Monday 26 December 2022

अवतार: कथा समुद्रमंथनाची!!

 



 2009 साली आलेला अवतार हा जेम्स कॅमेरूनचा मेगा ड्रीम प्रोजेक्ट. खरंतर 1995 पासून कॅमेरूनच्या डोक्यात असलेला हा विषय. पण त्याला अनुलक्षून असलेली तांत्रिक करामत उपलब्ध नसल्याने बाजूलाच राहिलेला हा विषय. अखेर 2004 नंतर मोशन कॅप्चर आणि त्याच्या सोबत असलेल्या इतर संगणकीकृत करामती दिमतीला हजर झाल्यावर, कॅमेरूनने या त्याच्या आवडत्या विषयाला हात घातला होता. अवतार हा आतापर्यंतच्या जगभरामध्ये गाजलेल्या सिनेमांपैकी एक. अगदी ब्लॉकबस्टर म्हणून ऑलटाइम क्लासिक सिनेमा. या सिनेमाने अनेक नवीन रेकॉर्ड बनवले, आणि तसेच, नवनवीन तांत्रिक कौशल्येही उपलब्ध करून दिली. थ्रीडी सिनेमाला जगभरामध्ये मिळालेला प्रतिसाद पाहून यानंतर अनेक अ‍ॅक्शन मारधाडपट थ्रीडीमध्ये आले. अर्थात हा सर्व झाला पूर्वेतिहास. अवतार – द वे ऑफ वॉटर हा त्या चित्रपटमालिकेमधला दुसरा चित्रपट. एकूण चार चित्रपट प्रदर्शित करायचा दिग्दर्शकाचा मानस आहे. पैकी, तिसर्‍या सिनेमाचे शूटिंगदेखील पूर्ण झाल्याची बातमी आहे. ट्रेलरदेखील येण्यापूर्वीच “हा चित्रपट मी बघणारच” असे आपण ठरवून टाकतो त्यापैकी एक असा हा अवतार.

जेम्स कॅमेरूनचा प्रत्येक सिनेमा हा अप्रतिमच असतो. त्याचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर जितके गाजतात, तितकेच ते समीक्षकांच्याही पसंतीस पडतात.  हे असे यश मिळवणारे फार थोडकेच दिग्दर्शक सध्या कार्यरत आहेत. द टर्मिनेटरसारखा जॉनर डिफायनिंग सिनेमा असो, ट्रू लाइज सारखी अ‍ॅक्शन कॉमेडी असो किंवा टायटॅनिकसारखा मास हिस्टेरीया देणारा सिनेमा असो, त्याच्या प्रत्येक सिनेमामध्ये प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन असतंच. अगदी छोट्या छोट्या फ्रेम्समधून त्याच्या सिनेमाची कथा उलगडत जाते, त्याचवेळी तंत्रज्ञानावर त्याची असलेली पकड इतकी मजबूत आहे की, इतक्या वर्षांनीही त्याचे सिनेमा फ्रेश वाटत राहतात.



अवतार – द वे ऑफ वॉटर त्याबबातीत मात्र अजिबात निराशा करत नाही. तंत्रज्ञान इतके कमालीचे वापरले आहे की, पॅन्डोरा या एका चंद्रावरची ही वसाहत अगदी सच्ची वाटत राहते. सायन्स फिक्शनमध्ये सायन्स आणि फिक्शन दोन्ही जमून येतात तेव्हाच ती कलाकृती खर्‍या अर्थाने परिपूर्ण होते. इथे, एकंदरीत, पाण्याखाली असणारे सर्व सीन शूट करण्यासाठी वापरलेली तंत्रज्ञाने, मोशन कॅप्चर टेक्निक, पॅण्डोरावरचे प्राणी, निसर्ग, पाण्याखालचे जग सर्व काही बेस्ट असतानाही, कुठेतरी काहीतरी उणीव राहून जाते.

 


अवतार म्हणजे काय हे आपण भारतीयांना समजावून सांगायची आवश्यकता नाही. भारतीय मिथकांमध्ये असलेले देवादिकांचे अवतार आणि त्यांचे अवतार कार्य यामधूनच कॅमेरूनला ही “अ‍ॅव्हटार” संकल्पना सुचली होती. एरवी हॉलीवूडपटांमध्ये असलेली कल्पना ही साधारण – पृथ्वीवर(म्हणजे केवल आम्रिकेत) आक्रमण करणारे परकीय एलियन्स, मग ते सर्व कसे दुष्ट दुष्ट, अमेरिकन लोक कसे हीरो हीरो इत्यादि. कॅमेरूनने ही संकल्पनाच उलट केली होती. त्याच्या नॅरेटिव्हमध्ये मानव हा यामधला खलनायक आहे. या पृथ्वीवरच्या मानवाने दूर कुठल्यातरी ग्रहावरच्या एका चँद्रावरच्या वस्तीवर आक्रमण केलेले आहे. ही परग्रहीय वस्ती अत्यंत सुंदर आहे, विलक्षण आहे. इथे असणारा निसर्ग हा पृथ्वीवरच्या निसर्गासारखाच विविधरंगी, विविधढंगी आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे तिथले मानव म्हणजे नावी लोक. हे लोक निळे आहेत, कॅमेरूनला ही रंग संकल्पना कृष्णाच्या रंगावरून सुचली असे म्हणतात. उंच आहेत, प्रचंड शक्तीशाली आहेत. पण तांत्रिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या मानवाने त्यांना नमवले आहे. पॅन्डोरावर मानवाने स्वत:ची कॉलनी प्रस्थापित केलेली आहे. इथली हवा मानवासाठी विषारी आहे, पण या ठिकाणी मिळणारी नवीन खनिजे मात्र मानवासाठी मौल्यवान आहेत. इथे टिकून राहण्यासाठी नावी लोकांसोबत त्याचा संघर्ष अद्याप सुरूच आहे. हा संघर्ष कमी व्हावा म्हणून शास्त्रज्ञांनी अवतार तयार केले आहेत. म्हणजे, मानव चक्क नावी अवतारामध्ये अवतीर्ण होतो, आणि त्यांच्यासारखाच दिसू-वागू लागतो. या अवताराचा आत्मा मात्र मानव आहे. या अवतारांनी मूळ नावी लोकांमध्ये मिसळून जावे, त्यांना आपलेसे करावे, थोडक्यात कॉलनायझेशनला मदत करावी असा त्यांचा सुप्त हेतू. या ग्रहावर आलेला जॅक सली हा अपंग सैनिक मात्र अवतार रुपामध्ये नावी टोळीमध्ये पूर्ण मिसळून जातो, त्यांच्यापैकीच एक होतो, आपले मानवरूप सोडून तो स्वत:ला नावी म्हणून स्विकारतो, आणि त्यांच्याच दुनियेत जगतो. पहिल्या भागामधला हा सर्वात रोचक भाग. दुसर्‍या भागामध्ये जॅक सली हा नावी झाला आहे, इथे त्याचे स्वत:चे कुटुंब आहे, मित्रमंडळी आहेत. मानव वस्ती आता पॅण्डोरावरून निघून गेली आहे. सर्व आलबेल आहे पण.... मानवाचा लोभीपणा काही कमी होत नाही.

 


मानवाचा इतिहास हा आपापसातल्या लढायांचाच राहिलेला आहे. आपल्यापेक्षा तांत्रिक दृष्ट्या मागासलेल्या मानववंशावर हल्ले करून त्यांना नामोहरम करतच होमो सेपियन आजवर इथे पोचलेला आहे. अगदी सतराव्या अठराव्या शतकापर्यंत एका मानव टोळीने दुसर्या मानव टोळीला टाचेखाली ताबून ठेवणे, त्यांचे भूभाग बळकावत लूट करणे इतकेच काय, एका मानवाने दुसर्‍या मानवाला विकणे-विकत घेणे हे सुरूच होते. या अस्सल इतिहासाचे रोपण कॅमेरूनने सायन्स फिक्शनच्या रुपात केलेले आहे. इथे पॅंडोरावर असलेली नावी जमात ही निसर्गाशी एकरूप झालेली आहे. त्यांच्या मनामध्ये असलेली निसर्गदेवी आयवा ही सर्वच चराचरामध्ये अखंड वाहते आहे, असा त्यांचा गाढ विश्वास आहे. पृथ्वीवरून आलेल्या प्रगत मानवाला मास्त्र हे थोतांड मान्य नाही, त्यांच्या दृष्टीने पैसा हेच काय ते खरे दैवत. या अशा मानवाचा आणि नावी अवतारामधील मानवाचा हा संघर्ष अवतार 1 मध्ये होता.

 


अवतार 2 मध्ये हा संघर्ष अधिक तीव्र व्हायला हवा होता, पण दुर्दैवाने तो तसा होत नाही. पहिल्या भागामध्ये असलेली अवतार आणि त्यामागची तात्त्विक बैठक दिग्दर्शक या भागामध्ये प्रकर्षाने दाखवत नाही. तांत्रिक करामती दाखवण्याच्या नादामध्ये कथेमधल्या काही महत्त्वाच्या बाजूंकडे लक्ष किंचित कमी पडतं, आणी मग एकदम प्रेडिक्टेबल कथा सुरू होते. कथेमध्ये एक मेजर झोलदेखील झालेला आहे. (स्पॉयलर असल्यामुळे इथे लिहत नाही). अख्खी कथा ही जॅक सली विरूद्ध मानव अशी सुरू होते. खरंतर, वास्तविक, भारतीय मिथकांमध्ये समुद्र, सामुद्रिक जीव यांच्याशी संबंधित अवतार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपली सृष्टी समुद्रामध्ये जन्म घेते, आपला सर्जक विष्णु समुद्रामध्येच स्थित आहे. समुद्रमंथन हा आपल्या पौराणिक मिथकांमधला एक महत्त्वाचा भाग. त्यामधले अमृत मात्र अवतार 2 मध्ये आणताना अतिशय ओढून ताणून आणले आहे, आणि त्याचे पुरेसे स्पष्टीकरण देखील येत नाही.




अवतार 1 मध्ये पृथ्वीवर परत गेलेले लोक या सिनेमाच्या सुरुवातीला पॅन्डोरावर परत येतात. ते नक्की का येतात हे समजत नाही. पण नावी बनलेल्या जॅक सलीला मात्र स्वत:चे शांत कौटुंबिक जीवन सोडून या स्काय पीपलविरूद्ध उठाव करावा लागतो. या प्रयत्नामध्ये त्याला आणि त्याच्या कुटुंबाला स्वत:चे मूळ स्थान सोडून परागंदा व्हावे लागते आणि समुद्रकिनारी दलदलीत राहणार्‍या एका टोळीकडे आश्रय मागावा लागतो. जॅक सली, नेतिरी आणि त्यांची मुलं ही डोंगराळ भागामधली आहेत, त्या जीवनाशी, तिथल्या निसर्गाशी एकरूप झालेली आहेत, आता त्यांना हा बदल सहन करावा लागतो. एका वेगळ्या निसर्गाशी, प्राणीजीवनाशी समरूप व्हावे लागते. इथे जगायचे तर इथलेच व्हावे लागते. आणि यामधून घडत असणार्‍या एका आगळ्यावेगळ्या नात्यांची इथे सुरुवात होताना दिसते. देवमासा हा यामधला एक महत्त्वाचा दुवा ठरतो. केवळ मानव अथवा मानवस्वरूपच नव्हे, तर इतर प्रत्येक चराचरामधल्या निसर्गाची ही कहाणी बनत जाते. ही केवळ स्वअस्तित्वाचीच लढाई नाही, तर ती भवतालाच्या अस्तित्वाचीदेखील लढाई आहे, आणि म्हणूनच या लढाईमध्ये केवळ जिंकून चालणार नाही तर पूर्ण बळाने शत्रुला नामोहरम करावे लागणार आहे.

 


इतकी सुंदर तात्विक पार्श्वभूमी असलेल्या या कथानकामध्ये कॅमेरूनने विनाकारण टीनेजर हायस्कूल हॉलीवूड ड्रामा का आणला आहे ते तोच जाणे. या अशा नाटकी फटकार्‍यांमधून उभे राहणारे कथेचे चित्र  फार ढोबळ आहे. अर्थात या कथामालिकेचे अजून दोन भाग येणार आहेत, आणि त्यांचे प्रमुख चित्रीकरणदेखील आटोपलेले आहे अशी बातमी नुकतीच वाचली आहे. त्यामुळे अखंड चार चित्रपट पाहताना कदाचित आज जाणवणारे लूपहोल्स त्यामध्ये बुजवलेलेदेखील असू शकतात. त्यामुळे त्यावर फारसे  भाष्य करण्यात अर्थ नाही. मात्र, सिनेमा म्हणून पाहत असताना यामधला भपका प्रचंड प्रमाणात जाणवतो, आणि कथामूल्य किंचित कमी पडते हे मात्र निश्चित.

 


मात्र हा सिनेमा मोठ्या प्रमाणात पकड घेतो, ते त्याच्या तांत्रिक बाजूमध्ये. पाण्याखाली केलेल्या चित्रीकरणासाठी वापरलेले अत्याधुनिक मोशन कॅप्चर तंत्रज्ञान असो, अथवा बखुबीने केलेले एडिटिँग असो, आपण सिनेमा पाहताना एक वेगळेच विश्व अनुभवत आहोत, हे प्रेक्षकांना वारंवार जाणवत राहते. अनेक समीक्षकांनी अवतार 2 ला करोडों डॉलर्सचा स्क्रीनसेव्हर म्हणून चिडवलेले आहे. अवतार 2 मधले पाण्याखालचे अद्भुत विश्व मला स्वत:ला मात्र जिवंत रसरशीत आणि अस्सल वाटले. फार क्वचित इतके सुंदर आणि तपशीलवार काल्पनिक विश्व उभारलेले दिसून येते.

 

सिनेमा म्हणून अवतार 2 बॉक्स ऑफिसवर गाजत आहेच. अवतार 1 च्याही पुढे तो मजल मारेल अशी चिन्हे आता दिसत आहेत. तसे घडल्यास अवतार 3 आणि 4 कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा काय्च्याकाय उंचावलेल्या असतील. त्या सर्वांना जेम्स कॅमेरून यशस्वीपणे पुरा पडेल याची खात्री आतातरी वाटत आहे, पण पुढल्या सिनेमांमध्ये स्क्रीनसेव्हरपेक्षा आणि तांत्रिक करामतींपेक्षाही कथा आणि त्यामधल्या घटकांचे परस्परसंबंध अधिक विस्तृतरीत्या दाखवल्यास अधिक उत्तम.

 

नंदिनी देसाई

Friday 9 September 2022

काय लायटिंग!! काय झकापक!! पण स्टोरीचा पत्त्याच न्हाई!!

काय लायटिंग!! काय झकापक!! पण स्टोरीचा पत्त्याच न्हाई!! 


- नंदिनी देसाई 



भारतामध्ये भलीमोठी फिल्म इंडस्ट्री आहे, बॉलीवूड तर आहेच आहे, पण त्याहूनही अनेक तर प्रादेशिक भाषांचे स्वत:चे फिल्म जगत आहे. याहून पलिकडे गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये उदयाला आलेली एक भलीमोठी इंडस्ट्री आहे अ‍ॅनिमेशन आणि सीजीआयची. अनेक हॉलीवूड सिनेमा स्टुडिओ कंप्युटर जनरेटेड इमेजरीसाठी त्यांचे काम भारतात आउटसोर्स करतात. इंग्रजी सिनेमा पाहताना जर एंड क्रेडिट्स पाहिले तर अनेक भारतीय सीजीआय कंपनी आणि भारतीय तंत्रज्ञांची नावे दिसू शकतील. 


नमनाला घडाभर तेल घालायचे कारण असे की, हे सर्व तंत्रज्ञान भारतात उपलब्ध असूनही, आपली सीजीआय अक्कल ही हॉट हीरो दाखवण्यासाठी त्याच्या अंगावरचा शर्ट जळणे, नाहीतर हिरॉइनच्या केसांचे क्लोजप घेताना ते केस अधिकाधिक चमकदार दाखवणे इतपतच मर्यादित राहते. त्यामुळे ब्रह्मास्त्रची घोषणा झाली तेव्हा जरा भितीच वाटली होती. करण जोहरने बाहुबलीला मिळालेले यश पाहून ते बॉलीवूडमध्ये रेप्लिकेट करण्याचा प्रयत्न केलाय असे तेव्हा वाटले होते. भरीसभर सिनेमा बनायला इतकी वर्षे लागली, आणि रीलीजच्या जवळ आला तेव्हा काहीही कॉन्ट्रोव्हर्सी यायला लागल्या होत्या, त्यामुळे मच अवेटेड सिनेमा बनलाय. मला सुरुवातीपासूनच ब्रह्मास्त्र हे अश्विन संगी- अमिशटाईप काहीतरी मायथॉलॉजिकल जत्रा आणि महाभारत-रामायण मालिका टाईप असेल अशी भिती वाटत होती. 


अयान मुखर्जीने ही भिती दुर्दैवाने साधार ठरवलेली आहे पण एकाच बाबतीत. या सिनेमाचा भारतीय पुराणकथांशी अथवा मिथकांशी दुरान्वयेही संबंध नाही. अस्त्राव्हर्स हे भारतीय मिथकांची नावे वापरून बनवलेले अव्हेंजर्सचे हिंदी व्हर्जन आहे. आपल्याकडे भारतीय मिथकांमध्ये अनेक प्रभावी कथानके आहेत. पण त्याऐवजी, अयान आणि रणबीरने मिळून हे हे स्पेशल इफेक्ट्स इथे आपल्याला हवेत, हा हा शॉट आपल्याला इथे असा हवा, आणि एक कार चेस सिक्वेन्स हवा, एक उड्या मारायचा शॉट हवा, एक पाण्यातली लढाई हवी आगीचे असे हे सीक्वेन्स हवेत असे बसून ठरवलेत आणि मग त्याच्या आजूबाजूला कथा बसवण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. मग त्यात तीन मेगा स्टार घेऊन त्यांना थोडे थोडे फुटेज दिले. मग त्यात थोडे अव्हेंजर्स अ‍ॅड केलेत, थोडा कॅम्प हाफ ब्लड, थोडा डॅन ब्राउन आणि मग थोडासा हॅरी पॉटर. मग मनमोहन देसाईंना साकडे घातले आणि त्यांच्याकडून थोडा मसाला उधार घेतला. आता उरलेला सगळा वेळ आलिया भट्टचे क्लोजप्स आणि रणबीरचे गोडमिट्ठास हसू. झाला ब्रह्मास्त्र तयार. 


यामधले सीजीआय आणि स्पेशल इफेक्ट्स भारी आहेत. प्रचंड पैसा खर्च केलेला दर शॉटला जाणवत राहतो, पण हे इफेक्ट्स कुठेही मनाला भावत नाहीत, ते कायम खोटे खोटे चिकटवलेलेच वाटत राहतात. त्यातून ते सातत्याने इतके आदळत राहतात की त्या नादात समोर दिसत असलेली सुंदर सिनेमेटोग्राफी अथवा अभिनेत्यांचा अभिनय हेदेखील विरून जायला लागते. सिनेमा कुठेही प्रेक्षकांना आपलासा करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे आपण कायम भांबावलेलेच राहतो. भई ये हो क्या रहा है? सिनेमामध्ये अचानक काही पॅचेस येतात, आणि निघून जातात. शिवाचे ते दोन बेस्ट फ्रेंड्स त्यांचे काय झाले? आणि ती लहान मुलं? त्यांचा नंतर काहीच उल्लेखदेखील नाही. त्या आलियाची फॅमिली कुठे आहे? पोरगी इतके दिवस गायब असून त्यांना काहीच फरक कसा पडत नाही? अगदी सुरुवातीला आलेला मोहन भार्गवचा रेफरन्स एकदम झकास वाटला होता. त्या आधारावर इतरही काही कॅरेक्टर्स येतील अशी आशा होती. पण तेही बहुतेक दिग्दर्शक विसरून गेला वाटतं. त्या गुरुकुलमधले इतर मुलांनाही अगदी कमी स्क्रीन टाईम दिला आहे. इन फॅक्ट, आलिया रणबीरपेक्षाही अयानने लायटिंगच्या माळांनाच जास्त स्क्रीन टाईम दिलाय असं सारखं वाटत राहतं. 


चुकीच्या ठिकाणी आलेली गाणी हाही एक या सिनेमाचा प्रॉब्लेम आहे. केसरिया गाणे सुंदर आहे, पण त्याची प्लेसमेंट फारच वाईट झालेली आहे. सुरुवातीचे भूत चढेया गाणे बढिया आहे, त्याची कोरीओग्राफीदेखील धमाल आहे. पण या गाण्यामुळे आणि एकंदरीत त्या पूजा पेंडालच्या माहौलमध्ये इतका भव्यदिव्यपणा आणला आहे की, त्यानंतरच्या अनेक शॉट्समध्ये काहीही भव्य वाटतच नाही, खुजेच वाटत राहते. ओपनिंगलाच दाखवलेली ही भव्यता सिनेमाला प्रचंड मारक ठरते. 


सिनेमाची पहिली 25 मिनिटे अत्यंत बॉलीवूडीय आहेत. बॉय मीट्स गर्ल. अमीर लडकी, अनाथ लडका. मग तो कसा गोल्ड-हार्टेड. ती कशी त्याच्या गरिबीच्या प्रेमात पडते वगैरे वगैरे. हा सर्व भाग नसता, तर कथानक कदाचित इतके ठिसूळ राहिले नसते. दैवी शक्ती असलेला शिवा (एक क्लॅरिफिकेशन- याचे नाव शिवा असले तरी तो महादेव शंकराचा अंश नाही, किंबहुना बहुत चालाखीसे अयानने यामध्ये कुठल्याही भारतीय देवाचे थेट नाव घेतलेले नाहीये.) याच्या अवतीभवती काहीतरी भयंकर घडतं आहे, आणि मध्येच नेहमीचा टिपिकल हिंदी फिल्म्सवाला रोमॅंटिक ट्रॅक सुरू होतो, यामध्ये प्रेक्षकाची त्या कथानकाशी लागत असलेली लिंक पूर्ण तुटून जाते. काळवेळेचे काही भान नसतेच का या हिंदीवाल्यांना? अगदी सुरुवातीपासून त्या कथानकामध्ये अथवा नायकाबद्दल जराही कनेक्शन प्रेक्षकांना वाटू नये याची अतीव काळजीच घेण्यात आली आहे... 


या सिनेमाचे एकूण तीन भाग असणार आहेत, पहिल्या भागामध्ये अयानने कथानकाची केवळ मांडणी केली असती तर पुढचे दोन भाग अधिक रंजक झाले असते. इथे पहिला भाग पूर्ण कथानक मांडतही नाही आणि उत्सुकताही ताणत नाही , त्यामुळे प्रेक्षकांना आता पुढे काय हे कुतुहल राहतच नाही. त्यातून दुसर्‍या भागासाठी हृतिक रोशन तयार नसल्याची बातमी नुकतीच वाचली. मुळात, तीन भागाचा सिनेमा काढताना पुढच्या सिनेमाचा मुख्य नायक जर किंचित दाखवला असता तरी प्रेक्षकाशी एक इमोशनल कनेक्ट लगेच तयार झाला असता. या फंड्यासाठी आमच्या मार्व्हलवाल्याना मानायला हवं. एंड क्रेडिटनंतर पुढची छोटीशी चुणुक दाखवून हे लोकांना कायम गुंगवून ठेवतात. 


अर्थात, इतके सारे लिहिले तरीही, ब्रह्मास्त्र हा वन टाईम वॉच नक्कीच आहे. किंबहुना, मसाला चित्रपटांवर पोसलेल्या आमच्यासारख्या लोकांसाठी तरी नक्कीच. सिनेमा सुपरहिट जाईल अशी चिन्हे आता तूर्तास तरी दिसत आहेत. बॉक्स ऑफिस सक्सेससाठी तरसलेल्या बॉलीवूडसाठी ब्रह्मास्त्र काही आशा दाखवेल असे वाटतंय तरी. 




सिनेमाची सेव्हिंग ग्रेस म्हणजे, याचे संगीत आणि ऑफ कोर्स कलाकार. रणबीर कपूरच्या खांद्यावर अख्खा सिनेमा आहे, आणि त्याने तो भार लीलया पेलला आहे. सुरुवातीचा एकटा, भांबावलेला तरूण ते स्वशक्तीची जाणीव झाल्यावर त्याच्यामध्ये उगवलेली धग हे सर्व ट्रांस्फॉर्मेशन त्याने परफेक्ट निभावलेले आहे. आलियासोबतचा त्याचा रोमान्सदेखील खूप सच्चा वाटतो, (ते ऑफ स्क्रीन रीअल पेअर आहेत म्हणून त्यांचा ऑन स्क्रीन रोमान्स सुंदरच वाटायला हवा अशी अपेक्षा असणार्‍यांनी कृपया करीना सैफचा एजंट विनोद किंवा काजोल अजयचा राजूचाचा हे सिनेमा पहावेत. धन्यवाद!!) रणबीर स्वत: अग्नीवर नियंत्रण ठेवायला शिकतो तो सीन मला प्रचंड आवडला आहे. तिथे रणबीरचा अभिनय तर जाणवतोच, पण त्याचे पदलालित्यही विशेषत: खूप कौशल्याचे आहे.


शाहरूख खानने पहिली दहा मिनिटे अक्षरश: गाजवली आहेत. एकहाती सिनेमा त्याने यापूर्वी अनेकदा ओढला आहे, इथे बिचारा केवळ एक सीन स्वजोरावर ओढतो. नागार्जुनाला अजून थोडा वाव द्यायला होता... त्याने अ‍ॅक्शन सीनमध्ये मात्र फुल्ल धमाल केली आहे. मौनी रॉय नागीन मालिकेच्या सेटवरून इकडे ब्रह्मास्त्रच्या सेटकडे वाट चुकून आल्यासारखी वाटते. तिचे ते बॉटॉक्स ओठ आणि एकसुरी संवादफेक कंटाळा आणते. 


आलिया भट्ट सुंदर दिसते आणि अभिनयही तितकाच सुंदर करते. अ‍ॅक्शन सीनमध्ये ती प्रचंड फिट वाटते. तिचे सर्व कॉस्च्युम्स मला विशेषकरून आवडले. ट्रेण्डी तरीही, कंफर्टेबल असे सर्व कॉस्च्युम्स आहेत. आलियाच्या स्क्रीन प्रेझेन्समध्ये एक फ्रेशनेस असतो, तो या सिनेमासाठी अतिशय आवश्यक ठरला आहे.  


माझ्यासारखे जर फुल्ल बच्चन फॅन असाल तर एक गोष्ट अवश्य मान्य कराल. जेव्हा बच्चनची एण्ट्री होते, तेव्हा असं वाटतं की आता सिनेमा खर्र्‍या अर्थाने सुरू झाला. मग तो सुरुवातीला येऊदेत, मध्यंतरामध्ये किंवा एकदम लास्टला. बच्चन आला की सिनेमा वाचला. हीरोची एंट्री म्हणजे काय ते आज या वयातही बच्चनकडे बघून समजतं. ब्रह्मास्त्रमध्ये तर बच्चन फायटींग करतो तेव्हा कसल्याही जादुई अस्त्राची आणि तलवारीची गरज भासणार नाही हे जाणवत राहतं. डोळेच काफी आहेत बॉस. 


मनमोहन देसाईच्या अनबिलिव्हेबल कथानकामध्येही बच्चन बिलिव्हेबल वाटायचा. तो मारतो ते केवळ ढिशुम ढिशुम नसून खरोखर व्हिलनला बुकलतोय असं वाटायचं. त्याकाळी कसलेही स्पेशल इफेक्ट्स नसताना, मनमोहन देसाई केवळ आपल्या स्टोरीटेलिंगवर प्रेक्षकांना पूर्ण गुंगवून टाकायचा. दुर्दैवाने, बॉलीवूडचा हा मसाला फॉर्‍म्युला आता पूर्ण फेल जाताना दिसतो आहे. आज कदाचित मनमोहन देसाई असते तर या अखंड स्पेशल इफेक्ट्सचा त्यांनी काय वापर केला असता देव जाणे. अयान मुखर्जी बॉलीवूडच्या आपल्या कथानकशैलीशी प्रामाणिक राहून व्हीएफएक्सचा वापर करू पाहत आहे. पण, कोबीच्या भाजीवर कोथींबीर घालण्याऐवजी त्याने अखंड कोथिंबीरीची जुडी वाटीभर कोबीच्या भाजीत घातली आहे. ते काय म्हणतात ना, चाराण्याची कोंबडी नी बाराण्याचा मसाला. त्यातली गत. सिनेमाचे अजून दोन भाग येणार आहेत, (ते यावेत अशी प्रचंड अपेक्षा आहे) त्यामध्ये तरी त्याच्याकडून हा मसाला व्यवस्थित रांधला जावा इतकीच अपेक्षा. 



नंदिनी देसाई. 





Wednesday 1 June 2022

केके!!

काल रात्री केके गेल्याची बातमी आली आणि मन किंचित सुन्न झालं. माझा अतिशय आवडता सिंगर. तितकाच अंडररेटेड. 


त्याच्या गाण्यांवर दोन फेसबुक पोस्ट लिहिल्या होत्या. त्या आता इथे डकवून ठेवत आहे. 


नंदिनी देसाई 


*11 जून 2020* 


आज रत्नागिरीत मॉन्सूनची एंट्री झाली आहे. मॉन्सून कधीच गडगडत लखलखत येत नाही. काळेकरडे ढग आकाशाच्या या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंत निवांत पहुडलेले असतात. आसमंतामध्ये एक शांतता दरवळलेली असते. कधीही कुठल्याहीक्षणी तो बरसायला लागतो. संततधार. एकसलग. 

पण तो बरसेपर्यंत मात्र, मन नुसतं कुंद कुंद झालेलं असतं. साचल्यासारखं. तिथंच अडकल्यासारखं. पण थोड्याच वेळात पाऊस बरसणार असतो. अभी मुझ में कही थोडी बाकी है जिंदगी असं ऐकवत. 


पण तो पाऊस बरसेपर्यंत काय? 

अशावेळी कानात आपसूक वाजतो केकेचा आवाज. केके हा बॉलीवूडमधला अत्यंत अंडररेटेड सिंगर आहे, हे आमचे आधीचेच मत पुन्हा एकदा इथं या निमित्ताने नोंदवून घेतो. पण त्याचवेळी, केकेचा आवाज मला अनेकदा “माझा” स्वत:चा आवाज वाटलेला आहे. त्याने गायलेली कित्येक गाणी जणू माझ्यासाठीच लिहिलेली आहेत असं वाटत राहतं. 

आज नेमकं याच मूडमध्ये रोगमधलं हे गाणं वाजायला लागलं. 


बेचारा कहाँ जानता है, खलिश है या खला है 

शहरभर की खुशी से ये दर्द मेरा भला है 

जश्न ये राझ ना आये, मझा तो बस गम में आया है 


हेच तर मी अनेकदा स्वत:ला अनेकदा समजावत आलेली असतेच की. नेमकं काय शोधतोय आपण? काय हरवल्यासारखं वाटतंय? कशासाठी आयुष्य हे असं ओकंबोकं आणि सुनंसुनं आहे. जेव्हा प्रत्येक जण त्याच्या कोषामध्ये खुश खुश असतो, तेव्हा कुठलीतरी जुनीपुराणी जखम घेऊन तीच कुरवाळत बसायची मला हौस. माझ्या एका जवळच्या मित्राच्या भाषेत सांगायचं झालं तर, “रस्त्याने जाणारं मढं माझं म्हणायचं आणी रडत बसायचं” पण यात जेन्युइन प्रॉब्लेम असा असतो, की मढं भलेही माझं नसेल. पण डोळ्यांतून येणारं पाणी तर खरं असतंच ना. आठवणींचे होणारे हल्ले हे तरी खरे असतातच ना. त्याचं काय!!! 


भट कॅम्पमधला रोग नावाचा हा पिक्चर. इरफान खानचा पहिला मेनस्ट्रीम बॉलीवूड पिक्चर. नायकाची सगळी तगमग त्यानं डोळ्यामधून दाखवलेली आहे. एम एम क्रीमरचे संगीत हे कायमच एका अर्थाने टिपिकल पण त्याचवेळी कुठल्याही साच्यात न अडकवता येण्यासारखं. या अशा काही गाण्यांमध्ये त्यानं तो संथ तरीही डोहासारखा खोलपणा दिलेला आहे, तो निव्वळ अनुभवण्यासारखा आहे. हेडफोन लावून शांत, सुकूनमध्ये ऐकायची गाणी आहेत की. त्याचवेळी, बॉलीवूडमधून झपाट्याने गायब होणारी अजून एक गोष्ट म्हणजे, अर्थपूर्ण गाणी. या गाण्यामध्ये काव्य आहे, काहीतरी आर्थ आहे, आणि त्या सिनेमाशी ते गाणं कुठेतरी जोडलेले आहे- म्हणून असेल पण हे गाणं कधीही ऐकताना केकेचा आवाज, निलेश मिश्राचे शब्द आणी इरफानचा चेहरा असं सारं या पावसाळी करड्या रंगामध्ये सामोरं येत जातं. 

एखादं शांत सरोवर पहुडलेलं असावं, कुणीतरी एखादा खडा फेकावा आणि त्या सरोवरामध्ये तरंग ऊठावेत तशी मनाची अवस्था होते हे असं काहीतरी ऐकलं की. नको त्या आठवणींचे फेर धरून सोबत घुमायला लागतात आणि मग नजर धूसर करत जातात. 

नशीब इतकंच की तेव्हा बाहेर पाऊस कोसळायला लागलेला असतो, आणि आपल्या नजरेमधलं पाणी कुणालाच दिसत नाही. 

#आजचेगाणे 

#नंदिनी 

>>>>>>


01-04-2017 


आज सकाळी हे गाणं शेअर केलं तेव्हाच लिहिणार होते,पण प्रापंचिक जबाबदार्या् खुणावत होत्या! तरीही, दिवसभर हे गाणं मनांत वाजत राहिलंच. गुझारिश माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे, आणि भन्साळीचा हा पिक्चर फ़्लॉप पिक्चर असूनही त्याचा वन ऑफ द बेस्ट आहे. सगळीच गाणी आवडती असली, तरी जाने किसके ख्वाब अधिक जवळचं आहे. 


केकेचा आवाज फार कमी ऐकू येतो हे एका अर्थाने बरंच आहे. टिपिकल पंजाबी ठेक्यावरच्या पार्टी गाण्यांमध्ये ऐकून ऐकून त्याच्या आवाजामधला तो स्पेशल धारदारपणा गायब व्हायची भितीच वाटते. या गाण्याच्या  शब्दांमध्ये अतोनात दर्द आहे, पण त्याचबरोबर एक आशेची सोनेरी किनार आहे. हे सगळं काही केके त्याच्या आवाजामध्ये पेलवू शकतो. 


एकेकाळी, स्टेज गाजवणारा जादूगार आणि गेल्या चौदा वर्षांपासून अपंगांचं जिणं जगत असलेल्या इथनला आता मरायचं आहे. दुसर्यााच्या दयेवर जगण्याचा मनस्वी कंटाळा आलेला आहे. अतिशय कुशाग्र बुद्धी असूनही मानेखालचं लुळं पडलेल्या या इथनला स्वप्नं तरी कसली पडणार!! गत आयुष्यामधल्या अनेक फोटोफ्रेममधून झळकणारा तो हसरा, जगज्जेता चेहरा आता सुकत चालला आहे, तरीही उशीखाली कुणीतरी रोज स्वप्नं मात्र ठेवतंच आहे.  मरण्याची- हे आयुष्य संपवून पुढच्या प्रवासाला निघायची अतोनात हौस असतानादेखील काहीतरी क्षीणमात्र का होईना त्याला या इथल्या जगण्याशी बांधून ठेवतंय! सुन्यासुन्या नजरेसमोर तो स्वत:लाच पाहतोय.. असा लुळापांगळा नाहीतर आधीसारखाच! त्याचं शरीर त्याची साथ देतंय. तो प्रेक्षकांसमोर असलेला कलाकार आहे. त्याच्या स्वप्नांशी खेळण्याचा त्याला अजूनही हक्क असल्यासारखा तो स्टेजभर बागडतोय. स्वप्नांचा भलामोठा बुडबुडा सोबत ठेवून त्याच्यासोबत खेळतोय. प्रकाशाच्या वाटेवर उडत जाण्याची आकांक्षा, ऊनसावलीच्या खेळामधला लपंडाव, आपल्याच शरीराचे मुक्त अविष्कार, सगळंसगळं काही अनुभवतो आहे. त्याच्या नजरेसमोर स्वप्नांची ती आतिषबाजी होते. अखेरीस, टाळ्यांचा कडकडाट होतो आणि तो स्वत:शी प्रसन्नपणे हसतो. हेच तर हवं असतं नाही का कलाकाराला?


#आजचेगाणे 

- नंदिनी देसाई


- नंदिनी देसाई

Sunday 29 May 2022

टॉप गन: मॅव्हरिक (फिल्म)



भूतकाळाची एक गम्मत असते. कधीही दुरून बघायला तो भूतकाळ छानच वाटतो. नॉस्टॅल्जिक आठवणींनी सजलेला भूतकाळ कायम रम्य, सुंदर वाटतो पण खरोखर काळ ओलांडून तो भूतकाळ आजच्या काळात आपल्यासमोर आला तर मात्र कदाचित... बोरिंग वाटू शकतोच. तब्बल तीस वर्षांनी आलेला टॉप गनच्या सीक्वेलबाबतीत ही भिती प्रकर्षाने जास्त जाणवत होती. भूतकाळामधली कथा तीन दशकांनी वर्तमानकाळात आणणे ही तारेवरची कसरतच आहे... 


1986 साली आलेला टॉप गन हा कल्चरल फिनोमेना होता. अमेरिकन नेव्हीच्यामते, ज्यावर्षी हा सिनेमा रीलीज झाला त्या वर्षापासून नेव्हीमध्ये अप्लाय करणार्‍यांची संख्या तब्बल पाचशे ट्क्क्यांनी वाढली. रे बॅन एव्हिएटर आणि बॉम्बर जॅकेट्सचा खप किती टक्क्याने वाढला देव जाणे. पण अवघ्या पंचविशीच्या टॉम क्रूझला या सिनेमाने जागतिक सुपरस्टारपद रातोरात देऊ केलं आणि त्याने ते गेली तीन दशकं अढळपणे टिकवून ठेवलं आहे. टॉम क्रूझ तेव्हा अ‍ॅक्शन हीरो म्हणून गाजला, लाखो तरुणींच्या दिल की धडकन बनला. आज टॉप गन मॅव्हरिक हा त्याचा सीक्वेल जेव्हा रीलीज झालाय तेव्हा टॉम क्रूझ साठीला पोचला आहे. चेहर्‍यावर वय दिसतं आहे पण ते अजिबात जाणवत नाही ते त्याच्या स्क्रीन प्रेझेन्समधून. आणि म्हणूनच टॉप गनचा सीक्वेल भूतकाळ घेऊन अवतरताना अजिबात बोरिंग वाटत नाही. आपल्या हिंदी सिनेमाला "हीरो"चे टेम्प्लेट टॉप गनच्या मॅव्हेरिकने दिले होते. निळी जीन्स, पांढरा टीशर्ट, डोळ्यांवर रे बॅन एव्हिएटर, बॉम्बर जॅकेट अशा वेषामधला आपला हीरो बाईकवरून सुस्साट एंट्री गेले दोन अडीच दशके घेतोच आहे.


टॉप गन हा टिपिकल अमेरिकन सिनेमा. सिनेमा तरीही जगभर गाजला, त्यामधली विमानांच्या लढाईची दृष्ये आजही अंगावर काटा आणतात. गो प्रो चा काळ नसताना आणि सीजीआय अगदीच बाल्यावस्थेमध्ये असताना, विमानाच्या आत आणि विमानावर कॅमेरा लावून शूट केलेले शॉट्स महान होते. आज सीजीआय काहीही करामती करू शकत असताना, कंप्युटर्सच्या सहाय्याने अख्खा सिनेमा ग्रीन स्क्रीनवरून घेता येऊ शकत असतानाही, टॉप गनचा सीक्वेल त्या जुन्यापुराण्या फूटेजची जादू सोबत घेऊन आला आहे. टोनी स्कॉट या मूळ दिग्दर्शकाच्या मृत्यूनंतर जोसेफ किनिस्की या दिग्दर्शकाने सिनेमाची धुरा सांभाळली आहे, आणि हे करत असताना एकच गोष्ट कायम लक्षात ठेवली आहे- हा सिनेमा टॉम क्रूझचा होता, आहे आणि राहील. 



सिनेमाच्या अगदी सुरुवातीला एक संवाद आहे जिथे मॅव्हरिकला "तुझ्यासारखे लोक आता अस्तंगत होत चालले आहेत" असं ऐकवलं जातं, त्यावर तो "कदाचित, पण आज नाही" हे ऐकवतो आणि पुढचे दोन तास हे उद्गार ज्खरे करून दाखवतो. तीन दशकापूर्वी असलेली सिनेमाची आर्थिक गणित, प्रसिद्धीचे प्रकार वगैरे सर्व सर्व काही बदलं आहे. एकेकाळी केवळ सुपरस्टार या एकमेव पात्रता निकषावर सिनेमा थेटरामध्ये आठवडेच्या आठवडे मुक्काम बाळगून असत. आता अभिनेत्यांपेक्षाही सुपरहीरोची चलती आहे. "काय अ‍ॅक्शन आहे, असं कधी घडेल काय पासून सुरू झालेला हा प्रवास " यापेक्षा "काय एफेक्ट्स आहेत, एकदम रीअल वाटतात" पर्यंत आलेला आहे. अभिनयापेक्षा इफेक्ट्सचे याचे कौतुक वाटायचे दिवस आहेत. सिनेमा हे सुपरहीरोच्या ब्रॅंड लॉयल्टीवर चालतात. अशा या बदलत्या काळामध्ये साठी गाठलेला टॉम पुन्हा एकदा त्याची ही गाजलेली भूमिका तडफेने घेऊन येतो, आणि बस्स.. छा जाता है. वय त्याच्या चेहर्‍यावर दिसतंच आहे, पण ते त्याच्या परफॉर्मन्समध्ये मात्र अजिबात जाणवत नाही. माणूस नसलेले फायटर प्लेन्स आता बॉम्ब टाकत जातात, पण तरीही, मानवी पायलटची आवश्यकता आजही राहणारच आहे, तसंच, कितीही ब्रॅंडेड चकचकीत झगमगाटी सिनेमा आले तरीही, अस्सल अ‍ॅक्शनची आणि सिनेमाची जादू मात्र तीच राहणार आहे. एक अर्थाने, आता असे सुपरस्टारडम आणि त्याची फॅनगिरी संपत आल्यासारखी आहेच आहे. टॉम क्रूझ त्या लाटेमधल्या शेवटच्या अभिनेत्यांपैकी एक. पण आग विझली तरी अद्याप निखारे मात्र रसरशीत आहेत. टॉम "बट नॉट टूडे" तो या सिनेमाभर अखंड जगला आहे. 


बदलत्या तांत्रिक करामतींनी टॉप गन मॅव्हरिकमध्ये कमाल केलेलीच आहे. एका निर्जन डोंगराळ भागामध्ये असलेल्या युरेनियम प्लॅंटवर बॉम्ब टाकून ते निकामी करणे या अतिकठीण मिशनसाठी इंस्ट्रक्टर म्हणून आलेला मॅव्हरिक त्यासाठी लागणारी टीम तयार करतो, हे करत असताना जुन्या काळच्या काही जखमादेखील भरत जातो. गूजचा मुलगा असलेला रूस्टर आता त्याच्यासोबत टॉप गनमध्ये आहे. त्याच्यसोबत असलेले भूतकाळाचे काही लागेबांधेदेखील आहेतच. एक जुनापुराणा रोमान्स आहे, जो आता टॉप गनमध्ये परत आल्यावर पुन्हा बहरला आहे. पण, हे सर्व काहीही असताना सिनेमाचा फोकस मात्र त्याच्या अ‍ॅक्शनवरून ढळत नाही. अगदी अफिल्य प्रसंगापासून ते शेवटच्या प्रसंगापर्यंत रॉ अ‍ॅक्शन ही या सिनेमाची जान बनून जाते. एरियल फूटेज तेही डोंगराळ ओसाड भागाचं व्हिज्युअली स्टनिंग तर आहेच, शिवाय या सिनेमाच्या भरभक्कम बाजूंपैकी एक आहे. विमानाच्या वर आणि आत लावलेले कॅमेरा यामुळे आपण सिनेमा पाहत नसून, खरोखर त्या फायटर जेटमध्येच आहोत अस वाटायला लागतं. दोन तासाची ही अक्षरश: एक रोलरकोस्टर राईड होते. 



सिनेमाच्या प्लॉटमध्ये काही मेजर घोळ अवश्य आहेत, शिवाय कथा अत्यंत प्रेडिक्टेबल देखील आहे. एक लीडर, त्याचा भूतकाळाशी झालेला सामना, मग त्यात आलेले प्रश्न, त्याने काढलेले मार्ग हे खूपच सरधोपट आहे, पण तरीही टॉम क्रूझचा अफलातून स्क्रीन प्रेझेन्स या सगळ्याला मॅजिकल बनवून जातो. त्याच्यासोबत असणारे इतर सर्व अभिनेते हे सिनेमाब्भर फायटर पायलट वाटत राहतात. विमानांची लढाई सुरू असताना विनाकारण गोळ्या झडत नाहीत. डॉगफाईट ही कुठूनही अचंबित आणि अतर्क्य वाटत नाही, हीच सिनेमाची गम्मत. 



टॉप गनच्या यशामध्ये त्याच्या साउंडट्रॅकचा हातभार फार मोठा होता. बर्लिनचं टेक माय ब्रेथ अवे आजही प्रेमगीत म्हणून लोकांच्या मनामध्ये बसलेलं आहे. लेडी गागाचं होल्ड माय हॅंड कदाचित त्या गाण्याची जागा घेणार नाही, पण तरीही हे तितकंच गाजेल हे नक्की. शिवाय, मूळ सिनेमामधलं टॉप गन अ‍ॅन्थेम पण या सीक्वेलमध्ये आहेच आहे. 


एका अर्थाने टॉप गन मॅव्हरिक ही त्या गतकाळाला दिलेली सलामी आहे. पण म्हणून सिनेमा तेवढा आणि तितकाच नाही. आजच्या नवीन पिढीलाही तो समजू शकेल, भावू शकेल आणि त्यांच्यापर्यंत पोचू शकेल. आणि म्हणून टॉप गन मॅव्हरिक ही तारेवरची कसरत सफाईने आणि यशस्वीरीत्या पूर्ण करतो. 

 - नंदिनी देसाई