाकडे निघालो आणि हे शहर अजिबात रहाण्यालायकदेखील नाही, असा शोध लागला... कारण त्या ड्रायव्हरनं मद्रासमधले तमाम रस्ते सोडून आमच्या या भागाकडे येण्यासाठी डंपिंग ग्राऊंडमधला रस्ता निवडला होता.



“दैंया ये मे कहां आ फंसी” असं गाण्ं मनातल्या मनात वाजायला लागलं. सोबत नवरा आणि दोन वर्षांची मुलगी आणि नवरा. आम्ही तिघंच. इतक्या  मोठ्या शहरात कुणीही ओळखीचं नव्हतं. भाषा येत नाही, ओळखपाख नाही आणि जवळ कुणीच नातेवाईक नाही...
स्टेशनवरून जवळजवळ दोनेक तासांचा प्रवास करून “मनाली न्यु टाऊन”ला पोचलो. नावावरून हे एखादं छोटंसं टुमदार उपनगर वगैरे असेल असं वाटलं होतं. वेल, छोटंस आहे, टुमदारही आहे. पण उपनगर नाही, खेडेगाव आहे. टाऊन असं नाव असूनदेखील आम्ही खेड्यांतच राहतोय.



पण गेल्या तीन वर्षांत या गावानं, या घरानं आम्हाला बरंच काही दिलं. “कशी लोक राहतात इथं?” असा प्रश्न सुरूवातीला पडायचा, मग हळूहळू या गावाच्या प्रेमात पडत गेले. या शहराच्या प्रेमात पडत गेले. मुंबईच्या जुहू चौपाटीपेक्षा मरीना बीच किती स्वच्छ आहे, आणि पुण्याच्या पब्लिक ट्रान्स्पोर्टपेक्षा इथलं ट्रान्स्पोर्ट किती जास्त फालतू आहे, यावर चर्चा वाद घडायला लागले. आधी भेळवडापावच्या आठवणीनं डोळ्यांत पाणी यायचं. आता बोंडा-सुंदल कुठं चांगले मिळतात याची माहिती जमा व्हायला लागली. एकेकाळी इडली डोशा केवळ नाश्त्याचे पदार्थ होते. आता लंच डिनरचे आयटमसुद्धा झाले.
खूप आधी एकदा आयपीएलच्या दरम्यान दोनतीनदा चेन्नईला आले होते. पण तेव्हा शहर भेटलंच नव्हतं. आता एकदम कडकडून भेटलं. ओळखीचं झालं आणि “माझं शहर झालं”



मद्रास ही मेट्रो सिटी खरंतर नावापुरतंच आहे. मुळात या शहराचा आत्मा खेडेगावाचा आहे.  इथं मुंबईसारखं धावतं लाईफ नाही. निवांत संथ गतीनं आरामात सर्व कामं चालतात. रात्रीअपरात्री मुलीबाळींना इथं फिरायला काही वाटत नाही. इथलं नाईट लाईफ म्हणजे पब आणि डिस्को नसून दाक्षिणात्य शास्त्रीय संगीताच्या कचेरी असतात. अशा संगीत महफीलिंना तरूण म्हातारे सर्वचजण मनापासून आनंद घेताना दिसतात. “बिर्याणी” हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मरीना बीच हा मद्रासचा केंद्रबिंदू आहे, इथे हीरो हे केवळ आवडते नसतात तर ते “देवस्थानी” असतात. पिक्चर पाहणं हा इथला टाईमपास नसतो तर ते एक नैमित्तीक कार्य असतं. अत्यंत कलासक्त, रसिक आणि प्रेमळ असं हे माझं सध्याचं गाव. आधुनिकता आणि परंपरा यांचं मिश्रण असलेलं हे गाव.





मद्रासमध्ये येऊन तीन वर्षं झाली असं वाटतसुद्धा नाहीये. यापुढचे लेख अशाच या मद्रासमध्ये राहण्याच्या अनुभवांबद्दल. इथल्या ठिकाणांबद्दल, खाद्यपदार्थांबद्दल, भटकंतीबद्दल, मैत्रीबद्दल आणि एकूणातच मद्रासबद्दल. 

Sunday, 6 September 2015

संंध्याकाळ

दिवसाभरामधली माझी सर्वात नावडती वेळ. संध्याकाळ. तिन्हीसांज. दिवस ढळायला आलेला असतो, रात्रीची कुठेतरी सुरूवात असते. सूर्य मावळतो, पण जाताजाता थोडाफार उजेड ठेवून जातो. हळूहळू तो उजेड काळोखानं निवळायला लागतो. आणि माझ्या मनाला कायमचीच हुरहूर लागते.
.. एक कसलीतरी अजब उदासी मनावर फिरू लागते.
संध्याकाळ नकोशी वाटते. कशाचीही अखेरच नकोशी वाटते. बहुतेक संध्याकाळी या घरात कोंडलेल्या अवस्थेमध्ये जात असतात, मच्छर येतील म्हणून दारंखिडक्या सर्व गच्च बंद करून बसायचं. बाहेर हळूहळू धूसर होत जाणारा त्या उजेडी-काळोखाचं मिलन बघायचंच नाही. श्वास रोखून धरल्यासारखं गच्च कोंडलेल्या अवस्थेमध्ये घरातच खुरटायचं...
संध्याकाळ ही प्रेमी लोकांची आवडती वेळ असते म्हणे. शाम हंसी, शाम जवां, शाम ढले वगैरे कित्येक गाण्यातून शेरोशायरीमधून ते झळकत असतंच. आमची गट्टी मात्र तलतच्या रेशमी आवाजामधून ठिबकणार्‍या शामे गम सोबतच जास्त जमणारी.  हल्लीहल्ली तर जास्तच. पण तो काळ असाहोताकी, संध्याकाळसुद्धा रोमॅण्टिक वाटायची. क्वचितच कधीतरी पण वाटायचे खरी.
सूर्यास्त झाल्यानंतर दिवस संपतो म्हणे. मग सुरू होते ती भुताखेतांची वेळ. करकरीत तिन्हीसांज चढत चढत जाते ती मध्यरात्रीपर्यंत. हा सगळा वेळ त्यांचा. जे काही अमानुष आहे, भयंकर आहे, भितीदायक आहे, आपल्या आकलनाबाहेरचं आहे- ही वेळ त्यांची. अंधाराच्या येण्याआधी देवासमोर दिवा लावायचा. शांत तुपाच्या वातीमध्ये जळत असलेली ती दिव्याची इवलाली ज्योत या सर्व अमानवी शक्तींसमोर पूर्ण शक्तींनिशी उभी ठाकून राहते. अमानवी शक्ती आहेत की नाहीत, हे मला माहित नाही, पण तरीही संध्याकाळी घरामध्ये लावलेला तो दिवा मला खूप आश्वासक वाटू लागतो.
तेवढ्यापुरतं बरं वाटतं पण तेवढ्याच पुरतं.... दबकत दबकत उदासी फेर धरून येतच राहते. किंबहुना उदासी हाच संध्याकाळचा स्थायी गुण असावा.
अशीच तीही उदासभरली संध्याकाळ.
ऑफिस सुटल्यावर घरी आले. ऑफिस सुटतं  पाच वाजून तीस मिनिटांनी मी घरी येते पाच वाजून पस्तीस मिनिटांनी, ते पण रमतगमत चालत आले तर. सकाळी ऑफिसला जाताना उशीर झाला तर तीन मिनिटांत पोचतेच. घराच्या समोर ऑफिस आणि ऑफिससमोर घर. मध्ये फक्त एक लांबच लांब पसरलेला रिकामा प्लॉट. आज दिवसभर ऑफिसात काम असं काही नव्हतंच. अख्खा वेळ याच्याशी त्याच्याशी बोलण्यात गेलेला.
घरी येऊन फ्रेश झाले. चहाकॉफीची काहीच सोय नाहीच, त्यामुळे येतानाच ऑफिससमोरच्या टपरीवरून वडापाव आणि चहा आणला होता. चहा गार व्हायच्या आधी पिऊन घ्यायला हवा. रात्री जेवणाचीही काही सोय नाही, बाहेरून ऑर्डर करावी लागेल. घरात करण्यासारखं काहीही नव्हतं. कंप्युटर नाही. टीव्ही नाही. पुस्तकं नाहीत, बोलायलापण कुणी नाही, एकाकीपणा सगळीकडून भरून आल्यासारखा. रिकाम्या घरासारखं वाईट काहीही नसतं.
फोनची बॅटरी संपत आली होती, तो चार्जिंगला लावला, त्याक्षणी शुभ वर्तमान कळाले. लाईट गेलेले होते. म्हणजे निवांत फोनवर गप्पा मारण्याचं ठरवलं होतं तेही गेलं. प्लास्टिकच्या पिशवीमधला चहा कपात ओतून घेतला. पावणेसहा होत आले होते.. हॉलमधल्या मोठ्या खिडकीला आता पडदे नाहीयेत. उघडीबोडकी दिसतेय ती खिडकी. तिथून बाहेर पहायलासुद्धा नको वाटतंय. बेडरूममधली खिडकी त्याहून लहान आहे. पण तिलाही पडदे नाहीत.
मच्छर यायची वेळ झाली म्हणून खिडक्यांच्या काचा ओढून घेतल्या. पण लगेच आता गरम होइल... खिळ्याला अडकवलेली गच्चीची चावी घेतली. मी ज्या फ्लॅटमध्ये भाड्यानं राहते त्यांचं हे स्वत:चं टेरेस. एरवी कायम कुलूपबंदच असतं. क्वचित सुट्टीच्या दिवही कधीतरी तिथं जाऊन वारा खात बसायचं. गच्ची म्हणजे काय फार मोठी नव्हेच, एका रूमइतकीच. पण त्याला वर मोकळं आकाश आहे, आणि दोन बाजूंनी भिंती नाहीत म्हणून गच्ची म्हणायचं.


गच्चीत घरमालकाचीच एक पत्र्याची खुर्ची आहे. जेमतेम अर्धा जिना चढून चहाचा कप घेऊन मी तिथं निवांत येऊन बसलेय. समोरची दिशा पश्चिम.. इथं बसलं की छान सूर्यास्त दिसतो. बिल्डिंगला लागून एक छोटा गावठाणातला रस्ता. त्यावर फारशी रहदारी नाहीच. त्याच्या पुढें रिकामा प्लॉट आणि मग त्याच्या समोर माझ्या ऑफिसची पिरॅमिडच्या आकारात बांधलेली विचित्र बिल्डिंग. प्लॉट आणि ऑफिसमध्ये मुख्य हायवे. त्यावरून गाड्या सणाणत धणाणत उधळत जाताहेत. या रस्त्यावर अद्याप सिग्नल नाहीत.  ट्राफिकचे नियम वगैरे गोष्टी तशाही ऑप्शनलाच असतात. तिथं कुणीतरी  अपघात प्रवण क्षेत्र असा बोर्ड टांगलेला आहे. दॅट शूड सम माय लाईफ ऍज वेल. साली सगळी जिंदगीच अपघात प्रवण. जरा कुठं सावरतंय म्हणेपर्यंत काहीतरी घडतंच. अचानक. अनपेक्षित आणि मग त्यानंतर सगळंच उलट सुलट पलटून जातं.


ऑफिसच्या बिल्डिंगपाठीमागे खाडी आहे. तिथून येणारा तुफान वारा जाणवतोय. खारा समुद्राचा वारा. सूर्य हळूहळू मावळायला निघेल. क्षितिजाच्या आसपास पोचला की मला दिसणार नाही. कारण अध्येमध्ये बिल्डिंगी आहेत.


चहा निवत चाललाय, पण प्यावासा वाटत नाही. माझ्या हातचा चहा किती छान दाट मसालेदार होतो, हा खूप पांचट आहे, मीच मला सांगते. आणि मग अचानक दचकते. “माझ्या हातचा चहा” हे आक्रित नक्की घडलंय कधी? मागे कधीतरी मीच घरी पुरणपोळ्या केल्या होत्या. आठवतंय? माझं घर.. माझा संसार... माझं आयुष्य!!! सगळंच हातातून सुटून निघाल्यासारखं निघालंय. परत एकदा डोक्यामधले शंकासूर नाचायला लागतात.


चहा होता तसाच एका घोटात पिऊन टाकला. चहा प्यायल्यासारखं वाटलंच नाही... पण ठिक आहे.


हा जो समोर रिकामा प्लॉट आहे ना तो खरंतर रिकामा नाही, त्याच्यावर एक अर्धवट बांधलेली बिल्डिंग आहे. गेली कित्येक वर्षं त्या जमिनीची कसली त री कोर्ट केस चालो आहे म्हणे. मी इथं पहिल्यांदा राहिला आले तेव्हा वाटलं की जर या बिल्डिंगचं बांधकाम चालू झालं तर आपलं काही खरं नाही, हॉल आणि बेडरूम दोघांच्याही खिडक्या एकदम समोरच की, त्या मजूर लोकांना वगैरे. बांधकामाची धूळ वगैरेचे त्रास तर होणारच. तेव्हा तडक दोन तीन दिवसांत मोहम्मद अलि रोडवर जाऊन जाड कापड आणलं आणि शिवून लगेच पडदे लावले. गेल्या दोन वर्षांत सुदैवानं ते बांधकाम काही चालू झालं नाही, आणि आता चालू झालं तरी पडदे जागेवरच नाहीत. तेपडदे कालच रात्री मी खोक्यात भरलेत. नवीन घरी वेगळे पडदे आहेत, म्हणजे हे पडदे लावायची गरज नाही. लक्कन सुरीनं एखादा तुकडा कापावा असं काहीतरी अचानक वाटून येतंय.  
हळूहळू अंधार पडत चाललाय. किंवा उजेड गायब होत 


चाललाय. कसं बघाल तसं म्हणा. सूर्यास्त झाला असणार. सगळ्याच भागाचे लाईट्स गेलेत त्यामुळे एरवी यावेळेपासून दिसणारे चमकणारी दुकानांची नावं हॉटेलचे बोर्ड वगैरे काहीच नाही. सगळीकडे दाटून राहिलेला तो गच्च राखाडी अंधार.
भणाण वारा सुटलाय. केस अस्ताव्यस्त उडतायत. पण सावरावेसे सुद्धा वाटत नाहीत. डोळ्यांवरचा चष्मा काढून बाजूला ठेवला. डोळे शांत मिटून वारा अंगाखांद्यावर घेत राहिले

.
आजचा दिवस संपला. खर्‍या अर्थानं संपला. 


आता येणार रात्र. काळी काळोखानं भरलेली. दिवस आणि रात्रीच्या मध्ये कुठंतरी हिंदकळत असलेली ही संध्याकाळ. इथून पुढं जे काही आहे त्याची काहीच कल्पना नाही, जे काही घडून गेलंय त्याचं आता काहीच होऊ शकत नाही. तो भूतकाळ झाला. दिवसाचा भूतकाळ आणि रात्रीचा भविष्य काळ यांच्यामध्ये कुठंतरी असलेलं ही वर्तमानाची संध्याकाळ. डोळे मिटल्यावर क्षणाक्षणाला काहीबाही दृश्यं नजरेसमोरून जायला लागतात. या घराशी जोडलं गेलेलं पहिलं नातं. कोयरीच्या पैठणीचा पदर उलगडावा तश्या आठवणी उलगडल्या जातायत. आठवायचं म्हटलं की काहीच आठवत नाही. सहजच डोकावल्यासारख्या स्मृती येतायत आणि जातायत.



घर ताब्यात घेतल्यावर आयुष्यात पहिल्यांदा केलेली झाडू फरशी सारखी कामं. तीपण एकटीनंच. नंतर  एकटीनंच बसून केलेली ती देवपूजा आणी मग दूध उतू घालवायचा विधी. हे खरंतर उगाचच. आई म्हणाली कर म्हणून. पण मग त्यानंतर पहिल्यांदाच करून घेतलेला चहा.. ऑफिसात सर्व चिडवतात, इतका गोड बासुंदीसारखा चहा पितेस म्हणून. पण मला चहा असाच लागतो. घट्ट, गोड आणि भरपूर उकळलेला. हा फ्लॅट भाड्यानं घेताना एजंट म्हणाला होता की याचा पायगुण चांगला आहे, जो कुणी इथं राहून गेलाय त्याचं चांगलंच झालंय.




इथं राहून माझं काय झालंय? चांगलं की वाईट? मुळात दोनतीन वर्षाचा कालावधी अश्याच दोन शब्दांमध्ये वर्णन करून संपतो का? चांगलं आणि वाईट! आज्जी गेली ती याच घरात असताना. प्रमोशन झालं ते याच घरात असताना. लग्नासाठी विनाकारण नकार ऐकले ते याच घरत असताना. “लग्न करेन तर तुझ्याशीच” असं तो म्हणाला तेही याच घरात असताना. मलेरीयाच्या तापानं रात्रभर एकटीच फणफणले तेही याच घरात असताना, आणि त्याच्या ओठांचा स्पर्श माझ्या ओठांना झाला तोही याच घरात असताना. काय चांगलं आणि काय वाईट... कसं ठरवणार? दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर दिवस येतो, संध्याकाळच्या या किर्र वेळी बसून रात्र चांगली की दिवस वाईट हे कसं ठरवणार?


मुळात जे घडलंय ते चांगलं के जे यापुढं घडणार आहे ते चांगलं. भविष्याची आजवर कधी भिती वाटलीच नाही... कारण भविश्यामध्ये कसलीच अनिश्चितता नव्हती, काळजी नव्हती. एकाकी भविष्याची किती म्हणून तमा बाळगायची...

मनामध्ये अजून गणितंच चालू आहेत. संपलेल्या दिवसांचे हिशोब होत आहेत. हरवलेल्या रात्रींचे अजून बाकी आहेत. भोवतालचा उजेड सेकंदासेकंदाला कमी होत जातोय. अजून लाईट आलेले नाहीत. सूर्य मावळल्यावर जाणवतंय. मळभ दाटलंय. पाऊस तर पडणार नाही, पण या मळभानं माझ्या मनातली उदासी अजून गहिरी होतेय त्याचं काय...


खरंतर उदास वाटायला नको. आनंद वाटायला हवा, पण वाटत नाहीये हेही खरंच. कुठून्तरी मनामध्ये काहीतरी आत आत तुटत चालल्यासारखं वाटतंय. माझंच काही तरी चुकतंय़ का? किती दिवस आपण या दिवसाची वाट पाहिली. काय –काय नि कसं कसं ठरवून ठेवलंय. अमुक करू, तमुक करू. मग आज अचानक या स्वप्नांपेक्षा हा एकटेपणा अचानक का महत्त्वाचा वाटायला लागलाय? काय बदलणार आहे नक्की? आयुष्य आहे, ते पुढे जाणारच. मागे काही व्यक्ती आयुष्यातून वजा झाल्या, आता काहींची बेरीज होणार.. आयुष्य आहे, ते पुढे वाहणारच. पण गणीतासारखंच आयुष्य इतकं कॉम्प्लीकेटेड का करून ठेवलेलं असतं आपणच..


हे घर ही वास्तू... आपल्या आयुष्यामध्ये केवळ दोन वर्षांसाठी आली. त्या दोनच वर्षांनी आपलं अख्खं आयुष्य डीफाईन होऊ शकतं का..


का नाही होऊ शकत? माझ्या केवळ एका निर्णयानं जर माझं आयुष्य बद्लू शकतं तर या दोन वर्षांमुळे आयुष्याचा लेखाजोखा मांडला जाऊ शकत नाही का? या दोन वर्षांनी मला घडवलं. अगदी छोटया छोट्या गोष्टीमध्ये मी कोण आहे आणी मला काय हवंय हे मला सांगितलंय.


म्हणजे मला काय हवंय हे मला स्पष्ट माहित असतानासुद्धा मी हा जुगार का खेळतेय.. जुगारच नाहीये का? जोपर्यंत निर्णय तुमचा तुम्ही घेत असता तो पर्यंत तो जुगार नसतो,. पण ज्या क्षणापासून तुमचे निर्र्णय दुसर्‍या कुणावर अवलंबून रहायला लागतात तेव्हापासून जुगार चालू होतो. फासे पडायला सुरूवात होतेच.



रात्र अंधारी असते म्हणून इतकी गूढ असते का? की ती गूढ असते म्हणून अंधारी होऊन येते. निर्णय घेण्याआधी जी घालमेल अस्ते ती फारच सुसह्य असते. निर्णय घेऊन झाल्यावर जी वाट पहावी लागते ती मात्र जीवघेणी असते. इट्स डन. तू हे ऑलरेडी निवडलं आहेस. हा निर्णय तुझा आणी फक्त तुझाच होता. मी स्वत:लाच समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करतेय. पावसाचे चुकारमुकार थेंब आकाशामधून खाली येऊन त्यामध्ये  उगाच स्वत:ची हांजी सांगून जातात. हा असला रिप्चिप पाऊस मला बिल्कुल आवडत नाही. बावा, पडायचंय ना तर सणकून कोसळ. असा कोसळ की मनामध्ये आणि डोळ्यामध्ये केवळ तूच राहशील. मग कदाचित इतकी सैरभैर होणार नाही मी. दोन पावलं कधीचीच पुढं टाकलीत. आता कितीसं अंतर उरलंय? पण तरीहे अंतर चालताना जीव मेटाकुटीला आलाय हे मात्र खरं. इतके दिवस मनामध्ये केवल प्रश्न होते, आज आता या क्षणी मात्र त्या प्रश्नांनी वादळ चालू केलंय.



चुकलं तर मागे फिरायचा रस्ता शिल्लक नाही. निर्णय चुकला तर “वेगळं” होता येईल पण परत हे असं “एकटं” होता येणार नाही. एकाकी, एकटं, बेफाम, बेफिकीर, बिनधास्त आयुष्य. माझं आयुष्य!!
टिपिकल भारतीय मध्यमवर्गीय विचारसरणीमध्ये लहानाची मोठी होऊनसुद्धा मी का या एकाच विषयाबद्दल इतकी का साशंक आहे. बरोबरीच्या मुलींनी अगदी नेटवर चॅट करून दहा दिवसांत लग्नंसुद्धा केली. त्या खुश आहेतच की. मला ते जमणारच नाही. प्रश्न केवळ खुशीचा नाही, मुळात बेसिक प्रश्न एकच आहे... का? “लग्नच का करावं?” हा प्रश्न मी स्वत:ला कित्येक्दा विचारतेच आहे. उत्तर मिळत नाही. मी लग्नाला नकार दिलाय याचा अर्थ त्यानं सोयिस्कररीत्या “त्याला” नकार दिलाय असा लावून घेतलाय... त्यावरून चिडला,, भांडला, हातदेखील उगारला. पण मला तो हवाय पण “लग्न” हे कृत्रिम नातं नकोय हे त्याला समजत नाहीये.. कसं समजणार?


घड्याळात किती वाजले होते कुनास ठाऊक... कितीवेळची इथं एकटीच बसून आहे. काळोख पूर्ण दाटलाय. लाईट नाहीतच. अंधारातच जिन्यावरून खाली आले. चाचपडायची वगैरे काही गरज नाही. इतका हा जिना सवयीचा झालाय. दाराची कडी उघडून आत आले. माझ्या घरामध्ये मला वावरायची चांगलीच सवय. रात्रीअपरात्री जाग आली तर एकही दिवा न लावता मी घरभर आरामात फिरू शकते. आजही फिरेनच...


आईग्गं! या कळवळ्या शब्दानंतर स्वत:साठी एकच इरसाल शिवी घातली. हा खोका इथं वाटेत मीच सकाळी ठेवलाय. दोन वर्षांतल्या सवयीमध्ये पायाला या खोक्याची सवय नव्हती. चांगलाच जोरात लागलाय. आता मात्र स्वत:वरचा आत्मविश्वास थोडाडळमळतोय. हातानं चाचपडत मला खुर्ची कुठे सापडतेय का ते बघते.  हाताला टेबल लागलंय, त्यावरचा मोबाईल. अजून बॅटरीमध्ये थोडी धगधुगी आहे. काही म्हणा, हे जुने नोकियावाले मोबाईल बॅटरीच्या बाबतीत फार दणकट होते. बाहेर पाऊस अजून झिमझिमच पडतोय. दिवसभर घरात साचलेला तो कुबटपणा आता संध्याकाळपासून खिडक्या बंद असल्यानं अजून जास्त जाणवतोय.


हाताशी जवळच ठेवलेल्या सॅकमधून टॉर्च शोधते. त्यानंच काल सांगितलं होतं आयत्यावेळी अलगनार्‍या वस्तो हाताशी राहू देत. इतर सर्व सामान मी कालच पॅक केलंय.


तिन्ही सांजेच्या त्या अर्धवट काळसर उजेडामध्ये मी एकवार माझ्या घरावर नजर फिरवली. दोनच खोल्या, पण त्याही रिकाम्या, भकास. गेल्या दोन वर्षांमधला संसार सगळा खोक्यांमध्ये रचून ठेवलाय. आजची रात्र या घरामधली शेवटची रात्र..


पण त्या रात्रीच्याही आधी असह्य होत जाणारी ही जीवघेणी संध्याकाळ. कधी एकदा पूर्ण रात्र पडतेय असं वाटायला लावणारी कातर कातर संध्याकाळ. खिडकीजवळ खुर्ची आणून बसलेय. वेळ जाता जात नाहीये. पण वेळ जाण्यासाठी काही करण्यासारखंदेखील नाही.


गेली आठ दिवस पॅकिंग करतेय. आधी क्वचित लागणार्‍या वस्तू. मग कपडे. मग किचनमधलं सामान. आज सकाळी ऑफिसला जायच्या आधी गॅस सिलेंडर परत केला. शेगडी खोल्यात घालून पॅक केली. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर पाटावर ठेवलेले देव आणि असंच उरलंसुरलं सामान पॅक करायचं होतं. पण आता लाईट नाहीत म्हणून देव अजून तसेच आहेत.


तश्याच त्या काळोखामध्ये उठले. नकळत हात जोडले. मी काही फारशी देवभक्त वगैरे नाही... पण तरी आता या क्षणाला देवांचं अस्तित्व हवंहवंसं वाटत होतं. कुणीतरी माझी या आततायी निर्णयामध्ये पाठराखण करतंय असं सांगायला हवंय. अंधार असूनसुद्धा सवयीनं निरांजन लावलं. तुपातल्या निरांजनाचा स्निग्ध प्रकाश पाटावर पडला. बालगणेश तो प्रकाश पाहून गालातल्या गालात हसला. मी परत हात जोडले. “मला कधी विसरू नकोस” मी हळूच कानात सांगितल्यासारखं कुजबुजले.


तो विसरेल किंवा आठवणीत ठेवेल. पण त्याच्या भरवश्यावर मला राहता तर येणार नाही. परत एकदा मनावर उदासीची गर्द छाया अंधारून आली. अचानक माझंच मला जाणवलं. संध्याकाळ फक्त बाहेरच होत नाहीये. कुठंतरी माझ्या मनामध्ये पण होतेय. इतके दिवस असलेला आनंदाचा उजेड हळूहळू काळोखा होत चाललाय. साशंकतेची काजळी रात्र बनत चालली आहे.



मोबाईल आता मात्र बंद पडलाय. मघाशी दिसणार्‍या उजेडात पाहिलं होतं तेव्हा साडेसात वाजले होते. लाईटचा अद्यप पत्ता नव्हता. किती वाजले होते त्याच्याशी आता काही देणंघेणं नव्हतंच. घरात नेहमी घालायचा टीशर्ट पायजमा घालूनच बाहेर पडले. नाहीतरी आपल्याला उद्या इथून जायचंय. कोण काय म्हणणार आहे? इतके दिवस तरी कुणाच्या म्हणण्याला काय किंमत दिली? घराजवळच्या हॉटेलामध्ये थाळीची ऑर्डर दिली. फोनवरून हेच मागवलं असतं पण आता फोन बंद पडला होता. अवघ्या तीन चार तासांपूर्वी ठरवलेल्या प्लानचा इतका मस्त फज्जा उडताना डोळ्यांसमोर दिसत होता. आणि मी अख्ख्या आयुष्याचे प्लान रचायला बघत होते. वेड लागलंय बहुतेक मला. हॉटेलात पण लाईट नव्हते. इव्हर्टरच्या जीवावर कुठंतरी तीन चार ट्युबलाईट मिणमिणत होत्या, इतकंच. उजेड एक तर लख्ख असावा नाहीतर संपूर्ण काळा काळोख. या असलय मिणमिणत्या उजेडात माझं डोकं दुखायला लागतं. वेटरनं आणून दिलेलं जेवण मुकाट गिळलं.


संध्याकाळ आता रात्र बनली होती. पण नेहमीची प्रसन्न रातराणी वगैरे नव्हे, तर संध्याकाळचीच उदासी अजून गहिरी झाल्यासारखी रात्र. इतके दिवस आपला निर्णय कदाचित चुकीचा आहे, असं वाटत होतं. या राखाडी ढगाळ संध्याकाळीनं त्यावर जणू शिक्कामोर्तबच केलं. माझं चुकलंय का? मी माझं आयुष्य दुसर्‍या कुणाच्या हाती सोपवायचा विचारच कसा करतेय.. घरी आले तेव्हा पाऊस किंचित जोरात चालू झाला.


करण्यासारखं काहीच नसल्यामुळे बेडवर येऊन पडले. त्याला सांगावं का... नाही येत मी तुझ्यासोबत. आपण वेगळेच राहू. किंबहुना आपण वेगळेच होऊया. मला एकटंच रहायला आवडेल. किती दिवस एकटी राहशील हा प्रश्न तो विचारणारच. त्याचं उत्तर मात्र माझ्याकडेही नाही. माझ्या या एकटेपणाच्या बदल्यात मला तू हवा की नको... या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. प्रेम, रोमान्स, मोहब्बत वगैरे संकल्पनांवर माझाच काय त्याचाही विश्वास नाही. आपण उर्वरीत आयुष्य एकमेकांसोबत काढू शकतो का हाच केवळ प्रश्न. त्याचं उत्तर होकारर्थी, माझं नकारार्थी!


“एकटी राहून तू सिनिकल होत चालली आहेस” तो मधूनच मला एकदा म्हणाला होता. असेलही कदाचित. पण हा एकटेपणा मला मनापासून भावतोय हे समजायला इतकं कठीण आहे का?


विचारांचा हायवे सुरू झाला की एक बरं असतं. मेंदूला काही कामच नसतं. कंप्युटरच्या गेममध्ये कसे कुठूनही कुणीही येत राहतात तसे कुठल्याही कोपर्‍यात साठवलेल्या आठवणी येतच राहतात. डोळे मिटून पडून राहिले.


आजची ही शेवटची रात्र. उद्यापासून तो सोबत असणार...


किंवा कदाचित नाही. श्या!! फोन चालू असता तर आताच फोन करून सांगितलं असतं... नको म्हणून. लाईट असते तर आता सगळं सामान खोक्यामधून काढायला  सुरूवात केली असती. माझा संसार. माझं घर. माझं आयुष्य.


विचार करता करता कधी डोळा लागला कळलंच नाही. गेली दोन-तीन रात्री पॅकिंग करत बसल्यानं धड झोप लागलीच नव्हती...
जाग आली ती टणाटना वाजाणार्‍या बेलमुळं. जागी झाले तर दोन सेकंद कळेचना, मी कूठं आहे...माझं घर पूर्णपणे अनोळखी होऊन माझ्याकडे टक्क बघत बसलं होतं. रात्री झोप लागल्यावर कधीतरी लाईट आले होते. मी झोपताना बहुतेक सर्व दिवे चालू ठेवले असणार. बेल परत एकदा वाजली. भिंतीवर घड्याळ नव्हतं, किती वाजले माहित नाही. बाहेर पाऊस जोरजोरात बरसत होता. मध्यरात्र नक्कीच होऊन गेली होती.


दार उघडलं तेव्हा तो बाहेर चिंब भिजून उभा होता. “फोन का बंद आहे? केव्हाचा ट्राय करतोय. मेसेजेसलापण उत्तर नाही.” त्याचा आवाज माझ्यावर चिडल्यासारखा, वैतागल्यासारखा. पण त्या वैतागापाठीमागे दडलेली प्रचंड मोठी काळजी. ढगाळ संध्याकाळीमागे दडलेल्या वादळी रात्रीसारखी.


मी काही न बोलता पेंगुळल्या डोळ्यांनी त्याच्या गळ्यात हात टाकते.


निर्णय घेऊन झालाय, आता तो निभवायचाय. इथून पाठी फिरणं शक्यच नाही. दोघांनाही.


फासे फेकून केव्हाचे झालेत, आता दान काय पडतंय त्याची केवळ वाट बघायची.




Thursday, 30 July 2015

स्पर्श (भाग २)

तो पुढं काहीतरी उत्तर देणार तेवढ्यात दारावरची बेल ऐकू आली. घड्याळात रात्रीचे साडेदहा वाजले होते. रात्रीएवढ्या वादळांत त्याच्या घरी कुणीही येण्याची शक्यता नव्हती. त्यानं टेबलावर ठेवलेला टॉर्च हातात घेतला.
“कोण आहे?” त्यानं दार उघडायच्या आधी जोरात विचारलं. मग कपाळावर हात मारून घेतला “यारदु?” असं तमिळमधून विचारलं.
बाहेरून कुणी काही उत्तर दिलं असतं तरी याला ऐकू आलं नसतं इतका पाऊस पडत होता. बेल परत एकदा वाजली. यावेळी बाहेर कुणीतरी चोर दरोडेखोर असायची शक्यता कमी आणि पावसानं भिजून त्याच्याकडं आडोश्याला आल्याची शक्यता जास्त. त्यानं दार उघडलं. त्याला वाटलंच होतं तसं बाहेर मिट्ट काळोखामध्ये कुणीतरी रेनकोटमधूनदेखील नखशिखांत भिजून उभं होतं.
“सार, मल्लिगै.” एक कुडकुडता बारीक आवाज ऐकू आला. त्यानं दाराबाहेर उजव्या बाजूला असलेला दिवा लावला. बल्बचा प्रकाश एका वीसबावीस वर्षाच्या मुलीवर पडला. पण इतक्या रात्री ही इथं कशी काय? “पोन्नीअम्मा डॉटर”
“कम इन्साईड” तो दारामधून बाजूला होत म्हणाला. “व्हॉट हॅपन्ड?”
त्याच्या इंग्लिश प्रश्नाला तिनं तमिळमधून उत्तर दिलं. त्याला त्यातलं बरंचसं समजलं नाही तरीही “सार, स्कूटर घेऊन शहरात गेले होते. रात्रीपर्यंत परत येणार होते. पण वाटेत स्कूटर पंक्चर झाली आणि लेट झाला. पाऊस इतका सुरू झाला की मी खूप हळूहळू आले. पण नेमकं ओढ्याचं पाणी चढलंय, स्कूटर घेऊन जाता येणार नाही, पण रस्त्यावर कुठं स्कूटर ठेवली आणि चोरली तर? म्हणून म्हटलं तुमच्याकडं स्कूटर पार्क करेन आणि सकाळी पाणी ओसरलं की घेऊन जाईन” तिनं हातानं त्याच्या गॅरेजजवळच्या पोर्चमध्ये ठेवलेली तिची स्कूटी दाखवली.
त्यानं एक एक तमिळ शब्द आठवत तिला विचारलं. “रोडले तन्नी इरक्का इप्पडी पोना?” रस्त्यावर पाणी आलंय़ तर जाशील कशी?
“ना स्विम पण्णी पोइटवे. येणकु पळक्कमदां”पण तिची भिजलेली अवस्था समोर दिसत होती. थंडीनं ती पूर्ण थरथरत होती. ही काय अख्खा रस्ता पोहून पार करणार होती. जेमतेम चाळीस किलोचा ऐवज असेल .पाण्यासोबत वाहून गेली असती म्हणजे. तिनं डोक्यावरची टोपी काढली. तिचा चेहरा बल्बच्या प्रकाशामध्ये दिसला.. पण पोन्नीअम्मासारखेच हिचे डोळेपण काजळी काळेभोर होते. चेहर्यााला एक कोरीव देखणेपणा होता.
“नाईट इंगे स्टे पन्नु. गो इन द मॉर्निंग” तो अचानक म्हणाला. तिच्या चेहर्य़ादवर पराकोटीचं आश्चर्य दाटून आलं. “सार. येन्न, येन्न सोळरींग?” ती पुटपुटली.
साहजिकच आहे म्हणा, तो स्वत:लाच म्हणाला. मी इथं या बंगल्यात एकटा आणि ही तरूण पोरगी. रात्रभर इथं राहून सकाळी जा. असं कोण राहील! आता काय ही पोरगी घरात आली म्हणून काय दोघं लगेच एका बेडावर झोंबाझोंबी थोडीच करणार आहोत... ती हॉलमध्ये झोपेल! मी माझ्या बेडवर. पण दोघांनाही काही प्रॉब्लेम नसला, अगदी दोघांनी एकमेकांना स्पर्शदेखील केला नाही तरी पण हा साला समाज नावाचा व्हिलन असतोच की कायम आजूबाजूला. शिवाय ती काय तुला फार ओळखत नाही. मग इतक्या सहज कोण रात्रभर तुझ्यासोबत थांबेल. तू प्यायलेला आहेस हेही तिच्या एव्हाना लक्षात आलं असेलच की. मघापासून तिसर्यांणदा त्याला आज आपण दारू प्यायल्याचा पश्चाताप झाला.
“डू वन थिंग” तो स्वत:लाच विनाकारण सावरत म्हणाला. “थोडावेळ थांब. भिजली आहेस ते जरा वेळ थांब, कॉफी वगैरे घे आणि गावात कुणालातरी फोन कर. कोणतरी तुला न्यायला येईलच. मग तुला जाता येईल. एवढ्या अंधाराचं एकटीनं जाणं ठिक नाही” त्यानं उच्च प्रतीचं तमिळ झाडलं, पण काहीतरी गडबड झाली असणार कारण मल्लिगेच्या चेहर्यांवर हसू आलं होतं.
“नो सार. आय विल गो” तीच इंग्रजीवर येत म्हणाली. ती अजून दारांतच उभी होती. आता पावसाची झड इतक्या जोरात होती की पडवीमधून दारात आणि दारातून आत पाणी येत होतं.
“कम इन्साईड. मळैले रोम्बा वेट आईट. आय विल कॉल पोन्नीअम्मा. नी मायहोम इरक्का सोळरें. डोन्ट वरी. कम!” तो दरवाज्यामधून बाजूला होत म्हणाला. ती बिचकत दोन-तीन पावलं आत आली. त्यानं पाठीमागे दार लावून घेतलं. अचानक घराचा उबदारपणा तिला जाणवला असणार. तिच्या रेनकोटमधून अजूनही पाणी निथळत होतं. तिनंडोक्यावरची टोपी काढली. मागच्या वेळी कधीतरी पोन्नीअम्मासोबत ती आली होती तेव्हा त्याच्या नजरेत तिच्या फक्त दोन गोष्टी भरल्या होत्या. कमरेपर्यंत लांब असलेले ते कुरळे जाड केस आणि ते केस ज्या कमरेपर्यंत होते ती गोलगरगरीत कंबर.
“डीकाशन इरूक्कु.यु विल हॅव कॉफी?” त्यानं विचारलं.
“अं.. वेणां सार!.” तिनं रेनकोट उतरवला. आतमधला तिचा एकेकाळला हिरवा असलेला सलवार सूट आता रंगपंचमी खेळून आल्यासारखा दिसत होता. नवीनच घातलेल्या सुती कपड्याचा यथेच्छ रंग गेला होता, ती रेनकोट उतरवत असतानाच त्यानं तिच्यावरून नजर हटवली होती. पण मध्येच त्यानं चोरून नजर टाकली तेव्हा सुतीकपडा अंगाला जागोजागी चिकटलेला त्याला दिसलाच होता. मल्लिगे गेली साताठ वर्षं भरतनाट्यम शिकत होती, आणि त्या नृत्यामुळं शरीर कसं आणि कुठं घाटदार होतं हे त्याला समोर दिसतच होतं.
त्यानं टेबलावर ठेवलेला मोबाईल उचलला. “कॉलिंग पोन्नीअम्मा. यु स्पीक” त्यानं नंबर डायल केला. “स्विच्ड ऑफ. एनी अदर नंबर इरूक्कु?”
तिनं खांद्याला लटकवलेली बॅग खाली ठेवली. त्यामधून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेला मोबाईल बाहेर काढला. इतकी काळजी घेऊनसुद्धा मोबाईल पूर्ण भिजलेलाच होता. “माय मोबाईल इज वेट”
“नो प्रॉब्लेम. लेट मी सी इट. मी कोरडा करून चालू करेन” त्यानं तो मोबाईल घेतला आणि पुसला.
“अम्मा नंबर मट्टुमदां न्याबगम इरुक्कु. मतद्देलां मोबाईलदां इरुक्कु. नोबडी नंबर रीमेम्बर” ती म्हणाली. तो हसला, मोबाईलमध्येच नंबर असल्यानं हल्ली कुणाच्याच लक्षात नंबर राहत नव्हते असं ती म्हणाली खरं.
“मुरूगैय्या कॉल पंटा?” त्यानं विचारलं. गावामध्ये कुणापर्यंत तरी किमान निरोप पोचला तरी बरं पडलं अस्तं. तिनं नुसतीमान डोलावली. मुरूगैयाचा फोन रेंजच्या बाहेर होता. त्याच्याकडं गावामधल्याच अजून कुणा एका दोघांचे नंबर होते पण सगळेच रेंजच्या बाहेर. “नेटवर्क प्रॉब्लेम व्हेरी डिफीकल्ट टू कॉल” तो म्हणाला.
“सार. मोबाईल इंजीनीअर? नेटवर्क इल्ला? तिनं विचारलं. अगं मुली, मी मोबाईलचा इंजीनीअर नाही गं, माजे सॅटेलाईट्स सेल्युलर नेटवर्क्ससाठी नाहीत, त्यांचं वेगळंच कम्युनिकेशन. पण हे इतकं तिला सांगणार कसं आणि सांगितलं तरी तिला कितपत समजणार होतं!
“नो, नो नेटवर्क” तो इतकंच म्हणाला.
ती अजूनही दरवाज्याजवळच कुडकुडून हात छातीजवळ घट्ट धरून उभी होती. “कम इन्साईड.ड्रेस चेंज. गेट फ्रेश. दिस हाऊस ओन्नुम पुदुसु इल्ले. मेक समकॉफी?” तो किंचित वैतागत म्हणाला. एक तर रात्रीपरात्री कुणी घरी आलेलं त्याला फारसं आवडलं नव्हतं. अचानक वाटलं, चांगुलपणा म्हणून उगाच हिला घरात बोलावलं. इतकी वर्षं याच भागात राहतेय. कशीही करून घरी गेलीच अस्ती. स्कूटी इथंच ठेवायची तर मला सांगायची पण गरज नव्हती.
मग अचानक वाटलं उगाच इतके वैतागलो, बिचारी एक तर इतक्या पावसांत भिजून आली ते पण अशी दुसर्यााच्याच घरी. घराची तिला सवय असली तरी आईसोबत आल्यावरच, असं रात्री अपरात्रीची सवय थोडीच असणार. मुलगी जरातरी भेदरलेली असणारच की. घरात बोलावलं तर काही उप्कार केले नाहीत, पोन्नीअम्मा आपल्यासाठी इतकं करते, आपल्याला इतकंही करता येऊ नये. आपणच तिला कॉफीची ऑर्डर काय म्हणून दिली.. आपले सगळेच मॅनर्स सध्या बासनात गुंडाळलेत. “ड्रेस चेंज कर. आय विल मेक कॉफी.” तो वरमून म्हणाला.
“सॉरी”
“वेणां. सार, नाने पोडरं”ती एकदम सहजपणं म्हणाली. त्याच्या वागण्यामधला बदल तिच्याही लक्षात आला असणार. “यु ट्राय अम्मा नंबर. मेसेज आय ऍम हीअर” म्हणत ती आधी बाथरूममध्ये गेली. तिला त्याचं घर चांगलंच माहित होतं. तो दिवसभर साईटवर काम करत असताना ती पोन्नीअम्मासोबत कितीदातरी मदतीला म्हणून यायची. ती आत गेल्यावर त्यानं बेडरूममध्ये जाऊन एक स्वच्छ टॉवेल आणला आणि बाथरूमसमोर ठेवला. अचानक आठवल्यासारखा परत बेडरूममध्ये गेला, त्याच्या कपाटामध्ये कुठंतरी आईचा एक जुना गाऊन राहिला होता. मागच्यावेळी ती आली होती तेव्हा विसरून गेली होती. त्यानं कपाटामध्ये उचकापाचक करून तो गाऊन काढला. “मल्लिगा, टेक दिस” त्यानं तो गाऊन आणि टॉवेल बाथरूमच्या दरवाज्याला अडकवत सांगितलं. तिचं आवरेपर्यंत तो सवयीनं पीसीसमोर बसला. ताराचे दोन मेसेज आले होते “गायब?”
त्यानं परत हाय टाईप केलं. सेकंदभरात तिचा परत मेसेज आला. “काय रे? कुठं गायब?”
“काही नाही. इथं पाऊस खूप आहे”
“मग? लाईट गेले?”
“गेले असतील. मला इन्व्हर्टर बॅकप आहे. पण माझ्याकडे ती मेड येते ना... तिची मुलगी पावसात फसली. गावाकडे जायला ओढा लागतो तिथं पाणी वर आलंय. तिला जाता येणार नाही.”
“म्हणून?”
“म्हणून ती इथं आली. बिचारी जाईल तरी कुठं?”
“शाळेत वगैरे जाते का?”
“नाही गं! मागच्या वर्षी कॉलेज झालंय. इथं तालुक्याला कसल्याशा दुकानामध्ये जॉब करते.”
“ओय होय! एकदम रूप तेरा मस्ताना सीच्युएशन. टोटल बॉलीवूड स्टाईल हां!” तिनं डोळा मारल्याचा स्मायली पाठवला.
“शटाप!” त्यानं गरागरा डोळे फिरवल्याची स्मायली टाईप केली. प्रत्यक्षात असे डोळे कोण फिरवत असेल कुणास ठाऊक. “तू अजून जागी कशी काय?”
“जस्मीतची वाट बघतेय. त्याला लेट होइल” पुन्हा एकदा त्याच्या मनामध्ये संतापाची हलकी लकेर येऊन गेली. बॉयफ्रेंड येईपर्यंत ती त्याच्याशी गप्पा मारेल. तो आल्यावर मग याला “बाय! स्वीट ड्रीम्स” करेल आणि त्याच्या कुशीत शिरेल. इथं हा नुसताच कुशी पालटत राहील. तारा आणि जसमीत आता या क्षणी एकमेकांच्या मिठीत आहे आठवून वैतागत राहील. पण हे सर्व मनात. आता मात्र त्यानं नुसतं “ओके” इतकंच टाईप केलं. त्यानं चॅट विंडो उघडून पाहिलं, आज अजून सानियापण ऑनलाईन आलेली दिसत नव्हती.
बाजूच्या विंडोमध्ये गुलशननं त्याला पिंग केलं होतं. गुलशन त्याचा जिगरी दोस्त. प्रत्यक्षात दोघं एकदाही भेटले नव्हते, पण फोनवर चिकारवेळा बोलणं झालं होतं. गुलशन गझल लिहायचा (गुलशन हे काय त्याचं खरं नाव नव्हतं. त्याचं खरं नाव “दत्तात्रय रामचंद्र उपाध्ये” होतं. इतक्या आध्यात्मिक नावानं तो फक्त भजनं लिहू शकला असता. म्हणून त्यानं गझलांसाठी गुलशन असं नाव घेतलं होतं) खरंतर याला त्या गझलांमधलं काहीही समजायचं नाही. कोण रदीफ कोण काफिया कोण मक्ता आणि कोण नुक्ता अशी त्याची अवस्था. तरी त्याला गुलशनसोबत गप्पा मारायला आवडायचं. गुलशन त्याला क्रीएटीव्ह प्रोसेस समजावून सांगायचा. एकदोनदा त्यानं ताराला “ही क्रीएटीव्ह प्रोसेस” नक्की काय असते असं विचारलं होतं. तिनं नेहमीसारखं “तुझ्या मनात जे काय असेल ते एक्स्प्रेस करणं” एवढंच उत्तर देऊन संपवलं होतं. पण गुलशनचं तसं नाही. तो तीन चार तास एकाच गझलेबद्दल बोलायचा. याला नुसतं ऐकायला आवडायचं. मनात काय असेल ते एक्स्प्रेस करनं इतक्या दिवसामध्ये त्याला आजवर कधी जमलं नव्हतं. यापुढं जमेल असंही कधी वाटलं नव्हतं. गुलशनला दोन मुलं होती. (लग्नपण झालेलंच होतं हां) पण तरी त्याचा इकडंतिकडं सतत प्रेमभंग होत असायचा आणि प्रत्येक प्रेमभंगांची गझल त्याच्याकडं आधीच तयार असायची. किंबहुना गझल लिहिता यावी म्हणून हा सतत स्वत:चा प्रेमभंग करवून घेत असावा असा बर्या च लोकांना संशय होता. अर्णवला क्वचित कधी सौम्याची आठवण आलीच तर तो या गुलशनमियांचे शेर वगैरे वाचून बघायचा. त्यातल्या उर्दू शब्दांचे अर्थ ऑनलाईन डिक्शनरीमधून शोधून शेराचा सगळा अर्थ समजेपर्यंत सौम्याच्या आठवणीचा दर्द का काय तो गायब. त्याच्यादृष्टीनं गझलांचा हाच एकमेव फायदा होता. आता याक्षणाला गुलशनचं आपल्याला काल रात्री झोपेत अर्धवट सुचलेला शेर पूर्ण करण्यासाठी दिवसामधले चार तास कसे वाया घालवावे लागले तरी परफेक्ट शब्द मिळालाच नाही याचं वर्णन कितीवेळचं चालू होतं. हा नुसता ह्म्म हम्म टाईप करत होता. ताराचा मघापासून काही रीप्लाय आला नव्हता. बहुतेक जसमीत घरी आला असावा. परत एकदा त्याच्या मनामध्ये जेलसी निर्माण झालीच. किती नाही म्हटलं तरीही.. तारा आता या वेळी जसमीतसोबत काय काय करत असेल याची चित्रं त्याच्या डोळ्यांपुढं तरळून गेलीच. सानिया अजून ऑनलाईन दिसत नव्हती. तो कंप्युटरचा फोल्डर उघडून परवाच डाऊनलोड केलेली पॉर्न मूव्ही चालू करणार...
“सार, काफी” या आवाजानं तो आधी दचकलाच. इतक्या रात्री घरामध्ये कसला आवाज ऐकायची त्याला सवयच नव्हती. त्यातून हा मुलीचा आवाज. गुलशनसोबत फालतू गप्पा मराताना विसरूनच गेला की मल्लिगे इथं आहे. त्यानं मागे वळून पाहिलं. तिनं गीझर सोडून गरम पाण्यानं व्यवस्थित अंघोळ वगैरे केली होती. त्याच्या आईचा गाऊन घातल्याचा एकमेव दुष्परिणाम असा झाला की त्या सैलसर गाऊनमधून त्याला इतका वेळ दिसणार तिचं घाटदार शरीर एकदम तंबूत लपेटल्यासारखं दिसायला लागलं. भरीसभर तिनं त्या गाऊनवर मघाशी त्यानंच दिलेला टॉवेल ओढणीसारखा घेतला होता. त्यानं मनातल्या मनात कपाळावर हात मारला. आईच्या त्या जुन्या कुबट वास मारणार्याख गाऊनपेक्षा त्याला स्वत:चा एखादा टीशर्ट आणी ट्रॅकपॅण्ट द्यायला का सुचलं नव्हतं. तिचे लांबसडक घुंगरूदार केस चक्क मोकळे सोडलेले होते. पहिल्यांदाच त्यानं ते इतके मोकळे केस पाहिले.. ओलेत्या केसांमध्ये अधूनमधून कुठंतरी पाणी चमकत होतं. मघाशी तिनं घातलेल्या हातभर गजर्याकचा वास अजूनही येत होता. क्षणभर त्याची नजर त्या केसांमध्ये हरवून गेली. तिला कदाचित त्याची नजर जाणवली असणार, चेहर्याटवर एक अवघडलेपण आलं. त्याच्या समोर कॉफीचा कप ठेवून ती पाठी वळाली.त्याला आता कॉफी अजिबात नको हवी होती. पण ही अजून जेवली पण नसेल हे त्याच्या लक्षात आलं. “किचन फूड इरुक्कु. नी साप्पडु.”
“वेणां. ना साप्पटुट्टें. सारक्कु वेणुमा??” तिनं तसंच पाठमोरं उत्तर दिलं. त्यानं अविश्वासानं घड्याळाकडं पाहिलं, रात्रीचे अकरा वाजले होते. इतक्या उशीरापर्यंत मी जेवलो नसेन असं हिला का वाटलं? “ना साप्पडीया. आय नो दॅट नी साप्पडल्ला. युअर अम्मा हॅज ओन्ली मेड. साप्पडु” तो म्हणाला. त्याचं लक्ष परत पीसीमध्ये गुंतलेलं पाहून मल्लीगा परत किचनमध्ये आली. तिला भूक लागलीच होती, स्वत:चं ताट वाढून घेऊन ती खाली जेवायला बसली. तो उगाच इकडंतिकडं फेसबूक, ट्विटर, युट्युब असा वेळ घालवत राहिला.
तेवढ्यात तारानं पिंग केलं. नेहमीसारखं हाय हॅलो नाहीतर “अर्णव...”
“हाय.” त्यानं टाईप केलं. “अर्णव... कॅन आय कॉल यु नाऊ?” तेवढ्यात तिचा अजून एक मेसेज आला. तारासोबत रोजच्या गप्पा तासन्तास चालत असल्या तरी फोनवर बोलणं फार क्वचितच. मुळात त्यालाच कुणाशी बोलायला आवडायचं नाही. त्यापेक्षा ऑनलाईन गप्पा परवडल्या.
“शुअर. मी फोन करू का?” त्यानं उत्तर टाईप केलं. पण तोपर्यंत त्याचा मोबाईल वाजला. त्यानं लगेच कॉल घेतला. “हॅलो अर्णव.” पलिकडे ताराचा आवाज होता. खूप रडल्यासारखा.
“काय झालं?” तो पीसीसमोरून उठला आणि सोफ्यावर जाऊन बसला.
“अर्णव, माझा जसमीतसोबत... ब्रेक अप. इट्स ओव्हर. एवरीथिंग इज जस्ट ओव्हर...” तारा हुंदके देत मध्येमध्ये बोलत होती. आणि हे सांगायला तुला मीच मिळालो का? त्यानं मनातच विचारलं. पण फोनवर मात्र तो सावकाशपणे म्हणाला. “कशावरून? काय घडलंय?” एका हातानं सानियाला “हाय” टाईप करत त्यानं विचारलं.
“मला खूप दिवसांपासून डाऊट होता. आय जस्ट न्यु इट. आज समक्ष विचारलं तर त्यानं सरळ कबूल केलं. त्याचं अजून कुणाबरोबर तरी अफेअर आहे. ऑफिसमध्येच...” ती अजूनच रडायला लागली.
“हे बघ. तू जरा शांत हो” खरंतर तिच्याइतकाच तोही हादरलाच होता. दोघांचं गेल्या अडीच वर्षापासून अफेअर होतं. दोघं एकत्रच तर राहत होते. एरवी कसलीही भांडणं नव्हतीच. आणि त्यानं मनातल्या मनात दोघांचं तुटू देत असं कितीही वेळा म्हटलं असलं तरी ते मनापासून नक्कीच नव्हतं. उलट त्याला जसमीत खूपच सेन्सिबल वाटायचा. ताराची कसलीकसली भलतीसलती फॅड असायची तरी तिला सपोर्ट करणारा वगैरे होता. मग आता अचानक असं काय घडलं असणार? “तारा, सर्वात आधी शांत हो. रडणं थांबव. काही गैरसमज झालेत का? एकदा नीट बोलून बघ” तो समजुतीच्या स्वरात म्हणाला.
“नाही. ती बया याची ऑफिसमध्ये बॉस आहे म्हणे. आणि ती बॉस आहे म्हणून हा तिच्यासोबत फिरतो. कॅन यु बीलीव्ह इट? मला खूप दिवसापासून संशय होता. आज मी सरळ विचारलं. वर मला आता सांगतोय की ती मजबूरी आहे. प्रमोशनसाठी. आणि त्याचं खरं प्रेम मात्र माझ्यावरच आहे. ते सर्व खोटं पण खरं प्रेम माझ्यावर. म्हणजे तिच्यासोबत फक्त सेक्सची मजा, पण प्रेम माझ्यावर हे काय लॉजिक आहे काय रे?” ती बोलत असताना त्याला रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज हॉर्न ऐकू येत होते. ताराचं हे वाक्य ऐकताना त्याच्यासाठी जुन्या आठवणींचा दरवाजा परत किलकिला झाला. त्यानं मुश्किलीनं लक्ष परत ताराकडं वळवलं. “आता आहेस कुठं?”
“मला त्याचं तोंड पण बघायचं नाही”
“असं काय वागतेस? एवढी मोठी जर्नालिस्ट आहेस. इतकं सुंदर लिहितेस आणी असं घराबाहेर निघून जातेस का? घरी परत जा. रात्रीचे बारा वाजलेत. त्याच्याशी एकदा नीट बोल. आणि मग काय ते ठरवा. ओके?”
“काही ठरवायचं नाही. मी ऑफिसमध्ये जातेय. रात्रभर तिथंच थांबेन, उद्या कुठे रहायचं ते बघेन. फक्त कुणाशी तरी बोलावंसं वाटलं म्हणून तुला कॉल केला.. मला काहीच कळत नाहिये...” एवढ्यात तिचा फोनवर आवाज थांबला. ती दुसर्या च कुणाशीतरी फक्त “मुझे जाने दो” एवढंच बोललेलं ऐकू येत राहिलं. तो इकडून केवळ “हॅलो, एव्हरीथिंग इज ऑलराईट? तारा, इज देअर एनी प्रॉब्लेम?” म्हणत राहिला. दोनेक मिनिटांनी ताराच्या हातामधला फोन कुणीतरी घेतला. “हाय. दिस इज जसमीत. एव्हरीथिंग इज फाईन” त्याचा भारीभरकम आवाज आला.
“व्हेअर इज तारा? मुझे उससे बात करनी है” तो म्हणाला.
“शी इज फाईन ऎण्ड व्हेरी मच ड्रंक. इसलिये मे इसे घर लेके जा रहा हू. कुछ नही बस थोडी मिसअंडरस्टॅन्डिंग है. घर पहुंचतेही फोन कर दूंगा” एवढं बोलून त्यानं फोन कट केला. अर्णवनं हातातला मोबाईल बाजूला ठेवला. नक्की काय घडत होतं तेच त्याला समजेनासं झालं. त्याचंच एक मन म्हणालं, “तू ताराला फॅण्टसाईझ करतोस. हे घडतंय ते सत्य नाही, तू नशेमध्ये आहेस.... तुला भास होताहेत”
तितक्यात त्याला किचनपाशी कुणाचीतरी चाहूल लागली. मल्लीगै त्याच्याकडं बघत उभी होती. ही खरंच इथं आलीये की हापण एक भासच?
“एनी प्रॉब्लेम?” तिनं विचारलं. काय उत्तर देणार? माझी एक ऑनलाईन फ्रेण्ड आहे. तिचं आताच तिच्या बॉयफ्रेण्डशी भांडण झालंय. पण यात माझा काय संबंध तेच मला माहित नाही.
त्यानं “नथिंग” असं पुटपुटत मान हलवली. मल्लिगै तशीच अवघडून उभी राहिली. बाहेर वीजा कडकडत होत्या. मघाशी तारासोबत बोलत असताना इथंच जवळच कुठंतरी वीज पडली होती. पाऊसही जोरात कोसळत होता. तेव्हाच कधीतरी लाईट गेलेले असणार. त्याचं घर इन्व्हर्टरच्या जीवावर चालू होतं. तारा किंवा जसमीतशी परत एकदा बोलल्याशिवाय त्याला समाधान वाटलं नसतं. पीसीसमोर बसून त्यानं फेसबूकचं पेज रीफ्रेश मारलं. नवीन काय काय नोटिफीकेशन्स आहेत ते वाचल्या. फेसबूकवर उगाचच स्टेटस अपडेट केलं. “दिलबर पे हो न कोइ असर या रब्बा दे दे कोइ जहरभी अगर..” काही संबंध नाही, असंच लिहायचं म्हणून. त्यानं मागं वळून पाहिलं तेव्हा इतका वेळ उभी असलेली मल्लिगे तिथंच खाली बसली होती.
तिला पेंगुळलेली बघताच त्यानं कपाळावर हात मारला. “आपल्याला झोप आली नाही म्हणून तिनं जागं कशापायी रहायचं?” तो उठून बेडरूममध्ये गेला. चालताना आपला तोल किंचित जातोय असं त्याचं त्यालाच जाणवलं. किती ड्रिंक्स घेतले, दोन की तीन? तेही त्याला आठवेना. बेडरूममध्ये येऊन त्यानं त्याच्या पलंगावरची एक गादी गुंडाळली, कपाटामधलं एक बेडशीट काढलं. बाहेर हॉलमध्ये नेऊन ठेवलं आणि परत येऊन उशी आणि दोन चादरी आणि एक उशी घेतल्या.
मल्लीगेने तोपर्यंत गादी अंथरून त्यावर बेडशीट घातलं होतं. त्यानं चादर नेऊन तिच्या हातात दिली. चादर देताना तिच्या हातांचा अगदी पुसटसा का होइना पण स्पर्श त्याला जाणवला. एखाद्या खळाळत्या नदीच्या थंडगार पात्रामधल्या पाण्याचा स्पर्श व्हावा, त्या क्षणापुरतं थंड शिरशिरी जाणवावी आणि लगेच त्या पाण्याच्या ऊबदारपणानं वेढून घ्यावं असं त्याला वाटून गेलं. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. अधीरतेनं त्यानं तो कॉल घेतला. “तारा?” त्यानं विचारलं.
“अर्णव, जसमीत घरी घेऊन आलाय. तो सारखा सॉरी म्हणतोय. मी आज रात्री थांबेन. काय करायचं ते उद्या ठरवेन. डोण्ट वरी. सॉरी. मी तुला इतक्या रात्री त्रास देतेय...” तिचा आवाज प्रचंड थकल्यासारखा होता, ही भावनिक ओढाताण आपल्याला किती थकवू शकते हे त्याच्याहून जास्त कुणाला माहित असणार. त्या दिवशी सौम्या निघून गेल्यावर जयच्या खांद्यावर डोकं ठेवून तोपण असाच हताश बसून राहिला होता.
“अरे वेडाबाई? त्रास कसला? यु कॅन कॉल मी ऍट एनीटाईम. मी अजून जागाच आहे. वाटलं तर रात्रभरात कधीही कॉल कर..”
“नो, अर्णव. यु डॊन्ट नो व्हॉट आय ऍम फीलींग राईट नाऊ”
“तारा, आय नो एक्झॅक्टली व्हॉट यु आर फ़ीलिंग. तेच सेम फीलींग घेऊन मी गेली चार वर्षं जगतोय. प्रेमाचे धोके मी पण पचवलेत. फार सोसलंय त्यापायी..” पहिल्यांदा कधीतरी त्यानं ताराला स्वत:विषयी काहीतरी इतकं आतल्या गाठीचं सांगितलं. “म्हणूनच सांगतोय. बीलीव्ह मी, सर्व ठिक होइल. जसमीतला फोन दे” तिनं जसमीतला मारलेली हाक त्याला इथं पुसटशी ऐकू आली.
“हॅलो” मघासचाच भक्कम आवाज आला.
“हाय, दिस इज अर्णव, ताराज फ्रेन्ड, प्लीज टेक केअर ऑफ हर.. ऍण्ड कॉल मी इन द मॉर्निंग... जस्ट डोण्ट हर्ट हर. बाय गूड नाईट.” जसमीतला काही उत्तरदेखील न देण्याची संधी देतात्यानं फोन बंद केला. तिथंच सोफ्यावर धपकन बसला. इतका वेळ त्याचं बोलणं ऐकत मल्लिगी तिथंच उभी होती.
“एनी प्रॉब्लेम?” तिनं मघासचाच प्रश्न परत विचारला.
“येस” यावेळी स्वत:शीच कबूल करत असल्यासारखं म्हणाला. खरंच प्रॉब्लेम आहे अर्णव. आणि हा प्रॉब्लेम ताराचा नाही तर तुझा आहे. इतक्या दिवसात जय सोडता सौम्याबद्दल कुणाशीतरी बोलला होता. पण यावेळी सौम्याची आठवण येण्याऐवजी जखमा भळभळण्याऐवजी त्याला जाणवला होता तो त्याचाच एकाकीपणा.
“फ्रेंड. फाईट विथ हर बॉयफ्रेण्ड, नथिंग सीरीयस...” तो काहीतरी म्हणायचं म्हणून बोलला.
“युअर बॉयफ्रेण्ड?” तिच्या आवाजामध्ये अतिप्रचंड अविश्वास होता.
“नो.. नो.. नॉट माय बॉयफ्रेन्ड” तो पटकन म्हणाला.“माय फ्रेण्ड ऍण्ड हर बॉयफ्रेण्ड. गर्ल... गर्ल फ्रेण्ड” गेल्या तीन वर्षामध्ये पाहिलेले असंख्य तमिळ सिनेमे आठवले तरी त्याला निव्वळ मैत्रीणीसाठी हवा तो शब्द सापडेना.
“युअर गर्ल्फेंड?” तिनं परत विचारलं. जाऊ दे! किती एक्स्प्लेन करायचं. त्यानं तंद्रीमधे मान डोलावली. ती किंचित हसली. तिनं याचं याच्या गर्लफ्रेंडशी भांडण झालं आहे असा सोयीस्कर अर्थ लावून घेतला असणार. “मॅरेज? कल्याणम?” तिनं लगेच विचारलं. गर्लफ्रेंडच्या पुढली स्टेप केवळ “लग्न” हीच असू शकते या भाबडेपणाचं त्याला हसू आलं. एकेकाळी हाच भाबडेपणा त्याच्याही मनात होताच.
“नो मॅरेज.” तो मोबाईलवर फॉरवर्ड आलेला कसलातरी आचरटचावट जोक वाचत म्हणाला.
“ओह. लाईक हिंदी फिल्म्स. नो मॅरेज... ओन्ली अफेअर? अदां अम्मा सारकिट्ट फाईट पन्रांगला?”
त्यानं चमकून मोबाईलमधलं डोकं वर करून तिच्याकडं पाहिलं. पोन्नीअम्मा लेकीसोबत त्याच्या घरातल्या प्रत्येक गोष्टींची चर्चा करत असेल असं त्याला कधी वाटलं नव्हतं. पण हिला आईसोबत सतत चाललेल्या वादावादी माहित होत्या. “शी इज नॉट माय गर्लफ्रेण्ड. अ गूड फ्रेन्ड. बेस्ट फ्रेण्ड” तो नक्की काय समजावतोय हेच त्याला कळेना.
“ओह..” ती म्हणाली. “सारुक्कु नो गर्लफ्रेण्ड?” ती गादीवरच मांडी घालून बसत म्हणाली.
“नो” तो तिच्याकडं बघत म्हणाला.
“व्हाय?”
“असंच. सिंगल नल्ला इरुक्कु”
“नो. नो. नॉट अ गूड थिंग. कल्याणम पन्ना वाईफ सारक्कु मराठी फूड सेयवांग. वीट्ट पात्तुप्पांग”” तो गालात हसला.
“पोन्नीअम्मा इरुक्कु! एल्लां सेयुदु”
“इंगे अम्मा सेयुदु. सारक्कु ट्रान्स्फ़र आणा पुदु लेडी सर्च पण्णाणुम.वाईफ लाईफलॉंग इरुक्कुं”
परत एकदा त्याचा मोबाईल वाजला. यावेळी आयरॉनिकली, टिपिकल नवराबायकोच्या त्यातही बायकोच्या कूकिंगवरच वाईट जोक होता. त्यानं तो जोक सिंधुला फॉरवर्ड केला. त्याच्यासमोर जमीनीवर गादी अंथरलेली आणि त्यावर मांडी घालून बसलेली मल्लिगे त्याच्याकडे बघत बसली होती. तिचा मघासचा पेंगुळलेपणा कुठंतरी गायब झाला होता. उलट त्याच्याशी गप्पा मारायच्या उत्साहात होती. त्यालापण ताराच्या भानगडीवरून स्वत:चं लक्ष उडवायचं होतं. काय करत असेल ती दोघं? जसमीतच्या धोक्याला ती माफ करेल? तो माफी मागत असेल? तिला जवळ घेऊन सॉरी म्हणत असेल... तिच्या ओठांवर ओठ टेकवून... “प्लीज मला सोडून जाऊ नकोस” म्हणत असेल. या वाक्यासरशी अचानक त्याच्या ध्यानीमनी नसताना इतके दिवस आठवणींखाली दडवून टाकलेला तो चेहरा फणा काढलेल्या नागासारखा सर्रकन डोळ्यासमोर आला. “अर्णव, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. माझी चूक झाली पण प्लीज हे लग्न मोडू नकोस, मी जीव देईन” सौम्या त्याच्या पायाशी पडून रडत होती. त्याक्षणी आपण तिची चूक माफ केली असती तर आज आपल्या आयुष्याचे रंग काय वेगळे असते?
लोखंडाचा टनभर वजनाचा तुकडा डोळ्यांसमोरून सरकवावा तस त्यानं तो चेहरा नजरेसमोरून सारला. “नो कल्याणम फॉर मी”
“व्हाय?”
“सपोज... आय गेट मॅरीड, वाईफ डझन्ट लाईक मी..”
“अप्पडी नडक्कादु... कल्याणा आयिडुच्चुन्ना वाईफ सार लाईक पण्णुं...”
“नॉट नेसेसरी... आवडलं म्हणून लग्न झालंच, आणि लग्न झालं म्हणून आवडलं, दोन्ही गोष्टी आवश्यक नाहीत.. एनीवेज,... ग्रॅज्युएशन कंप्लीटा? व्हॉट यु विल डू नेक्स्ट?”तो विषय बदलत म्हणाला. गावातल्या तिच्या वयांच्या मुलींची लग्नं होऊन त्या दोन तीन मुलांच्या आया झाल्यातरी पोन्नीअम्मानं गावापासून तीन तासांवर असलेल्या कॉलेजमध्ये तिला शिकायला ठेवलं होतं. त्याच्या घरच्या नोकरीमधून मिळत असलेला पगार हा फक्त आणि फक्त लेकीच्या शिक्षणासाठी होता. त्याव्यतिरीक्तही पोन्नीअम्मानं लेकीच्या कॉलेजसाठी कधीही पैसे मागितले तरी तो विनाखळखळ द्यायचा. याबाबतीत त्याला पोन्नीअम्माचा प्रचंड अभिमान वाटायचा. त्याच्या आईनं नाही का वडलांच्या जाण्यानंतर एकटीनं नोकरी सांभाळून दोन्ही मुलांची शिक्षणं केली होती.
“पीजी एन्ट्रन्स प्रीपेअर पन्रं. बट नो कोचिंग हीअर.” त्याचा मोबाईल परत वाजला. तन्मयनं रीयुनियनसाठीचं रीमाईंडर मेल पाठवलं होतं. त्यानं लगेच मेल डीलीट केलं. मल्लीगे बोलतच होती. “इथं तसंपण पीजी नाहीच आहे. सिटीमध्ये जावं लागेल.” सिटी म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण. इथून पाच तासांच्या अंतरावर. अचानक ती काहीतरी सुचल्यासारखं म्हणाली. “सार, यु विल गाईड मी फॉर एक्झाम?”
“एन्ना सब्जेक्ट?”
“झूलॉजी”
“मग झालंच तर... मी काय डोंबल गाईड करेन? मी दहावीनंतर बायोच्या वाटेलाच गेलो नाही. नो झूलॉजी आफ्टर स्कूल.”
“सार. फिजिक्सल पीएचडीआ?”
“इल्ल... इलेक्ट्रॉनिक्स. पण सिंधुनं झूमध्येच एमएससी केलंय. तिला गाईडन्ससाठी विचार. शी वील हेल्प यु” तिच्या चेहर्यालवर आलेलं प्रश्नचिन्ह बघताच तो पुढं म्हणाला. “माय सिस्टर. युएसल इरुक्कु.. फेसबूक लिस्टल इरुक्कु. यु सेण्ड हर रीक्वेस्ट. आता माझ्याइतकी इंटेलिजंट नाही, पण तरी शी इज व्हेरी गूड. या जयने जर लग्न करून तिला युएसला नेलं नसतं तर तिनं पण काहीतरी चांगलं केलंच असतं.” तो भराभर इंग्लिशमध्ये जे काय बडबडला ते सगळं समजल्यासारखं तिनं मान डोलावली. “चलो, लेट नाईट आयिडीचु. मॉर्निंग मळे स्टॉप देन यु कॅन गो. इल्ल... पोनीअम्मा टेन ओक्लॉक वरूं” बोलताना तो एक क्षणभर थांबला. “नी इंगे नाईट स्टे पण्णा पोन्नीअम्मा विल से सम्थिंग......” आताही त्याला हवा तो शब्द आठवेना. रात्रभर इथं राहिलीस तर पोन्नीअम्मा काही म्हणेल का?'
मल्लेगेने उत्तरादाखल आतापण नुसती नकारार्थी मान हलवली. “गूड” तोच म्हणाला.. “येदुं प्रॉब्लेमना कॉल पण्णु.नो भया! ओके? आय स्लीप व्हेरी लाईट.” बोलता बोलता तो सोफ्यावरून उठला. बेडरूमकडे जाण्यासाठी त्यानं पाऊल उचललं आणि नक्की काय झालं ते त्यालाच समजलं नाही. पण सोफ्यासमोरच्या टीपॉयला धडकून तो अडखळला. जवळजवळ पडलाच होता तितक्यात खाली बसलेल्या मल्लिगेने झटकन उचलून त्याला धरलं आणि परत सोफ्यावर बसवलं.
“इट्स ओके” तो पुटपुटला. केवळ दोनच ड्रिंक्स घेऊनदेखील तो इतका कसा काय बेताल झाला होता तेच त्याला उमगेना. बाजूला बसलेल्या मल्लीगैचं जवळ येणं मात्र त्याला खूप प्रकर्षानं जाणवलं. तिचा एक हात अजून त्याच्या खांद्यावर होता. दुसरा त्याच्या दंडावर. मघाशी अर्धाक्षणभरच जाणवलेली ती शिरशिरी अंगामधून मस्तकांत गेली. तीन वर्षं... तीन वर्षांनी आपल्या अंगाला कुण्या स्त्रीचा स्पर्श होतोय. सेक्सचॅटमधल्या त्या अनोळखी बायकांचे व्हर्च्युअल स्पर्श नव्हेत. “ओह.. नाऊ आय ऍम टचिंग युअर लिप्स” सारखे पांढर्याो स्क्रीनवर काळ्या अक्षरांचे बुडबुडे स्पर्श नव्हेत.. पॉर्न मूव्हीजमध्ये पाहिलेले दुसर्यां चे खोटे नाटकी कमर्शीअल स्पर्श नव्हे तर.. सेक्ससाठी विकत घेतलेल्या मुलींचे प्रोफेशनल स्पर्श नव्हे,तर खराखुरा एखाद्या जिवंत माणसाला एका मुलीनं केलेला विनाकारण स्पर्श. त्वचेचा त्वचेला होणारा स्पर्श. ज्या स्पर्शामध्ये कसलाही आव नव्हता, नाटक नव्हतं. मल्लीगेने हात बाजूला घेतला. ती उठून उभी राहिली. नक्की काय करावं ते तिलाही सुचत नसणार. आज रात्रीमध्ये आपल्या वागण्यानं नक्की कितीवेळा तिला “झक मारली आणि इथं आले” अस वाटलं असणार... त्यानं मनातच हिशोब घालायचा प्रयत्न केला. मनानं तसलं काही करायला ठाम नकार दिला कारण त्याला आताच झालेल्या त्या स्पर्शाची अनुभूती अजून हवी होती. मन अजूनही त्या स्पर्शाभोवतीच रेंगाळत होतं. त्यानं हात नकळत पुढं केला. त्यासरशी मल्लीगे पाऊलभर मागे सरकली. त्यानं हात मागे घेतला.
“नी तूंगु. आय विल गो.” तो तिला म्हणाला. आता या क्षणी तिनं लगेच आपल्या बाजूला बसावं. आपल्याला घट्ट धरावं. आपण तिच्या मिठीमध्ये हरवून जावं, तिच्या केसांच्या धुंद वासानं मोहरून जावं, तिच्या नाजुक पातळ ओठांची चव घ्यावी, तिच्या शरीराची उष्णता आपल्या अंगाला घासावी, असं बरंच काही वाटत असताना तो तिला “तू झोप जा” म्हणाला. बळजबरी करायची गरजही नव्हती. मल्लिगैचं आणि त्याचं सामाजिक स्थान असल्या गोष्टींना माअन्यता देणारं होतं. तिनंही नकार दिलाच नसता तरी सौम्या म्हणाली तेच खरं, आपल्यामध्ये ती आगच नाही. प्रश्न संस्कारांचा नव्हता, मर्दानगीचा नव्हता. नक्की कसला होता तेच त्याला माहित नव्ह्तं. याआधी रात्रभरासाठी विकत घेतलेल्या मुली अंगावरचा कपडानकपडा उतरवून जवळ आल्यातरी क्षणभर का होइना अवघडायचो. केवळ स्वत:ला प्रूव्ह करायच्या नादांत बोलावलेल्या त्या मुली. त्यांचाही एके क्षणी प्रचंड कंटाळा आला, आणि ते सर्व सोडून दिलं. ते पॅशन आणि तो हावरेपणा कधी नव्हताच. आज एवढ्या तीन साडेतीन वर्षांच्या उपासानंतरही नाही. मल्लीगेसारखी नाजुक कोवळीपोरगी समोर असतानाही नाही, इथंया एकाकी बंगल्याच्या निर्जन ठिकाणी पण नाहीच. साला, ती नियतच नाही आपल्याजवळ.
ती परत गादीजवळ जाऊन बसली. त्याला उठून त्याच्या बेडरूममध्ये जायचं होतं. पण उठल्यानंतर न अडखळता आपण बेडपर्यंत जाऊच शकू याची त्याला खात्री नव्हती आणि आता मल्लिगेने जर त्याला सावरलं असतं तर.... कदाचित... त्याच्या हातून पुढं काही घडलं तर...
आपण असं वागूच शकत नाही याची त्याची त्यालाच खात्री होती.
“मल्लिगे..” तो म्हणाला. “प्लीज स्ट्रॉंगा कॉफी पोडु” हे ऐकल्यावर ती लगेच उठून किचनमध्ये गेली- जणू तिला त्याच्या नजरेसमोरून दूर जायचंच होतं. त्यानं सोफ्यावर पाठीमागे मान टेकवली. “काय करतोस अर्णव?” स्वत:शीच तो बडबडला. “आई बरोबर म्हणाली. यु आर गेटिंग ऍन ऍडिक्ट... तू व्यसनी होत चालला आहेस..दारूमुळं नाही तर तुझ्या एकाकीपणाच्या व्यसनामुळं.”
त्यानं टीपॉयवर ठेवलेला मोबाईल उचलला. सानियाचा मेसेज. “हाय, सेक्सीबॉय यु देअर?” ही सानिया बंगालातली. सानिया हे नाव पण खरं नाही. पाच वर्षांपूर्वी लग्न करून युरोपमध्ये गेली. तिथं बोलायला कुणी नाही. कुआठल्यातरी पॉर्न वेबसाईटवर चॆटमध्ये दोघांची ओळख झालेली. कितीतरी दिवस ऑनलाईन चॅट केल्यावर नंबर्स एक्सेंज केले. मग तिनंच फेसबूकवर ऍड केलं. ती त्याच्याशी तासनतास गप्पा मारायची. नवरा कायम स्वत:च्या व्यापात. मूल व्हायची शक्यतापण शून्य. घरामध्ये करण्यासारखं काहीच नाही. दिवस घालवायला दुसरं साधन नाही. . “मी दिवसभर इंटरनेटवर असते, किमान मला माणसांत असल्यासारखं वाटतं” म्हणायची. “त्यातून तू सोबत असलास तर कुणीतरी आपल्यावर सुद्धा प्रेम करतंय याची जाणीव राहते”
अर्थात हे टाईमपासवालं प्रेम. प्रेम पण नव्हेच, नुसता सेक्सचा व्यवहार. तेही नुसतंच बोलण्यामधलं. नाहीतर बघण्यामधलं. आताही तिचा असाच मेसेज आलेला असणार. त्यानं उत्तर म्हणून फक्त हाय टाईप केलं. पण सेण्डचं बटण दाबलं नाही. ती आता ऑनलाईन आहे, गप्पा मारायच्या मूडमध्ये. तारासारख्या नुसत्याच शिळोप्याच्या गप्पा नव्हे. त्याहून जास्त चावट गप्पा.... ऑनलाईन व्हर्च्युअल सेक्स. आता या क्षणी सानिया तिच्या घरात एकटीच असेल. तोही एरवी एकटा. मग वेबकॅम चालू करून चॅटींग...
पण आता त्याला ते नकोसं झालं होतं. मन परत परत मल्लिगेच्या त्या निसटत्या स्पर्शाकडं धावत होतं.
त्यानं मोबाईल बंद केला. डोळे मिटून तो शांत बसून राहिला. मल्लिगेने कॉफीचा मग आणि थॊडी बिस्कीटं आणून त्याच्यासमोरच्या टीपॉयवर ठेवली. “सार” तिनं आवाज दिला. त्यानं डोळे उघडून पाहिलं. परत एकदा स्वत:चा हात पुढे केला तर स्पर्श करता येईल इतक्या जवळच्या अंतरावर मल्लिगे उभी होती. जिवंत. हाडामांसाची. प्रत्यक्षात अनुभव घेता येण्याजोगी. तिच्या शरीराच्या उष्णतेचा त्याच्या शरीराच्या त्वचेला जाणीव करून देणारी. त्याच्या पुरूषीपणाला आपल्यामध्ये कुठंतरी सामावून घेत हरवून टाकण्याची ताकद असलेली स्त्री.
त्याच्यानजरेसमोर सौम्यासोबत घालवलेले कित्येक दिवसरात्र आठवले. साडेचार वर्षं. साडेचार वर्षांचं प्रेम, अफेअर, एंगेजमेंट, कमिटमेंट आणि सेक्स.
अंगणामधल्या झाडांच्या दोन तीन फांद्या पडल्याचा आवाज त्या शांततेमध्ये त्याला ऐकू आला. परत त्याचा मोबाईल वाजला.. तब्बल चार मेसेजेस आणि सत्तावीस नोटिफिकेशन्स. एएरवीची गोष्ट असती तर त्यानं धडाधड सगळं वाचलं असतं. आता मात्र त्याची नजर मोबाईल स्क्रीनवर नुसती फिरली. स्क्रीन सेव्हर वर दूर्वा त्याच्याकडॆ बघून हसत होती.
जोपर्यंत तो इथं बसून आहे तोपर्यंत मल्लिगे झोपली नसती.. अवघडल्यासारखी बसून राहिली असती, आणि आपण बेडरूमपर्यंत धडपणं चालत जाऊ शकू याची त्याला अजून खात्री नव्हती.
“आर यु स्केअर्ड? भया?” त्यानं विचारलं. तिच्या चेहर्या वर आश्चर्य दाटून आलं. “व्हॉट भया?” तिनं उलट प्रश्न केला.
पोरीचं बरोबरे अर्णव. मनातच म्हणाला. तुला उठून धड चालता येईना झालंय, तिच्या अंगावर हात काय टाकशील? मुरूगैयाअ गावच्या मुलींबद्दल काय वाट्टेल ते सांगेल. तिची संमती असती तर ते स्वत:हून पुढे आली असती. अशी बावरली नसती. नर आणि मादी याहून वेगळी नाती काय नसतातच का? स्वत:च्या संरक्षणाची इतकी खात्री असल्याखेरीज तिनं रात्री अकरा वाजता तुझ्या घराचा दरवाजा वाजवला असता का? रात्रीअपरात्री जंगलामधून एकटी फिरणारी ती मुलगी. उलट तिनंच तुला धरून हाणलं तर बोंबलशील. तो एकटाच हसला. त्याचं हसणं बघून मल्लीगेने एक भुवई उचलून “काय” असं विचारलं. त्यानं हातातला मोबाईल दाखवला. “फॉरवर्डेड जोक” तो परत हसला. तिच्याही चेहर्याचवर विनाकारण हसू येऊन गेलं.
“सर, फोटो यारदु?” आता तिला विषय बदल्लायचा असणार. तिनं मोबाईलमधल्या फोटोकडे बोट दाखवून विचारलं.
“दूर्वा, माय सिस्टर डॉटर”
“युअर सिस्टर, अक्का?”
“नो. वी आर ट्विन्स. जुडवा.”
त्यानं अथवा सिंधुने कुणालाही जुळं असल्याचं सांगितलं की जे आश्चर्य बघायला मिळायचं तेच आश्चर्य मल्लीगेच्या चेहर्या्वर आलं.
“शी नेव्हर कम?”
“नाही. युएस इरक्कु.” त्यानं टीपॉयवर ठेवलेला मोबाईल उचलला. “दुर्वा. इद सिंधु” त्यानं मोबाईलमधली फोटो गॅलरी उघडून तिला फोटो दाखवले. गादीवर बसलेली मल्लिगे थोडी पुढं सरकून आली. “हा जय. हर हजबंड. माय अम्मा.”
“त्यांना मी पाहिलंय. त्या सेम तुमच्यासारख्या दिसतात. ही तुमची दुर्वा पण तशीच दिसते. तुमच्या दोघांचा एक फोटो लावा ना... मस्त येईल.”
“आय हॅव्ह नॉट इव्हन मेट हर”
“हाऊ?”
“ती झाल्यापासून यु एसला गेलोच नाही. कूठंच गेलो नाही. सिंधु रोज बोलावते. जय बोलावतो.पण जावंसं वाटत नाही, साला! लाज वाटते आपलीच. लग्नाला महिना असतना लग्न मोडून घेतलं म्हणून.” तो शांतपणे म्हणाला. अचानकच. खरंतर तिला सांगायची काहीच गरज नव्हती. पण सांगावंसं मात्र वाटत होतं.
तिच्या चेहर्यासवरचं प्रश्नचिन्ह त्याला दिसत होतं. “कल्याणम?”
“नो कल्याणम, ब्रेक कल्याणम. लग्न मोडलं. सौम्या, माझ्याच बिल्डिंगमध्ये रहायची. अकरावी संपत आली होती, तेव्हा मी तिला विचारलं. छान होती, दिसायला बोलयला, मला कधी आवडायला लागली मलाही माहित नाही... पण खूप दिवसांनी हिंमत करून विचारलं. ती आधी नाही म्हणाली. मग आठेक दिवसांनी स्वत:हून हो म्हणाली. लाईक एनी अदर टीनेजर, आमचं अफेअर चालू झालं. मूव्हीज, पब्ज, लॉंग ड्राईव्ह. जास्त सीरीयस काही नाही. घरी तेव्हाच समजलेलं. बहिण माझ्याच तर वर्गात होती. पण आई काही म्हणाली नाही.. बाबा खूप आधीच गेले होते. जबाबदारीची जाणीव होतीच. त्यामुळं मी हा अफेअरचा तमाशा कितीही केला तरीही अभ्यासावरचं लक्ष कधीच उडू दिलं नाही. बारावीला मेरीटमध्ये आलोच. इंजीनीअरिंगला गेलो. सौम्या सोबत होती. पण तिनं बी एससी करायचं ठारवलं. तिला मार्कपण जास्त नव्हते. तरीही आमचं अफेअर चालू राहिलं. भेटत राहिलो. मी दर सेमीस्टरला युनिव्हर्सिटी टॉपर राहिलो. हळूहळू आयुष्याची गाडी सेट होत गेली. इंजीनीअरिंगनंतर पीजी केलं. आई म्हणाली तुला शिकायचंय तेव्हढं शिक. मला आणि सिंधु दोघांनाही. आईच्या नोकरीमुळे तसा मेजर आर्थिक प्रॉब्लेम किंवा कमवायलाच हवं असं काही नव्हतं. मग पीजी नंतर ठरवलं की जॉब घ्यायचा. एम एन सीमध्ये कॅंपस रीक्रूटमेंट झाली होती. नोकरी करून वर्ष झाल्यावर लग्नाचा विषय निघाला. अर्थातच या सर्वांमध्ये माझं आणि सौम्याचं प्रेम चालूच होतं. आईला सौम्या पसंद होती. तसं जातीबाहेर होतं, तरी तिच्या आईवडलांनीदेखील होकार दिला. केवळ माझं शिक्षण आणि पगार बघून. माझा तो जॉब मस्त फिरतीचा होता. दोनतीन महिने वेगवेगळ्या देशांमध्ये. कंप्लीट पेड व्हेकेशन असल्यासारखं त्यांच्या मुलीला याहून चांगलं स्थळ त्यांना शोधूनपण सापडलं नसतं. दरम्यान सिंधुचं पण जयसोबत ठरलं.. माझा एकुलता बेस्ट फ्रेण्ड. तुला एक मजा सांगू? जयनं सिंधुला पहिल्यांदा डेटवर नेण्याअधी माझी परवानगी घेतली. इडियट!! सिंधुसाठी याहून बेस्ट लाईफ पार्टनर मिळालाच नसता. आई म्हणाली होती की दोन्ही भावाबहिणींची लग्नं एकाच मांडवात लावायची... पण लग्नाला फक्त महिना शिल्लक होता. फक्त महिना! आणि मी लग्न मोडलं. स्वत:हून. कुणालाही काहीही स्पष्टीकरण न देता. खरी गोष्ट फक्त तिघांना माहित आहे. मी, जय आणि सौम्या. साडेचार वर्षं ज्या मुलीवर प्रेम केलं, ज्या मुलीसोबत मी भविष्याचे इमले रचले.. त्या मुलीशी नातं तोडायला मला फक्त एक क्षण पुरला. फक्त एक क्षण.” बोलताना त्याचे डोळे भरून आले. इतक्या वर्षांनी पहिल्यांदा तो कुणाशीतरी याबद्दल बोलत होता. ती केवळ ऐकत होती, पण तिला समजण्यासाठी तो बोलतच नव्हता. कुटःअल्या भाषेत बोलतोय हेही त्याला माहित नव्हतं. पण तो पहिल्यांदाच बोलत मात्र होता. “मी आणि सौम्या आम्ही दोन वेगळ्या ग्रहावरचे प्राणी होतो. तिचा स्वभाव आणि माझा स्वभाव. जगण्याच्या तिच्या कल्पना आणि माझ्या कल्पना पूर्ण भिन्न होत्या. तरी मला असं वाटायचं की आम्ही एकमेकांवर इतकं प्रेम करतो की या वेगळेपणाच्या पलिकडे जाऊन आम्ही ऍज अ कपल खुश राहू. आणि माझं खरंच तिच्यावर प्रेम होतं. खूप. मनापासून. तिचंपण माझ्यावर प्रेम होतं असं ती कायम म्हणायची. मी आयुष्यामध्ये तिचा सोडून कधीच कुणाचा विचारपण केला नव्हता.” तो बोलत राहिला. डोळ्यांमधले दोन अश्रू अलगद गालावर उतरले.
“तिच्या लॅपटॉपला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तिच्या भावानं ती नसताना काहीतरी डाऊनलोड केलं आणि व्हायरस आला. तो मूर्ख तिच्या नकळत लॅपटॉप घेऊन माझ्याकडं आला. नीट करून दे सांगायला.... मी इतक्या वर्षांच्या अफेअरमध्ये तिचा साधा फोन कधी चोरून पाहिला नव्हता. मग लॅपटॉप फार दूरची गोष्ट. पण असंही तिच्याकडं लपवण्यासारखं काय असणार होतं? मी स्कॅनिंग करत असताना मला तिचे फोटो दिसले. आम्ही कुठं कुठं फिरायला गेलो होतो, तेव्हा मीच काढलेले. आणि मग मला एक हिडन फोल्डर दिसला. तिचेच फोटो होते. पण मी काढलेले नव्हते. माझ्यासोबतपण नव्हते. दुसर्या च कुणाबरोबरतरी. मला आधीपासून माहित होतं की तिचं फ्रेण्डसर्कल प्रचंड मोठं आहे. त्यांच्यासोबत फिरायची, भटकायची तिला आवड होतीच. नुसते बाजूबाजूला उभे राहून काढलेले फोटो असते तर मला संशय घ्यायची गरजच नव्हती. पण हे केवळ तसले फोटो नव्हते. फार इंटीमेट.. फार जवळीकीचे फोटो होते. फोटोत सगळंच स्पष्ट दिसत होतं. डेट तपासली, तर मागच्याच आठवड्यांत काढलेले फोटो. आमच्या लग्नाची तयारी चालू होती, आणि हे असले फोटो? अख्खाच सुन्न झालो. जयला फोन करून बोलावलं. जयनं तिला बोलावलं. आई आणि सिंधु लग्नाच्याच खरेदीला बाहेर गेल्या होत्या. सौम्याला काहीच कल्पना नव्हती. ती आधी माझ्यावरच उखडली. म्हणाली, तिच्या परवानगीशिवाय मी तिचे फोटो का पाहिले. तिचा मुद्दा बरोबर होता.. मला ते फोटो पाहण्याचा काहीच हक्क नव्हता, पण मग ती खोटं का बोलली होती? हा प्रश्न सर्वात मोठा होता. तिच्याकडं उत्तर नव्हतं. मी चिडलो. आयुष्यात पहिल्यांदा तिच्यावर इतका चिडलो असेन. मी तिच्यावर हात उचलला. फक्त उचललाच, मारलं नाही. नीयतच नाही ना. पण गेली इतकी वर्षं अफेअर असताना ती दुसर्याा कूणासोबत हे असं आणि इतकं कसं काय करू शकते? इट वॉज जस्ट अबाऊट सेक्स. ऍपेरेण्टली, मी तिला सेक्समध्ये फार समाधान देऊ शकत नव्हतो. म्हणजे मी नामर्द आहे असं नाही. पण तिला जे थ्रिल, जे पॅशन हवं होतं ते माझ्यामध्ये नव्हतं. तो अडव्हेंचरचा सेन्स माझ्यामध्ये नव्हता, मी फार बोरिंग होतो. एरवीपण होतोच, पण सेक्समध्ये जरा जास्तच. फॉर मी, सेक्स वॉज जस्ट अ नॉर्मल थिंग. येस्स, आय वॉज नेवर रोमॅंटिक, आणि ना मी पॉर्नस्टारसारखे चाळे करतो. आय अल्वेज हॅड प्लेन व्हनिला सेक्स. सो.. प्रत्येक वेळी मी तिला सुख देत होतो, आय मेड इट शुअर.. पण तित्कं पुरेसं नव्हतं. म्हणून तिनं अधेमध्ये कधीतरी मित्रांबरोबर पार्टीमध्ये वगैरे... जस्ट फॉर फन. चार वर्षं माझ्यासोबत ती राजरोस झोपत होती. तेव्हा हे सर्व तिला सांगता आलं नाही... आणि माझ्यानकळत जस्ट फॉर फन! म्हटलं इतकं मी बोरींग आणि पॅशन नसलेला मुलगा आहे तर माझ्याशी लग्नच का करतेस? आधीच सांगायचं ना... ब्ब्वा अर्णव, तू मला बिछान्यावर हवं तसं सुख देऊ शकत नाहीस. यु कान्ट मॅच टू माय लिबिडॊ. लेट्स ब्रेकप. हिच्यासाठी मी शंभरेक तडजोडी करतच होतो... त्यापेक्षा वेगळे झालो असतो. ते तिनं केलं नाही. बीकॉज आय वॉज अ प्राईझ कॅच फॉर हर. पैसा, इज्जत, करीअर, जगभरात फिरणं, हे सगळं तिला मी देऊ शकत होतो. तिचा तो पॅशनेट आणि थ्रिलवाला झोप्या नाही. मी लग्न मोडलं म्हणून् सांगितल्यावर रडायला लागली. हातापाया पडली. प्लीज अर्णव माझा विचार कर. आईबाबा काय म्हणतील.. लोकं काय म्ह्णतील. मी यापुढं असं कधीच काही करणार नाही. तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. तुला धोका देणार नाही. सगळे नुसते बुडबुडे. शब्दांचे. माझ्या भावनांचे. जयनं आम्हाला दोघांना समजवायचा खूप प्रयत्न केला. मी नाहीच ऐकलं. मला ना ती दुसर्याा कुणाबरोबर फिजिकली इन्व्हॉल्व्ह झाली याहून.... . माझ्यासोबत असताना तिनं माझ्याशीच एकनिष्ठ रहावं अशी माझी अपेक्षा चुकीची होती का? मी तिला जर सेक्शुअली सॅटीस्फाय करू शकत नाही असं तिला वाटलं होतं ना... मग तिनं नातं तोडायचं होतं ना. मला ते चाललं असतं... माझ्या चांगुलपणाचा, माझ्या प्रेमाचा, माझ्या शांतपणाचा हा जो काही तिनं गैरफायदा घेतला... दॅट वॉज मोअर हर्टींग. इन्साल्टिंग. एक क्षण. एक निर्णय. देन इट वॉज ओव्हर. लाईफमध्ये भयाण पोकळी तयार झाली. सगळंच कोसळल्यासारखं झालं. आईला आणि सिंधुला जयनंच काहीतरी सांगितलं. मी काहीच बोलू शकलो नाही. मी माझी बॅग भरली आणि दिल्लीला गेलो. नोकरीचा राजिनामा दिला. ही सरकारी कॉन्ट्रॅक्टवरची नोकरी घेतली. दरम्यान तिनं मला फोन करायचे भेटायचे खूप प्रयत्न केले. तिची इतकी हिंमत, की स्वत:च्या आईवडलांना घेऊन दिल्लीला आली. माझी मनधरणी करायला. कारण तिला माहित होतं.... काय घडलंय हे मी त्यांना सांगू शकणार नाही. माझा तो स्वभावच नाही. त्यांनाच काय मी सख्ख्या आईला सांगू शकलो नाही. काय सांगणार... एकीकडे अपमानास्पद पण वाटत होतंच की. चार वर्षांची प्रेयसी जेव्हा तुमच्या मर्दानगीवर प्रश्न उठवते. इट हर्ट्स. इट इज इन्सल्टींग.”
मल्लिगे गालावर हात ठेवूनत्याचं बोलणं ऐकत होती. इतकावेळ घडाघडा बोलत असताना ती इथं आहे हेच त्याच्या लक्षात नव्हतं. कितीतरी वर्षांनी तो कुणाशीतरी प्रत्यक्ष समोरासमोर बसून मनातला सल सांगत होता. त्यानं मान वर करून तिच्याकडं पाहिलं. तो जे काय बोलला होता त्यातलं किती तिला समजलं होतं आणि किती नाही ते त्यालाच माहित नव्हतं पण ती ऐकत होती. “मग दिल्लीतच राहिलो. सिंधुच्या लग्नापुरताच येऊन गेलो. आई खूप खचली. पण मला आता परत जायचंच नव्हतं. सगळीकडून हरल्यासारखं वाटायला लागलं. कसं विसरणार? अख्ख्या आयुष्यातला दिवसनदिवस तिच्याशी जोडला गेला होता. कसं विसरणं शक्य आहे? आणि विसरता येत नाही म्हणून माफ करणं तरी शक्य आहे का? मग एका रात्रीचे पैसे देऊन खूप प्रेमं विकत घेतली. खूप शरीरं अनुभवली. प्रत्येकीला एकच प्रश्न विचारायचो. मी सेक्शुअली कंपीटंट आहे का? पैसे घेतलेल्या मुली. त्या खोटंच बोलणार की. मग एक दिवस असा उजाडला की त्याचासुद्धा कंटाळा आला. काहीच नको. आजूबाजूला कुणीच नको. कुणाशीच बोलायला नको. कुणालाच काहीच सांगायला नको. स्वत:लाच खोलीमध्ये दिवसभर कोंडून घ्यायचो. ऍक्युट डीप्रेशनमध्ये जायची वेळ आली. मग ही पोस्टिंग निघालेली ऐकलं. मी मुद्दाम मागून घेतली. यायला कुणीच तयार नव्ह्तं. जंगलीभाग, एकट्यानं रहायचं.. पण मी आलो. इथं आल्यावर खरं सांगायचं तर खूप बरं वाटलं. जसं आयुष्य मला हवं तसंच हे होतं. परत अभ्यास चालू केला. पीएचडीचं काम सुरू केलंच होतं. इथं बरं वाटायला लागलंय.. आणि तीन वर्षं इथंच आहे.”
“वीडले पोमाटे?” तिनं शांतपणं विचारलं.
“हे घरच आहे की” तो आजूबाजूला बघत म्हणाला. “जिथं आपल्या मनाला शांती मिळते तेच तर आपलं घर असतं. पीएचडी झाल्यावर परत एकदा बदली होइलच. तेव्हा जावंच लागेल. कदाचित आता परत जायची हिंमत आलीये. सिंधु कायम मला सांगते, की एका मुलीपायी मी माझं आयुष्य बरबाद करू शकत नाही. पण मला नाही वाटत इथं येऊन मी आयुष्य बरबाद वगैरे केलं. यु नो व्हॉट, शी गॉट मॅरीड, सौम्या, वर्षाच्या आत तिचं लग्न झालं, लंडनमध्ये आहे. फेसबूकवर फोटो पाहतो मी कधीतरी. खुश दिसते. मी मात्र अजून त्याच गर्तेत फिरल्यासारखा. कदाचित असं झालंय के मी तिला केव्हाच विसरलोय. आणि मलाच त्याचा पत्ता नाही. मे बी आय ऍम ओव्हर हर. जखमा केव्हाच्याच बुजल्यात, पण त्या पट्ट्या सोडून बघायची हिंमत माझ्यात नाही. व्रणसुद्धा ठणकतील अशी भिती वाटते. मी का एकटा राहतोय? जगापासून फटकून... मला नाही वाटत इथं येऊन आयुष्य बरबाद वगैरे केलं. आय ऍम हॅपी. करीअरवाईज पण पीएचडीचं काम झालेलंच आहे. आता नेक्स्ट काय ते माहित नाही. आय ऍम हॅपी.” तीनचारदा तो हेच एक वाक्य पुटपुटत बसला. मग तो शांतपणे म्हणाला. “मी खुश आहे, पण हेही खरं की मी खूप एकाकी आहे. मी खूप एकटा आहे. हा एकटेपणा आता नकोसा झालाय.”
मग दोनेक क्षण दोघंही काहीच न बोलता शांत बसून राहिले. बाहेर पाऊस कोसळतच होता, वीजा चमकतच होत्या. “मल्लिगे, डू मी अ फेवर?” त्यानं थोड्यावेळानं विचारलं.
“परत कॉफी बनवू?” ती लगेच उठत म्हणाली. ही इतक्या वेळची शांतता तिला असह्य झाली असावी.
“नको.” त्यानं हात पुढं केला. “जस्ट कम हीअर.” ती जागच्या जागी थबकली. “सार? येन्न सोळरींग?”
“हात धर. फक्त माझा हात धर. घाबरू नकोस. मी इतकाही वेडा नाही... मला काहीही वावगं करायचं नाहीये. मी करू शकतो. इच्छापण आहे.. पण नियत नाहीये. आता फक्त माझा हात धर. मला स्पर्श हवाय. त्याहून जास्त काही नको” ती दोन पावलं पुढे आली. सोफ्यावर त्याच्या बाजूला बसली. तिनं त्याचा हात धरला आणी घट्ट दाबला.
“एकटं रहायला लागणं फार वाईट असतं. पण त्याहून जास्त वाईट काय अस्तं माहिताय? एकटं रहावंसं वाटणं. आजूबाजूला कुणाचंच असणं नकोसं वाटणं......” तो हळू आवाजात कुजबुजला. “मी स्वत:ला हरवायला बघतोय. आताचं नाही कायमच.... आपण फार एकलकोंडे आहोत. आपल्याला एकटं रहायला आवडतं. आपल्याला कुणाचीच गरज नाही. अशी स्वत:चीच समजूत करून घेतली. हे काय ऑनलाईन एवढे खंडीभर मित्र आहेत. मैत्रीणी आहेत. टाईमपाससाठी एवढ्या गोष्टी आहेत. पण यापैकी कुठलीही गोष्ट तुम्हाला हा स्पर्श देऊ शकत नाही. हजारो किमी दूर असलेल्या मित्राला तुमच्या मनामधल्या भावना समजतात. त्यांची जाणीव होते, पण ते तुम्ही त्याला सांगितल्यावर. समोरचा माणूस मात्र केवळ तुमच्या नजरेवर, स्पर्शावर तुमच्या मनात काय चाललंय ते जाणू शकतो. नथिंग, नथिंग इन द वर्ल्ड कॅन बीट दिस सेन्सेशन.”
थोडावेळ तो तिचा हात हातात घेऊन तसाच डोळे मिटून बसून राहिला. ती त्याच्या चेहर्यामकडे एकटक बघत राहिली. खूप दिवसांनी त्याला असं रितं रितं वाटत होतं, मनामध्ये कधीचं काय काय साठलं होतं ते आज एकदाच वाहिलं. आता शिल्लक राहिलं तो ते केवळ समाधान. रितं झाल्याचं समाधान. त्याची तंद्री भंगली ती वाजणार्याि मोबाईलच्या रिंगनं. बाजूला ठेवलेला मोबाईल त्यानं उचलला. परत सानियाचाच मेसेज. त्यानं उत्तर दिलं नाही.
“गूड नाईट” म्हणून तो उठला. यावेळी अजिबात न धडपडता व्यवस्थित उठला. बेडरूममध्ये आल्यावर त्यानं हातातला मोबाईल उचलून जयचा नंबर डायल केला. तो ऑफिसमध्ये असेल. कदाचित बिझी असेल... दोन तीन रिंग वाजल्यावर पलिकडून त्याच्या बेस्ट फ्रेण्डचा आवाज आला.
“हां अर्णव, बोल. इतक्या रात्री?”
“जय, एक फेवर हवं होतं. बिझी असलास तर नंतर बोलू.” हे बोलतानासुद्धा हजारो किमी पलिकडे असलेल्या जयच्या चेहर्या वर काय हसू आलं असेल त्याचा इथंच अंदाज आला.
“अर्णव, तुझ्यासाठी मी अजिबात बिझी नाही. बोल... काय झालंय?” आवाजामधला आश्वासकपणा त्याला पुन्हा एकदा जाणवून गेला.
“कुणी मिळालं तर... मी पंधरा दिवसांत बोस्टनला यायचं ठरवतोय. आईला घेऊनच.. सिंधुच्या डिलेव्हरी आधी.. इथं कुणी रीप्लेसमेंट मिळालं की लगेच...”
“मग यात तुला फेवर काय हवंय?येण्यासाठी काही खास निमंत्रण की हत्तीघोडे पाठवू?” जय हसत म्हणाला.
“नाही रे. अपण रिप्लेसमेंट म्हणून कुणी मिळालं तर..सजेस्ट कर. किमान दोन तीन महिन्यांसाठी तरी.. तेवढी तरी सुट्टी टाकायला हवी....” त्याच्या आवाजातला बदल सातसमुद्राच्या पलिकडे असलेल्या जयला जाणवला. “अर्णव, ठिक आहेस ना? काय झालंय?”
“काही नाही. आय मिस यु. खूप एकटं वाटतंय यार. बोलायला पण कुणी नाही”
“तू इकडे ये.. खूप दिवस.. दिवस काय वर्षं झाली आपण पोटभर गप्पाच मारल्या नाहीत”
तो हसला. मनापासून. “बाय, टेक केअर. सिंधुला सांग..मी लवकरच् येईन!” त्यानं फोन कट केला.
व्हॉट्सऎपवरचे पंचवीस मेसेजेस, फेसबूकवरच्या सोळा नोटिफिकेशन्स, सानियाचे चार मेसेजेस दिसत असूनसुद्धा त्यानं मोबाईल स्विच ऑफ केला आणि डोळे मिटून शांत पडून राहिला.
(समाप्त)