Monday, 26 December 2022

अवतार: कथा समुद्रमंथनाची!!

 



 2009 साली आलेला अवतार हा जेम्स कॅमेरूनचा मेगा ड्रीम प्रोजेक्ट. खरंतर 1995 पासून कॅमेरूनच्या डोक्यात असलेला हा विषय. पण त्याला अनुलक्षून असलेली तांत्रिक करामत उपलब्ध नसल्याने बाजूलाच राहिलेला हा विषय. अखेर 2004 नंतर मोशन कॅप्चर आणि त्याच्या सोबत असलेल्या इतर संगणकीकृत करामती दिमतीला हजर झाल्यावर, कॅमेरूनने या त्याच्या आवडत्या विषयाला हात घातला होता. अवतार हा आतापर्यंतच्या जगभरामध्ये गाजलेल्या सिनेमांपैकी एक. अगदी ब्लॉकबस्टर म्हणून ऑलटाइम क्लासिक सिनेमा. या सिनेमाने अनेक नवीन रेकॉर्ड बनवले, आणि तसेच, नवनवीन तांत्रिक कौशल्येही उपलब्ध करून दिली. थ्रीडी सिनेमाला जगभरामध्ये मिळालेला प्रतिसाद पाहून यानंतर अनेक अ‍ॅक्शन मारधाडपट थ्रीडीमध्ये आले. अर्थात हा सर्व झाला पूर्वेतिहास. अवतार – द वे ऑफ वॉटर हा त्या चित्रपटमालिकेमधला दुसरा चित्रपट. एकूण चार चित्रपट प्रदर्शित करायचा दिग्दर्शकाचा मानस आहे. पैकी, तिसर्‍या सिनेमाचे शूटिंगदेखील पूर्ण झाल्याची बातमी आहे. ट्रेलरदेखील येण्यापूर्वीच “हा चित्रपट मी बघणारच” असे आपण ठरवून टाकतो त्यापैकी एक असा हा अवतार.

जेम्स कॅमेरूनचा प्रत्येक सिनेमा हा अप्रतिमच असतो. त्याचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर जितके गाजतात, तितकेच ते समीक्षकांच्याही पसंतीस पडतात.  हे असे यश मिळवणारे फार थोडकेच दिग्दर्शक सध्या कार्यरत आहेत. द टर्मिनेटरसारखा जॉनर डिफायनिंग सिनेमा असो, ट्रू लाइज सारखी अ‍ॅक्शन कॉमेडी असो किंवा टायटॅनिकसारखा मास हिस्टेरीया देणारा सिनेमा असो, त्याच्या प्रत्येक सिनेमामध्ये प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन असतंच. अगदी छोट्या छोट्या फ्रेम्समधून त्याच्या सिनेमाची कथा उलगडत जाते, त्याचवेळी तंत्रज्ञानावर त्याची असलेली पकड इतकी मजबूत आहे की, इतक्या वर्षांनीही त्याचे सिनेमा फ्रेश वाटत राहतात.



अवतार – द वे ऑफ वॉटर त्याबबातीत मात्र अजिबात निराशा करत नाही. तंत्रज्ञान इतके कमालीचे वापरले आहे की, पॅन्डोरा या एका चंद्रावरची ही वसाहत अगदी सच्ची वाटत राहते. सायन्स फिक्शनमध्ये सायन्स आणि फिक्शन दोन्ही जमून येतात तेव्हाच ती कलाकृती खर्‍या अर्थाने परिपूर्ण होते. इथे, एकंदरीत, पाण्याखाली असणारे सर्व सीन शूट करण्यासाठी वापरलेली तंत्रज्ञाने, मोशन कॅप्चर टेक्निक, पॅण्डोरावरचे प्राणी, निसर्ग, पाण्याखालचे जग सर्व काही बेस्ट असतानाही, कुठेतरी काहीतरी उणीव राहून जाते.

 


अवतार म्हणजे काय हे आपण भारतीयांना समजावून सांगायची आवश्यकता नाही. भारतीय मिथकांमध्ये असलेले देवादिकांचे अवतार आणि त्यांचे अवतार कार्य यामधूनच कॅमेरूनला ही “अ‍ॅव्हटार” संकल्पना सुचली होती. एरवी हॉलीवूडपटांमध्ये असलेली कल्पना ही साधारण – पृथ्वीवर(म्हणजे केवल आम्रिकेत) आक्रमण करणारे परकीय एलियन्स, मग ते सर्व कसे दुष्ट दुष्ट, अमेरिकन लोक कसे हीरो हीरो इत्यादि. कॅमेरूनने ही संकल्पनाच उलट केली होती. त्याच्या नॅरेटिव्हमध्ये मानव हा यामधला खलनायक आहे. या पृथ्वीवरच्या मानवाने दूर कुठल्यातरी ग्रहावरच्या एका चँद्रावरच्या वस्तीवर आक्रमण केलेले आहे. ही परग्रहीय वस्ती अत्यंत सुंदर आहे, विलक्षण आहे. इथे असणारा निसर्ग हा पृथ्वीवरच्या निसर्गासारखाच विविधरंगी, विविधढंगी आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे तिथले मानव म्हणजे नावी लोक. हे लोक निळे आहेत, कॅमेरूनला ही रंग संकल्पना कृष्णाच्या रंगावरून सुचली असे म्हणतात. उंच आहेत, प्रचंड शक्तीशाली आहेत. पण तांत्रिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या मानवाने त्यांना नमवले आहे. पॅन्डोरावर मानवाने स्वत:ची कॉलनी प्रस्थापित केलेली आहे. इथली हवा मानवासाठी विषारी आहे, पण या ठिकाणी मिळणारी नवीन खनिजे मात्र मानवासाठी मौल्यवान आहेत. इथे टिकून राहण्यासाठी नावी लोकांसोबत त्याचा संघर्ष अद्याप सुरूच आहे. हा संघर्ष कमी व्हावा म्हणून शास्त्रज्ञांनी अवतार तयार केले आहेत. म्हणजे, मानव चक्क नावी अवतारामध्ये अवतीर्ण होतो, आणि त्यांच्यासारखाच दिसू-वागू लागतो. या अवताराचा आत्मा मात्र मानव आहे. या अवतारांनी मूळ नावी लोकांमध्ये मिसळून जावे, त्यांना आपलेसे करावे, थोडक्यात कॉलनायझेशनला मदत करावी असा त्यांचा सुप्त हेतू. या ग्रहावर आलेला जॅक सली हा अपंग सैनिक मात्र अवतार रुपामध्ये नावी टोळीमध्ये पूर्ण मिसळून जातो, त्यांच्यापैकीच एक होतो, आपले मानवरूप सोडून तो स्वत:ला नावी म्हणून स्विकारतो, आणि त्यांच्याच दुनियेत जगतो. पहिल्या भागामधला हा सर्वात रोचक भाग. दुसर्‍या भागामध्ये जॅक सली हा नावी झाला आहे, इथे त्याचे स्वत:चे कुटुंब आहे, मित्रमंडळी आहेत. मानव वस्ती आता पॅण्डोरावरून निघून गेली आहे. सर्व आलबेल आहे पण.... मानवाचा लोभीपणा काही कमी होत नाही.

 


मानवाचा इतिहास हा आपापसातल्या लढायांचाच राहिलेला आहे. आपल्यापेक्षा तांत्रिक दृष्ट्या मागासलेल्या मानववंशावर हल्ले करून त्यांना नामोहरम करतच होमो सेपियन आजवर इथे पोचलेला आहे. अगदी सतराव्या अठराव्या शतकापर्यंत एका मानव टोळीने दुसर्या मानव टोळीला टाचेखाली ताबून ठेवणे, त्यांचे भूभाग बळकावत लूट करणे इतकेच काय, एका मानवाने दुसर्‍या मानवाला विकणे-विकत घेणे हे सुरूच होते. या अस्सल इतिहासाचे रोपण कॅमेरूनने सायन्स फिक्शनच्या रुपात केलेले आहे. इथे पॅंडोरावर असलेली नावी जमात ही निसर्गाशी एकरूप झालेली आहे. त्यांच्या मनामध्ये असलेली निसर्गदेवी आयवा ही सर्वच चराचरामध्ये अखंड वाहते आहे, असा त्यांचा गाढ विश्वास आहे. पृथ्वीवरून आलेल्या प्रगत मानवाला मास्त्र हे थोतांड मान्य नाही, त्यांच्या दृष्टीने पैसा हेच काय ते खरे दैवत. या अशा मानवाचा आणि नावी अवतारामधील मानवाचा हा संघर्ष अवतार 1 मध्ये होता.

 


अवतार 2 मध्ये हा संघर्ष अधिक तीव्र व्हायला हवा होता, पण दुर्दैवाने तो तसा होत नाही. पहिल्या भागामध्ये असलेली अवतार आणि त्यामागची तात्त्विक बैठक दिग्दर्शक या भागामध्ये प्रकर्षाने दाखवत नाही. तांत्रिक करामती दाखवण्याच्या नादामध्ये कथेमधल्या काही महत्त्वाच्या बाजूंकडे लक्ष किंचित कमी पडतं, आणी मग एकदम प्रेडिक्टेबल कथा सुरू होते. कथेमध्ये एक मेजर झोलदेखील झालेला आहे. (स्पॉयलर असल्यामुळे इथे लिहत नाही). अख्खी कथा ही जॅक सली विरूद्ध मानव अशी सुरू होते. खरंतर, वास्तविक, भारतीय मिथकांमध्ये समुद्र, सामुद्रिक जीव यांच्याशी संबंधित अवतार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपली सृष्टी समुद्रामध्ये जन्म घेते, आपला सर्जक विष्णु समुद्रामध्येच स्थित आहे. समुद्रमंथन हा आपल्या पौराणिक मिथकांमधला एक महत्त्वाचा भाग. त्यामधले अमृत मात्र अवतार 2 मध्ये आणताना अतिशय ओढून ताणून आणले आहे, आणि त्याचे पुरेसे स्पष्टीकरण देखील येत नाही.




अवतार 1 मध्ये पृथ्वीवर परत गेलेले लोक या सिनेमाच्या सुरुवातीला पॅन्डोरावर परत येतात. ते नक्की का येतात हे समजत नाही. पण नावी बनलेल्या जॅक सलीला मात्र स्वत:चे शांत कौटुंबिक जीवन सोडून या स्काय पीपलविरूद्ध उठाव करावा लागतो. या प्रयत्नामध्ये त्याला आणि त्याच्या कुटुंबाला स्वत:चे मूळ स्थान सोडून परागंदा व्हावे लागते आणि समुद्रकिनारी दलदलीत राहणार्‍या एका टोळीकडे आश्रय मागावा लागतो. जॅक सली, नेतिरी आणि त्यांची मुलं ही डोंगराळ भागामधली आहेत, त्या जीवनाशी, तिथल्या निसर्गाशी एकरूप झालेली आहेत, आता त्यांना हा बदल सहन करावा लागतो. एका वेगळ्या निसर्गाशी, प्राणीजीवनाशी समरूप व्हावे लागते. इथे जगायचे तर इथलेच व्हावे लागते. आणि यामधून घडत असणार्‍या एका आगळ्यावेगळ्या नात्यांची इथे सुरुवात होताना दिसते. देवमासा हा यामधला एक महत्त्वाचा दुवा ठरतो. केवळ मानव अथवा मानवस्वरूपच नव्हे, तर इतर प्रत्येक चराचरामधल्या निसर्गाची ही कहाणी बनत जाते. ही केवळ स्वअस्तित्वाचीच लढाई नाही, तर ती भवतालाच्या अस्तित्वाचीदेखील लढाई आहे, आणि म्हणूनच या लढाईमध्ये केवळ जिंकून चालणार नाही तर पूर्ण बळाने शत्रुला नामोहरम करावे लागणार आहे.

 


इतकी सुंदर तात्विक पार्श्वभूमी असलेल्या या कथानकामध्ये कॅमेरूनने विनाकारण टीनेजर हायस्कूल हॉलीवूड ड्रामा का आणला आहे ते तोच जाणे. या अशा नाटकी फटकार्‍यांमधून उभे राहणारे कथेचे चित्र  फार ढोबळ आहे. अर्थात या कथामालिकेचे अजून दोन भाग येणार आहेत, आणि त्यांचे प्रमुख चित्रीकरणदेखील आटोपलेले आहे अशी बातमी नुकतीच वाचली आहे. त्यामुळे अखंड चार चित्रपट पाहताना कदाचित आज जाणवणारे लूपहोल्स त्यामध्ये बुजवलेलेदेखील असू शकतात. त्यामुळे त्यावर फारसे  भाष्य करण्यात अर्थ नाही. मात्र, सिनेमा म्हणून पाहत असताना यामधला भपका प्रचंड प्रमाणात जाणवतो, आणि कथामूल्य किंचित कमी पडते हे मात्र निश्चित.

 


मात्र हा सिनेमा मोठ्या प्रमाणात पकड घेतो, ते त्याच्या तांत्रिक बाजूमध्ये. पाण्याखाली केलेल्या चित्रीकरणासाठी वापरलेले अत्याधुनिक मोशन कॅप्चर तंत्रज्ञान असो, अथवा बखुबीने केलेले एडिटिँग असो, आपण सिनेमा पाहताना एक वेगळेच विश्व अनुभवत आहोत, हे प्रेक्षकांना वारंवार जाणवत राहते. अनेक समीक्षकांनी अवतार 2 ला करोडों डॉलर्सचा स्क्रीनसेव्हर म्हणून चिडवलेले आहे. अवतार 2 मधले पाण्याखालचे अद्भुत विश्व मला स्वत:ला मात्र जिवंत रसरशीत आणि अस्सल वाटले. फार क्वचित इतके सुंदर आणि तपशीलवार काल्पनिक विश्व उभारलेले दिसून येते.

 

सिनेमा म्हणून अवतार 2 बॉक्स ऑफिसवर गाजत आहेच. अवतार 1 च्याही पुढे तो मजल मारेल अशी चिन्हे आता दिसत आहेत. तसे घडल्यास अवतार 3 आणि 4 कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा काय्च्याकाय उंचावलेल्या असतील. त्या सर्वांना जेम्स कॅमेरून यशस्वीपणे पुरा पडेल याची खात्री आतातरी वाटत आहे, पण पुढल्या सिनेमांमध्ये स्क्रीनसेव्हरपेक्षा आणि तांत्रिक करामतींपेक्षाही कथा आणि त्यामधल्या घटकांचे परस्परसंबंध अधिक विस्तृतरीत्या दाखवल्यास अधिक उत्तम.

 

नंदिनी देसाई

Friday, 9 September 2022

काय लायटिंग!! काय झकापक!! पण स्टोरीचा पत्त्याच न्हाई!!

काय लायटिंग!! काय झकापक!! पण स्टोरीचा पत्त्याच न्हाई!! 


- नंदिनी देसाई 



भारतामध्ये भलीमोठी फिल्म इंडस्ट्री आहे, बॉलीवूड तर आहेच आहे, पण त्याहूनही अनेक तर प्रादेशिक भाषांचे स्वत:चे फिल्म जगत आहे. याहून पलिकडे गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये उदयाला आलेली एक भलीमोठी इंडस्ट्री आहे अ‍ॅनिमेशन आणि सीजीआयची. अनेक हॉलीवूड सिनेमा स्टुडिओ कंप्युटर जनरेटेड इमेजरीसाठी त्यांचे काम भारतात आउटसोर्स करतात. इंग्रजी सिनेमा पाहताना जर एंड क्रेडिट्स पाहिले तर अनेक भारतीय सीजीआय कंपनी आणि भारतीय तंत्रज्ञांची नावे दिसू शकतील. 


नमनाला घडाभर तेल घालायचे कारण असे की, हे सर्व तंत्रज्ञान भारतात उपलब्ध असूनही, आपली सीजीआय अक्कल ही हॉट हीरो दाखवण्यासाठी त्याच्या अंगावरचा शर्ट जळणे, नाहीतर हिरॉइनच्या केसांचे क्लोजप घेताना ते केस अधिकाधिक चमकदार दाखवणे इतपतच मर्यादित राहते. त्यामुळे ब्रह्मास्त्रची घोषणा झाली तेव्हा जरा भितीच वाटली होती. करण जोहरने बाहुबलीला मिळालेले यश पाहून ते बॉलीवूडमध्ये रेप्लिकेट करण्याचा प्रयत्न केलाय असे तेव्हा वाटले होते. भरीसभर सिनेमा बनायला इतकी वर्षे लागली, आणि रीलीजच्या जवळ आला तेव्हा काहीही कॉन्ट्रोव्हर्सी यायला लागल्या होत्या, त्यामुळे मच अवेटेड सिनेमा बनलाय. मला सुरुवातीपासूनच ब्रह्मास्त्र हे अश्विन संगी- अमिशटाईप काहीतरी मायथॉलॉजिकल जत्रा आणि महाभारत-रामायण मालिका टाईप असेल अशी भिती वाटत होती. 


अयान मुखर्जीने ही भिती दुर्दैवाने साधार ठरवलेली आहे पण एकाच बाबतीत. या सिनेमाचा भारतीय पुराणकथांशी अथवा मिथकांशी दुरान्वयेही संबंध नाही. अस्त्राव्हर्स हे भारतीय मिथकांची नावे वापरून बनवलेले अव्हेंजर्सचे हिंदी व्हर्जन आहे. आपल्याकडे भारतीय मिथकांमध्ये अनेक प्रभावी कथानके आहेत. पण त्याऐवजी, अयान आणि रणबीरने मिळून हे हे स्पेशल इफेक्ट्स इथे आपल्याला हवेत, हा हा शॉट आपल्याला इथे असा हवा, आणि एक कार चेस सिक्वेन्स हवा, एक उड्या मारायचा शॉट हवा, एक पाण्यातली लढाई हवी आगीचे असे हे सीक्वेन्स हवेत असे बसून ठरवलेत आणि मग त्याच्या आजूबाजूला कथा बसवण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. मग त्यात तीन मेगा स्टार घेऊन त्यांना थोडे थोडे फुटेज दिले. मग त्यात थोडे अव्हेंजर्स अ‍ॅड केलेत, थोडा कॅम्प हाफ ब्लड, थोडा डॅन ब्राउन आणि मग थोडासा हॅरी पॉटर. मग मनमोहन देसाईंना साकडे घातले आणि त्यांच्याकडून थोडा मसाला उधार घेतला. आता उरलेला सगळा वेळ आलिया भट्टचे क्लोजप्स आणि रणबीरचे गोडमिट्ठास हसू. झाला ब्रह्मास्त्र तयार. 


यामधले सीजीआय आणि स्पेशल इफेक्ट्स भारी आहेत. प्रचंड पैसा खर्च केलेला दर शॉटला जाणवत राहतो, पण हे इफेक्ट्स कुठेही मनाला भावत नाहीत, ते कायम खोटे खोटे चिकटवलेलेच वाटत राहतात. त्यातून ते सातत्याने इतके आदळत राहतात की त्या नादात समोर दिसत असलेली सुंदर सिनेमेटोग्राफी अथवा अभिनेत्यांचा अभिनय हेदेखील विरून जायला लागते. सिनेमा कुठेही प्रेक्षकांना आपलासा करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे आपण कायम भांबावलेलेच राहतो. भई ये हो क्या रहा है? सिनेमामध्ये अचानक काही पॅचेस येतात, आणि निघून जातात. शिवाचे ते दोन बेस्ट फ्रेंड्स त्यांचे काय झाले? आणि ती लहान मुलं? त्यांचा नंतर काहीच उल्लेखदेखील नाही. त्या आलियाची फॅमिली कुठे आहे? पोरगी इतके दिवस गायब असून त्यांना काहीच फरक कसा पडत नाही? अगदी सुरुवातीला आलेला मोहन भार्गवचा रेफरन्स एकदम झकास वाटला होता. त्या आधारावर इतरही काही कॅरेक्टर्स येतील अशी आशा होती. पण तेही बहुतेक दिग्दर्शक विसरून गेला वाटतं. त्या गुरुकुलमधले इतर मुलांनाही अगदी कमी स्क्रीन टाईम दिला आहे. इन फॅक्ट, आलिया रणबीरपेक्षाही अयानने लायटिंगच्या माळांनाच जास्त स्क्रीन टाईम दिलाय असं सारखं वाटत राहतं. 


चुकीच्या ठिकाणी आलेली गाणी हाही एक या सिनेमाचा प्रॉब्लेम आहे. केसरिया गाणे सुंदर आहे, पण त्याची प्लेसमेंट फारच वाईट झालेली आहे. सुरुवातीचे भूत चढेया गाणे बढिया आहे, त्याची कोरीओग्राफीदेखील धमाल आहे. पण या गाण्यामुळे आणि एकंदरीत त्या पूजा पेंडालच्या माहौलमध्ये इतका भव्यदिव्यपणा आणला आहे की, त्यानंतरच्या अनेक शॉट्समध्ये काहीही भव्य वाटतच नाही, खुजेच वाटत राहते. ओपनिंगलाच दाखवलेली ही भव्यता सिनेमाला प्रचंड मारक ठरते. 


सिनेमाची पहिली 25 मिनिटे अत्यंत बॉलीवूडीय आहेत. बॉय मीट्स गर्ल. अमीर लडकी, अनाथ लडका. मग तो कसा गोल्ड-हार्टेड. ती कशी त्याच्या गरिबीच्या प्रेमात पडते वगैरे वगैरे. हा सर्व भाग नसता, तर कथानक कदाचित इतके ठिसूळ राहिले नसते. दैवी शक्ती असलेला शिवा (एक क्लॅरिफिकेशन- याचे नाव शिवा असले तरी तो महादेव शंकराचा अंश नाही, किंबहुना बहुत चालाखीसे अयानने यामध्ये कुठल्याही भारतीय देवाचे थेट नाव घेतलेले नाहीये.) याच्या अवतीभवती काहीतरी भयंकर घडतं आहे, आणि मध्येच नेहमीचा टिपिकल हिंदी फिल्म्सवाला रोमॅंटिक ट्रॅक सुरू होतो, यामध्ये प्रेक्षकाची त्या कथानकाशी लागत असलेली लिंक पूर्ण तुटून जाते. काळवेळेचे काही भान नसतेच का या हिंदीवाल्यांना? अगदी सुरुवातीपासून त्या कथानकामध्ये अथवा नायकाबद्दल जराही कनेक्शन प्रेक्षकांना वाटू नये याची अतीव काळजीच घेण्यात आली आहे... 


या सिनेमाचे एकूण तीन भाग असणार आहेत, पहिल्या भागामध्ये अयानने कथानकाची केवळ मांडणी केली असती तर पुढचे दोन भाग अधिक रंजक झाले असते. इथे पहिला भाग पूर्ण कथानक मांडतही नाही आणि उत्सुकताही ताणत नाही , त्यामुळे प्रेक्षकांना आता पुढे काय हे कुतुहल राहतच नाही. त्यातून दुसर्‍या भागासाठी हृतिक रोशन तयार नसल्याची बातमी नुकतीच वाचली. मुळात, तीन भागाचा सिनेमा काढताना पुढच्या सिनेमाचा मुख्य नायक जर किंचित दाखवला असता तरी प्रेक्षकाशी एक इमोशनल कनेक्ट लगेच तयार झाला असता. या फंड्यासाठी आमच्या मार्व्हलवाल्याना मानायला हवं. एंड क्रेडिटनंतर पुढची छोटीशी चुणुक दाखवून हे लोकांना कायम गुंगवून ठेवतात. 


अर्थात, इतके सारे लिहिले तरीही, ब्रह्मास्त्र हा वन टाईम वॉच नक्कीच आहे. किंबहुना, मसाला चित्रपटांवर पोसलेल्या आमच्यासारख्या लोकांसाठी तरी नक्कीच. सिनेमा सुपरहिट जाईल अशी चिन्हे आता तूर्तास तरी दिसत आहेत. बॉक्स ऑफिस सक्सेससाठी तरसलेल्या बॉलीवूडसाठी ब्रह्मास्त्र काही आशा दाखवेल असे वाटतंय तरी. 




सिनेमाची सेव्हिंग ग्रेस म्हणजे, याचे संगीत आणि ऑफ कोर्स कलाकार. रणबीर कपूरच्या खांद्यावर अख्खा सिनेमा आहे, आणि त्याने तो भार लीलया पेलला आहे. सुरुवातीचा एकटा, भांबावलेला तरूण ते स्वशक्तीची जाणीव झाल्यावर त्याच्यामध्ये उगवलेली धग हे सर्व ट्रांस्फॉर्मेशन त्याने परफेक्ट निभावलेले आहे. आलियासोबतचा त्याचा रोमान्सदेखील खूप सच्चा वाटतो, (ते ऑफ स्क्रीन रीअल पेअर आहेत म्हणून त्यांचा ऑन स्क्रीन रोमान्स सुंदरच वाटायला हवा अशी अपेक्षा असणार्‍यांनी कृपया करीना सैफचा एजंट विनोद किंवा काजोल अजयचा राजूचाचा हे सिनेमा पहावेत. धन्यवाद!!) रणबीर स्वत: अग्नीवर नियंत्रण ठेवायला शिकतो तो सीन मला प्रचंड आवडला आहे. तिथे रणबीरचा अभिनय तर जाणवतोच, पण त्याचे पदलालित्यही विशेषत: खूप कौशल्याचे आहे.


शाहरूख खानने पहिली दहा मिनिटे अक्षरश: गाजवली आहेत. एकहाती सिनेमा त्याने यापूर्वी अनेकदा ओढला आहे, इथे बिचारा केवळ एक सीन स्वजोरावर ओढतो. नागार्जुनाला अजून थोडा वाव द्यायला होता... त्याने अ‍ॅक्शन सीनमध्ये मात्र फुल्ल धमाल केली आहे. मौनी रॉय नागीन मालिकेच्या सेटवरून इकडे ब्रह्मास्त्रच्या सेटकडे वाट चुकून आल्यासारखी वाटते. तिचे ते बॉटॉक्स ओठ आणि एकसुरी संवादफेक कंटाळा आणते. 


आलिया भट्ट सुंदर दिसते आणि अभिनयही तितकाच सुंदर करते. अ‍ॅक्शन सीनमध्ये ती प्रचंड फिट वाटते. तिचे सर्व कॉस्च्युम्स मला विशेषकरून आवडले. ट्रेण्डी तरीही, कंफर्टेबल असे सर्व कॉस्च्युम्स आहेत. आलियाच्या स्क्रीन प्रेझेन्समध्ये एक फ्रेशनेस असतो, तो या सिनेमासाठी अतिशय आवश्यक ठरला आहे.  


माझ्यासारखे जर फुल्ल बच्चन फॅन असाल तर एक गोष्ट अवश्य मान्य कराल. जेव्हा बच्चनची एण्ट्री होते, तेव्हा असं वाटतं की आता सिनेमा खर्र्‍या अर्थाने सुरू झाला. मग तो सुरुवातीला येऊदेत, मध्यंतरामध्ये किंवा एकदम लास्टला. बच्चन आला की सिनेमा वाचला. हीरोची एंट्री म्हणजे काय ते आज या वयातही बच्चनकडे बघून समजतं. ब्रह्मास्त्रमध्ये तर बच्चन फायटींग करतो तेव्हा कसल्याही जादुई अस्त्राची आणि तलवारीची गरज भासणार नाही हे जाणवत राहतं. डोळेच काफी आहेत बॉस. 


मनमोहन देसाईच्या अनबिलिव्हेबल कथानकामध्येही बच्चन बिलिव्हेबल वाटायचा. तो मारतो ते केवळ ढिशुम ढिशुम नसून खरोखर व्हिलनला बुकलतोय असं वाटायचं. त्याकाळी कसलेही स्पेशल इफेक्ट्स नसताना, मनमोहन देसाई केवळ आपल्या स्टोरीटेलिंगवर प्रेक्षकांना पूर्ण गुंगवून टाकायचा. दुर्दैवाने, बॉलीवूडचा हा मसाला फॉर्‍म्युला आता पूर्ण फेल जाताना दिसतो आहे. आज कदाचित मनमोहन देसाई असते तर या अखंड स्पेशल इफेक्ट्सचा त्यांनी काय वापर केला असता देव जाणे. अयान मुखर्जी बॉलीवूडच्या आपल्या कथानकशैलीशी प्रामाणिक राहून व्हीएफएक्सचा वापर करू पाहत आहे. पण, कोबीच्या भाजीवर कोथींबीर घालण्याऐवजी त्याने अखंड कोथिंबीरीची जुडी वाटीभर कोबीच्या भाजीत घातली आहे. ते काय म्हणतात ना, चाराण्याची कोंबडी नी बाराण्याचा मसाला. त्यातली गत. सिनेमाचे अजून दोन भाग येणार आहेत, (ते यावेत अशी प्रचंड अपेक्षा आहे) त्यामध्ये तरी त्याच्याकडून हा मसाला व्यवस्थित रांधला जावा इतकीच अपेक्षा. 



नंदिनी देसाई. 





Wednesday, 1 June 2022

केके!!

काल रात्री केके गेल्याची बातमी आली आणि मन किंचित सुन्न झालं. माझा अतिशय आवडता सिंगर. तितकाच अंडररेटेड. 


त्याच्या गाण्यांवर दोन फेसबुक पोस्ट लिहिल्या होत्या. त्या आता इथे डकवून ठेवत आहे. 


नंदिनी देसाई 


*11 जून 2020* 


आज रत्नागिरीत मॉन्सूनची एंट्री झाली आहे. मॉन्सून कधीच गडगडत लखलखत येत नाही. काळेकरडे ढग आकाशाच्या या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंत निवांत पहुडलेले असतात. आसमंतामध्ये एक शांतता दरवळलेली असते. कधीही कुठल्याहीक्षणी तो बरसायला लागतो. संततधार. एकसलग. 

पण तो बरसेपर्यंत मात्र, मन नुसतं कुंद कुंद झालेलं असतं. साचल्यासारखं. तिथंच अडकल्यासारखं. पण थोड्याच वेळात पाऊस बरसणार असतो. अभी मुझ में कही थोडी बाकी है जिंदगी असं ऐकवत. 


पण तो पाऊस बरसेपर्यंत काय? 

अशावेळी कानात आपसूक वाजतो केकेचा आवाज. केके हा बॉलीवूडमधला अत्यंत अंडररेटेड सिंगर आहे, हे आमचे आधीचेच मत पुन्हा एकदा इथं या निमित्ताने नोंदवून घेतो. पण त्याचवेळी, केकेचा आवाज मला अनेकदा “माझा” स्वत:चा आवाज वाटलेला आहे. त्याने गायलेली कित्येक गाणी जणू माझ्यासाठीच लिहिलेली आहेत असं वाटत राहतं. 

आज नेमकं याच मूडमध्ये रोगमधलं हे गाणं वाजायला लागलं. 


बेचारा कहाँ जानता है, खलिश है या खला है 

शहरभर की खुशी से ये दर्द मेरा भला है 

जश्न ये राझ ना आये, मझा तो बस गम में आया है 


हेच तर मी अनेकदा स्वत:ला अनेकदा समजावत आलेली असतेच की. नेमकं काय शोधतोय आपण? काय हरवल्यासारखं वाटतंय? कशासाठी आयुष्य हे असं ओकंबोकं आणि सुनंसुनं आहे. जेव्हा प्रत्येक जण त्याच्या कोषामध्ये खुश खुश असतो, तेव्हा कुठलीतरी जुनीपुराणी जखम घेऊन तीच कुरवाळत बसायची मला हौस. माझ्या एका जवळच्या मित्राच्या भाषेत सांगायचं झालं तर, “रस्त्याने जाणारं मढं माझं म्हणायचं आणी रडत बसायचं” पण यात जेन्युइन प्रॉब्लेम असा असतो, की मढं भलेही माझं नसेल. पण डोळ्यांतून येणारं पाणी तर खरं असतंच ना. आठवणींचे होणारे हल्ले हे तरी खरे असतातच ना. त्याचं काय!!! 


भट कॅम्पमधला रोग नावाचा हा पिक्चर. इरफान खानचा पहिला मेनस्ट्रीम बॉलीवूड पिक्चर. नायकाची सगळी तगमग त्यानं डोळ्यामधून दाखवलेली आहे. एम एम क्रीमरचे संगीत हे कायमच एका अर्थाने टिपिकल पण त्याचवेळी कुठल्याही साच्यात न अडकवता येण्यासारखं. या अशा काही गाण्यांमध्ये त्यानं तो संथ तरीही डोहासारखा खोलपणा दिलेला आहे, तो निव्वळ अनुभवण्यासारखा आहे. हेडफोन लावून शांत, सुकूनमध्ये ऐकायची गाणी आहेत की. त्याचवेळी, बॉलीवूडमधून झपाट्याने गायब होणारी अजून एक गोष्ट म्हणजे, अर्थपूर्ण गाणी. या गाण्यामध्ये काव्य आहे, काहीतरी आर्थ आहे, आणि त्या सिनेमाशी ते गाणं कुठेतरी जोडलेले आहे- म्हणून असेल पण हे गाणं कधीही ऐकताना केकेचा आवाज, निलेश मिश्राचे शब्द आणी इरफानचा चेहरा असं सारं या पावसाळी करड्या रंगामध्ये सामोरं येत जातं. 

एखादं शांत सरोवर पहुडलेलं असावं, कुणीतरी एखादा खडा फेकावा आणि त्या सरोवरामध्ये तरंग ऊठावेत तशी मनाची अवस्था होते हे असं काहीतरी ऐकलं की. नको त्या आठवणींचे फेर धरून सोबत घुमायला लागतात आणि मग नजर धूसर करत जातात. 

नशीब इतकंच की तेव्हा बाहेर पाऊस कोसळायला लागलेला असतो, आणि आपल्या नजरेमधलं पाणी कुणालाच दिसत नाही. 

#आजचेगाणे 

#नंदिनी 

>>>>>>


01-04-2017 


आज सकाळी हे गाणं शेअर केलं तेव्हाच लिहिणार होते,पण प्रापंचिक जबाबदार्या् खुणावत होत्या! तरीही, दिवसभर हे गाणं मनांत वाजत राहिलंच. गुझारिश माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे, आणि भन्साळीचा हा पिक्चर फ़्लॉप पिक्चर असूनही त्याचा वन ऑफ द बेस्ट आहे. सगळीच गाणी आवडती असली, तरी जाने किसके ख्वाब अधिक जवळचं आहे. 


केकेचा आवाज फार कमी ऐकू येतो हे एका अर्थाने बरंच आहे. टिपिकल पंजाबी ठेक्यावरच्या पार्टी गाण्यांमध्ये ऐकून ऐकून त्याच्या आवाजामधला तो स्पेशल धारदारपणा गायब व्हायची भितीच वाटते. या गाण्याच्या  शब्दांमध्ये अतोनात दर्द आहे, पण त्याचबरोबर एक आशेची सोनेरी किनार आहे. हे सगळं काही केके त्याच्या आवाजामध्ये पेलवू शकतो. 


एकेकाळी, स्टेज गाजवणारा जादूगार आणि गेल्या चौदा वर्षांपासून अपंगांचं जिणं जगत असलेल्या इथनला आता मरायचं आहे. दुसर्यााच्या दयेवर जगण्याचा मनस्वी कंटाळा आलेला आहे. अतिशय कुशाग्र बुद्धी असूनही मानेखालचं लुळं पडलेल्या या इथनला स्वप्नं तरी कसली पडणार!! गत आयुष्यामधल्या अनेक फोटोफ्रेममधून झळकणारा तो हसरा, जगज्जेता चेहरा आता सुकत चालला आहे, तरीही उशीखाली कुणीतरी रोज स्वप्नं मात्र ठेवतंच आहे.  मरण्याची- हे आयुष्य संपवून पुढच्या प्रवासाला निघायची अतोनात हौस असतानादेखील काहीतरी क्षीणमात्र का होईना त्याला या इथल्या जगण्याशी बांधून ठेवतंय! सुन्यासुन्या नजरेसमोर तो स्वत:लाच पाहतोय.. असा लुळापांगळा नाहीतर आधीसारखाच! त्याचं शरीर त्याची साथ देतंय. तो प्रेक्षकांसमोर असलेला कलाकार आहे. त्याच्या स्वप्नांशी खेळण्याचा त्याला अजूनही हक्क असल्यासारखा तो स्टेजभर बागडतोय. स्वप्नांचा भलामोठा बुडबुडा सोबत ठेवून त्याच्यासोबत खेळतोय. प्रकाशाच्या वाटेवर उडत जाण्याची आकांक्षा, ऊनसावलीच्या खेळामधला लपंडाव, आपल्याच शरीराचे मुक्त अविष्कार, सगळंसगळं काही अनुभवतो आहे. त्याच्या नजरेसमोर स्वप्नांची ती आतिषबाजी होते. अखेरीस, टाळ्यांचा कडकडाट होतो आणि तो स्वत:शी प्रसन्नपणे हसतो. हेच तर हवं असतं नाही का कलाकाराला?


#आजचेगाणे 

- नंदिनी देसाई


- नंदिनी देसाई

Sunday, 29 May 2022

टॉप गन: मॅव्हरिक (फिल्म)



भूतकाळाची एक गम्मत असते. कधीही दुरून बघायला तो भूतकाळ छानच वाटतो. नॉस्टॅल्जिक आठवणींनी सजलेला भूतकाळ कायम रम्य, सुंदर वाटतो पण खरोखर काळ ओलांडून तो भूतकाळ आजच्या काळात आपल्यासमोर आला तर मात्र कदाचित... बोरिंग वाटू शकतोच. तब्बल तीस वर्षांनी आलेला टॉप गनच्या सीक्वेलबाबतीत ही भिती प्रकर्षाने जास्त जाणवत होती. भूतकाळामधली कथा तीन दशकांनी वर्तमानकाळात आणणे ही तारेवरची कसरतच आहे... 


1986 साली आलेला टॉप गन हा कल्चरल फिनोमेना होता. अमेरिकन नेव्हीच्यामते, ज्यावर्षी हा सिनेमा रीलीज झाला त्या वर्षापासून नेव्हीमध्ये अप्लाय करणार्‍यांची संख्या तब्बल पाचशे ट्क्क्यांनी वाढली. रे बॅन एव्हिएटर आणि बॉम्बर जॅकेट्सचा खप किती टक्क्याने वाढला देव जाणे. पण अवघ्या पंचविशीच्या टॉम क्रूझला या सिनेमाने जागतिक सुपरस्टारपद रातोरात देऊ केलं आणि त्याने ते गेली तीन दशकं अढळपणे टिकवून ठेवलं आहे. टॉम क्रूझ तेव्हा अ‍ॅक्शन हीरो म्हणून गाजला, लाखो तरुणींच्या दिल की धडकन बनला. आज टॉप गन मॅव्हरिक हा त्याचा सीक्वेल जेव्हा रीलीज झालाय तेव्हा टॉम क्रूझ साठीला पोचला आहे. चेहर्‍यावर वय दिसतं आहे पण ते अजिबात जाणवत नाही ते त्याच्या स्क्रीन प्रेझेन्समधून. आणि म्हणूनच टॉप गनचा सीक्वेल भूतकाळ घेऊन अवतरताना अजिबात बोरिंग वाटत नाही. आपल्या हिंदी सिनेमाला "हीरो"चे टेम्प्लेट टॉप गनच्या मॅव्हेरिकने दिले होते. निळी जीन्स, पांढरा टीशर्ट, डोळ्यांवर रे बॅन एव्हिएटर, बॉम्बर जॅकेट अशा वेषामधला आपला हीरो बाईकवरून सुस्साट एंट्री गेले दोन अडीच दशके घेतोच आहे.


टॉप गन हा टिपिकल अमेरिकन सिनेमा. सिनेमा तरीही जगभर गाजला, त्यामधली विमानांच्या लढाईची दृष्ये आजही अंगावर काटा आणतात. गो प्रो चा काळ नसताना आणि सीजीआय अगदीच बाल्यावस्थेमध्ये असताना, विमानाच्या आत आणि विमानावर कॅमेरा लावून शूट केलेले शॉट्स महान होते. आज सीजीआय काहीही करामती करू शकत असताना, कंप्युटर्सच्या सहाय्याने अख्खा सिनेमा ग्रीन स्क्रीनवरून घेता येऊ शकत असतानाही, टॉप गनचा सीक्वेल त्या जुन्यापुराण्या फूटेजची जादू सोबत घेऊन आला आहे. टोनी स्कॉट या मूळ दिग्दर्शकाच्या मृत्यूनंतर जोसेफ किनिस्की या दिग्दर्शकाने सिनेमाची धुरा सांभाळली आहे, आणि हे करत असताना एकच गोष्ट कायम लक्षात ठेवली आहे- हा सिनेमा टॉम क्रूझचा होता, आहे आणि राहील. 



सिनेमाच्या अगदी सुरुवातीला एक संवाद आहे जिथे मॅव्हरिकला "तुझ्यासारखे लोक आता अस्तंगत होत चालले आहेत" असं ऐकवलं जातं, त्यावर तो "कदाचित, पण आज नाही" हे ऐकवतो आणि पुढचे दोन तास हे उद्गार ज्खरे करून दाखवतो. तीन दशकापूर्वी असलेली सिनेमाची आर्थिक गणित, प्रसिद्धीचे प्रकार वगैरे सर्व सर्व काही बदलं आहे. एकेकाळी केवळ सुपरस्टार या एकमेव पात्रता निकषावर सिनेमा थेटरामध्ये आठवडेच्या आठवडे मुक्काम बाळगून असत. आता अभिनेत्यांपेक्षाही सुपरहीरोची चलती आहे. "काय अ‍ॅक्शन आहे, असं कधी घडेल काय पासून सुरू झालेला हा प्रवास " यापेक्षा "काय एफेक्ट्स आहेत, एकदम रीअल वाटतात" पर्यंत आलेला आहे. अभिनयापेक्षा इफेक्ट्सचे याचे कौतुक वाटायचे दिवस आहेत. सिनेमा हे सुपरहीरोच्या ब्रॅंड लॉयल्टीवर चालतात. अशा या बदलत्या काळामध्ये साठी गाठलेला टॉम पुन्हा एकदा त्याची ही गाजलेली भूमिका तडफेने घेऊन येतो, आणि बस्स.. छा जाता है. वय त्याच्या चेहर्‍यावर दिसतंच आहे, पण ते त्याच्या परफॉर्मन्समध्ये मात्र अजिबात जाणवत नाही. माणूस नसलेले फायटर प्लेन्स आता बॉम्ब टाकत जातात, पण तरीही, मानवी पायलटची आवश्यकता आजही राहणारच आहे, तसंच, कितीही ब्रॅंडेड चकचकीत झगमगाटी सिनेमा आले तरीही, अस्सल अ‍ॅक्शनची आणि सिनेमाची जादू मात्र तीच राहणार आहे. एक अर्थाने, आता असे सुपरस्टारडम आणि त्याची फॅनगिरी संपत आल्यासारखी आहेच आहे. टॉम क्रूझ त्या लाटेमधल्या शेवटच्या अभिनेत्यांपैकी एक. पण आग विझली तरी अद्याप निखारे मात्र रसरशीत आहेत. टॉम "बट नॉट टूडे" तो या सिनेमाभर अखंड जगला आहे. 


बदलत्या तांत्रिक करामतींनी टॉप गन मॅव्हरिकमध्ये कमाल केलेलीच आहे. एका निर्जन डोंगराळ भागामध्ये असलेल्या युरेनियम प्लॅंटवर बॉम्ब टाकून ते निकामी करणे या अतिकठीण मिशनसाठी इंस्ट्रक्टर म्हणून आलेला मॅव्हरिक त्यासाठी लागणारी टीम तयार करतो, हे करत असताना जुन्या काळच्या काही जखमादेखील भरत जातो. गूजचा मुलगा असलेला रूस्टर आता त्याच्यासोबत टॉप गनमध्ये आहे. त्याच्यसोबत असलेले भूतकाळाचे काही लागेबांधेदेखील आहेतच. एक जुनापुराणा रोमान्स आहे, जो आता टॉप गनमध्ये परत आल्यावर पुन्हा बहरला आहे. पण, हे सर्व काहीही असताना सिनेमाचा फोकस मात्र त्याच्या अ‍ॅक्शनवरून ढळत नाही. अगदी अफिल्य प्रसंगापासून ते शेवटच्या प्रसंगापर्यंत रॉ अ‍ॅक्शन ही या सिनेमाची जान बनून जाते. एरियल फूटेज तेही डोंगराळ ओसाड भागाचं व्हिज्युअली स्टनिंग तर आहेच, शिवाय या सिनेमाच्या भरभक्कम बाजूंपैकी एक आहे. विमानाच्या वर आणि आत लावलेले कॅमेरा यामुळे आपण सिनेमा पाहत नसून, खरोखर त्या फायटर जेटमध्येच आहोत अस वाटायला लागतं. दोन तासाची ही अक्षरश: एक रोलरकोस्टर राईड होते. 



सिनेमाच्या प्लॉटमध्ये काही मेजर घोळ अवश्य आहेत, शिवाय कथा अत्यंत प्रेडिक्टेबल देखील आहे. एक लीडर, त्याचा भूतकाळाशी झालेला सामना, मग त्यात आलेले प्रश्न, त्याने काढलेले मार्ग हे खूपच सरधोपट आहे, पण तरीही टॉम क्रूझचा अफलातून स्क्रीन प्रेझेन्स या सगळ्याला मॅजिकल बनवून जातो. त्याच्यासोबत असणारे इतर सर्व अभिनेते हे सिनेमाब्भर फायटर पायलट वाटत राहतात. विमानांची लढाई सुरू असताना विनाकारण गोळ्या झडत नाहीत. डॉगफाईट ही कुठूनही अचंबित आणि अतर्क्य वाटत नाही, हीच सिनेमाची गम्मत. 



टॉप गनच्या यशामध्ये त्याच्या साउंडट्रॅकचा हातभार फार मोठा होता. बर्लिनचं टेक माय ब्रेथ अवे आजही प्रेमगीत म्हणून लोकांच्या मनामध्ये बसलेलं आहे. लेडी गागाचं होल्ड माय हॅंड कदाचित त्या गाण्याची जागा घेणार नाही, पण तरीही हे तितकंच गाजेल हे नक्की. शिवाय, मूळ सिनेमामधलं टॉप गन अ‍ॅन्थेम पण या सीक्वेलमध्ये आहेच आहे. 


एका अर्थाने टॉप गन मॅव्हरिक ही त्या गतकाळाला दिलेली सलामी आहे. पण म्हणून सिनेमा तेवढा आणि तितकाच नाही. आजच्या नवीन पिढीलाही तो समजू शकेल, भावू शकेल आणि त्यांच्यापर्यंत पोचू शकेल. आणि म्हणून टॉप गन मॅव्हरिक ही तारेवरची कसरत सफाईने आणि यशस्वीरीत्या पूर्ण करतो. 

 - नंदिनी देसाई

Wednesday, 10 February 2021

फिरूनी नवी (भाग 4)

 भल्या पहाटे सात वाजता त्यानं कार गेटसमोर लावली. गेटला लावलेलं कुलूप अजून उघडलेलंही नव्हतं त्यानं दोन तीनदा गेट खडाखडा हलवून आवाज दिला. पण, कोणाचही उत्तरं आलं नाही. काल रात्री आईचा ताबडतोब घरी ये इतकाच फोन आला होता.

एरवी आई बाबा भल्या पहाटे पाच वाजता उठतात. आणि आज कायं झालयं. अखेर वैतागून त्यानं खिशातला मोबाईल काढला आणि आईला फोन लावला. रिंग पूर्णपणे वाजून संपत होती तेव्हा फोन उचलला.

“आई, मी बोलतोय”

”सकाळी सकाळी तुझा फोन” तिच्या आवाजातला वैताग स्पष्ट जाणवत होता.

”आई दारं उघड मी केव्हाचा गेट बाहेर उभा आहे. ”

आईनं बाबांना हाक मारून गेट उघडायला सांगितलं. गेट उघडताना बाबा म्हणाले ”काय राजे कॉलेजचे दिवस विसरलात का? रात्रभर उडंगून याच वेळेला गेटवरून उडया मारून मागच्या दाराने घरात येत होतात. ”

पण तेव्हा निहाल माझ्यासाठी मागचं दार उघड ठेवत होता या तपशीलाची त्यानं आठवण करून दिली नाही. घरी गेल्यावर आईने स्वागत थंडपणे केलं. तिच्याकडून त्याला तशीही काही अपेक्षा नव्हती.

डायनिंग टेबलावर ठेवलेल्या एक कप चहानं त्याची सकाळ उजाडली. खरतर रात्रभर प्रवास करून आल्याने भूक लागली होती. पण आईने अजून नाश्ता बनवला नव्हता.

”नुस्ता चहा काय देतेस अजून काहीतरी खायला दे, ” बाबा म्हणाले.

”थोडया वेळाने पोळया करायला मावशी येतील, तेव्हा त्यांनाच काहीतरी बनवायला सांगेन” आईने विषय बंद केला. त्यानं निमुटपणे समोर ठेवलेल्या गारेगार  चहाचा घोट घेतला. “बेस्ट चहा” तो म्हणाला.

“चला, तुझ्याकडून कौतुक ऐकलं आता मी सुखाने मरायला मोकळी.” तिच्या टोमण्यावर काही न बोलता त्यानं अजून एक घोट घेतला.

”आई, इतक्या तातडीने मला का बोलवून घेतलंस? ” चहा संपता संपता त्यानं विचारलं.

हातामधला न्यूजपेपर बाजूला ठेवत त्याचे बाबा म्हणाले, “बोलूया! सगळा विषय सावकाश बोलूया, आधी आंघोळ करून घे. वाटल्यास तासभर झोप काढ, मग बोलू.” 

“काही गरज नाही.” आई म्हणाली. “आधी विषय क्लीअर करू आणि मग त्याला वाटेल तेवढा वेळ आराम करू दे नाहीतर झोपा काढूदेत.”

“पूजा, जरा सबूरीने घे,” बाबा तिला समजावत म्हणाले.

तो आता प्रचंड वैतागला. “बाबा, आईचं बरोबर आहे. जो वर मला इकडे बोलवण्याच कारणं कळत नाही तोवर मी आराम काय करेन? बाबा, सारं ठीक आहे ना. काही अडचण नाही ना?”

“का? अडचण अस्ती तर तू काय मदत केली असती?”  आईच्या प्रश्नात टोकेरी बाणाचा ईफेक्ट होता.

“नाही, अडचण कसली नाही.” बाबा, म्हणाले.

निमिष पुन्हा एकदा गोंधळात पडला. दोघांच्याही तब्येती व्यवस्थित होत्या. आर्थिक दृष्टीने बाबा चांगलेच भरभक्कम होते मग तरीही त्याला बोलावून घेण्यासारखं काय घडलं होतं?

“निमिष, आम्ही हा बंगला विकणार आहोत.” बाबा माझी नजर चुकवत बोलले.

“ओके,”

“बंगला विकून जे पैसे येतील त्या मधून निहालच्या नावाने ट्रस्ट फंड चालू करायचा विचार आहे.” 

ओके,   त्यानं परत तेच उत्तर दिलं.

हा बंगला बांधून पंचवीस एक वर्ष झाली होती. पण  सात आठ वर्शांपूवी बाबांनी खोल्या वाढवायच्या म्हणून वर मजला काढला होता. तिथं दोघा भावांची सेपरेट बेडरूम, गेस्टरूम, लायब्ररी आणि एक छोटं किचन केलं होतं. दुर्दैवाने दोन्हीं भावांमध्ये भांडण झाली. पटलं नाही, तर कुणीतरी वेगळं राहून घर करण्यापेक्षा आहे त्याच घरात दोन सेपरेट घर करता यावीत अशी त्याच्या आईची ही योजना.

पण, निहालनंतर आता गरजच उरली नव्हती. निमिष गावी परत यायचे तसे काही चान्सेस नव्हते. त्यामुळे त्यांनी हा बंगला विकला तरी त्याला काहीच फरक पडत नव्हता.

“पण मग मला का बोलावून घेतलं?”

“कोर्टात लिहून दयायला की  तुझा हया बंगल्यावर काहीही हक्क नाही आणि हा बंगला विकून जे काही पैसे येतील त्यावरही तुझा काही हक्क नाही.” त्याच्या आईनं विषय क्लीअर करून टाकला. 

“बाबा, या कारणासाठी तुम्ही मला काही न सांगता रातोरात बोलावून घेतलत. लेट मी गेस आपल्याला कोर्टात आज लगेच जायचंय. बरोबर?”

“निमिष, अरे!!”  बाबा किंचित गोंधळत म्हणाले

घटनाक्रम लक्षात आल्यावर तो चिडला. “मी वकीलाकडे जावून त्याचा सल्ला घेउन तुमच्या या खरेदीविक्रीच्या व्यवहारामध्ये काही अडचण निर्माण करेन किंवा बंगल्यावर हक्क सांगेन अशीच तुम्हाला भीती आहे ना?” त्याचा आवाज खूप शांत होता, पण मनात धुमस्त असलेला संताप त्याला स्वत:लाच जाणवत होता.  “हीच किंमत करता काय माझी?”

आई माझ्या  समोरून ताडकन उठली “जास्त बोलू नकोस. जगातल्या कुठल्याही वकीलाकडे जा किंवा तुझे गुंड मित्र घेवून ये, मी कुणालाही घाबरत नाही. या बंगल्यातली एक विट किंवा आलेल्या पैशंमधला एक रूपयासुध्दा तुला देणार नाही.”

“आजवर मी तुमच्याकडे कधी पैसे मागितलेत?”

“एजंटने या बंगल्याची आणि आजूबाजूच्या प्रॉपर्टीची किंमत दोन कोटी ठरवली आहे. किती! दोन कोटी. इतका पैसा पाहिलास तर तुझी नियत बदलेलसुध्दा तुझा काय भरवसा?”

“बाबा, आईला समजावून सांगा, मला पैसे नकोत. माझ्यापुरतं मी कमावून खातोय.” 

“हो ना, पण आयते मिळाले तर कोणाला नकोयत.”

“बाबा, आईला समजवा. माझ्या संयमाची फार परीक्षा घेउ नका. मी जगाच्या कुठल्याही कोप-यावरती असलो तरी माझ्यासाठी घर म्हणजे हे घरं! माझं अख्ख लहानपण हया घरात गेलयं. या घराबद्दल तुमची अनेक स्वप्न होती. हे घर गाजतं रहावं अशी तुमची इच्छा होती. माझ्याच एका चुकीमुळे निहाल हे जग सोडून गेला कबूल आहे मला. पण तरीही… आजही हे घर त्याचं आणि माझं आहे. आपल्या चौघांचं आहे. तुम्हांला हे घर विकून निहालसाठी फंड चालू करायचाय तर माझी काहीच हरकत नाही. हया घरावर किंवा हयाच्या पैशांवर मी कसलाही दावा सांगणार नाही. तुम्ही म्हणाल त्या कागदावर मी सही करेन. वाटल्यास गेल्या पाच वर्षांत कमावलेला माझा प्रत्येक रूपयाही मी या फंडसाठी देईन. पण प्लीज माझ्यावर इतके घाणेरडे दोषाआरोप करू नका.”

तिरीमिरीत उठून तो दाराबाहेर निघाला. पाठीमागून बाबा आवाज देत होते. पण काही न बोलता तो कारमध्ये बसला.

सुमारे दोन एक तास गावातल्या रस्त्यांवर असाच बेभान गाडी चालवत भटकत राहिला.

फोनची रिंग सतत वाजत राहिली, पण त्यानं तिकडे लक्ष दिलं नाही. दहा वाजता गावामधल्या एसटी स्टॅंडजवळच्या एका अतिशय साध्या हॉटेलमध्ये जाऊन  स्वस्तातली नॉन एसी रूम घेवून फ्रेश झाला. बरोबर अकरा वाजता तो कोर्टात पोचला. आई बाबा तिथंच बसले होते. निमिषने त्यांना पाहून न पाहिल्यासारखं केलं. मग वकीलानेच त्याच्यासमोर काही कागदपत्र ठेवली. काय आहे ते बघायचे कष्टही न घेता त्यानं दोन चार सहया करून त्या बंगल्यावरचा स्वत:चा हक्क सोडला.

निघताना त्याचे बाबा त्याला काहीतरी सांगत होते, पण त्याचं त्याकडे काही लक्ष नव्हतं. गावाबाहेर पडण्याआधी मात्र त्यानं कार बंगल्यासमोर आणली. दोन कोटी रूपये म्हणे. या जागेची, या वास्तूची किंमत दोन कोटी रूपये. पण, इथल्या आठवणींच काय त्याची किंमत कशी काढणार. त्याच्या नजरेसमोर  या बंगल्याच्या भूमीपूजनाचा दिवस उभा राहिला. आम्ही पहिली कि दुसरीला होतो. तेव्हा इथंल बांधकाम सुरू झालं. भूमीपूजनाचा मान अर्थात त्याचा आणि निहालचा. इवलारी कुदळ घेवून काढलेले त्यांचे फोटो इथंच आसपास घरात कुठेतरी असतील. सगळे फोटो कधीतरी एकदा शोधायला हवेत...

गाडी वळवून तो परत मुंबईच्या वाटेला लागला. पनवेलला पोहचला, तेव्हा रात्रीचे सात वाजले होते. सकाळपासून निव्वळ एक चहावर असूनही त्याला भूक लागली नव्हती.

पनवेलच्या आधी कितीतरी वेळ गाडी थांबवून तो हातातल्या मोबाईलकडे बघत राहिला. गेल्या महिन्यात झालेल्या त्या अचानक भेटीनंतर त्याने तिला फोनही केला नव्हता, आणि भेटलाही नव्हता.

तरीही त्याने अनिशाला मेसेज केला. मी अर्ध्या तासात येतोय चालेल?

तिचा लगेच रिप्लाय आला. “ओके. लवकर ये. जेवण्यासाठी तुझी वाट बघेन.” 

तो मेसेज वाचताना त्याचं मन भरून आलं. इतका वेळ चुकारमुकारपणे डोळयांमधून येणारे अश्रू आता मात्र कसल्याही बंधनांची पर्वा न करता सलग जुलैच्या पावसाळी रात्रीसारखे वाहत राहिले. आज त्याचं घर हरवलं होत.

पण त्याच वेळी कुणीतरी त्याची वाटही पाहात होतं.

आणि जिथं कुणी तुमची वाट पाहणार असतं तेच तुमचं घरं असतं. नाही का?

<<<<<<<<

दरवाजा उघडल्या उघडल्या ती थबकली. तो येतो म्हणाला होता, तरी येईलच असं तिला वाटलं नव्हतं. अजिबातच काहीच संपर्क न ठेवलेल्या निमिषकडून आज आलेला फोन अनपेक्षित होताच. त्याहून जास्त अनपेक्षित होतं त्याचं लगेच येणं.

तिनं दार उघडल्याक्षणी आपण इतक्या रात्री असे अचानक तिच्या घरी आलो याचा त्याला पश्चाताप झाला. मागच्या वेळी काहीही विचार न करता, तो थेट तिच्या घरी आला होता त्यावेळी त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते. आज त्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतानाही त्यानं इथं यायला हवं होतंच का?

“आत तरी ये” ती म्हणाली.

“दरवाजामधून बाजूला तरी हो” त्यासरशी तो म्हणाला. दोघांच्याही चेहर्‍यावर एकच स्माईल आलं. ती दारामधून मागे सरकली. तो घरात आला. मागच्यावेळेसारखा पसारा घरभर होताच, पण किमान आज घरभर लाईट लावलेले होते. खिडक्या उघड्या होत्या. घर जरा एक टक्का का होईना प्रसन्न वाटत होतं. समोर उभी असलेली अनिशाही किंचित बदलल्यासारखी. म्हणजे अंगामध्ये तो ढिगळ गाऊन होताच, पण किमान आता तो धुतलेला तरी वाटत होता.

“सामान कुठाय तुझं” तिनं विचारलं.

“सामान? म्हणजे?” त्याने दार बंद करत विचारलं.

“गावाला घरी गेला होतास ना?”

“एकच छोटी बॅग. कारमध्येच ठेवलीये.”

“मग आता फ्रेश कसा होशील? दुपारपासून ड्राईव्ह करतोयस, तर पटकन चेंज करून घे. तोवर मी जेवण ऑर्डर करेन. तुला नॉन व्हेज मध्ये काय हवंय ते माहित नव्हतं म्हणून मी ऑर्डर केलं नाही. नाहीतर….” ती भराभरा बोलत सुटली.

“अनी, ऐक! मी तुला असाच सहज कॉल केला होता. खूप दिवसांत आपण भेटलो नव्हतो किंवा फोनवर पण नीट बोलणं झालं नव्हतं म्हणून. डीनरचा प्लान करायलाच हवं असं काही नाही.” तिचा नर्व्हसनेस कमी करायला तो म्हणाला.

“ओह!” ती एकदम वरमली.

“किंवा आपण असं करू! पटकन तूच चेंज कर. कुठेतरी बाहेर डिनरला जाऊ! चालेल?” त्यानं बाजू किंचित सावरायचा प्रयत्न केला.

“नको.” ती अचानक म्हणाली. “त्यापेक्षा मी.. आपण.. आय मीन..”

“ठीक. मग तुझा पहिलाच प्लान परफेक्ट होता असं म्हणू. तुला जे हवं ते ऑर्डर कर. माझ्यासाठी फक्त दाल खिचडी. बाकी काही नको”

“ओके” तिने मोबाईल उचलला. स्पीड डायलवरून नंबर डायल करून तिनं दोन दाल खिचडीची ऑर्डर दिली. ऑर्डर देतानाच पलिकडच्याला “गरमागर्म भेजना वर्ना मै पेमेंट नै करेगी” वगैरे धमकी पण तिनं दिलेली ऐकून तो गालातल्या गालात हसला. ही काय कुणाला पैसे न देता राहील. बारावीत असताना  हिशोबात काहीतरी गल्लत झाली आणि दुकानदाराने हिला वीस रूपये जास्त दिले होते. रात्री साडेआठ वाजता अभूतपूर्व गोंधळ घातला होता. “उद्या सकाळी जाऊन पैसे परत येऊन देऊ” या तिच्या आईवडीलांच्या आणि निहालच्या समजावण्याला अजिबात बधली नव्हती.

अखेर त्यानं बाईक काढली, तिला दुकानात घेऊन गेला. ते जास्तीचे वीस रूपये परत दिले तेव्हा कुठं इतरांना सुटकेचा श्वास घेता आला.

बाथरूममध्ये जाऊन त्यानं तोंडावर पाणी मारलं. सवयीने डोळ्यावर चष्मा तसाच राहिला होता. तो ओला चष्मा काढून पुसत तो बाहेर आला तेव्हा अनिशा खिडकीजवळ उभी होती.

“चष्मा कधी लागला तुला?” तिनं अगदी सहजपणे विचारलं.

शिट! ही गोष्ट त्याच्या लक्षात आलीच नव्हती. गेल्या दोनेक वर्षांतच आलेला हा चष्मा. एरवी तो कायम कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यामुळे, चष्मा लावतच नाही.

“गेल्या दोन वर्षांत” त्याने परत चष्मा डोळ्यावर ठेवत उत्तर दिलं. तिनं एकवेळ पुन्हा त्याच्या चेहर्‍याकडे निरखून पाहिलं. “सेम निहाल दिसतोस” ती बोलून गेली.

तिच्या या वाक्यावर काय उत्तर द्यावं ते त्याल सुचेना. “चार्जर कुठाय?” म्हणत त्यानं वेळ मारून नेली.

“घरी सहज गेला होतास? काही काम होतं?” तिनं पुढचा प्रश्न विचारला.

“काही खास नाही. असंच आईनं बोलावलेलं?”

“कसे आहेत दोघे?”

“ठीक आहेत. तुझा काहीच टच नाहिये का?”

“अगदी सुरूवातीला थोडाफार होता. मग नंतर मी ही नोकरी पकडली. आईबाबा तयार नव्हते. इव्हन पूजाकाकी पण वैतागली होती. मला म्हणाली, तुला काय गरज आहे नोकरीची? आयुष्यभर तुझी जिम्मेदारी आम्ही घेऊ. मग ते वेगवेगळ्या मॅरेज पोर्टलवर रजिस्टर केलं. स्थळं बघायला पण लागले. माझ्यासाठी ते खूपच इरिटेटिंग होतं. आय मीन… “

“अनी, आय अ‍ॅम रीअली सॉरी, या दरम्यान मी तुझ्यासमोर येण्याची हिम्मत पण केली नाही. मला..”

“एका अर्थाने बरंच आहे ना? निमिष, अरे मला लोकं मनमोकळेपणानं बोलू पण देत नाहीत रे. निहाल आता या जगात नाही हे सत्य मला पक्कं ठाऊक होतं. तेव्हाच, त्याच रात्री. पण तरीही मला सतत त्याचे आजूबाजूला असल्याचे भास होत राहतात. हे नॉर्मल नाही हे मलाही माहित होतंच की. पण लोकांनी मला वेड लागल्यासारखंच ट्रीट करायला सुरूवात केली. म्हणजे, क्लीअर कट एकच सोल्युशन. आपण तिचं लग्न लावून देऊ, मग ती सेटल होईल. आपल्या संसारात आणी आपल्या घरात. मला थोडा वेळ हवा होता. मुक्तपणे माझं दु:ख मला सहन करण्यासाठी…. तोही मिळेना. म्हणून मग सरळ घर सोडून इकडे आले. नवीन नोकरी, नवीन घर, नवीन माणसं. आता कूठे गाडी रूळावर येतेय. प्रॉपर काऊंसिलिंग पण घेतेय. त्याचाही फायदा होतोय. म्हणजे भास जरा कमी झालेत. पूर्ण थांबले नाहीत. पण आता समजतं…. आता सुरूवातीला व्हायचा तितका त्रास होत नाहीये”

“अनी, यार! यातलं काहीच मला माहित नव्हतं. आईला जेव्हा तुझ्याबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, की तू युएसला निघून गेलीस… एका अर्थाने बरं पण आहे म्हणा. कदाचित तेव्हा तुला भेटलो असतो तर…”

“जर तरच्या गणितांना काहीच अर्थ नसतो निमिष!” ‘’तितक्यात दारावरची बेल वाजली. हॉटेलमधून ऑर्डर आली होती. त्यानंच दार उघडून पार्सल घेतलं. सवयीनुसार तो पैसे द्यायला गेला तेव्हा पाठीमागून अनिषाचा आवाज आला. “पाकिट ठेव खिशात. दादाचा आणि माझा महिन्याचा एकदम हिशोब असतो!”

पार्सल देताना समोरचा पंचवीस किलो वजनाचा ऐवज असलेला दादा सगळे दात दाखवत हसला. “दिदी, गर्मागर्म खिचडी लाये है, खा लो. फ्रीझ में रख के तीन दिन यही मत खाना”

तिनं पुढे येऊन त्याच्या हातून पार्सल घेतलं. किचनमध्ये जाऊन ताटं वाढायला घेतली.

हॉलमध्येच खुर्च्या ओढून दोघं जेवायला बसले. खिचडी चवीला बेफाट होती. त्याला केव्हाची भूक लागलेलीच होती, त्यामुळे काही न बोलता तो शांतपणे खात राहिला. ती ताटामधले दोन तीन घास तशीच चिवडत बसली होती.

त्यानं दुसर्‍यांदा खिचडी वाढून घेतली, तेव्हा अखेर तो तिला म्हणाला. “अगं, जेव ना.”

“जेवतेय की”

“व्यवस्थित पोटभर जेव. मी हावर्‍यासारखा मघापासून खात सुटलोय आणि तुझं एखाद घास खाणं चाललंय”

“मला आज फारशी भूक नाहीच आहे. पण तू पोटभर जेव. दुपारी घरून निघालास तेव्हा पूजाकाकीने डबा बांधून दिला नाही का?” ही त्याच्या आईची आवडती सवय होती. कुणी कुठे बाहेर निघालं की, दोन दिवस पुरेल इतका खाऊ बांधून द्यायची. निहालचं कॉलेज तर गावापासून तीन साडेतीन तासांच्या अंतरावर. घरून जेवून निघाला तरी वाटेत असूदेत म्हणून त्याच्यासोबत पराठे आणि चटणी द्यायची.

अर्थात हे सर्व निहालसाठीच होतं म्हणा. त्याच्यासाठी नाही.

पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी तराळलं.

तिच्या लक्षात न येऊ देता, त्यानं हलकेच डोळे पसले.

“काय झालंय निमिष? सांगशील मला?” तिनं मात्र ते बरोबर हेरलं होत.

अखेर बांध फुटल्यासारखा तो बोलत राहिला. गेल्या पाच वर्षात कधीच कुणाशी बोलला नव्हता इतकं. आपल्याच घरात परका झाल्याची भावना इतके दिवस फक्त तो बाळगून होता. आज ती त्याने कुणाला तरी बोलून दाखवली.

“पण हे रॉंग आहे. पूजाकाकी आणि अमितकाका असं कसं करू शकतात? तुझ्याच घरामध्ये? आणि हा निहालच्या नावाने ट्र्स्ट फंड चालू करायला घर कशाला विकलंय?”

“प्रॉपर्टीची किम्मत दोन करोड झालीये. त्यांना आता इतकं मोठं घर नकोय. मी काय येऊन राहणार नाही… आणि..”

“निहालच्या आणि तुझ्या आठवणी आहेत त्या घरामध्ये. घर हे नुसतं सिमेंट कॉन्क्रीट आणि दगडावाळूचं नसतं. आठवणी पण असतात आणि त्या जपायलाच हव्यात.”

“मला घर विकायचा किंवा ट्रस्ट फंड चालू करायचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण मला अचानक काही न सांगता, मी प्रॉपर्टीत हिस्से मागेन वगैरे बोललं ते जास्त हर्टींग होतं. एनीवेज…”

“मी बोलू का? पूजाकाकीशी?” तिनं दबकत विचारलं.

“अजिबात नको. तू आणि मी. मी तुझ्या समोर जरी आलोय असं तिला समजलं तरी ती माझा जीव घेईल. इन फॅक्ट, मला दर वेळेला विचारते. मी मरत का नाही एकदाचा!” तो सटकन बोलून गेला.

“निमिष!” ती ओरडली. “प्लीज असं बोलू नकोस. प्लीज! मरण म्हणजे जोक नसतो रे”

“हे तू मला सांगतेस? अनिषा, त्या रात्री तू आणि मी होतो. निहालसोबत. त्या रात्री फक्त माझ्या चुकीमुळे निहाल गेलाय. आईचा माझ्यावरचा राग एका परीने योग्य पण आहे म्हणा. तिचा गूड बॉय गेला. तेही माझ्यासारख्या बॅड बॉयमुळे. माझ्या चुकीमुळे”

अनीशाने हातातलं ताट नेऊन सिंकमध्ये ठेवलं आणी हात धुतले. किचनबाहेर ती आली तेव्हा, निमिषने चार्जिंगला लावलेला त्याचा मोबाईल काढून घेतला होता.

“येतो, अनीशा. खूप दिवसांनी तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून आलो. पण साला, आपलं आयुष्य एका विचित्र लूप होलमध्ये अडकलं आहे. कितीही दूर गेलो, तरी त्याचा विषय येणारच. आणि तुला त्रास होणारच.”

<<<<<<<<

“निमिश, इतकं लिहून झाल्याशिवाय तू इथून उठणार नाहीस. समजलं?”  निहालचा शांत तरी ठाम आवाज ऐकून अनिशाने मान वर करून पाहिलं. आज कधी  नव्हे ते तिघे एकत्र अभ्यासाला बसले होते. एरवी निहाल आणि अनिशा कायम एकत्रच अभ्यास करायचे. पण आज दहा मिनिटांपूर्वी काकींनी निमिषला  त्यांच्यासोबत अभ्यासाला पिटाळलं होतं. आधी बराचवेळ स्टडी टेबलाच्या एका बाजूला बसून त्याने पुस्तकामध्ये चित्र विचित्र आकृत्या काढल्या. नंतर थोडया वेळाने निहालने गणित सोडवण्यासाठी वापरलेल्या रफ कागदांच्या घडया घालून विमान आणि मोर बनविला. मग त्याला चहा हवा झाला. काकींनी चहाएवजी दोन चार फटके देण्याची ऑफर दिल्यावर परत निमूटपणे येऊन तो टेबलावर बसला होता.

कॉलेजला दिवाळीची सुट्टी लागली होती. निहालचं बारावीचं वर्ष म्हणून तो तसाही दिवसामधून आठ ते दहा तास अभ्यास सहज करत होता. दुपारच्या वेळी स्वयंपाक घरातल्या डायनिंग टेबलवर बसून आम्ही जर्नल पूर्ण करीत बसलो होतो. बाहेर ऑक्टोबर हिटने हैराण केलं होतं. त्यात आई आणि काकींनी मिळून सकाळभर करंज्या तळल्या होत्या. किचनमध्ये अजूनही तो करंजीचा गोडसर वास पसरून राहिला होता. अनिषाच्या जर्नलमधल्या फक्त आकृत्या काढायचं शिल्लक होतं.

“निहाल, तुझा अभ्यास झाला की, प्लीज मला या आकृत्या काढून देना.” तिनं त्याच्याकडे भुणभुण लावली.

“तुझ्या तू काढ ना, परीक्षेमध्ये काय मी येणार आहे?” त्यानं मान पण वर न करता उत्तर दिलं.

“अरे, मी बेडूक काढला तरी तो शहामृगासारखा दिसतो त्यामुळे प्लीज”

हे बोलणं होईपर्यंत निमिषने तिच्यासमोरचं जर्नल ओढून घेतलं आणि आकृत्या काढायला सुरूवात केली. जेमतेम दोन की तीन आकृत्या काडःऊन झाल्यावर त्याला तहान लागली म्हणून तो जागचा उठला. लगेच निहालने त्याच्याकडे भुवई वर करून पाहिलं.

“पाण्यासाठी तहानलेल्या व्याकुळ जीवाला तू का सतावतोयस?”

“ड्रामेबाजी बंद कर आणि होमवर्क पूर्ण कर. त्या अनिशाकडे बघ!! मुलगी असूनही किती वेळ न बोलता शांत वाचत बसली आहे.”

लगोलग अनिषाने पुस्तकांतून मान वर काढली. “मुलगी असूनही म्हणजे काय?”

“अगं म्हणजे, वर्गातल्या मुली कशा उगाचच इकडे तिकडे बागडत असतात, बोलत असतात. पण तू मात्र अभ्यासाला बसलीस की अजिबात बोलत नाहीस.”  निहाल तिला समजावत म्हणाला.

“म्हणजे तू बोरिंग आहेस. काय? बोरिंग” हातातली वही फाटकन् मिटत निमिष म्हणाला.

“तू मला बोअरिंग म्हणालास? मी निहालला विचारलं.

“नाही गं राणी मी असंच आपलं.” परत पुस्तकामध्ये मान खाली घातलेला निहाल पटकन बोलून गेला. तिचा स्वत:च्या कानांवर विश्वासच बसत नव्हता.

“रा . . णी” तिनं विचारलं. आता मात्र निमिशला हसू आवरत नव्हतं तिनं हातातल्या पुस्तकाचा फटका त्याच्या हातावर मारला. पण नेमकेपणाने त्याने तेवढयात हात उचलला आणि तिचं पुस्तक टेबलावर धाडकन आपटलं.

“काय रे निमिष? अभ्यासाची पुस्तकं घेउन आदळआपट कशाला करतोयस?” आतून पूजाकाकीचा आवाज आला.

“मी नाही गं, ही तुझी लाडकी अनिशा” त्यानं लगेच ओरडून उत्तर दिलं.

तिनं टेबलाखालून निमिषला जोरात पाय मारला. पण निमिष ऐवजी आई गं करून ओरडला ते मात्र निहाल. हे पाहून निमिषला आता मात्र हसू आवरेना. आतमधून परत एकदा काकींचा आवाज आला. “निमिष, आता धपाटे घालेन हां. ते दोघं सिन्सीअरली अभ्यास करतायत तर त्रास देऊ नकोस”

“आई, मस्ती ते दोघं करताहेत त्यांना बोल की, सारखं आपलं माझ्याच नावाचा उध्दार! मरेनात का तो अभ्यास.” इतका वेळ हसत खेळत बसलेला निमिष आता मात्र ताडकन खुर्चीवरून उठला. खुर्चीच्या बाजूला ठेवलेले दप्तर खसक करून ओढलं आणि त्यात टेबलावरची पुस्तक भरायला सुरूवात केली.

“निमिष, तू काय चालवलंयस?” निहालने विचारलं

तो काही न बोलता दप्तरात पुस्तक कोंबत होता. त्या कोंबाकोंबीत त्याच्या दप्तराची झोप उघडली आणि त्यामधून गुटख्याची दोन तीन पाकीटे बाहेर आली.

“निमिष, हे तुझ्याकडे कसं काय आलं?” ते चंदेरी पाकिट उचलत निहाल म्हणाला.

“माझं नाहीए ते मित्राचं आहे.” निमिषने पाकिट हिसकावून परत दप्तरामध्ये कोंबलं.

“खोटं बोलू नकोस.” निहाल शांतपणे म्हणाला. 

“निमिष, फेकून दे ते. चांगली सवय नाहीय.” अनीशा समजावणीच्या स्वरात म्हणाली. 

“तुला काय करायचंय? एकदा सांगितलंय नां मित्राच आहे. त्यानं लपवायला माझ्या दप्तरात ठेवलंय त्याच्या घरी मिळाल तर मार बसेल म्हणून.” निमिष तिच्यावर एकदम वसकला.

“नीट बोल, आणि ही तुझ्या घरी  मिळाली तर तुझा काही जाहिर सत्कार होणार आहे?”  निहालने विचारलं.

“जा ना जा!! आईला जाउन सांग. तू मम्माचा गुड बाॅय आहेस ना? ताबडतोब तिला जाऊन सांग. मग ती तुला शाब्बासकी देईल आणि माझी गाढवावरून धिंड काढेल. हेच तर तुला हवंय ना.?” निमिष पाठीला दप्तर लावत म्हणाला.

“वाटेल ते बोलू नकोस! निमिष, ही सवय चांगली नाही. दात किडतील, तोंडाला घाण वास येइल.” अनीशा पुन्हा त्याला समजावत म्हणाली.

“येऊ देत ना आम्ही काही स्कॉलर विद्वान नव्हे की, आमची गर्लफेंड असेल आणि ती आम्हाला किस करेल.”

यावर अनिशा आणि निहालने काही बोलण्याआधी तो दप्तर घेउन स्वयंपाक घराच्या मागच्या दाराने बाहेर पडला देखील होता.

*****

हातामधली सिगरेट त्यानं न पेटवताच परत ठेऊन दिली. दारामध्ये चावी फिरल्याचा आवाज झाला पण तो जागचा उठला नाही. दार लोटून निलम आत आली तरी तो अंधारात तसाच बसून होता.

“काय रे!, असा का बसलायस?” निलमने दिवा लावत विचारलं. तिच्या त्या हाकेबरोबर तो भानावर आला.

“तू कधी आलीस?” त्याने विचारलं.

“हे काय आता जस्ट येतेच तर आहे.”, निलम म्हणाली, “आज नं, शूट खूप वेळ चालू राहिलं. पार कंटाळा आला. कधी एकदा घरी येते असं मला झालं होतं. तू जेवलायस का?” पण तिच्या या बोलण्याकडे त्याचं लक्ष नव्हतंच.

“काय? काय म्हणालीस?”

“अरे मी विचारलं तू जेवलायस का? तसे अकरा वाजून गेलेत तरी ही तुझ जेवण झालं नसेल तर मी काय तरी बनवते. नाही तर मॅगी करून खाते.”

“फ्रीजमध्ये मी आणलेला पुलाव असेल बघ.” तो परत खिडकीबाहेर बघत म्हणाला.

तिच्या बोलण्याकडे त्याचं खरंच लक्ष नव्हतं. खरं तर तिनं संध्याकाळीच फोन करून आज येऊ का? विचारलं होतं. पण तो हो का म्हणाला हे मात्र त्याला माहित नव्हतं. पण आता रात्री साडेबारा वाजता निलम त्याच्या घरात आली होती. थोड्याच वेळात निलम फ्रेश होवून आली. येताना तिने स्वतःसाठी पुलाव आणि माझ्यासाठी एक चिल्ड बियर आणली होती.”

“किती वेळचा बसलायस इथे. कसला विचार करतोयस?”, तिनं विचारलं. थंड बियरचा एक घोट घेतला. खरं तर तो गेले तासभर कसला विचार करत होता हे त्यालाही आठवत नव्हतं. तो काही तरी बोलेल म्हणून अपेक्षेने निलम त्याच्याकडे पहात होती. मायक्रोव्हेवमध्ये गरम केलेला पुलाव चमच्याने चिवडत ती बसली होती. त्याचं लक्ष तिच्या प्लेटकडे गेलेलं बघताच ती एकदम बावरली.

“झालंच! पाच मिनिटात जेवून घेते. देन आय विल् बी रेडी.” ती त्याला म्हणाली. तो हॉटेलमधनं आणलेला भात कदाचित तिला आवडलेला नसावा.

“चांगला लागत नाही का? नको असेल तर ठेवून दे आणि मॅगी बनवून खा.” तो म्हणाला.

“नाही, ठीक आहे. आय विल मॅनेज.”

अचानक त्याला जाणवलं. इतकी वर्षं त्याच्या घरी येत असूनही निलम आजही स्वतःला परकीच समजते. त्यानं बियर टेबलवर ठेवली आणि किचनमध्ये गेला. ओटया खालच्या ट्रॉलीमध्ये किरणामालाच्या दुकानात असतात तशा मॅगीच्या माळा भरून ठेवलेलया होत्या. त्यापैकी एक पॅकेट काढून त्यानं शिजवायला ठेवली. त्याच्या मागोमाग निलम आत आली.

“अरे खरंच कशाला? मी भात संपवेन ना”. ती म्हणाली.

“चवीला फार ग्रेट नाहीए. तू खाऊन घे. तोपर्यंत मी जरा पुस्तक वाचत पडतो.” तो तुटकपणे म्हणाला.

दहा बारा मिनिटानंतर निलम जेव्हा त्याच्या बेडरूममध्ये आली तेव्हा तो खरंच रिडरवर पुस्तक वाचत पडला होता. डोळ्यावर प्रचंड झोप तर होतीच, पण निलमने आता  क्रीम कलरची पातळ झिरझिरीत नाईटी घातलेली होती. शॉवर घेतल्यानंतर तिचे एरव्ही सरळ असणारे केस आता किंचित कुरळे झाले होते. तिच्या गोल सटोल चेहर्‍यावर हा कुरळेपणा बेहद्द खुबसुरत दिसत होता. ओठांवरच्या त्या किंचित हसणार्‍या स्मितासह एक एक पाउल शांतपणे टाकत ती त्याच्याजवळ आली. त्याच्या हातातला रिडर तिने काढून नाईट स्टॅण्डवर ठेवला.

त्याच्या केसांमधून हात फिरवत तिनं त्याचा चेहरा जवळ घेतला आणि ओठांवर ओठ ठेवले.

नीलम त्याच्या घराला कितीही परकं मानत असली तरी त्याला मात्र ती अजिबात परकं मानत नाही.

त्यानं निलमला ओढून मिठीत घेतलं आणि स्वत:च्या दातांनी तिचा खालचा ओठ किंचित चावला त्याबरोबर तिच्या तोंडून एक नाराजीचा एक सूर बाहेर पडला. त्यानं पुन्हा एकदा तिचा ओठ तसाच चावला मात्र यावेळी तिच्या डाव्या दंडात त्याची पाचही बोटंही रूतवली.

सेक्सचा खेळ आता रंगात आला होता.

गेले दोन दिवस मनामध्ये सतत येणारे अनिशाचे विचार आणि आठवणी जर विसरायच्या असतील तर कदाचित हेच कामी येऊ शकेल.

रात्री दोन अडीचच्या सुमारास त्याला जाग आली. त्याच्या मिठीमध्ये निलम तशीच अंगावर एक कपडा न घालता पहूडलेली होती. त्यानं नाईट स्टॅंडवरचा त्याचा मोबाईल उचलला. व्हॉट्सॅप वर मेसेजेस स्क्रोल करत असताना अचानक त्याला अनिशाचं नाव दिसलं. त्याखाली बारीक अक्षरामध्ये ऑनलाईन!

कसलाही विचार न करता त्यानं ताबडतोब तिचा नंबर डायल केला.



(क्रमश:)

नंदिनी देसाई