Sunday 20 September 2015

MADरास -१

नवर्‍याला मद्रासला नोकरी मिळाली तेव्हा मी सर्वात जास्त खुश झाले होते. मंगळूर वाईट नाही, उलट मोठ्या शहराच्या सर्व सोयीसुविधा असलेलं एक निवांत शहर् आहे. शाळेच्या-कॉलेजच्या उत्तमोत्तम सोयींसाठी मंगळूर मला कायम आवडत राहील. अशा या ठिकाणी लेकीचं शिक्षण होणार म्हणून बरं पण वाटायचं.
पण... लेकीची शाळा सुरू होण्याआधीच नवीन नोकरी, नवीन शहर, नवीन भातुकली. ती पण पूर्णपणे अनोळखी शहरामध्ये.


लग्नानंतरच्या पाच वर्षामध्ये तीन वेळा शहरं बदलून झाली होती, आता परत इथलं सगळं स्थिरस्थावर सोडून नवीन कुठेतरी जायचं का अशी धाकधूक होतीच. शेवटी महिना पंधरादिवस चर्चा करून करून मी आणि नवर्‍यानं “चलो मद्रास” असा निर्णय घेतला.


मंगलूरमध्ये असलेले बहुतेक तमीळ कलीग्ज इकडे खटपट करत होते, आमची नोकरी पक्की झाली तशी मात्र बहुतेकांनी “तू अजोबात जाऊ नकोस. शहरापासून फर लांब आहे. तुम्ही ऍडजस्ट होऊ शकणार नाही” वगैरे चालू केलं. अर्थात आम्ही निर्णय घेतलाच होता. कूठंही ऍडजस्ट होऊच याची मला खात्री होती.


शिवाय काही झालं तरी मद्रास मोठं शहर आहे. तिथं मलादेखील परत जॉब सुरू करता येईल अशी आशा वाटत होती. सोबत अद्याप मतदानाचा हक्क नसलेलं पण अतिशय महत्त्वाचं असं आमचं दोन वर्षांचं टिल्लं होतं. तिच्यादृष्टीनं हा बदल फार मोठा होता, तरीदेखील जायचंच असं आम्ही ठरवलं.  मग पॅकिंग, आवराआवरी, गॅस परत देणं, बॅंक अकाऊंट बंद करणं वगैरे वगैरे सर्व खटपटी चालू झाल्या.


१ सप्टेंबरला आम्ही मंगळूरवरून मद्रासला यायला निघालो. रात्री नऊ वाजता सुट्णारी ट्रेन दुसर्‍या दिवशी दुपारे दोननंतर मद्रासला पोचली. वास्तविक मंगळूर आणि मद्रास हे भारताच्या नकाशावर समोरासमोर आहेत. एक पश्चिम किनार्‍यावर आणि एक पूर्व किनार्‍यावर. पण आमची भारतीय रेल्वे अशी सरळ येत नाही. मंगळूरवरून निघालेली ट्रेन खाली दक्षिणेला केरळात जाते तिथून तमिळनाडूमध्ये आणि मग परत वर उत्तरेला चढून चेन्नईला येते. इतकी लांबवर फिरून का येते माहित नाही...

मंगळूरात संध्याकाळी पाच वाजता सामानाचा ट्रक भरून पाठवल्यावर रिकाम्या घरामध्ये अक्षरश: करमेना. सुनिधी तर पार बावचळली. घर तर दिसतंय, पण सामान काहीच नाही... सगळीकडे धावता येतंय, पण खेळायला काहीच नाही..
रात्री आम्हीही ट्रेनमध्ये बसलो. बाय रोड ट्रक दुपारपर्यंत पोचला असता, आम्ही संध्याकाळपर्यंत. “तुम्ही येईपर्यंत ट्रक दारामध्ये लावतो आणि झोप काढतो” असं पॅकर्सवाला माणूस म्हणाला होता. त्याचे दिव्य प्रताप नंतर सविस्तर सांगूच.

आता जरा फ़्लॅश फॉरवर्ड मारते आणि मद्रासमध्ये येते.


मद्रासमध्ये सतिश जॉइन व्हायला जाणार आणि तेव्हाच घर शोधून वगैरे येणार होता, पण आम्हाला मद्रासची काहीच माहित नाही. दोन्तीन तमिळ मित्र-मैत्रीणींना “काटुपल्लीला जॉब आहे तर तिथून रहायला कुठले एरिया जवळ पडतील” असं विचारून पाहिलं तर त्यांना काटुपल्ली कुठं आहे तेच माहित नव्हतं. मग मदतीला आला तो सतिशचा एक ज्युनिअर. अतिशय अवली कॅरेक्टर आहे. बापाकडे चिकार पैसा, लहानपण सगळं गल्फमध्ये गेलेलं. कशीबशी मिळवलेली इंजीनीअरींगची डिग्री आणि नोकरीला लागेस्तोवरच महिन्यातले वीस दिवस दारूमध्ये. असा हा पंचवीसेक वर्षाचा मुलगा. म्हणे. “सर, मै आपको घर दिलवाता हू. मेरा उधर बहोत पहचान है” मंगळूरहून सतिशसोबत स्वत: आला, त्याचा एक काका इथल्या राजकारणात बराच  ऍक्टीव्ह आहे, त्याला सोबत घेतलं आणि हे घर शोधलं. “घर शोधणे” या कामासाठी (काही पूर्वानुभव लक्षात घेऊन) सतिशनं दोन दिवस ठरवले होते. पण प्रत्यक्षात दोन तासामध्ये हे घर फायनल झालं.
“हा एरीया राहण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त योग्य आहे” त्या असिस्टंटच्या काकांनी ठामपणे सांगितलं. “इथून जाणं येणं सोयिस्कर आहे, शिवाय शाळा वगैरे सर्व जवळ आहे” प्रत्यक्षात खेड्यासारख्या दिसणार्‍या या मनाली न्यु टाऊनबद्दल सतिश फारसा काही इम्प्रेस्ड नव्हता, पण आधी येऊ, आणि मग बघू असा त्यानं विचार केला.

मला घराचे वगैरे फोटो मेसेजवर पाठवले ते ठिकठाक वाटले. चेन्नईचा पहिला सणसणीत फटका आम्हाला बसला तो घरभाडं ऐकल्यावर. चेन्नई हे फार स्वस्त शहर आहे असं का म्हणतात ते आम्हाला तेव्हा समजलं. मंगळूरला  चार खोल्यांच्या फ्लॅटला जितकं भाडं भरत होतो, त्याच्या निम्मं भाडं एका स्वतंत्र बंगल्याचं. पाच मोठ्या खोल्या, पाठीमागे अंगण, पुढं छोटंसं अंगण. दोन माड आणि बाग. एवढं सर्व त्या भाड्य़ामध्ये. सतिश घर फायनल करून मंगळूरला परत आला.

तर आता परत बॅक टू ट्रेन. रात्रीचा प्रवास पॅकिंगच्या दमणूकीमुळं झोपूनच झालेला. सकाळी ट्रेन कुठल्याशा स्टेशनवर थांबली होती, तेव्हा मी सतिशला म्हटलं. “आता या क्षणी आपण रस्त्यावर आहोत. सर्व सामान ट्रकमधून रस्त्यावर आणि आपण ट्रेनमध्ये”


“ट्रॅकवर” कुठल्याही क्षणी लॉजिकची कास न सोडणारा नवरा वदला. दुसरा एखादा माणूस असता तर “कशाला घाबरतेस सर्व ठिक होइल” वगैरे धीराचे शब्द बोलला असता की नै. आमच्यात तशी पद्धतच नाही.
तर ट्रेन मद्रासला पोचली. (इथं विस्तारभयामुळे सुनिधीच्या रडण्याचे, खेळण्याचे वगैरे डीटेल्स लिहत नाहीये. पण प्लीज बी नोटेड. हा सर्व वेळ तो इवलाला जीव आमच्याच सोबत होता. तिला तेव्हा बोलतादेखील येत नव्हतं. सर्व कम्युनिकेशन खाणाखुणांनीच)


ट्रेन मद्रासला पोचल्यावर सतिश ट्रकवाल्याला फोन करू लागला. “कुठं आहेस” म्हणून विचारायला. त्याचा फोन स्विच ऑफ. धाबं दणाणणं म्हणजे काय त्याचा प्रत्यय आला. तरी त्या पॅकर्स मूव्हर्स दिलेले अजून दोन तीन नंबर ट्राय केले. सर्वच बंद. मंगळूरच्या ब्रॅंचला फोन केला तर तो म्हणे “वो तो पहुंच गया होगा, आप उधर जाना” या सर्व धांदलीमध्ये स्टेशनवर पोचल्यावर काहीतरी खाऊन घेऊ असं ठरवलं होतं ते विसरूनच गेलो. सुनिधी झोपेत होती, बाहेर येऊन फास्ट ट्रॅकची प्रीपेड टॅक्सी बूक केली आणि मनाली न्यु टाऊनकडे निघालो. टॅक्सी चालक (हा अत्यंत खडूस जमातीचा होता, वाटेत दोन मिनिटं गाडी थांबव बिस्कीटांचा पुडा घेऊ म्हटलं तर अजिबात थांबला नाही. हिंदी इंग्लिश समजत नाही म्हणे!) सूड उगवल्यासारखा शॉर्टकट म्हणून चेन्नई डंपिंग ग्राऊंडच्या रस्त्यानं घेऊन आला. त्या वासानं मला मळमळू लागलं, आणि सुनिधीला उलटी झाली. चेन्नई म्हणजे मुंबैइ सारखी मेट्रो सिटी हे चित्र कूठेच दिसेना. एरवी तमिळ सिनेमांअधून दिसणारी सुरेख चित्रासारखी चेन्नईदेखील दिसेना. छोट्या छोट्या गल्ल्या, (धारावीची आठवण देणार्‍या), खड्डेमय रस्ते यातून बाहेर एकदम हायवेलाच लागलो आणि आता हे डंपिंग ग्राऊंड.. आपल्याला जर चेन्नईमध्ये फिरायचं  झालं तर रोज या रस्त्यानं यावं जावं लागणार...


मंगळूर सोडून चेन्नईमध्ये गेलो तर मला नोकरी करता येईल. इथं माझ्या क्षेत्रासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत  वगैरे वगैरे सर्व काही धुरळयत उडून गेलं. रोज तीन ते चार तासाचा हा प्रवास (कारमधून अडीच तास, पब्लिक ट्रान्स्पोर्टने त्याहून जास्त) झेपेल का? वगैरे विचार येऊ लागले. “तुला टूव्हीलर घेऊन फिरता येईल गं” आमचे मनकवडे पतीराज म्हणाले.


आणि... मग सुरू झाला आमचा जगप्रसिद्ध एन्नोर पोर्टचा हायवे. हे भलेमोठे वीस चाकी वगैरे कंटेनर्स. शुरू कहंपे होते है और खत्म कहांपे पताही नही चलता टाईप्स. दोन तीन दिवस इथ्लं कंटेनर्सच ट्राफिक अडलेलं असतं. त्याच्या मधून अडथळ्यांची शर्यत पार केल्यासारखा कार आणि बाईक्स जातयेत असतात. इथं मी टूव्हीलर चालवणं म्हणजे अवतार समाप्तीची घोषणाच.


अजून त्या  ट्रकवाल्याचा फोन लागत नव्हता. सामानाचं काय... किंमत किती असेल ती असो, पण घराचं प्रत्येक सामान होतं त्यामध्ये. टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन, ओव्हन, कपाट, कपडॆ, बेड, अंथरूणं, लेकीची खेळणी... भांडी, बादल्या, मग, देवघर, ढीगभर पुस्तकं आणि काय नी काय... परक्या गावात येऊन सामान हरवलं अस्तं तर आमची काय अवस्था होइल...

नवर्‍याचं टेन्शन हळूहळू वाढत होतं. मी खिडकीतून बाहेर बघून अजूनच हताश होत होते, लेकरू उलट्यांनी वैतागलं होतं. शेवटी येऊन पोचलो एकदाचे मनाली न्यु टाऊनला. घरमालकांनी ओळखीच्या एकांकडे चावी देऊन ठेवली होती. सुदैवानं त्या नवरा बायकोला उत्तम इंग्लिश येत होतं. त्यामुळे व्यवस्थित बोलता आलं. कॉफी घेता घेता ट्रकवाल्याला फोन करणं चालूच होतं. अखेरीस त्यानं फोन उचलला आणि म्हणाला “रंड निमिष्गं वरो” दोन मिटांत काही आला नाही पण दहा मिनिटांनी मात्र आमच्या सामानाचा ट्रक आला आणि आम्ही चावी घेऊन आमच्या नवीन घराकडे निघालो. एव्हाना सहा वाजून गेले होते. हुश्श म्हणतच होतो तितक्यात....

... धो धो पाऊस चालू झाला. दारात सामानाचा ट्रक उभा. त्यातले तमिळ हमाल काय बोलतात ते कळत नाही. चावीनं दार उघडलं तर गुडुप्प अंधार (आमच्याकडे पाऊस आला की लोकं छत्री उघडत नाहीत, टी एन ई बी वाले लाईट मात्र काढतात) इतकावेळ कुठंतरी निवांत झोपलेल्या त्या ट्रकवाल्याला आता सामान उतरवायची काय घाई लागली होती कुणास ठाऊक. घरामध्ये आम्हाला काहीच दिसेना. घरमालकानं पेंट काढून घेतला होता, त्याचा वास अख्ख्या घरात कोंडलेला, आणि पेंटींगचं काम झाल्यावर घर झाडून वगैरे घ्यायचं असतं हे पेंटर लोकं विसरली होती बहुतेक. पायाला सगळा चिखल लागत होता. फरशी कुठल्या रंगांची ते ही समजलं नसतं. इतकी घरात घाण होती. पटकन एक झाडू मारून घ्यावा म्हटलं तर तेही होइना. भरीसभर हमालांनी बदाबदा सामान आणून फेकायला सुरूवात केली. पुस्तकांचा एक खोका आणि गादी कशी काय पण चप्प भिजलेली होती.

गॅस चालूच नव्हता, इंडक्शन होता, पण लाईट नव्हते.
घरभर सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. झोपायची गादी भिजली होती. बेड अजून जोडायचा होता.
मद्रासमध्ये रहायचं म्हणून जी काय चित्रं रंगवली होती ती आतापर्यंत सर्व पुसली गेली होती. हे आणि असं होइल अजिबात वाटलं नव्हतं. बाहेर पाऊस अजून धडाधडा कोसळतच होता. प्रचंड भूक लागली होती, पण खायला केवळ कोरडा खाऊ होता. ज्यांच्याकडे चावी दिली होती ती बाई संध्याकाळी म्हणाली होती की रात्री मी जेवण आणून देईन. साडेनऊ वाजता तिचा फोन आला की आम्ही बाहेर कुणाच्यातरी बर्थडेला आलोय, इथंच उशीर होइल. आम्हाला घरी यायला अकरा वाजतील. म्हणजे तात्पर्य रात्रीच्या जेवणाची सोय तुम्हीच करा. आधीच सांगितलं असतं तर सतिश बाहेर जाऊन हॉटेलातून काही घेऊन आला असता.



काल सकाळी पॅकिंगच्या कामापासून मी आणि सतिश दोघंही दमलो होत. सोबत सुनिधी होतीच. रात्रभर आणि दिवसभर प्रवास. खाण्यापिण्याचे हाल. आता बाहेरून जेवण आणावं तरी शक्य नाही. लाईट नाहीत. बाहेर पाऊस. अनोळखी गाव आणि भाषा माहित नाही.

सुनिधीसाठी मिल्क पावडरचं दूध बनवलं त्यात बिस्कीट कालवून खाऊ घातलं. भुकेजलेलं लेकरू तेवढं खाऊन लगेच झोपलं पण!

आम्ही प्लेटभर सुका चिवडा आणि लाडू इतकंच डिनर करायचं ठरवलं....  
देवाक काळजी!!


(क्रमश: ) 

No comments:

Post a Comment