Monday 9 December 2013

समुद्र किनारा (भाग १०)

वीर कपूर चालत चालत कंपाऊंडच्या बाहेर आला आणि अचानक थांबला. पायातले बूट काढून त्याने कंपाऊंडच्या आत फ़ेकले आणि उघड्या पायांनी तो वाळूतून चालायला लागला. सकाळचे साडेसहापण अजून वाजले नव्हते, पण बर्‍यापैकी उजाडलेले होते. समोरचा समुद्र अजून आळसावल्यासारखाच होता. इतक्या पहाटे या प्रायव्हेट बीचवर अजून कुणीही नव्हतं, त्याच्याशिवाय. तो दूरवर वाळूमधेच बसला होता. वीर चालत चालत त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
“हॅलो, मिस्टर नदीम शेख. हीअर वी मीट अगेन” वीर म्हणाला.
त्याने मान वळवून वर पाहिलं आणि तो हसला.. “वीर. शादी मुबारक!” तो बसल्याजागीच म्हणाला.
“आल्याबद्दल धन्यवाद.” वीर म्हणाला. बोलताना “बस ना,” तो म्हणाला पण वीरची नजर त्याच्या हातातल्या सिगरेटवर होती. “स्मोकिंग?” वीरने उभं राहूनच विचारलं.
“आजची लास्ट!”
“यु आर इम्पॉसिबल!! मुद्दाम करतोस का तू हे सगळं. तुला माहित आहे आज माझं.....”
“आज तुझं लग्न आहे ही एकच गोष्ट मला माहित आहे वीर. आणि म्हणूनच या लग्नाच्या आधी मला तुला भेटायचं होतं!”
“कशासाठी? झाली तेवढी कॉम्प्लिकेशन्स बास नाही का झाली तुला? अजून काय हवंय? सुखाने जगू देत ना आम्हा दोघांना” वीर वैतागून म्हणाला. “आय ऍम सॉरी.. चुकून बोललो मी..”
“त्यासाठीच तर आज मी इथे आलोय. तुम्हाला दोघांना सुखाने जगता यावं म्हणून.”
वीर त्याच्या बाजूला वाळूत बसकण मारत बसला.
“मी इथे आलोय हे सरस्वतीला सांगितलं नाहीस ना?” त्याने विचारलं.
“तूच मला ऑर्डर केली होतीस. नको सांगूस म्हणून. पण मला माहित आहे, ती कालपर्यंत तुझा फोन ट्राय करत होती. तुझा नंबर लागला नाही म्हणून तुझ्या घरी पण फोन केला होता तिने... पण तू इथे आलास ते तिला का नाही सांगायचं?”

तो फ़क्त हसला. “माय फोन इज डेड, अनलाईक मी. मी इथे आलो होतो आणि तुला भेटलो होतो हे तिला कधीच सांगू नकोस. आणि आता यापुढे तुमच्या दोघांच्या आयुष्यामधे मी परत येणार नाही.”
“असं दर वेळेला म्हण तू. दरवेळेला. जर तुला माहिती होतं की आज आमचं लग्न आहे, तर मग....”
“तरी मी तुला का सांगितलं की मी इथे येणारच म्हणून? तू नको म्हणत असताना सुद्धा, मुद्दाम फ़क्त तुला भेटायला म्हणून मी का इथे आलो? का मी परत परत तुझ्या आणि सरस्वतीच्या आयुष्यामधे येऊन विष घालतो आहे... का मी एकदाचा मरून जात नाही? हेच सगळं म्हणायचं आहे ना तुला?”
“नदीम, प्लीज... तुला मी इथे येऊ नको म्हटलं नाही... कालपण तुझा मेसेज आल्यावर तुला ये असाच रीप्लाय केला होता. तुझ्यामधे आणि सारामधे असलेलं नातं मला चांगलंच माहित आहे... साराच्या बोलण्यामधे तिच्या साहिलचं नाव नसेल असं एकही वाक्य नसतं.. आजही ती तुझ्यावर तितकंच प्रेम करते जितकं तू तिच्यावर!”
“पण त्या प्रेमाला काहीही भविष्य नाही”

वीर हसला, “असं म्हणत म्हणत तीन वर्षं गेली, नदीम.”
“….. तोच तर प्रॉब्लेम झालाय ना. हरामखोर त्या हॉस्पिटलवर केस ठोकणार आहे मी. आधी सांगतात सहा महिने... आणि अजून मी जगतोय त्याचं काय?”
“तू नंतरचा इतका विचार करतोस की आजचं जगणं विसरून गेलास”
“जगणं? म्हणजे नक्की काय असतं रे वीर? जन्माला आलो ते हार्टमधे काहीतरी सॉलिड प्रॉब्लेम घेऊन. नंतर काय सर्जरी वगैरे झाली तरी डॉक्टर म्हणाले फ़ार तर वीस-पंचवीस वर्षं जगेल हा. आणि म्हणून ती सगळी वर्षं नुसती अशीच गेली. अम्मीअब्बाच्या चिंतेमधे, काळजीमधे.. रात्र रात्र अम्मी जागायची, नमाझ पढायची, कशासाठी तर पोरगा वाचावा म्हणून. एवढी वर्षं सगळी न जगल्यासारखी. वीर, तुला आठवतं, शाळेत असताना तू सगळ्या स्पोर्ट्समधे कायम असायचाच, आणि मी मात्र कधीच नाही. जास्त धावलं की मला दम लागायचा म्हणून अब्बांनी शाळेला पत्रच देऊन ठेवलं होतं स्पोर्ट्सबद्दल...”
“आणि त्या मूर्खांनी ते इतकं सीरीयसली घेतलं की तुला त्या वर्षी चेसमधे पण खेळू दिलं नव्हतं” त्या आठवणीने वीरला हसू आलं.
नदीम पण हसला. “स्कूलचे दिवस माझ्यासाठी बेस्ट होते. कारण आधी कितीतरी वर्षं मला अम्मीने घराबाहेर सोडलंच नव्हतं कधी. सतत घरामधे. बाहेर गेला की आजारी पडेल म्हणून. म्हणून होम स्कूलिंग. पाचवीनंतर कुठे मला स्कूल कसलं ते बघायला मिळालं. असाच तर प्रत्येक दिवस जात होता वीर, मला अजून जगवण्यासाठी अम्मी अब्बा रोज झगडत होते. पैशाला कमी नव्हती, दुआंना कमी नव्हती, कमी होती ती माझ्या नशीबात. कधी कधी असं वाटायचं हे सगळं कशासाठी? आपण आज ना उद्या मरणार.. मरायचं आहे तर आपण आपल्या टर्म्सवर का नाही मरायचं. पण ते आमच्यात मान्य नाही.. हराम आहे! म्हणजे आला दिवस जगायलाच हवा. कसा का होइना, पण कधीकधी फ़ार विचित्र घडतं रे. मुंबईमधल्या पोल्युशनचा मला त्रास होतो असं वाटलं म्हणून अम्मी मला घेऊन तिच्या गावी गेली होती. अख्खा महिनाभर. असंच काही कामधाम नव्हतंच मला तिथे. अब्बांनी तर मला कॉलेजला पाठवायचंच नाही असं आधीच ठरवलं होतं. फ़ार वेळ जात नसेल तर म्हणाले कुठल्याही ऑफ़िसमधे येऊन बसत जा. घरचेच दोन तीन न्युजपेपर, आणि वर नवीन चॅनल चालू केलं होतं तेव्हा. तसंही घरामधे कुणी मला काही बोलणारं नव्हतंच. मी काम करावं वगैरे कुणाचं काही म्हणणं नव्हतं. पण मला ते करायचं पण नव्हतं. तेव्हा गावामधे असंच दुपारचं फ़िरत असताना मला ती दिसली. एका झाडाखाली बसलेली, आपल्याच विश्वात रंगलेली. पुस्तक वाचण्यामधे हरवलेली. सरस्वती. आयुष्यातले काही क्षण असे असतात की वाटतं याच क्षणासाठी तर आपण इतके दिवस जगत होतो.. माझ्यासाठी तो क्षण होता, वीर. मी तिला कितीतरी वेळ नुसता बघत होतो. डोळ्यांमधे साठवून घेत होतो. कुणाच्या प्रेमात पडण्याची, कुणासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्नं रंगवण्याइतका खुळा तेव्हा नव्हतोच, सहा महिन्यांपूर्वी चेकप केलं होतं. सगळं नॉर्मल होतं, पण लाईफ़चं घड्याळ टिक टिक करत चाललंच होतं. तिच्याशी थांबून बोलणं म्हणजे आपलाच पाय खोलात घालणं हे पटत होतं, कळत होतं. पण वळत नव्हतं. नाही राहवलं मला. मी तिच्याकडे बघत बसलो आणि प्रेमात पडत गेलो. तिच्याकडून कसलीच अपेक्षा न ठेवता. तरीही त्यादिवशी तिच्यासोबत बोललो. बोलताना जाणवलं, ती पण आपल्या प्रेमात पडत आहे...पण तिने तोपर्यंत तिने एवढं सोसलं होतं की रस्त्याने जाणार्‍या कुणीही तिच्याशी दोन ओळी नीट बोललं असतं तरी त्याच्या प्रेमात पडली असती... पण नशीब माझंच फ़ाटकं. तेव्हा गावी असताना रोज तिला भेटायचो. मैत्री झाली, माझ्या भावना मी कधीच लपवल्या नाहीत. तिच्या भावना तिने कधीच सांगितल्या नाहीत... आणि गंमत माहीतीये, तिला मी तिच्या आयुष्यामधे मान्य होतो, पण माझा धर्म मान्य नव्हता. माझ्या नावामुळे तिच्या जुन्या आठवणींचे डंख तिला डसायचे, म्हणून तिने तिच्यापुरता मार्ग शोधून काढला, माझं नावच बदलून तिने स्वत:च्याच मनाची समजूत घातली, पण तिच्या मनातली खळबळ मला समजत होती. पण कुठल्या तोंडाने मी तिला कमिटमेंट देणार होतो? कसं तिला सांगणार होतो की धर माझा हात. मी तुला आयुष्यभर सांभाळेन, इथे माझ्याच दुसर्‍या दिवसाचा मला भरवसा नव्हता. पण कसं ते माहित नाही, त्या लढाईमधे माझ्याच प्रेमाचा विजय झाला. तिला घेऊन इथे मुंबईला आलो. माझ्या घरातला प्रत्येक जण तिला बघून खुश होता. ती स्व्त: इथे त्याहून जास्त खुश होती. तिला तिच्या मनाप्रमाणे तिला इथे जगता येत होतं. अब्बांनी सांगूनसुद्धा ती आमच्या पेपरमधे कामाला आली नाही. आधी स्ट्रगल केला, जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा कुणालाही आमच्या दोघांबद्दल न सांगताच. जगातलं प्रत्येक सुख तिच्या पायाशी टाकण्याइतका श्रीमंत होतो, पण जेव्हा... जेव्हा...” बोलता बोलता तो अचानक थांबला. “.. जेव्हा मला ऍटॅक आला, आणि डॉक्टर म्हणाले, ऑलमोस्ट ओव्हर.. तेव्हा मात्र धीर खचला. मी सरस्वतीला सोडून जाणार ही कल्पनाच मला असह्य झाली... आणि त्यानंतर थोडे दिवस तिच्यापासून लांब राहिलो, एकदाचं मी तिला आमचं नातं संपलं म्हणून सांगून घराबाहेर पडलो. तिला माझ्याशिवाय जगणं भाग होतं. तिने जगण्यासाठी मी दूर जाणं आवश्यक होतं.. मी तीळ तीळ मरत असताना तिच्या डोळ्यांत स्वत:ला कधीच बघू शकलो नसतो..”
“त्याच रात्री तू माझ्या घरी आला होतास...” वीर म्हणाला.
“हो. कुठे जाऊ काय करू समजत नव्हतं! घरी गेलो असतो तर अम्मी-अब्बांनी सरस्वतीला खरं काय तेच जाऊन सांगितलं असतं. पार गोंधळून गेलो होतो. कुणाचाच काही आधार नव्हता... आजूबाजूला इतकी माणसं असतानासुद्धा एकटा पडलो होतो....”
“नदीम...” वीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. “मी तेव्हाही तुझा मित्र होतो, आजही आहे. तेव्हाच जर मी....”
“काय करणार होतास? माझा आजार तुला माहित होता. सरस्वतीबद्दल तुला सगळं सांगितलं होतं मी....”
“नदीम, खूप आधी, जेव्हा सारा नवीन होती इथे, तेव्हा एका पार्टीमधे तिला भेटलो होतो, तिने मला नाव सांगितलं... सरस्वती केळकर, ऍन्ड आय अल्मोस्ट आस्क्ड हर, तू नदीमची गर्लफ़्रेन्ड ना? पण नाही विचारलं ते एका अर्थाने बरंच झालं... नंतर राजनला सांगून तिला आमच्या टीममधे बोलावलं. तुझ्याशी बोलताना मला असं वाटायचं की ही सरस्वती मला खूप ओळखीची वाटते. माझ्यासारखीच तर आहे ती. मला बापाने सोडलं, तिला आईने. दोघांनाही सतत स्वत:ला खूप प्रूव्ह करत राहण्याची जिद्द आहे. माझ्या लाईफ़मधे रसिका पिलर होती, आणी सरस्वतीच्या लाईफ़मधे तू.... तू जेव्हा तिच्याबद्दल माझ्याशी बोलत रहायचास तेव्हापासून...”
“तेव्हापासून तू पण तिच्या प्रेमात पडत होतास, मला माहिती होतं, ट्रीटमेंटसाठी युकेला गेल्यावर माझ्याकडे फ़ार कमी ऑप्शन्स होते, मी त्यातला सगळ्यांत सोपा ऑप्शन निवडला, मरायच्या आधीच सरस्वतीला मी मेल्याचं खोटं सांगितलं. वाटलं, ती रडेल. दोन तीन दिवस, कदाचित आठवडाभर. आणि मला विसरेल. मुंबईला आल्यावर माझा आजार तिला समजला होता. हे होणार हे तिला माहितच होतं....”
“तरीपण... मी तेव्हाही तुला म्हटलं होतं नदीम. आपण फ़िल्मची स्क्रीप्ट नाही लिहत रीअल लाईफ़मधे. तुझी सरस्वती मरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली.... तुझे सगळे अंदाज चुकले साफ़. सरस्वती एक दोन दिवस रडून मग तिच्या साहिलला विसरणार नव्हतीच....”
“आणि तेव्हा तू तिच्या आयुष्यात आलास.... माझ्या मैत्रीखातर की तिच्याखातर... ते मला माहित नाही”
“दोन्ही चूक. सारा माझ्या आयुष्यात आली तीच मुळी माझ्यासाठी. साराने माझ्या आयुष्याला एक वेगळंच परिमाण दिलं. तिचं तिच्या साहिलवर प्रेम होतं, आजही आहे आणि उद्यापण राहिल. साराच्या मनामधे तुझी जागा कधीच मिळवू शकणार नाही. ती कायम स्वत:ला समजावत राहते, की माझ्यावर तिचं साहिलपेक्षा जास्त प्रेम आहे. पण तिच्या डोळ्यांत मला खरं काय ते दिसतं, तिच्या स्पर्शात ते जाणवत राहतं. ती माझ्यावर प्रेम करत नाही. मी तिचा कधीच नाही. कधीच.. मग स्वत:वरच चिडतो मी. मलाच प्रश्न पडतो... का मी या मुलीवर इतकं प्रेम करतो... तिच्या मनामधे तर दुसरंच कुणीतरी आहे. माझ्याशिवाय दुसरंच कुणीतरी... मग मला आठवतं त्या दुसर्‍या कुणालातरी.... तुला.... तिच्या आयुष्यातून बाजूला सारून तर मी तिच्या प्रेमात पडलोय. तुझा खूप राग येतो मग नदीम... खूप राग. मग तेवढाच राग साराचा पण येतो.. आणि सर्वात शेवटी स्वत:चा राग येतो.. कशाला आपण एवढं हिच्यावर प्रेम करतो..... कशासाठी?”
“वीर, प्रेम कोण कुणावर कशासाठी करतं हे जर माहित असतं तर लाईफ़ इतकं कठिण झालं असतं का रे? सगळी इक्वेशन्सच सोपी झाली असती ना...”
वीर यावर काहीच बोलला नाही. दूरवर उठणार्‍या समुद्राच्या लाटा बघत राहिला. कितीतरी दिवसांनी तो आणि नदीम असे भेटत होते. याआधी नदीम मुंबईत आलाय हे समजलं तरी वीर पेटून उठायचा, सारा कदाचित त्याच्या आयुष्यातून निघून जाईल, या एकाच भावनेने. पण आज सारा आणि तो लग्नाच्या गाठीमधे गुंतत असतानादेखील आलेला नदीम पाहून वीर चिडला नव्हता. कदाचित या सगळ्यांमधे सर्वात जास्त अन्याय त्याच्यावरच झाला होता म्हणून असेल. समोर बसलेला नदीम गेल्या चार महिन्यांमधे अजूनच थकलेला दिसत होता. त्याच्या वडलांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला तरी होणारी गोष्ट अटळ होतीच...
नदीमने हातातल्या घड्याळात पाहिलं.
“आठ वाजता राजन माझ्या कॉटेजवर येईल. मी तिथे नसलो तर तो शोधत इकडे नक्कीच येईल” वीर म्हणाला.
“आणि मला इथे बघून लगेच पॅनिक होइल.. घाबरू नकोस, मी तेवढा वेळ थांबणार नाही. तुझ्या लग्नाचा मुहूर्त एवढा महत्त्वाचा नाही, जितका माझ्यासाठी इथून जाण्याची वेळ आहे.” बोलता बोलता नदीमने अजून एक सिगरेट पेटवली
.
“मघाशी आजची लास्ट म्हणाला होतास ना?.."

“कमॉन, आजचा दिवसच लास्ट आहे माझा. काय बेक्कार लाईफ़ आहे रे माझं. मनासारखं व्यसन पण करता येत नाही. असं तुकड्यातुकड्यातून जगताना खरंच वैतागून गेलोय.”
वीरने त्याच्या हातातली सिगरेट घेतली आणि वाळून विझवली. “नदीम, एकदा भेट साराला. लग्नाआधी भेट. पुन्हा एकदा दोघंही विचार करा. तू निघून जाणं एवढाच रस्ता असू शकत नाही...”
यावेळी नदीम हसला. “आणि तुझं काय वीर? समजा, मी आणि सरस्वतीने लग्न करायचं ठरवलं तर तुझं काय होणार?”
वीरला काहीही उत्तर सुचलं नाही. “या कथेचा दुसरा कुठला शेवट असूच शकत नाही. वीर आणि सरस्वती. हे असं ऐन मोक्याचय वेळी नवरा नाहीतर नवरी बदलणं पिक्चरमधेच शोभून दिसतं.”
“मग आता नेक्स्ट काय?” वीरने विचारलं.

“सिंपल. तू इथून उठशील, मागे फ़िरशील आणि कॉटेजकडे चालत जाशील. फ़क्त एक प्रॉमिस करून. एकदाही मागे वळून पहायचं नाही...”
“आणि तू?”
“मी? मी पण सेम... इथून उठणार आणि सरळ चालत जाणार... मागे वळून न बघता...”
“वेडा आहेस का तू? आत्ता तर म्हणालास की आत्महत्या अलाऊड नाही तुमच्यामधे म्हणून.... आणी मग सरळ तू समुद्रामधे”
नदीम हसला. “येस, वीर. आता वेळ आली आहे साहिलने किनारा सोडायची. मी आत्महत्या करत नाहीये. मी फ़क्त चालत पाण्यात जातोय..”
“बट यु डोन्ट नो स्विमिंग, आणि तुझी कंडिशन.... नदीम... प्लीज! असला काही वेडेपणा करू नकोस.”
“वेडेपणा? हाऊ मेनी टाईम्स यु विश्ड? मी मरून का जात नाही असं कितीवेळेला वाटलं तुला? मग आज तुझी ती दुआ खरंच घड्तेय”

“नदीम. नो!” वीर ओरडला, “माझ्यामधे आणि सारामधे तू कितीही असलास, तरी मी तुला असं करू देणार नाही. हात जोडतो वाटलं तर आज माझं लग्न आहे आणि आज तू...”
“डोन्ट वरी, वीर. म्हणून तर मी घड्याळ बघतोय, करंटचा टाईम चेंज होइल, मी इथे सापडणार नाही. बॉडी किमान शंभरेक किमी तरी वाहील. दोन तीन दिवसांनी सापडेल. आय होप तोपर्यंत ईझीली ओळखू येणार नाही मी... तेव्हा सरस्वतीला तू सांगू शकशील. आज आता काहीच बोलायची गरज नाही तुला.”
“तुला मी इतका वाईट आणि दगडाच्या काळजाचा वाटलो का? तू इथे मरणाच्या गोष्टी करत असताना मी तिथे आनंदात लग्न लावून घेईन? आता ताबडतोब साराला इथे फोन करून बोलावतो. हा प्रश्न फ़क्त तुझ्या आणि माझ्या आयुष्याचा नाही, तिच्यापण आहे. तिलाच याचा डीसीजन घेऊ देत” वीरने खिशामधला मोबाईल काढला, नदीमने तो फोन लगेच हिसकावून घेतला.
“वेड मला नाही तुला लागलंय. काय बोलतोस तुला तरी समजतंय. सरस्वतीला इथे बोलावून तुला तुझ्याच आयुष्यात माती कालवायची आहे का? माझी लास्ट सर्जरी फ़ेल गेलीये. तसंही माझ्याकडे जास्त दिवस नाहीत...”
“मग जेव्हढे दिवस आहेत तेवढे.... आज आता या मरायच्या गोष्टी कशाला? असं करून तुला काहीही मिळणार नाहीच... कारण तू गेल्यावरपण सारा तुझ्यावरच प्रेम करत राहणार. तुझ्याच आठवणीत जगत राहणार.. मग काय फ़ायदा आहे?”
“क्लोजर वीर क्लोजर. तुला एक क्लोजर मिळेल. मी आता या जगात नाही, सरस्वतीला तुझ्यापासून दूर घेऊन जाणारं कुणीही या जगात नाही, याचं तुला क्लोजर मिळेल.”
“मला नकोच आहे. आज सारा माझ्यासोबत जशी आहे, तेवढ्यात मी खुश आहे. तू या जगात असल्याने अथवा नसल्याने तिच्या मनामधे असलेल्या तुझ्या प्रेमामधे अथवा माझ्या प्रेमामधे काहीच फ़रक पडत नाही”
“तुला पडत नसेल, पण मला पडतोय. एनीवेज, तुला प्रत्येक गोष्ट समजावत बसण्याइतका वेळ माझ्याकडे नाही. तुला पण लग्नासाठी रेडी व्हायचं आहे ना... यु गो, ऍन्ड लेट मी गो...”
“नदीम, नाही. माझं मन मला असलं काम कधीच करू देणार नाही... तू माझ्यासोबत आता चल, आपण शांतपणे एकदा बसून बोलू या... विचार करू या”
“त्यासाठीच तर तुला इथे बोलावलं होतं ना मी वीर? तुझ्याशी बोलायचं होतं, तुला भेटायचं होतं...”
“साराला?”
“तिला भेटलो तर मरायचा निश्चय परत डळमळेल माझा.”
“मी तुला मरू देत नाहीये नदीम. विसरलास का? आय ऍम युनि चॅम्पियन इन स्विमिंग. तुला समुद्रामधून बाहेर खेचत आणण्याइतका नक्कीच....”
“ते माहित आहे वीर. पण प्रश्न असा आहे की कशासाठी? कशासाठी तू मला वाचवणार? वाचवून तरी काय होइल?”
“आणि तू मरून तरी काय होइल? आज ना उद्या साराला खरं काय ते समजेल. आणि एका सेकंदासाठी तरी तुला असं वाटतं की ती मला माफ़ करेल?”
“मी तिच्यासाठी एक लेटर लिहून ठेवलंय. योग्य वेळी तिच्याकडे पोचतं केलं जाईल. शिवाय कंपनीमधले माझे शेअर्स पण तिच्या नावावर केलेत. खरं काय ते समजल्यावर ती कदाचित मला माफ़ करणार नाही, पण तुला करेल”
“नदीम, माझा फोन दे. लेट मी कॉल समवन. तू असला अघोरीपणा करू नकोस.”

“तुला साराची शपथ आहे वीर. तुझ्या साराची. एक पाऊलपण आता पुढे येऊ नकोस.” नदीम मागे सरकत म्हणाला. अचानक त्याने खिशातली गन काढली. “पुढे आलास तर बघ..”
“नदीम थांब प्लीज...”
“नाही वीर. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या आणि सरस्वतीच्या नात्यामधे कायम दरी राहणार. मला जाऊ देत, फ़क्त जाताना मला एक वचन दे की, तू माझ्या सरस्वतीला कधीही अंतर देणार नाहीस”
वीर पुढे येत म्हणाला, “नदीम, आता हा मूर्खपणा बास. माझा फोन दे. मी सरस्वतीला कधीही अंतर देणार नाही, पण म्हणून तुला मरू पण देणार नाही, प्लीज ऐक जरा माझं.” आता वीर खरोखर घाबरला होता. समुद्राच्या लाटा नदीमच्या पायापर्यंत पोचल्या होत्या. मागे वळून साराला अथवा राजनला जाऊन बोलावणं शक्य नव्हतं, वीरचा फोन नदीमने पाण्यात फ़ेकला होता, आणि पुढे जाऊन नदीमला धरणं शक्य नव्हतं. नदीम चांगला शूटर होता, त्याचा नेम सहजासहजी चुकला नसता.
काय करावं ते वीरला सुचेना. त्याने दूरवर आजूबाजूला पाहिलं. प्रायव्हेट बीच असल्याने त्या दोघांखेरीज कुणीही नव्हतं. देव करो आणि मला शोधायला म्हणून राजन अथवा कुणीतरी लगेच येऊ देत, वीर मनातच म्हणाला.
“मला मरायची भिती नाही, वीर. मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. ही गन मी उगाच आणली नाही. तू मला विरोध करशील याची कल्पना होती. फ़िजिकली तू मला आतापण खेचत घेऊन जाशील हे माहित आहे.. पण मी ही गन चालवणारच नाही असा तुझा समज असेल तर तो खोटा आहे... कारण, मला माझ्या मरण्यापेक्षा तुझं जगणं महत्त्वाचं वाटत नाहीये सध्या.”
“यु आर जस्ट रॅम्बलिंग. तू माझ्यासाठी नाही पण सारासाठी तरी...”
“नो, यु आर रॉंग. एक पाऊल जरी पुढे आलास तरी मी गोळी चालवेन... आय विल शूट ऑन युअर नीकॅप. मग समोर पडून माझं मरण तुला बघायला लागेल”” नदीमच्या डोळ्यातला थंडपणा वीरला जाणवला. “आत्ताच मागे फ़िर, आणि तुझ्या कॉटेजमधे जा. मागे वळून पाहू नकोस. माझी शेवटची रीक्वेस्ट आहे. करंटच्या टायमिंगमधे फ़रक पडला तर बॉडी इथेच मिळेल माझी. चालेल का?”
“नदीम...” वीरने परत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. पण नदीम अजून पाठी पाण्यात जात होता, आता त्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं होतं.
वीर सावकाश मागे वळला. आता मागे फ़िरण्याव्यतीरीक्त त्याला दुसरा काहीही पर्याय दिसत नव्हता,
कॉटेजपर्यंत जाऊन मदत बोलावणे किंवा नदीम पाण्यात बुडायला लागल्यावर मागे धावत जाऊन त्याला वाचवायचा प्रयत्न करणे हे शक्य होतं. वीर मनातल्या मनात नदीम समुद्राच्या खार्‍या पाण्यात किती वेळ टिकू शकेल याचं गणित करत होता.

“साहिल आता त्याच्या समुद्राकडे कायमचा चाललाय, वीर. आता मला वाचवू नकोस” नदीमचा आवाज आला. “सरस्वतीला सांग, मी कायम तिच्यावर खूप प्रेम केलंय. तिच्याशिवाय जगणं शक्य नव्हतं आणि तिच्यासमोर मरणं शक्य नव्हतं..”
नदीमचा आवाज थांबला. वीर जागच्या जागी थबकला. “चालत रहा वीर, आय कॅन स्टिल शूट यु. मागे पाहू नकोस.” परत नदीमचा आवाज आला. वीर दोन पावलं पुढे चालला. त्याच्या मनामधे एक वेगळीच लढाई चालू होती. साहिलने मरावं ही तुझी खूप दिवसापासूनची इच्छा होतीच की, तो स्वत:शीच म्हणाला, मग आता का घाबरतोस? तो मृत्यू तुझ्या डोळ्यासमोर होतोय म्हणून? की आजवर तू कुणाचा मृत्यू पाहिलाच नाहीस म्हणून?
हे असं वागून नदीमने काय मिळवलं असेल.... कदाचित माझ्या मनामधे आयुष्यभराचा गिल्ट? इतके दिवस सारा आणि साहिलच्या प्रेमामधे आपण मधे आलो याची भावना होती, सारा परत कधीतरी साहिलकडे परत जाईल याची असुरक्षितता होती.. आणि आता? सारा फ़क्त माझीच होईल अशी भाबडी अपेक्षा आपण करतोय? जे आपलं कधी नव्हतंच त्याला आपलंच मानून चालण्याचा हा आपला वेगळा अट्टहास!
वीर चालत असताना परत थांबला. नदीमचा आवाज आला नाही, आपण कितीवेळ चालतोय? कॉटेजच्या अगदी जवळ पोचला होता. गर्र्कन त्याने मागे वळून पाहिलं. समोरचा समुद्र शांत हेलकावे खात होता. अगदी शांतपणे. कदाचित त्याला खूप उशीर झाला होता, किंवा कदाचित त्याला हा उशीर हवा होता.
पण मागे वळताच वीर ओरडला आणि जीवाच्या आकांताने त्या समुद्राकडे धावत सुटला. साहिलला जगवण्यासाठी किंवा.....
(समाप्त)

No comments:

Post a Comment