Wednesday, 18 January 2017

रहे ना रहे हम (भाग २३)

तो आणि मी एकत्र राहिला लागलोय हे बिल्डिंगमध्ये काही जणांना समजलं. काही जणांनी आडून तर काही जणांनी थेट विचारलं, मी बहुतेक जणांना  “नुकतंच लग्न झालंय, तो  शिपवर असतो, अजून थोड्या दिवसांनी परत जाईल” वगैरे थातुरमातुर उत्तर दिलं.क तर फ्लॅट माझ्या बापाचा होता, त्याला कुणीतरी काहीतरी फोन करून कळवलं असतं तर वेगळेच वांदे. त्यापेक्षा हे कारण सुटसुटीत झालं. आमच्यासमोरचा फ्लॅट कुण्या कुलकर्णींचा होता. तो त्यांनी अजून कुणालातरी भाड्याने दिला होता पण दरवाज्यावर नेमप्लेट कुलकर्णींची असल्याने आम्ही कुलकर्ण्यांचा फ्लॅट असंच म्हणायचो. क्वचित घरात नसताना काही कुरीअर, सोसायटीचं लेटर वगैरे त्यांच्याकडे आलेलं असलं की तेवढ्यापुरतं बोलणं व्हायचं. नवरा बायको आणि दोन मुलं असा छोटासा संसार होता. शांत लोकं होती आणि मुख्य म्हणजे चौकश्या फार करायचे नाहीत. आफताबबद्दल पण त्यांनी जास्त काही विचारलं नाही मीच एकदा ओळख करून दिली. बिल्डिंगमध्ये नाव सांगण्यापुरतं मी त्याचं नाव “अजय” केलं होतं. हे त्याला आवडायचं नाही, पण लोकांनी जास्त प्रश्न विचारले तर आमच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं- खासकरून माझ्याकडे! खोटं बोलणं हे खरं बोलून भानगडी वाढवण्यापेक्षा जास्त परवडण्यासारखं होतं.

 या शेजार्‍यांनी डोंबीवलीला स्वत:चा फ्लॅट घेतला आणि ते जूनच्या दरम्यान शाळेची ऍडमिशन तिकडे घेऊन घर सोडून गेले. महिनाभर जेमतेम घर रिकामं राहिलं आणि लगेच नवीन भाडेकरू आले. नवरा बायको आणि कॉलेजमध्ये जाणार्‍या मोठ्या दोन मुली. वन बीएचकेच्या त्या छोट्याश्या फ्लॅटमध्ये हे पाचजण राहणार कसे याची मलाच चिंता. नवरा कंपनीत कामाला होता आणि बायको गारमेंट फॅक्टरीमध्ये टेलरिंग काम करत होती म्हणे. हे लोक आल्यापासून आमच्यासोबत एकही वाक्य बोलले नाहीत. मीच ओळख करून घेण्यासाठी काही विचारलं तर त्या काकी धाडकन दरवाजा बंद करून आत गेल्या. त्या बोलत नाहीत तर तू कशाला आगाऊपणा करतेस असा आहेर मला आमच्याच फ्लॅटमधून तात्काळ मिळाला.  
हे लोक (मला खरंच त्यांचं नाव माहित नाही!) रहायला आल्यानंतर दोनेक आठवडे सुरळीत गेले. मी आणि आफताब एके रात्री झलक दिखला जा बघत डिनर करत होतो तेव्हा अचानक त्यांच्या फ्लॅटमधून जोरात ओरडल्याचे आवाज आले. नवर्‍याने बहुतेक दारू प्यायली असावी. अतिशय घाणेरड्या आवाजात तो बायकोला शिव्या देत होता. थोडावेळ घाणेरड्या शिव्या, बायकोवर संशय घेणारं वगैरे सर्व काही झाल्यावर मात्र चक्क मारल्याचे आवाज येऊ लागले. ती बाई विव्हळायला लागली. पोरी कदाचित घरी नसाव्यात, असल्या तरी काही बोलत नसाव्यात. टीव्हीवरच्या कार्यक्रमाकडे माझे लक्ष लागेना, हातातला घास तसाच फिरत राहिला. आफताब शांतपणे जेवत होता. दोघांनाही तो मारल्याचा आवाज अस्वस्थ करत होता.
मला दारू पिणारे लोक नवीन नाहीत. बाबा अधूनमधून पितो, अझर रोजच पितो, आफताब क्वचित, मी स्वत: क्वचित. मला शिव्या देणारे लोकही नवीन नाहीत. आज्जी माझ्या बाबाला गटार फुटल्यासारखे बोलतो, म्हणून कितींदा ओरडायची. अर्थात बाबाची ही भ आणि झ ची बाराखडी घराबाहेर. घरात नाही. माझ्यासमोर तर बिल्कुल नाही. मी जर अधेमध्ये च्यायला वगैरे काही बोलले तरी बाबा डोळे वटारून बघायचा.
पण मला अजिबात माहित नसलेली गोष्ट म्हणजे बायकोला मारणारी लोकं. माझा बाबा लाख  भानगडबाज असेल, पण इतक्या वर्षांत त्यानं कधी आईवर आवाज चढवलेला मी ऐकला नव्हता, मारणं तर फार दूरच. एखाद्या लहान मुलीला जपावं तसं आईला जपायचा. माळ्यावरून जड सामान तो स्वत: काढायचा, आई भाजी आणायला गेली तर हा पिशव्या उचलायला म्हणून सोबत जायचा, असा माझा बाबा आईवर हात काय उचलेल! माझ्या लहानपणापासून ते आजवर मला ना कधी बाबाने मारलं ना आईने. फार हट्ट केला की आई एखादा फटका द्यायची. कोपर्‍यात उभं करून ठेवायची. पण बाबा चुकूनही नाही. बाबा अहिंसावादी वगैरे अजिबात नव्हता. बाहेर असताना चिकार मारामारी करायचा, पण घरामध्ये नाही. आईसोबत बोलतानापण तो कधी “तुला काय कळतंय? बायकांची ही कामे नव्हीत” वगैरे बोलायचा नाही, असं कुणी स्वत:च्या बायकोला म्हटलं तरी ते त्याला खटकतं. अझर आणि नूरीच्या नात्यामध्ये इतके किचकट प्रॉब्लेम्स होते. पण अझरने तिच्यावर कधी हात उगारला नाही. त्यादिवशी अगदी सहनशक्तीचा कडेलोट होऊन पण त्यानं तिच्यावर हात उगारला नव्हता.

इतके दिवस मी अशी नवरा बायकोला मारतो आणि ती रडते वगैरे पिक्चर सीरीयलमध्ये पाहिलेलं. पण आता घडत असलेला प्रसंग अवघ्या काही फुटांवर होता. समोरच्या फ्लॅटमधून मारल्याचे आणि तोंडात बोळा कोंबून कण्हल्याचे आवाज येतच राहिले. ते आवाज येऊ नयेत म्हणून आफताबने  टीव्हीचा व्हॉल्युम मोठा केला, अर्ध्या तासाने आवाज यायचे थांबले.
पण त्यावर मी आणि आफताब काही बोललो नाही.
मग हे रोजचंच चालू झालं. तो माणूस दारू प्यायचा याबद्दल माझं काही म्हणणं नाही. आपल्या घराच्या चौकटीमध्ये काय वाट्टेल ते करायचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण दारू पिऊन असा दंगा करणं! एकदा तर रात्री दोन वाजता ओरडायचे आवाज ऐकू आले. मला आधी वाटलं की स्वप्नांतच ऐकू येतंय, पण चांगली जाग आल्यावरही आवाज येतच राहिला. बाहेर पाऊस जोरात पडत होता, तरी ओरडल्याचे आवाज येतच होते. लाईट लावून दाराच्या फटीतून पाहिले तर एका मुलीला तो बाप मारत होता, तेपण दार उघडून जिन्यामध्ये! मी आफताबला उठवलं पण तो म्हणे, “आपण काय करू शकतो?” आणि लगेच मुसक घेऊन तो झोपला.
मी दाराआडून ती मारामारी कितीतरी वेळ पाहत राहिले. मुलगी कॉलेजच्या फंक्शनला गेली होती. तिकडून तिला यायला उशीर झाला होता, म्हणून बाप मारत होता. आधी बराच वेळ घरामध्ये तमाशा झाला असावा, पण मग ती मुलगी “मी आता घर सोडून जाते आणि जीव देते” म्हणत बाहेर निघाली आणि जिन्यामध्ये हे प्रकरण चालू झालं.
मी माझ्या मोबाईलवरून शंभर नंबर डायल केला. पोलिस येतील आणि काय ती कारवाई करतील, पण माझा फोन ज्याने कुणी घेतला त्याची एकंदर अवस्था समोरच्या मारकुट्या बेवड्याइतकीच होती. त्याला मी काय बोलतेय ते समजून घ्यायचं नव्हतंच, वर इतक्या रात्री कुणी मुलीनं फोन केलाय हे पाहून अधिकच चेव चढल्यासारखा, “मग आता घरात एकटी आहेस का? पत्ता सांग जरा” असं बरळू लागला. फोन बंद केला, आणि बेडरूममध्ये येऊन दार लावून झोपले. झोप कधी लागली माहित नाही पण सकाळी जाग येईपर्यंत तेव्हा रात्रीचाच प्रकार डोक्यात भिरभिरत होता. सकाळी नेहमीप्रमाणे आईचा फोन आला, “गूड मॉर्निंग”
नेहमीसारखं काय चालूये, कसं चालूये वगैरे थॊडंफार बोलणं झालं. आई मला रोज न चुकता फोन करायची, तिला अजून मी आणि आफताब एकत्र राहत असलेलं माहित नव्हतं. त्यामुले तिला वाटायचं की मी एकटीच आहे, आणि म्हणून तिला माझी काळजी वाटायची. मी बोलता बोलता तिला रात्रीचा प्रसंग सांगितला.
“बाबाला विचार, त्या कुलकर्णींचा काही कॉंटॅक्ट नंबर आहे का?”
“विचारते. त्यांनी पण यतिनसारखाच इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलाय. दुबईला का कुठेतरी असतात. तिकडेच सेटल झालेत. त्यांच्या एजंटचा नंबर असला तर देते.” मग इकडचं तिकडचं बोलून फोन ठेवला.
माझ्या हातात चहाचा कप देत आफताबनं विचारलं “कुलकर्णींचा नंबर कशाला हवा?”
“त्यांना सांगूयाकी. तुला काल रात्री जराही जाग आली नाही. तासभर तमाशा चालू होता. त्या माणसानं मुलीचं डोकं जिन्यावर आपटलं. मी पोलिसांना तेव्हा फोन केला..”
“वेडी आहेस का तू? पोलिसांना कशाला?”
“अरे मग, किती मारामारी चालू होती...”
“त्यात आपला काय संबंध आहे. स्वप्निल? पुन्हा असला आगाऊपणा करू नकोस. आणि कुलकर्णींना किंवा त्यांच्या एजंटला काही सांगायची गरज नाही!”
“आर यु क्रेझी? तो माणूस गेले महिनाभर रोज त्याच्या बायकोला आणि मुलींना मारतोय. मी त्यात काय आगाऊपणा करतेय? मी परवा तुला म्हटलं की, फक्त दार उघड आणि....”
“आणि काय करू? त्याच्या दोन कानाखाली मारू? बेवड्यासोबत हाणामारी हेच करू का? गुंडा आहे का मी?”
“तू विषय भलत्याच ट्रॅकवर नेतोस. आवाज चढवून विचारलं असतं तरी चाललं अस्तं ना. बाबा म्हणतो की, आपल्या बायकांवर हात उगारून मर्दानगी सिद्ध करणारी माणसं प्रत्यक्षात भाडखाऊ असतात.”
“सीरीयसली, इफ यु डॊन्ट नो द मिनिंग, डोन्ट युज द वर्ड!! सेकंड थिंग, मी अस्लं काहीही करणार नाही. तूपण कुणालाही फोन करून काही बोलू नकोस. आपला यात काहीही संबंध नाही”
“आफताब...”
“स्वप्निल, पूर्ण ऐकून घे. कुलकर्णी का जे कोण आहेत त्यांना फोन करून काय सांगशील? समोरचा माणूस दारू पिऊन दंगा घालतो. ते जर विचारायला इकडे आले तर तो काय म्हणेल.. मी माझ्या घरात काय वाट्टेल ते करेन. ही पोरगी कोण मला बोलणारी? विषय वाढलाच तर हेदेखील बाहेर येईल की, तू इथे बिनालग्नाची एका मुलासोबत राहतेस. तेपण माझ्यासोबत. तुला या सर्वांचे परिणाम माहित नाही का?”
“सेम लॉजिक अप्लाईज, मी माझ्या घरात काय वाट्टेल ते करेन. दोन प्रौढ व्यक्ती आहोत आणि आपल्याला कुणाहीसोबत एकत्र रहायचा हक्क आहे. मी काय किंवा तू काय.. आपण कुणाला मारत नाही. फिजिकली हर्ट करत नाही. रात्रीअपरात्री घाणेरड्या शिव्या देऊन बिल्डिंग जागवत नाही. ”
“कुणी जागत नाही. काल तुझ्याशिवाय अख्ख्या बिल्डिंगमध्ये कुणीही उठलं नव्हतं. जरी आपण एकमेकांना मारत नसलो तरीही स्वप्निल, एखाद्या मुलीनं असं बिनालग्नाचं राहणं हे समाजात मान्य होणारी गोष्ट नाही हे तुला चांगलंच माहित आहे.”
“ग्रेट!! नवर्‍याने बायकोला धडाधडा मारलं तरी चालतं. तिच्या आणि स्वत:च्या मुलीच्या प्रायव्हेट पार्ट्सचा वाट्टेल तसा घाणेरडा उल्लेख चारचौघांत करायचा ते या समाजामध्ये चालतं कारण त्यांचं लग्न झालेलं आहे. माझ्याइतक्या वयाच्या मुली असलेला बाप आपल्या लग्नाच्या बायकोवर भलते संशय घेऊ शकतो. पण मी!! बिनालग्नाची तुझ्यासोबत राहू शकत नाही तेच नेमकं समाजाला खटकतं. ”
“रॉंग. तू आणि मी तर लग्न करूनही या समाजामध्ये सुखाने ताठ मानेने राहू शकत नाही. समाजाला खटकण्यासाठी आपल्या नात्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. तुझी आणि माझी केस फार कॉम्प्लेक्स आहे. आपली आर्थिक स्थिती वेगळी, धर्म वेगळे. माझ्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुझ्यासाठी चिक्कार आहेत..... तेव्हा माझं ऐक. जास्त डोकं घालू नकोस. तो माणूस जे वागतो ते चुकीचं आहे हे मलाही माहित आहे. पण आपण यामध्ये काही करू शकत नाही. चहा गार झाला. संपव. ऑफिसला जायचं नाही का?” तो उठत म्हणाला.
“ती बाई अशा नवर्‍यासोबत का राहत असेल? ती स्वत: कमावती आहे. का सोडून देत नाही?”
“तो चर्चेचा वेगळाच विषय आहे. नवरा सोडून आलेल्या बाईला समाजात काही किंमत नाही हे तुला माहित असेल. चल, आटप. डोक्याला जास्त ताण घेऊ नकोस. ” मी मात्र माझ्याच विचारांमध्ये गढले होते.

“आफताब, मला हे सर्व घरी सांगायचंय” मी अखेर म्हटलं. खूप दिवसांपासून असं वाटत होतं.. किमान आईला तरी सांगावं. आईला जर विषय समजला असता तर...”
“हे म्हणजे? आताच तर तासभर ऐकवलंस ना कालचं प्रकरण?”
“तुझ्यामाझ्याबद्दल! सांगितलं तर वाईट काय होणार नाही ना...”
“पुढे मागे काहीही न बघता आपलं लग्न लावून देतील. मला आता या स्टेजला ते खरंच नकोय.” तो ताडकन म्हणाला.
“लग्नासाठी म्हणत नाहीये, पण एकंदरीतच...”
“हे बघ, मी तुला खॊटं बोल असं कधीच सांगणार नाही... पण प्लीज तू परिस्थिती समजून घे. यतिनकाकांनी जर लग्नाचा विषय काढला तर मला नाही म्हणता येणार नाही... काकांचे आमच्या घरावर तितके उपकार आहेत. त्यांच्यामुळे अझरभाई स्वत:च्या पायावर उभा राहिला आहे. पण तो सध्या एकटा आहे. त्याच्याआधी मी लग्न करणं मला स्वत:ला चूक वाटतं. मी लहान भाऊ आहे.  म्हणून प्लीज.. अजून थोडे दिवस जाऊ देत. तू आणि मी दोघं मिळून सांगू. या रिलेशनशिपला सध्या तरी याच स्टेजवर थांबू देत”
“याला रीलेशनशिप असं तरी का म्हणावं?” खूप दिवसांपासून मनामध्ये असलेला प्रश्न अखेर मी विचारला.
“आपण अनोळखी आहोत का? आपल्या दोघांमध्ये नातं आहे. आणि हे नातं काल किंवा आज सुरू नाही झालंय. हे तुलाही माहित आहे आणि मलाही. कुठल्यातरी मूर्ख निर्णयामुळे मला आपल्यामधली ही फ्रेंडशिप हरवायची नाही.” मला हे नातं फ्रेंडशिपच्या पुढे न्यायचं होतं, पण त्याला मैत्री महत्वाची वाटत होती.

तो अख्खा दिवस ऑफिसमध्ये विचार करण्यांतच गेला. सध्या माझ्याकडे फारसे रिपोर्ट नव्हते. काम जास्त नसलं की मन भरकटत राहतं.  समोरच्या फ्लॅटमध्ये चौकटीमध्ये आखलेला संसार जखडत ओढत का होईना रेटून नेणारी ती बाई आणि मी चौकटी मॊडल्याच्या अविर्भाव आणत प्रत्यक्षात तिच्यासारखीच अडकलेली मी. ती लग्नाचा नवरा आहे म्हणून सोडू शकत नाही, मी माझं खूप प्रेम आहे म्हणून सोडू शकत नाही. तिच्या पायांतली बेडी दिसते, जाणवते. माझी बेडी तर तलम नाजुक, दिसतही नाही. जाणवत तर त्याहून नाही. पण तरीही बेडी आहे. एकाचठिकाणी बांधून ठेवणारी, तिथल्यातिथेच मला अडकवून ठेवणारी ही बेडी आहे.

अर्थात दिवसभर विचार फक्त मीच केला असावा असं नाही कारण, संध्याकाळी घरी आल्यावर आफताबने मला दोन गूड न्युज दिल्या. एक माझं गावी जायचं तिकीट बूक झालं होतं आणि दुसरं म्हणजे मी आईला हे सगळं काही फोनवर सांगण्याऐवजी प्रत्यक्ष गावी गेल्यावरच सांगावं. सांगताना एकत्र रहातोय वगैरे न सांगता, “आम्ही कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहोत पण लग्नाचा विचार नाही” हे सांगायलाच हवं असं त्याचं म्हणणं. मी सकाळी इतकी बकबक केली खरी, पण आईला हे सर्व सांगायचं म्हणजे पोटात कावळे नाचल्यासारखे व्हायला लागलं. ते भूक लागल्यावर कावळे ओरडतात, पण आईची जाम भिती वाटली की कावळे नाचतात!!!

आठवड्याभरानं गणपती येणार होते. मी ऑलरेडी ऑफिसमध्ये पाच दिवसांची सुट्टी खेरीज शनि-रवि जोडून आठवड्याभराचा प्लान केला होता. पण तिकीट वेटींग लिस्टवर होतं, ते आज कन्फर्म झालं. मुंबईपासून इतक्या जवळ असूनही मी अलमोस्ट सात की आठ महिन्यांनी घरी निघाले होते.
आफताबला सुट्टी नव्हती, त्यामुळे तो एकटाच राहणार होता. निघताना त्यानं माझं सामान अगदी व्यवस्थित पॅक करून दिलं. शिवाय, आईसाठी साडी वगैरे शॉपिंग करायला पण तो गपगुमान आला.
रात्रभर प्रवास करून घरी गेल्यागेल्या आईनं “इतक्या दिवसांनी आल्याबद्दल” स्वागत केले. आईच्या स्वागताची पद्धत म्हणजे, “मी यतिनला सांगित्लं, गाडी घेऊन स्टेशनात जा. पोरीला घरचा पत्ता सापडला नाही तर चिंता. इतक्या दिवसांनी येतेय, कुठे हरवली बिअरवली तर काय घ्या. मुंबईमद्ये एकटी राहते पण आमचं गाव अडनीड. हरवायचे चान्सेस पण जास्त” अशी टकळी सुरू झाली की आपण मान खाली ठेवून बसायचं. चुकूनही उलटं उत्तर द्यायचं नाही आणि कविताने खवलेल्या खोबर्‍याच्या ताटाकडे तर अजिबात पहायचं नाही.
बाबा सकाळीच दुकानामध्ये गेला होता. गणपतीच्या दिवशी काहीबाही लोकं सामान घ्यायचं विसरतात, मग आयत्यावेळी यतिनभाऊंचं दुकान उघडं दिसलं की आपोआप तिकडे जातात. एका सामानासोबत अजून चारपाच गोष्टी नेतात. त्यामुळे यतिनभाऊ कुठल्याही सणाला दुकान उघडं ठेवतात. तसंपण आमच्याकडे गणपती बसवायला भटजी येतो, पूजेचे सर्व साहित्य आणि नैवेद्याची तयारी आई करते. बाबा घरी आला की आरती करायची असा नियम.
आईची बडबड होइस्तोवर मी नाश्ता केला. पहाटेपासून पाऊस चांगलाच पडत होता. तसा भाद्रपद आला तरी याअवर्षी पावसाने चांगलाच हात दिला होता. आतापण खिडकीमधून पडणारा पाऊस बघत मी फेसबूकवर स्क्रोलिंग करत बसले होते. आईला आता नाही तर उद्या सर्व सांगायचं असं मी ठरव्लं होतं. सणासुदीच्या दिवशी उगाच वादविवाद नकोत. आईबाबाची रीऍक्शन नक्की काय असेल ते मला अजून समजत नव्हतं. विचारांवरून विचार नुसते पॉपकॉर्नसारखे तडतड उडत होते. “फुले आणली नाहीत” आईनं मध्येच पुकारा केला.
“गाडीची चावी दे, मी घेऊन येते”
“आता चांगली मिळणार नाहीत. अझरपण घरात नाही. त्याच्या बागेत जास्वंदीची फुले आहेत. तो आला की हाक मारून मागवते”
“मी जाऊन आणते की. दोन मिनिटांचं तर काम आहे” मी लॅप्टॉप शटडाऊन करत म्हटलं.
“खरं की काय, चक्क आमच्या लाडक्या राजकुमारी घरामध्ये काहीतरी काम करणार!”
“माते, मला सर्व घरकाम येतं. समजलं ना. सतत टोमणे मारू नकोस.” मी पाठच्या दरवाज्याने बाहेर पडले. पावसानं सगळा चिखल झाला होता. भांडी घासायच्या भागामध्ये तर शेवाळ साठलं होतं.
“ताई, जपून जा” कविताने मला सल्ला दिला. “छत्री नेताय?”
“कशाला? चार फुले तर तोडून आणायची”
कवितासोबत हल्ली तिची सून कामाला यायची. दोघी मिळून कामं करायच्या. कविता आमच्याकडे काम करत असताना तिची सून अझरभाईंकडे कामाला गेली होती. मी गडग्यावरून उडी मारायच्या बेतात असताना ती एकदम समोरून आली.
“घरात कुणी नाये” मी अलिकडच्या गडग्यावर आणि ती पलिकडच्या असा संवाद चालू झाला.
“माहिताय. मी त्यांच्या बागेमधून फक्त फुले आणतेय”
“तिकडे सगळा चिखल आहे.”
“असू देत ना”
“तिकडे एकटीने जाऊ नका. जनावरं वगैरे येतात” मला हिचा रागच आला. लहानपणापासून मी या घरात फिरतेय आणि ही कोण मला सांगणारी? एकंदरीत तिचा सूर मला “तू तिकदे जाऊ नकोस” असाच होता. एकतर फारशी ओळख पाळख नाही तरी मला “जाऊ नका” सांगणारी ही कोण?
“वाट सोड, उशीर होतोय” मी अखेर म्हटलं.
“सांगते तेवढं ऐका, जाऊ नका.  त्यांनीच सांगितलंय, येऊ नका म्हणून”
“आता तर म्हणालीस की अझर घरात नाही. आता म्हणे, येऊ नका. हा काय मूर्खपणा आहे?” मी सरळ गडग्यावर चढून पलिकडे उडी मारली. कविताला मी लहानपणापासून ओळखते. तिनं असला आगाऊपणा कधी केला नसता, पण ही सून काल आली आणि मला शहाणपणा शिकवते. तडातडा अझरच्या बागेकडे निघाले खरी.. (ही बाग अझरची नक्की कधीपासून झाली. मला आठवतंय तसं या बागेची खरी मशागत केली आफताबने. असो) पण अचानक जाणवलं की घराचा मागचा दरवाजा उघडा आहे. खिडक्या उघड्या आहेत. म्हणजे, अझर घरातच आहे!! कविताची सून नुकतीच त्याच्या घरामधून बाहेर आली होती...  मी तिकडे येत आहे ते बघून.. नक्की काय ते समजेना. पावसाने बाग सगळी पाणीपाणी झाली होती. जास्वंदीच्या झाडाजवळ नुसती फांद्यांची झुप्पाझिप्पी झाली होती. लालचुटूक जास्वंदीची कैक फुलं फुलली होती. हाताच्या जवळ येतील तितकी मी काढून घेत होते. शिवाय थोडी तगरीची, मोगर्‍याची अशी फुलं वेचली. अजून थोडं पुढे गेल्यावर चाफ्याचं एक उंच झाड होतं. त्यावर फुलंच फुलं आली होती. दोन चार उड्या मारून फुलं काढली पण आली नाहीत.
अझरचं या फुलबागेकडे अजिबात लक्ष नसावं इतक्या वेड्यावाकड्या फांद्या वाढल्या होत्या, वेलींच्या मांडवाखालून जावं तसा अंधारभरलं वातावरण होतं. एक तर पावसाळी दिवस. कुंद हवा. त्यात पाण्यानं निथळणारी झाडं. त्यांत मी एकटीच. म्हणजे मी स्वत:लाच तसं सांगितलं. कारण, मघापासून मला दोनतीनदा जाणवलं की मी आता एकटी नाहीये. कुणीतरी आहे. मी इकडेतिकडे वळून पाहिलं पण होतं. घराह्च्या पुढच्या बाजूला अझरची बाईक आणि कार दोन्ही दिसत नव्हते. घराचं दार तर उघडं होतं, मग घरात होतं कोण?
आयुष्यात कधी वाटली नाही तितकी भिती मला आता याक्षणाला वाटली. माझी भिती खोटी नव्हती हे पण मला लगेच समजलं कारण, अचानक कुणीतरी झाडीमधून पुढे आलं, माझे केस धरून खस्स्कन त्याच्या अंगाजवळ ओढलं आणि एकदम अचानक किस घेतला.




Tuesday, 20 December 2016

रहे ना रहे हम (भाग २२)


मी साधारण पाचवीला असताना आईनं ठरवलं की मी यापुढे तिच्या बेडरूममध्ये झोपायचं नाही. बाबा तर तेव्हा रात्रीचा कधी नसायचाच त्यामुळे मला आठवतं तसं आई आणि मी एकाच बेडवर झोपायचो. मग पाचवीनंतर आई म्हणाली की तू आजपासून तुझ्या खोलीमध्ये झोपायचं, तोपर्यंत माझी खोली ही केवळ मला पसारा करायला, खेळायला वगैरे कामांसाठी आहे  असा माझा समज होता. इतकं आठवतंय की त्याआधी आईबाबाचं भांडण झालं होतं. आता ते भांडण कशामुळे झालं ते लक्षात आलंय पण तेव्हा ते समजायची अक्कल नव्हती. आईनं हा हुकूम काढलं तेव्हा मला काय इतकं वाटलं नाही कारण, मला झोप लागेपर्यंत आई माझ्याच खोलीमध्ये मला झोपवायची, काहीतरी गोष्टीबिष्टी सांगत. रात्री मला कधीतरी जाग आली की मी सरळ बेडवरून खाली उतरून आईच्या खोलीमध्ये जाऊन झोपायचे. बाबा बहुतेकदा नसायचाच. अजून कधीतरी मला रात्रीअपरात्री स्वप्नांत असं वाटतं की मी माझा तो मिकी आणि मिनीमाऊसचा पांढरा नाईट पायजमा घालून माझ्या बेडवरून खाली अंधारातच उडी मारतेय आणि तशीच दुडूदुडू धावत जाऊन आईच्या बेडवर  चढतेय. झोपेतच आई मला जवळ घेतेय, माझ्या केसांमधून हात फिरवून मला कुशीत घेऊन थोपटतेय.   
पुढे जसजशी अक्कल आणि शहाणपण वाढत गेलं तसं “माझी खोली” या गोष्टीला माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड अस्तित्व मिळालं. कंप्युटर आल्यापासून तर अतिच. मग मी आईच्या खोलीत जाऊन झोपणं बंद केलं, नंतर तर मला माझ्या खोलीमध्ये कुणी आलेलं पण आवडायचं नाही. कविता येऊन रोज घर झाडून-पुसून जायची, अकरावी-बारावीला असताना तर मी घरात नसेल तर तिलाच काय आईलापण माझ्या खोलीत जायला बंदी केली होती. तेव्हापासून मी कायमच घराबाहेर पडताना माझ्या खोलीला कुलूप लावून बाहेर पडायचे. आता मुंबईला हॉस्टेलला आल्यापासून ती सवय कमी झाली. तसं माझ्या खोलीमध्ये लपवण्यासारखं काय फार मोठं सिक्रेट नसायचं पण तेव्हा प्रायव्हसी जपणे हा फार मोठा विषय होता.
आफताब माझ्यासोबत रहायला आल्यानं पहिल्यांदा सुरूंग लागला तो या गोष्टीला. माझ्या खोलीमध्ये, बेडवर, कपाटामध्ये, बाथरूममध्ये एकूणच आयुष्यामध्ये चोवीस तास इतर कुणीतरी सतत आहे, फिजिकली नसेल तरी त्याच्या वस्तूंमुळे ही गोष्ट मला फार ओव्हरव्हेल्मिंग वाटत होती. बाथरूममम्ध्ये त्याचं शेव्हिंग किट मला सतत खुपायचं. तशी चिडायची गरज नाही हे मलाही समजत होतं तरीही “माझ्या” वस्तूंसोबत इतर वस्तू ठेवलेल्या मला चालायचं नाही. शेअरिंगची सवयच नव्हती...
लतिकासोबत हॉस्टेलमध्ये राहताना तशी थोडाफार सवय झाली होती. तरीही खोलीचा तिचा भाग स्वतंत्र, माझा स्वतंत्र. एकाच खोलीमध्येही आम्ही वेगवेगळ्या होत्या. पण आता तीच सेम परिस्थिती नव्हती. रात्रभर आपल्या बेडवर दुसरं कुणीतरी झोपलंय हे फारच वैतागवाणं फीलिंग असतं. हेकाय मी त्याला बोलून दाखवलं नाही,पण तरी त्याला लक्षात आलं असावं, तो बहुतेकदा काहीतरी वाचत किंवा लॅपटॉपवर काम करत हॉलमध्येच झोपायचा.  
त्यानं आयुष्याची पहिली बरीच वर्षं भावांच्या रूममध्ये एकत्र काढली होती. नंतर आमच्या बाजूला रहायला आल्यानंतर जरी घर भलंमोठं असलं तरी कायम येणारेजाणारे लोक, नातेवाईक यामुळे तो एकटा असा फारसा राहिलाच नाही. आणि राहिला तरी सगळं स्वत:चं स्वत: करता येण्यासारखं असल्यामुळे त्याला याचा फारसा त्रास होत नसावा. कदाचित झालाही असेल, पण मी विचारलं नाही. मी त्याला जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा वाटलं की आम्ही कित्त्त्ती वेगळे आहोत. आमचं काहीही जमण्याची शक्यता नाहीच, पण आज इतक्या वर्षांनी त्याचा सततचा सहवास म्हणा किंवा दोघांची वाढलेली मॅच्युरीटी लेव्हल म्हणा आमचे छोट्यामोठ्या गोष्टींवर खटके फार कमी उडायला लागले.
या लिव्ह इनमुळे मला मी किती मोठा मूर्खपणा एकेकाळी केला असता याची जाणीव व्हायला लागली. एखादा पुरूष जेव्हा चोवीस तास तुमच्यासोबत रहायला लागतो तेव्हा काय मेजर झोल होतात. शिवाय, सगळं बाडबिस्तारा नेऊन दुसर्‍याच्या घरात जाऊन रहायचं, आणि तिथंच ऎडजस्ट करायचं ही कसली भयंकर पद्धत आहे. नवीन पार्टनर, नवीन घर, नवीनच “अहो” आईबाबा आणि एकूणातच सगळंच काही नवीन नवीन. या घरामधले लोकं ब्वा आपल्या घरी ही नवीन मुलगी आली आहे, आपण जरा ऍडज्स्ट करू वगैरे कशाचा विचार करत नाहीत. पण त्या मुलीनं मात्र या कंप्लीट नवीन ठिकणी जमवून घ्यायचं, वेळ पडेल तसं स्वत:च्या बेसिक सवयींनादेखील मुरड घालायची आणि ऍडजस्ट व्हायचं! झोपायचं कधी उठायचं कधी हे त्यांच्या घरच्या पद्धतीने ठरणार. त्यांच्या पद्धतीने जेवायचं, चहा त्यांच्या पद्धतीने आणि टॉयलेटचं शेड्युलपण त्यांच्या घरच्या पद्धतीने ठरवायचं!! या लग्न नावाच्या गोष्टीचं पोरींना इतकं भयंकर आकर्षण कशापायी असतं हो? म्हणजे एकेकाळी मलाही होतंच, पण आता अनुभवांती हे शहाणपण आलंय की “लग्न” या घटनेमध्ये काहीही ग्लॅमरस नाही!

त्याकाळामध्ये मी आणि तो माझ्या ऑफिस किंवा असंच सटरफटर याशिवाय जास्त कधी बोललोच नाही. बोलण्याव्यतिरीक्त ओठांना इतरही बरीच कामं होती हे गंमत म्हणून म्हणता येईल. पण प्रत्यक्षात तो अजूनही निधीमधून सावरला नव्हता. बोलताना कुठूनही विषय सुरू झाला तरी कसंही कुठूनही पोचून तिच्यापर्यंत येऊन थांबायचा.  तसं झालं की त्याची नजर एकदम फार कडवट व्हायची, बोलणं तर अल्मोस्ट थांबायचंच, मग लॅपटॉपमध्ये मेल्स चेक करणं किंवा लॅपटॉपवर जाऊन काहीतरी वाचत  बसणं. घरामध्ये एक भीषण शांतता.
प्रॉब्लेम हा होता की माझं त्याच्यावर इतकं प्रेम असतानाही मला त्याची ही अवस्था पुरेपूर पटत होती. केदार प्रकरणाच्या वेळी माझी हीच अवस्था झाली होती. त्यावेळी केदारच्या कानाखाली मारताना आफताबला नक्की काय वाटलं असेल ते मला आज जाणवत होतं. अर्थात आमच्या दोघांच्या प्रेमभंगामध्ये एक भलामोठ्ठा फरक मात्र होता.
 केदारचं लग्न झाल्याबद्दल ज्याक्षणी मला समजलं त्याक्षणी मी आमच्या नात्याचं श्राद्ध उरकून मोकळी झाले. एका निमिषार्धात मी आणि केदार आता या जन्मात एकत्र येऊ शकणार नाही हे मला कळून चुकलं पण आफताब मात्र, अजून निधीला विसरला नव्हता. मनाच्या एका कोपर्‍यामध्ये अजूनही कुठेतरी ती परत येईल याची त्याला प्रचंड आशा होती. दिवसाच्या कुठल्याही वेळेला वाजलेला मोबाईल, मेसेजचा टोन, असो नवीन इमेलचं नोटिफिकेशन “कदाचित निधी असेल” हा विचार त्याच्या मनामध्ये चमकून जायचा, हे त्यानं मला कधी सांगितलं नाही, पण मी आणि तो एकमेकांना इतके ओळखून होतो की मला ते आपसूकच समजलं होतं. निधी खरंतर युएसला गेली होती, जाताना तिनं कुणालाही तिचा पत्ता, मोबाईल नंबर इतकंच काय पण ईमेल आयडीपण दिला नव्हता. तिच्या कॉलेज फ्रेंड्सपैकी अगदी चारदोन जणांशीच तिच संपर्क होता आणि त्यांच्यापैकी कुणीही या “गावगुंड मवाली” पोराला तिचे कॉंटॅक्ट डीटेल्स दिले नसते.
मला ना निधीचं याबाबतीत जाम कौतुक वाटतं. कसं व्यवस्थित प्लानिंग केलं या पोरीनं. आधी आफताबला जाळ्यात अडकवला, मग सहासात वर्षं त्याच्यासोबत राहून स्वत:च्या सर्व शारिरीक, मानसिक आणि भावनिक गरजा भागवल्या. (थोड्याफार आर्थिकसुद्धा.). मात्र हे करताना स्वत:च्या सामाजिक इज्जतीला तिनं जरासुद्धा धक्का लागू दिला नाही. आयमीन, मी वसीमसोबत केवळ फ्रेंड म्हणून असताना सुद्धा गावभरात माझा लौकिक मुसलमानाच्या सोबत फिरणारी असा झाला आणि हिनं मुसलमानाचा बॉयफ्रेंड इतकी वर्षं ठेवूनसुद्धा ही मात्र “चांगल्या कॅरेक्टरची”. शिवाय ऍडिशनल बोनस म्हणून तिच्या घरदारच्या लोकांसाठी आफताबसारखा शिकलासवरलेला मुलगासुद्धा गुंड म्हणून कन्व्हिन्स करण्यात ती कामयाब झाली. हे असं एका क्षणात नातं तोडण्ं जमतं कसं या लोकांना?
त्याकाळी मी आणि आफताब फार जवळ आलो, पण तरीही कुठेतरी एकमेकांपासून दूरच राहिलो. या नात्याचं भविष्य काय, नावपण आम्हाला माहित नव्हतं. त्याच्या मनामध्ये या नात्याला काय स्थान आहे ते मला व्यवस्थित माहिती होतं, याहीआधी निधीचा आणि त्याचा ब्रेकप जेव्हा कधी झालाय, त्यानं लगेच असं दुसरं एखादं नातं जोडलंय, पण निधी परत आली की तो कायम तिच्याचकडे गेलाय. पूर्वी मला माहित नसलेल्या अशा कुणीतरी होत्या, आता मी होते. यानं त्याला काय फरक पडला असता! मी मात्र या औटघटकेच्या संसारामध्ये समाधान मानत होते.
तोही हळूहळू सावरत होता, मुद्दाम त्याला थोडं अजून रीलॅक्स वाटावं म्हणून मी माझ्या ग्रूपमध्ये त्याला घेऊन जात होते. माझ्या अख्ख्या फ्रेंडसर्कलमध्ये मी त्याची ओळख करून दिली. आमच्यासोबत वीकेंडला मूव्हीज डिनर किंवा इतर आऊटिंगमध्ये तो पण सामिल झाला. सर्वांनाच तसा तो खूप आवडला, आशीशखेरीज!  
आशिष अतिशय दुखियारी आत्मा होता. त्याचा काय प्रॉब्लेम होता माहित नाही, पण तो कायम दोन विभिन्न जगात असल्यासारखा वावरायचा. म्हणजे, आमच्यासोबत फिरायला, पिक्चर बघायला त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. त्यातही कधी चान्स मिळालाच तर इकडेतिकडे हात लावून घेणे, नको तिथं टक लावून बघणं वगैरे चीप उद्योगपण करायचा. पण त्याच्या बहिणींबद्दल एक शब्द बोललेला त्याला सहन व्हायचं नाही. बहिणीच कशाला? भारतीय संस्कृतीमध्ये जे काय महानोत्तम आहे ते सर्व काही त्याला पूजनीय होतं. अपवाद फक्त आमच्यासारख्या एकट्या स्वतंत्र मुलींचा. देबजानीला त्याने “मी अधेमध्ये तुझ्या फ्लॅटवर येऊका विचारलं होतं. तिनं एच आरच्या सीनीअरकडे कंप्लेंट केली होती. तरी आशिष वठणीवर काही आलाच नाही. त्यानं मला याआधी टोमणे मारले होते आणि वरकरणी गोड बोलत काय घाण कमेंट्स पास केल्या होत्या. आता मी आफताबसोबत असल्यावर तर चेकाळल्यासारखा काहीही बोलायचा. आम्ही बरेचदा त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो. एकाच ऑफिसमध्ये असल्यानं त्याला तसंही टाळता यायचं नाही. आशिष स्वत: एकदम कर्मठ घरामधला होता. त्याच्या बहिणींनी इतर फॅशनचे कपडे राहू देत, बिनाओढणीचा सलवार सूट घातलेलं पण चालायचं नाही. बाय द वे, त्याला चार मोठ्या बहिणी आणि नंतर झालेला हा पाचवा वंशाचा दिवटा. आताच्या या जगामध्ये पण असले फॅमिलीज आहेत हे एक आश्चर्यच म्हणायचं.
तर आम्ही बाहेर गेलेले असताना हे आफताब व्हर्सेस आशिष कायमच घडायचं. आशिष सतत त्याच्याशी हिंदीत बोलायचा. ग्रूपमध्ये तसे नॉनमराठी लोक बरेच होते, पण आशिष मुद्दाम आफताबसोबतच हिंदी बोलायचा. तेपण “तुमको ये पिक्चर नाही देखने का तो हम काय करे?” टाईप हिंदीचा मुडदा पाडत!
एकदा आम्ही सर्वजण वीकेंडला लंचसाठी वाशीला भेटलो होत. सर्वजण म्हणजे ऑफिसचे सर्वजण. शिवाय मी आफताबलाही सोबत घेतलं होतं. लंचनंतर आम्हा दोघांचा प्लान जब वी मेट परत बघण्याचा होता. कधीनव्हेते, मला आणि त्याला दोघांनाही एकच पिक्चर बेहद आवडला होता. आर्थात, त्याला जबवी मेट आवडण्याची कारणं वेगळी होती, माझी कारणं वेगळी. त्याला खासकरून करीना कपूर फार म्हणजे फार आवडली होती. पहिल्यांदा पिक्चर पाहिला तेव्हा तो मला म्हणाला, “ही एकदम निधीसारखंच कॅरेक्टर घेतलंय, हो ना?”
आसपास भिंत नव्हती म्हणून अन्यथा मी दाणदाण डोकं आपटलं असतंच. निधीनं तुला सोडून दुसर्‍या कुणाशीतरी संसार मांडलाय हे या शहाण्याला कधी कळणार. अर्थात, मला अख्खा पिक्चर आवडला तो शाहिदच्या एका डायलॉगसाठी. ते नाही का, ट्रेनमध्ये ती विचारते “तुम मुझे पसंद करते हो ना?”
त्यावर तो इतकं मस्त समजूतदार उत्तर देतो. “हा! पर तुम्हे टेन्शन लेने की जरूरत नही है. वो मेरा प्रॉब्लेम है” इतके डझनावारी हिंदी आणि इंग्लिश रोमँटिक पिक्चर पाहिलेत, पण फार कमी वेळा ऑन स्क्रीन इतका समजूतदारपणा बघायला मिळालाय.
पिक्चर पाहून आल्यावर लंचदरम्यान ऍडमिनची हरिनी तिचा काहीतरी स्केरी एक्स्पीरीयन्स सांगत होती. “मी अशी रोडवरून जात होते. तर माझ्यामागे एक व्यक्ती. मला तो कोण ते माहितच नाही. तो व्यक्ती माझ्यामागून येत होता”
आम्ही सगळे टोटल गुंगून हे ऐकत असताना मोबाईलमध्ये काहीतरी वाचत असलेला आफताब मध्येच म्हणाला. “ती व्यक्ती”
हरिनी या मध्येच बोलण्यानं टोटल गोंधळली. “नाय रे. माणूसच होता. अंधार असला तरी तेवढा समजतंच ना”
“माणूस.. आय मीन, पुरूष असेल. पण व्यक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे तो व्यक्ती चूक” आफताब ठामपणे म्हणाला.
वास्तविक यावर हरिनीने “ओके” म्हणून तिची गोष्ट पुढे सांगायला सुरूवात केली. पण आशिष तडमडला.
“पण जर तो पुरूष असेल तर तो व्यक्ती म्हणणं बरोबर आहे. मराठीमे तो ऐसेही बोलते है”
“नोप. तो पुरुष, ती स्त्री, तो माणूस, ते बाईमाणूस आणि ती व्यक्ती, मराठी व्याकरणाचं कुठलंही पुस्तक उघडून बघ. हेच दिसेल.”  
“ओह. मराठी व्याकरण ऍंड ऑल दॅट हा? मला वाटलं तुझी मातृभाषा उर्दू असेल”
“मी काय युपी लखनौचा आहे का? पुण्यात अर्धं आयुष्य गेलंय. माझी मातृभाषा मराठीच”
 “पण मदरश्यामध्ये अरेबिकच शिकवतात ना?”
“हो शिकवतात, पण मी मुळात मदरश्यामध्ये शिकलो नाहीये. मला अरेबिकमध्ये प्रार्थना करता येते. पण त्याचा अर्थ असा नाही की, ती माझी बोलीभाषा आहे. लहानपणापासून जी भाषा माझ्या कानांवर पडली, मी ज्या भाषेत पहिले शब्द उच्चारले, ज्या भाषेची बडबडगीतं माझ्या आईनं मला शिकवली ती माझी भाषा” अशारितीनं अतिशय शांत शब्दांमध्ये आफताबनं आशिषचा खातमा केला. त्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. इतक्या शाब्दिक मारानंतर आशिष अर्थातच गप्प बसणार्‍यांमधला नव्हता पण सुदैवानं ग्रूपमधल्या देबजानीनं इथून पुढं विषय बंगाली आणि तमिळवर नेला. तिचा बॉयफ्रेंड तमिळ होता, त्यांच्याकडे तर हा भाषिक अस्मितेचा प्रश्न चांगलाच धगधगता होता.  त्या दिवशी ग्रूपमध्ये अख्खी संध्याकाळ आम्ही भाषा या विषयावर चर्चा करण्यात घालवली.
मात्र, या प्रसंगांनंतर आशिष दरवेळी मला ऑफिसमध्येही काहीबाही ऐकवू लागला होता. माझ्या अपरोक्ष तर तो माझा उल्लेख घाणेरड्या शिव्यांनीच करायचा ही गोष्टसुद्धा माझ्या कानावर आली.
अर्थात त्यानं मला फारसा काही फरक पडत नव्हता! मी आता आफताबशिवाय जगणं या कल्पनेचा विचारदेखील करू शकले नसते. पण अखेर काही झालं तरी मामला अजूनही एकतर्फीच होता. “वो मेरा प्रॉब्लेम है, किसी और को टेन्शन लेनेकी जरूरत नही है!”

>>>>>>> 
 ऑफिसच्या ऍडमिनकडून मेल आली होती की यंदा ऑफिस डे सेलीब्रेशनसाठी सर्वांनी ट्रॅडिशनल ड्रेस घालून यायचं. आमच्याकडे तमिळ, बंगाली, तेलुगु, मराठी, गुज्जू, पंजाबी (गूडनाईटच्या कागदावर जितक्या भाषा लिहिलेल्या असतात ते सर्व) लोकं असल्याने साहजिकच या ट्रॅडिशनल डेचं फारच कौतुक सुरू झालं. कोण काय घालणार? कुणाची जोडी कुणासोबत. शॉपिंगला कुठे जायचं. एक्सेसरीज काय घ्यायच्या. असं बरंच काहीबाही. ऑफिसमधले दिवसच्या दिवस या चर्चेमध्ये जात होते. मी जोधा अकबर लूक करायचं ठरवलं.. पिक्चर नुकताच पाहिला होता. मस्त लव्हस्टोरी होती, ऐतिहासिक वगैरे गोष्टींशी त्याचा फारसा संबंध नसेल, (म्हणजे नव्हताच त्यावरून आफताबशी चिक्कार वादावादीपण झाली होती.) पण मला पिक्चर आवडला. फिक्शन म्हणून बघायचं तर एका राजकन्येच्या मनाविरूद्ध झालेल्या विवाह, आणि ज्या संस्कृतीशी तिचा अजिबात संबंध नाही, तिथे तिने ऎडजस्ट करण्याचा प्रयत्न, सोबत अधेमध्ये नवर्‍याने दिलेली साथ किंवा कधीतरी रागामध्ये सोडलेली साथ. मध्येच उफाळून येणारा टिपिकल मेल इगो. शिवाय दोन्ही प्रेमिकांमध्ये व्हिलनगिरी करणारे बाहेरचे कुणी नव्हे, तर घरातलेच घरफोड्ये. एखादी आदर्श प्रेमकहाणी असावी अशी ही गोष्ट. पण सर्वांत मॊठा प्लस पॉइंट म्हणजे, उघड्या अंगानं तलवारबाजी करणारा ह्रितिक!!
विषय भरकटला... पण आता मुद्दा होता, जोधाच्या लूकचा.
एकतर मला तो कुंदनचा भलामोठा सेट फार आवडला होता, शिवाय माझ्याकडे सागरदादाच्या लग्नासाठी शिवलेला रेड घागरा पण होता. परफेक्ट लूक झाला असता. मी अंधेरीला एका दुकानांत तो कुंदनचा सेट बघितला तर फारच महाग होता, पण मला देबजानीने सांगितलं की क्रॉफर्ड मार्केट किंवा भुलेश्वरला एकदम स्वस्त मिळेल. पण मी त्या भागात कधीच फिरले नव्हते. देबजानीला माझ्यासोबत ये म्हटलं तर म्हणाली, “आफताब को लेके जाव. वो सब उन लोगोंका एरिया है” मी लगेच तुणतुणं आफताबसमोर वाजवलं.
“अजिबात नाही” लॅपटॉपवर काहीबाही खडबडवत  नजर स्क्रीनसमोरून न ढळवता इतकंच उत्तर आलं.
“पण का?” परत कीबोर्डची लटपटकटपट! मी तोच प्रश्न दोन तीनदा विचारला.
अखेर मेलच्या सेंडवर क्लिक झालं आणि नजर उठून माझ्यावर स्थिरावली. डाव्या हाताने चष्मा सावरला, आणि मग निवांत उत्तर आलं.
“मला त्या गर्दीत फिरायला आवडत नाही. चीप वस्तू मिळतात म्हणून मी तीन तास त्या गर्दीत घामेजत भटकणार नाही” या व्यक्तीला शॉपिंगचा अर्थच कळत नाही खरंतर. पण मी काही बोलायच्या आत, “दुसरं म्हणजे तो बटबटीत सेट तुला अजिबात चांगला दिसणार नाही” असा निकाल!! नजर परत लॅपटॉपकडे आणि किबोर्डची लटपटलटपट चालू.
“मग मी काय घालू? माझ्याकडे ट्रॅडिशनल डेमध्ये घालण्यासारखा तोच एक ड्रेस आहे. बाकी सर्व फॉर्मल”
“नऊवारी नेस ना”
“काय? वेड लागलंय का? ऑफिसला जायचंय, मला सांभाळता येत नाही. एकदाच कॉलेजच्या फंक्शनला नेसले होते. हालत खराब झाली होती. आठवतंय?”  
पण आता काही उत्तर येणं शक्य नव्हतं कारण, आफताबमहाराज परत स्वत:च्या एक्सेलशीट गुहेमध्ये तपस्येला बसले होते. एकवेळ मेनका येऊन नाचली म्हणून अख्खी बिल्डिंग जागी होईल, पण जोवर समोरची एक्सेलशीट निस्तरत नाही तोवर त्याची नजर हालणार नाही. त्याच्या लॅपटॉपसमोरच मी माझं पुस्तक वाचत बेडवर लोळत पडले. थोड्यावेळानं अचानक गुणगुणण्याचा आवाज आला, मला वाटलं यानंच मीडीयाप्लेयरवर गाणं लावलं असणार, पण तो लॅपटॉपसमोरून उठला होता आणि माझ्या बाजूला बसला होता. हातातलं पुस्तक मीटून मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तोच गुणगुणत होता. “तू जो हसती है, तो बिजली सी चमक जाती है”
“हे काय?”
“विसरलीस? मै भला होश मे कैसे रहू”
“ओह! लक्षात आहे की. दिवसभर मला चिडवत होतास.”
“दिवसभर तुलाच बघत होतो. स्वप्निल, काय कातील दिसत होतीस”
“शटाप! काकूबाई दिसते म्हणून तूच म्हणत होतास”
“मग काय तुला केदारसमोर आणि निधीसमोर काय सेक्सी दिसतेस! आता याक्षणी तुला उचलून आपल्यासोबत कुठंतरी दूर घेऊन जावं आणि तुझ्यासोबत बेदरकार शृंगार उधळावा असं वाटतंय हे म्हणणार होतो का?”
“असं म्हणणार होतास का?”
“अल्लाकसम! एक्झाक्टली हीच भावना होती. त्यादिवशी पहिल्यांदा तू मला आवडलीस. म्हणजे मैत्रीण म्हणून नव्हे, एक मादी म्हणून. याआधी कसं कुणाबद्दलही वाटलं नव्हतं. टीनेजरमधले क्रश असो, वा गर्लफ्रेंड्स या सर्वांबद्दल असलेल्या आकर्षणापेक्षाही त्यादिवशी, त्याक्षणी तुझ्याबद्दल वाटलेलं ते आकर्षण आदिम होतं, रानटी होतं पण सच्चं होतं.”
त्याला माझ्याबद्दल असं कधी वाटलं असेल असं मला चुकूनही वाटलं नव्हतं. पण  तूर्तास हे वाटण घाटण जरा बाजूला ठेवू. “मी अख्खा दिवस तुझ्यासोबत होते, पण तुझ्या वागण्यांत जे जाणवलं नाही”
“देन आय ऍम अ गूड ऍक्टर. असंपण.. ही भावना चोवीस तास तुमच्या मनांत नसते. काही क्षणांपुरतंच वाटणारं अस्तं. जबरदस्त ओढ म्हण, वासना म्हण किंवा अजून काहीही ग्लोरीयस नाव दे. स्वप्निल, तुला खूप वेळेला पाहिलंय, पण त्या नऊवारी साडीमध्ये तू जे काही दिसलीस.” त्यानं माझ्या ओठांवर ओठ टेकवले.
दुसर्‍या दिवशी, मी देबजानीला हे सर्व सांगितलं, म्हणजे याच शब्दांत नव्हे पण साधारण. देबजानी आणि मी बर्‍याचदा असल्या बकवास गप्पा मारत बसायचो. तिचा बॉयफ्रेंड सध्या युकेला गेला होता. त्यांना लग्न करायचं होतं, पण स्वत:चा फ्लॅट झाल्याशिवाय करता आलं नसतं. म्हणूनच दोघंही पैसे साठवून साठवून ठेवत होते.
“पागल है क्या? तू तो फिर वो मराठी स्टाईल साडी पहन”
“मुझे नही आती”
“क्यु? वेस्टर्न स्टाएल तो अच्छी पहनती है” देबजानीच्या भाषेत आपण जी पाचवारी साडी गुंडाळतो ती वेस्टर्न स्टाईलची साडी. आता तशी मला नेसता येते. लतिकाने शिकवली होती. आईच्या भाषेत झाकायचं ते सगळं उघडं टाकून नेसायची ती साडी. सागरदादाच्या रिसेप्शनला मी वाईन कलरची साडी घेतली होती त्याचा ब्लाऊज इतका मस्त शिवला तरी आई “यामध्ये ब्रेसियर कशी घालायची?” टाईप मूलभूत प्रश्न विचारून मला सतावत होती. लारा दत्ता कींवा प्रियांका चोप्रा फार मस्त कॅरी करतात अशा डीझायनर साड्या.
“मराठी स्टाईल अलग रहता है. धोती के जैसे पहनना पडता है. फिरसे संभलनेमे बहुत प्रॉब्लेम. वो चाची ४२० मे कमल हासन देख कैसे पहनता है...”
बराच वेळ डिस्कशनावर डिस्कशन झाल्यानंतर अखेर रसिकाने (ती मध्येच आम्हाला जॉइन झाली होती) मार्ग सुचवला. तिची आईच्या मावशीच्या नणंदेची सून नऊवारी शिवून देते म्हणे- नात्यांचा इतका मोठा पिरॅमिड समजेप्र्यंत माझी इजिप्शियन ममी व्हायची. ते मरो. हे प्रकरण चांगलं होतं. आपण साडी फक्त पॅंटसारखी घालायची आणि पदर पिनप करायचा. हे फारच भारी आणि सिंपल काम झालं. लगेच रसिकाने त्या आ. मा. न. सूनेला फोन लावला आणि माझी मापं वगैरे सर्व काही मेसेजवर देऊन (त्यासाठी आम्ही दोघी वॉशरूमात मेजरिंग टेप घेऊन!!! ऎडमिनकडून टेप घेतल्याने हरिनी पण आमच्यांत सामिल) साडी फायनल केली.

अर्थात, मी ती साडी कम पॅंट ऑफिसच्या ट्रॅडिशनल डेला घातलीच नाही. मला हवा होता तसा जोधा लूकच केला होता. ती नऊवारी फक्त आणि फक्त आफताबसाठी... तो ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी सॉरी रात्री!! अति डिटेल्स द्यायची काही गरज नाही!! 


Sunday, 20 November 2016

रहे ना रहे हम (भाग २१)

निधीच्या लग्नाची तारीख मला पक्कीच माहित आहे. एकवेळ ती किंवा तिचा नवरा विसरेल पण मी विसरणार नाही.. कारण त्या रात्री आफताब पहिल्यांदा माझ्या फ्लॅटवर आला. अर्थात त्या रात्री आमच्यामध्ये काहीच फिजिकल घडलं नाही. त्याला मैत्रीच्या आधाराची गरज होती, माझ्यासाठी माझ्या प्रेमापेक्षाही मैत्रीचं नातं जास्त महत्त्वाचं होतं. पण तरी त्यानंतर तो सतत येतच राहिला. कधी वीकेंडला तर कधी सुट्टी आहे म्हणून सहज. मग कधीतरी माझी आठवण आली म्हणून. हक्कानं तो येत राहिला आणि आमचं नातं तसंच वाढत गेलं.
नातं म्हणायला गेलं तर फार मोठी कन्सेप्ट होईल. मी आणि आफताब एकमेकांना ओळखतच होतो, अरिफच्या बर्थडेदिवशी एकमेकांना शरीरानंदेखील व्यवस्थित ओळखू लागलो आणि मग हळूहळू हीपण ओळख अधिकाधिक दृढ गेली. मला कधीतरी हे खरंच वाटायचं नाही की इतक्या वर्षांनी आफताबच्या ओठांवर निधीचं नाही तर माझं नाव होतं. माझी निधीसोबत काही इर्षा नव्हती. म्हणजे किमान सुरूवातीला तरी, नंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं की मीच आफताबच्या प्रेमात पडले आहे, त्तेव्हा कळत नकळत का होईना निधीचा जाम राग यायचा. ते साहजिकही होतं. निधीनं त्याच्याशी लग्न न करायला धर्म हे एकमेव कारण होतं (म्हणे!). गेली सात वर्षं त्याच्यासोबत फिरताना, झोपताना तिला या गोष्टीची कधीच जाणीव झाली नाही का? मला ती लग्नानंतर एकदा फक्त भेटली. गावी आली होती तेव्हा आमच्या दुकानामध्ये येऊन गेली.. त्यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा होता, त्यामुळे मला आफताबबद्दल काही बोलणं शक्य झालं नाही. तरीही “कशी आहेस? लग्नाचं काय ठरलं?” या तिच्या खवचट प्रश्नाचं उत्तर देताना मी पण तितक्याच खवटपणे सांगितलं “लवकरच ठरतंय, आमचे नेबर आहेत सुर्वे. त्यांच्याच धाकट्या मुलासोबत. तू पाहिलंयस ना त्याला? सीए झालाय तो?” मी बोलत असताना निधीचा चेहरा काय रंगला होता हे इथं लिहून मजा येणार नाही. त्यादिवशी हे उत्तर देऊन मी माझ्यापरीनं सूडाला पूर्णत्त्वाकडे नेलं होतं. पण तरी अखेर निधीचीच सरशी झाली!!! मला आणि आफताबला तिनं वेगळं केलंच.
पण ते फार नंतर! महत्त्वाचं काय तर अखेर, आफताब अंधेरीच्या फ्लॅटमधलं त्याचं सर्व सामान घेऊन माझ्या फ्लॅटवर रहायला आला. सामान म्हणायला होतं काय, ढीगभर पुस्तकं आणि दोन कपड्यांच्या बॅगा. हे पुरूषांचं एक बरं असतंय, आमचं झालं तर कपड्यांच्याच दहाबारा बॅगा भरतील. त्याला आता पुढची सीएफएची परीक्षा द्यायची होती. त्यासाठी चिक्कार अभ्यास करायचा होता आणि म्हणून त्यानं नोकरीमधून वर्षभर ब्रेक घेतला होता. परीक्षेशिवाय मुख्य कारण म्हणजे, निधी प्रकरणामधून आलेलं डिप्रेशन होतं. हे त्याला स्वत:लाही नीट माहिती होतं. त्याला पैशाचा तसा काही प्रश्न नव्हता. सीए म्हणून काही छोटीमोठी रीटर्न्स भरायची वगैरे कामं करून चाललं असतं. आता अभ्यास करण्यासाठी माझा फ्लॅट अतिशय निवांत म्हणून तो इकडे रहायला आला. म्हणजे,  खरंतर मीच त्याला तसं सुचवलं. आमच्या बिल्डिंगजवळ असलेल्या एका अतिशय महागड्या क्लासमध्ये सीए इंटरच्या मुलांना शिकवण्यासाठी त्याला जॉब आला. एखाद्याला “शिकवणे” याची त्याला इतकी आवड होती की, त्यानं पगार वगैरे कसलाही विचार न करता डायरेक्ट हो म्हणून सांगितलं. अर्थात पगार जबरदस्तच होता.
तो माझ्या घरी रहायला येईपर्यंत आईबाबाला यातलं काहीच माहित नव्हतं म्हणजे अधूनमधून येतो तेसुद्धा माहित नव्हतं. त्यामुळे आमचं काही फिजिकल आहे हे समजायचा प्रश्नच नव्हता. केदारच्या वेळेला आईला सर्व समजल्यावर तिनं माझी बरीच खरडपट्टी काढली होती. त्यात नेहमीचे “स्त्रीची अब्रू काचेचं भांडं” वगैरे फिल्मे डायलॉग तर होतेच. त्यामुळे मी हा मामला तिच्यापासून जरा लांबच ठेवला. तसे हल्ली आईबाबा इकडं जास्त यायचे नाहीत. बाबा स्थानिक राजकारणामध्ये बरा रमला होता, दिवसामध्ये दोन चार दुकानांमध्ये महागडा माल विकून झाल्यावर उरलेला वेळ तो पक्षाच्या कामामध्ये गुंतला होता. कॉलेजच्या गुंडागर्दीनंतर राजकारणामध्ये जायला बाबाला तसा उशीरच झाला म्हणायचा. आईनं वेळ जायला म्हणून अनेक उपद्व्याप लावून घेतले होते. कुठे बालसाक्षर वर्ग, कुठे महिला बचतगटांना मार्गदर्शन, तर कुठे काय कसलं! हे उद्योग वेळ खायला उठू नये म्हणून केले पण आता मलाच खायलासुद्धा वेळ नाही असं तिनं मला ऐकवलं होतं. शाब्दिक कोट्या म्हणून ठिकच आहे तरीही हे खरं की माझे आईबाबा आता अतिशय बिझी झाले होते. खरंतर मी आईला किंवा बाबाला आफताबबद्दल सांगायला हरकत नव्हती. पण मी सांगितलं नाही. काय सांगणार? या नात्याला काहीही भविष्य नव्हतं. मुळात त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं!
ही गोष्ट कितीही कडू वाटली, अप्रिय वाटली तरीही खरी होती. तो माझ्यासोबत होता. फिजिकली वी वेर ग्रेट! इमोशनलीही आम्ही एकमेकांचा आधार होतोच पण तरीही मी आफताबचं “प्रेम” नव्हते. हे त्यानंच मला सांगितलं होतं. निधीच्या लग्नादिवशी जेव्हा तो माझ्याकडे आला त्याच्या दुसर्‍या दिवशी.
“स्वप्निल, मला अजून कॉम्प्लिकेशन्स नकोयत. मी निधीला अजून विसरलो नाही. विसरेन असंही वाटत नाही. मला तू आवडतेस, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, पण याहून अधिक दुसरं नाव मी या नात्याला याक्षणी देऊ शकत नाही. जर हे तुला मान्य नसेल तर मी निघून जाईन. पण मी तुला कसलीही कमिटमेंट देऊ शकत नाही.”
मला नात्याला नाव, कमिटमेंट वगैरे गोष्टी हव्याच कुठे होत्या? मला केवळ तो हवा होता. निधीला अजून विसरू न शकलेला तरीही माझ्यासोबत राहणारा असा हा बॉयफ्रेंड मीच स्विकारला होता. त्यामुळे त्याबद्दल नो रीग्रेट्स! ही गोष्ट आईबाबाला अजिबात न सांगता निभावणं हे अतिशय रिस्की होतं. जर चुकून त्यांना बाहेरून कूठंतरी समजलं तर आजवर त्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाच्या चिंध्या उडाल्यासारखं झालं अस्तं. हे नातं अतिशय क्षणभंगुर होतं याची मला कायमच जाणीव होती आणि म्हणूनही असेल पण हे नातं जितके दिवस टिकतंय तितके दिवस का होईना मला आसुसल्यासारखं जपायचं होतं. त्याच्याकडून मला याहून दुसरी काहीही अपेक्षा तेव्हा नव्हती.
पण, आशा अपेक्षा आणि नाती अशी कायमच एकसारखी राहत नाहीत. पेट्रीडिशमध्ये ठेवलेल्या फंगससारखी ती सतत बदलत राहतात. पण ते पुढे. सध्यातरी माझा बॉयफ्रेंड माझ्या घरी मूव्ह झालाय. आम्ही म्हणजे अगदी न्युएज लिव्ह इन कपल आहोत असं माझ्या ग्रूपमधल्या प्रत्येक फ्रेंडचं मत पडलंय. काहीतरी भयंकर परंपरा वगैरे मोडल्याचा फील तेव्हा निमिषभर का होईना पण येऊन गेला होता.
आम्ही दोघं एकत्र रहायला लागल्याचा साईड इफेक्ट म्हणजे, माझा ऑफिसमधला परफॉर्मन्स एकदम सुधारला. आता हे काय कॉज आणि इफेक्ट इतकंसाधं सोपं नाहीये. मी रोज ऑफिसमधून आल्यानंतर सर्व घडामोडी सविस्तरपणे त्याला सांगायचे, दोघांमध्ये बोलायला रोज काहीतरी विषय नको! त्यानंतर मग एक्स्पर्ट कमेंट चालू व्हायच्या, “तू त्याला मेल करायचं ना. आणि फोनवर हे टॉपिक कधी डिस्कस करायचे नाहीत. मिनट्समध्ये हा पॉइंट मेन्शन का केला नाहीस, सरांना सांग, हे माझ्या कामात बसत नाही तरीही मी केलंय. आणि अगदी बेस्ट वेने केलंय” वगैरे वगैरे. कॉलेजं संपली तरी आमच्या घरात लेक्चर्स चालूच राहिली पण हळूहळू ऑफिसच्या कामाला शिस्त आली, प्रोफेशनल अप्रोच बदलू लागला.
घरातही बरेच बदल झाले. पहिली गोष्ट म्हणजे, माझं ऊठसूट हॉटेलमध्ये ऑर्डर करणं बंद झालं. घरामध्ये ओट्स कॉर्नफ्लेक्स, मुसली वगैरे हेल्दी (आणि भयंकर बेचव गिळगिळीत) वस्तू आल्या. आपल्या रोजच्या आहाराचे तीन भाग असतात. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे लहानपणी पहिली दुसरीमध्ये ईव्हीएसमध्ये शिकवलं होतं. आता इतक्या वर्षांनी त्याचा पुढचा धडा शिकले, ब्रेकफास्टला केलेले पोहे दुपारी दोन वाजता गरम करून खाणे म्हणजे लंच नव्हे आणि तेच पोहे रात्री परत (वर शेवकांदा घालून) खाणे म्हणजे डिनर नव्हे. मुळात पोहे एकदा खाण्यापुरतेच बनवावेत. अर्धा किलो पोहे हे महिन्यातून तीन चार वेळेला बनवता येतात एक्दाच सर्व करायची गरज नसते. शिवाय एकावेळेचे पोहे करून झाल्यावर नीट डब्यात भरून ठेवावेत. पिशवीला स्टेपलरच्या पिना मारून सापडेल त्या डब्यात टाकू नये. वगैरेवगैरे. चाचींनी तिन्ही मुलांना सगळा स्वयंपाक शिकवला होता. त्यात इतकी वर्षे तो एकटा राहत असल्यानं सर्व करायची सवय लागली होती. त्यामुळे सकाळी मी ऑफिसला जाण्याआधी ब्रेकफास्ट. दुपारी स्वत:पुरतं लंच, आणि रात्री दोघांसाठी ताजं गरमागरम डिनर इतकं तोच करत होता. पुढं नंतर अभ्यास वाढल्यानंतर महिन्याभरानं त्यानंच सोसायटीमध्ये शोधाशोध करून पोळ्यांना बाई लावली. त्यात मला काय प्रॉब्लेम असणारे! रोज सकाळी त्याच्यासोबत ब्रेकफास्ट करून मी ऑफिसला बाहेर पडायचे. रात्री गरमगरम् भाजी वरण आणि पोळ्या आयत्या मिळायच्या, म्हणजे मी काहीच करत नव्हते अशातला भाग नाही, पण माझ्यापेक्षा त्याला कूकिंगमध्ये जास्त इंटरेस्ट होता. अभ्यासामधून ब्रेक म्हणून कूकिंग करायचा म्हणे!!  नाहीतर आम्ही... अभ्यासामधून ब्रेक म्हणून ऑक्रुट नाहीतर नवीनच आलेल्या फेसबूकावर बागडायचं!

Wednesday, 2 November 2016

रहे ना रहे हम (भाग २०)

नोकरीमधलं पहिलंच परफॉर्मन्स अप्रेझल काही खास गेलं नाही, मला सुब्रमण्यम सरांनी याची वॉर्निंग दिलीच होती. माझा परफॉर्मन्स (एच आरच्या दृष्टीनं) फार खास नव्हता. मला त्यामध्ये खरंच काही प्रॉब्लेम नव्हता, फार काय पगारवाढ जास्त होणार नाही, की फरक पेंदा है! बाप नावाचं एटीएम अजून कमावत होतंच. मी वेळेत ऑफिसला जात होते आणि दिलेली सर्व कामं करत होते हेच माझ्या दॄष्टीनं भारी होतं. आमच्या घराण्यामध्ये “नोकरी” करणारं कुणी नव्हतंच. आजोबांचा आंब्यांच्या कलमांचा धंदा, बाबाचे तर अनेकोनेक वेगवेगळे धंदे, काकाकाकूंचा दवाखाना म्हणजे स्वतंत्र बिझनेसच. नोकरी करणारी मी पहिलीच. त्यामुळे हे सर्व तसं नवीनच. माझे रिपोर्ट्स वेळेवर जायचे, लॅंग्वेज कमांड चांगली होती, त्यामुळे चुका फारश्या असायच्या नाहीत. परफॉर्मन्स अप्रेझल म्हणजे काय आणि त्याचा एकंदरीत करीअरवर कितपत परिणाम होतो वगैरे गोष्टी समजल्याच नव्हत्या. त्यात मी कॉलेजामधून डायरेक्ट आले ती नोकरीमध्ये. तेपण फारशी शोधाशोध न करता. माझ्यासाठी हे कॉलेजचंच एक्स्टेन्शन असल्यासारखं. रॉय आणि मी तर एकाच वर्गात होतो. पण इतरही बरेच जण, माझ्यासारखे कॉलेजामधून आलेले होते. आमचा एक भलामोठ्ठा ग्रूप तयार झाल्यासारखंच होतं. सगळेच अनमॅरीड त्यातही बहुतेकजण सिंगलच होतो, त्यामुळे ऑफिस म्हणजे कॉलेजच्या कॅंटीनसारखं कायमच हॅपनिंग होतं. कॉलेजच्या रंगीबेरंगी कपड्यांमधून एकदम टकाटक फॉर्मल्समध्ये आलो इतकाच काय तो फरक.
पण ऑफिसमध्ये कितीही मज्जा येत असली तरी मला काहीतरी खुपत होतं, हे मला करायचं नव्हतं, असं सतत वाटायचं. मला प्युअर रीसर्च मध्ये रस होता, आता जरी मी रीसर्च असिस्टंट असले तरी माझं मुख्य काम माझ्या फिल्डमधल्या सायंटिफिक रीसर्चचा डेटा कोलेट करून त्याची समरी आणि रिपोर्ट बनवणे इतकंच होतं. हे इतकं पण काही इंटरेस्टिंग वाटत नव्हतं, थोड्या दिवसांनी तर मोनोटोनस वाटायला लागलं. पण आता जॉब प्रोफाईल बदलून मिळाला नसता, त्यामुळे आहे तेच काम ओढत राहिले. रॉय अजूनही युएसमध्ये पीएचडी साठी ट्राय करत होता. त्याच्या नेट सर्चमध्ये मी थोडीफार मदत करत होते. तिकडच्या युनिव्हर्सिटीचे डीटेल्स आणि रीसर्चसाठी मिळत असलेले सब्जेक्ट्स बघून एकदम भारी वाटायला लागलं होतं. हळूहळू रॉयसोबत मीही डीसीजन घतला. आपणसुद्धा अप्लाय करायचं, सिलेक्ट झाल्यावर आईबाबा “नाही” म्हणणार नाहीत. आधीच सांगितलं तर कदाचित ते नको म्ह्णतील. पण ऍडमिशन हातात असेल तर मला सपोर्ट करतील. अगदी लहान असताना तुम्हाला काय हवंय ते आईबापाला लगेच समजतं, टीनेजमध्ये तुम्हाला काय हवंय ते त्यांना समजू शकतच नाही असं तुम्हाला वाटत असतं, मग त्यामधून केवळ भांडणंच होत राहतात. त्याहून थोडं मोठं झालं की आपल्याला जे हवंय ते आईबापाला नक्की कसं गळी उतरवता येईल याचा बरोब्बर अंदाज आलेला असतो. त्याहून पुढची काही स्टेज असली तर मला माहित नाही, मी अजून तिथं पोचलेले नाहीये.
एकूणात मला नोकरीमध्ये महिन्याच्या अठ्ठावीस  तारखेला बॅंकेत जमा होणार्‍या पॉकेटमनीइतकाच मला रस होता. आफताबसारखं फार करीअर ओरिएंटेड वगैरे वागणं जमलंच नस्तं.
त्या रात्रीनंतर मी आफताबला स्वत:हून कधीही फोन केला नाही, त्यानंही मला कॉल केला नाही. आधी पण आम्ही काय दररोज फोन करत होतो अशातला भाग नाही, पण आता तर पूर्णच संवाद बंद होता. मी निधीलाही फोन केला नाही, मला अजूनच कॉम्प्लिकेशन्स नको हवी होत्ती. आय लव्ह्ड आफताब. आय स्लेप्ट विथ हिम. मला तो कधीतरी एका क्षणापुरता का होइना “माझा” म्हणून हवा होता, तसा मिळाला. याहून जास्त अपेक्षा माझीच कधी नव्हती. पण माझ्याबाबतीत अपेक्षांची गणितं  कायम चुकत आलीत.

त्या रात्री टीव्हीवर क्युंकि सांसभी कभी बहु थी बघत हॉलमध्येच अस्ताव्यस्त पडले होते. खरंतर मला आता या सीरीयलमध्ये कोण कुणाचं काय लागतं ते काही केल्या कळायला मार्ग नव्हता, पण सवय म्हणून मी रोज की सीरीयल बघत होते. मुळात तुलसीचा नवराच इतक्यांदा बदलला होता की मला तिचं कन्फ्युजन कसं होत नाही याचंच आश्चर्य वाटत होतं.
लतिकानं एकदा भन्नाट किस्सा सांगितला, ती एका मित्राबरोबर अलिबागला गेली, तिथं अतिशय चुकीच्या क्षणी, तिनं या मित्राऐवजी  तिच्या कास्टिंग एजंटचं नाव घेतलं होतं. तो मित्र पण असला की, त्यानं चालू क्रिया ताबडतोब थांबवून तिच्याशी कडाकडा भांडायला सुरूवात केली. आय मीन, आधी काम पूर्ण करावं मग ते काय भांडत बसावं! लतिका म्हणे, “मै तो कन्फ़्युज हो जाती हू! सामने कौन है वो हरबार याद रखना पडता है. अच्छा है के हम  गॉड गॉड कहते रहे. भगवान किसी काम तो आये” लतिका इतकी अचाट होती.
हा किस्सा आठवून आता मी आता एकटीच हसत होते. इतक्यात फोन वाजला. पलिकडे आफताब होता. आमच्या त्या रात्रीनंतर जवळजवळ वर्षभरानंतर आलेला हा त्याचा पहिला कॉल.
“काय वैताग आहे” हॅलो वगैरे काही म्हणायच्या भानगडीत न पडता त्यानं सरळ मुद्दा मांडला.
“कुणाचा?”
“ट्राफिकचा. पुण्यामधून केव्हाचा निघालोय. अजून पनवेलमध्येच आहे” त्याचा आवाज वैतागवाणा कमी आणि चिवचिवणार्‍या चिमणीइतका उत्साही जास्त वाटत होता.
“हे सांगायला फोन केलास”
“केव्हाचा या रस्त्यावर अडकून पडलोय. सहज आठवलं तू इथंच राहतेस म्हणून तुला कॉल केला. आय होप मी तुला डिस्टर्ब करत नाहीय. बिझी आहेस का?”
“मी क्युंकी बघतेय”
“ओह, इतक्या महत्त्वाच्या कामामध्ये मी तुला त्रास देतोय का? ओके, जास्त वेळ घेत नाही. मला फक्त जरा चांगल्या हॉटेल्सची नावं सांग. इथंच कुठंतरी डिनर करेन. असल्या ट्राफिकमध्ये घरी पोचायला दीड दोन वाजतील”
“हॉटेलची नावं आणि नंबर मेसेज करते. पण जर इतका उशीर झाला असेल, आणि अंधेरीमध्ये तुझा कुणी बेइंतिहा इंतजार करत नसेल, तर तू माझ्याकडे येऊ शकतोस. डाळभात रेडी आहे.”
“तुझ्याकडे! आए यु शुअर? स्वप्नील, कदाचित माझी नियत ठीक नसेल” तो हसत म्हणाला.
“कदाचित म्हणूनच मीही तुला बोलवत असेन” मी पण हसतच उत्तर दिलं. इतकं खोटं मी आजवर कधी हसले नसेल. तो इतक्या रात्री कशासाठी फोन करत होता आणि इकडेच का येत होता हे न समजायला मी काय साठच्या दशकांची हिरॉइन नव्हते. तरीही मीच स्वत: त्याला बोलावलं. कौन कंबख्त कहता है के प्यार अंधा होता है... प्यार टोटली कंप्लीट स्टुपिड होता है.
अर्ध्या तासांनी तो माझ्या घरी आला. बिल्डिंगच्या सेक्युरीटीला इतक्या रात्री माझ्याकडे कुणीतरी आल्याचं बघून फारच आश्चर्य वाटलेलं. वॉचमननं लगेच इंटरकॉमवर फोन केला.
“पता है भैय्या, वो मेरा ब्रदर लगता है. अंदर भेज दो और कार पार्किंगमे आज् रातके लिये जगह देदो” मी त्याला सांगितलं. त्या रात्रीनंतर आम्ही परत पहिल्यांदाच भेटत होतो. मला वाटलं की फारच ऑकवर्डनेस असेल, पण त्याच्या वागण्यामध्ये तसं काहीच वाटलं नाही. नेहमीच्या सवयीप्रमाणे तो बोलत होता. येतानाच त्यानं चायनीझ फ्राईड राईस आणि आईस्क्रीम पार्सल आणलं होतं. हे आणायला हॉटेल बरं सापडलं होतं याला. मी त्याला राईस मायक्रोवेव्हमध्ये गरम करून दिला, तसं माझं जेवण आधीच झालं होतं, पण आईस्क्रीमला सर्व गुन्हे माफ असतात.
“तुझे पता है, आईस्क्रीम दूधसे बनती है” माझ्या बाजूला बसत तो म्हणाला.
“थॅंक्स फॉर द जनरल नॉलेज अपडेट” मी टीव्हीचं चॅनल बदलत म्हटलं. सेट मॅक्सवर सूर्यवंशम लागला होता. म्हणजे जगामध्ये सर्व काही नॉर्मल चालू असावं.
“तू दूध पित नाहीस, मग आईस्क्रीम चालतं?”
“आईस्क्रीम चालत नाही आफताब! ते विरघळतं. तसंपण मी आईस्क्रीम खाते कारण मला ते आवडतं. दूध पित नाही कारण ते मला आवडत नाही. जरी दुधापासून आईस्क्रीम बनवत असले तरीही दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. फिजीकल प्रॉपर्टीज वगळ्या आहेत, केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या, त्यामुळे यु कान्ट कंपेअर”
“मी कंपेअर करतच नाहीय फक्त मला कधीकधी तुझी मजा वाटते.”
“मला माहिताय, मीच एकंदरीत तुझ्यासाठी मजेचा मामला आहे. हो ना?” मी अचानक गरज नसताना बोलून गेले.
“स्वप्निल, व्हॉट आर यु सेइंग? वाईट टोमणा मारतेस!” तो अचानक सावरून म्हणाला.
इतका वेळ दाबून धरलेला माझा धीरपण आता बाहेर पडला. “टोमणा नाही, सत्य तेच सांगतेय. त्या रात्रीपासून मला कॉल केला नाहीस. आणि आज अचानक मी तुला घरी बोलवेनच अशी काहीतरी कहाणी रचून मला सांगितलीस. आफताब, मी मूर्ख नाहीये. हे नातं तुझ्यासाठी केवळ फिजीकल रिलेशनशिपवर आहे हे मला माहित आहे तरीही...”
मी बोलत असतानाच त्यानं माझ्या ओठांवर त्याचा हात ठेवला. “काहीही बोलू नकोस. त्या रात्रीनंतर मी तुला काय फोन करणार होतो? वी गॉट ड्रंक, वी स्लेप्ट टूगेदर. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा तू निघून गेली होतीस. मोबाईलवर तुझा “मी पनवेलला जातेय” इतकाच मेसेज. इतकं सारं घडल्यावर फोन करायची माझी हिंमत नव्हती. तू फोन करशील म्हणून खूप दिवस वाट पाहिली. अगदी अझरभाईला पण आडून आडून विचारलं. डोंट वरी. त्याला हे सगळे झोल काही माहित नाही. पण मी आज दिवसभर फक्त तुझाच विचार करतोय. तुला फोन करू का की नको. स्वप्निल, तुझ्या मनामध्ये अजून दुसरंच कुणीतरी आहे असं अझरभाई म्हणाला. त्यानंतर मला समजेना की...”
“तू यामध्ये माझी ढाल का वापरतोस? मला फोन करण्यासाठी तुला इतका विचार करावा लागतो? मी त्यादिवशी निघून गेले, कारण जाग आल्यानंतर तुझ्या मोबाईलमध्ये मला निधीचा ती तुझ्या घरी येत असल्याचा मेसेज दिसला. त्याक्षणी मला जाणवलं की मी किती मोठी चूक केली, तुझ्यासाठी मी केवळ सेक्सटॉय असू शकते, पण मी इमोशनली अटॅच्ड आहे त्याचं काय? निधीशिवाय तू जगू शकत नाहीस हे सांगून माझे कान किटवले आहेस. मग त्यानंतर सर्वच इतकं कॉम्प्लिकेटेड झालं की मी तुझ्यासून दूरच रहायचं ठरवलं. पण ते जमत नाही. आजही तू फोन केलास मी तुला घरी ये म्हटलं. मी स्वत:ला पूर्ण ओळखून आहे, त्यामुळे कदाचित आजची रात्रही आपण एकाच चादरीत घालवू....बट दॅट डझ नॉट मीन दॅट...”
“नाही, स्वप्निल. मी इथं केवळ सेक्ससाठी किंवा... मजा मारण्यासाठी आलो नाहीय. मी.... मला सांगायचंय की, त्या रात्रीनंतर.... मला.... स्वप्निल.. हे फार कन्फ़्युझिंग आहे. आय डोंट नो...”
“इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदा तुला असं अडखळताना बघतेय.”
तो क्षणभर माझ्याकडे रोखून बघत राहिला. “स्वप्निल, निधी चॅप्टर इज ओव्हर फ़ॉर मी. फॉरेव्हर”
“त्यात काय मोठी न्युज आहे. तुमचा ब्रेकप हजारदा होतो, हजार प्लस एक वेळेला पॅचप होतो”
आणि मग अचानक इतका वेळ त्यानं घेतलेला “नॉर्मलपणाचा” मुखवटा धाडकन गळून पडला. त्याचा फोन आल्यापासूनच काहीतरी गडबड असल्याच जाणवत होतं. त्याचं एकंदरीत वागणं उसनं अवसान आणल्यासारखं होतं. खाली मान घालून त्यानं एक एक शब्द उच्चारला. “निधीचं लग्न झालं. आज. दुपारी. साडेतीनवाजता”
ही बातमी खरंच फार शॉकिंग होती. निधीचं लग्न ठरलेलं मला कसं माहित नाही? मला आईपण याबाबतीत काही बोलली नव्हती. गावामध्ये अश्या बातम्या आईला खरंतर आधीपासून माहित होतात.
“काय सांगतोस? पुण्यामध्ये? तू तिच्या लग्नाला गेला होतास?” इतक्या सीरीयस क्षणी बावळट प्रश्न विचारायचे अनेक फायदे असतात. समोरचा स्वत:चं दु:ख विसरून लगेच आपली अक्कल काढायला धावतो. खासकरून समोरचा जर आफताब असेल तर
“वेडी आहेस का स्वप्निल? तिच्या लग्नाला मी जाणारे का? इथं मुंबईत झालं. मुंबईचाच मुलगा आहे पण जॉबसाठी युएसला असतो. टिपिकल आयटी वाला. पंधरा दिवसांपूर्वी लग्न ठरलं. लगोलग झालं. निधीनं तिच्या घरी म्हणजे होणार्‍या नवर्‍याला सांगितलं की तिला एक मुसलमानाचा मुलगा फार त्रास देतो पार कॉलेजपासून, तो गावी हे लग्न सुखासुखी होऊ देणार नाही म्हणून लग्न मुंबईलाच करू या. त्या मुसलमानाच्या गुंडमवाली मुलाला कळू नये म्हणून गावी कुणाला खबर लागू दिली नाही. लकी गर्ल!” पण हे बोलताना आफताबचे डोळे भरून आले होते.
“मला हे आधी का नाही सांगितलंस?”
“मग मी इथं का आलोय? स्वप्निल, तुझ्याखेरीज कुणाला हे सांगू? मलाच आज सकाळी समजलं. काय करावं सुचेना, घरामध्ये स्वत:ला संपवायचे विचार यायला लागले. अझरभाईला फोन केला तर तो म्हणाला की कामासाठी गोव्याला गेलाय. आपण उद्या बोलू. मग मी काय करणार! सगळं जग हरल्यासारखं वाटतंय. निधी मला सोडून गेली याचं काही नाही. ते आजनाउद्द्या होणार होतं. मला पक्कंच माहित होतं. पण तरीही अखेर तिनं माझी किंमत गुंड पोरगा इतकीच केली. काय त्रास देणार होतो मी तिला? तोंडावर येऊन सांगायचं होतं ना, की ब्वा आफताब! माझ्यामध्ये वेगळ्या धर्मातल्या मुलाशी लग्न करण्याची हिंमत नाही. माझ्या आईवडलांची जगामध्ये जी काय नाचक्की होइल त्याची मला जास्त पर्वा आहे. तर आपलं जे काय नातं होतं ते ठिक, पण मी दुसर्‍याशी लग्न करतेय. इतकं कबूल जरी केलं असतं ना तरी मी मानलं असतं. खैर! जे घडलंय ते ऑलरेडी घडून गेलंय. माझ्याकडे आता मन मोकळं करायला कुणीही नाही. फ्रेंड्स नाहीतच. तूच एक होतीस. तुझ्याहीसोबत त्या रात्रीनंतर नात्यामध्ये विनाकारण कॉम्म्प्लीकेशन्स आलेत. आय नो, मी तेव्हा चुकलो.”
“आपण दोघंही चुकलो”
“तसं म्हण. पण सत्य हेच की, मी माझ्या आयुष्यामध्ये असलेली एकमेव मैत्रीण तेव्हा गमावली. मला तुला गमवायचं नाहीये, फ़रगेट फिजिकल रिलेशनशिप ऍंड ऑल दॅट. मला माझी बेस्ट फ्रेंड परत हवीये. मी इथं मजा मारायला आलो नाहीय स्वप्निल. माझ्या प्रेमभंगाच्या दु:खावर रडण्यासाठीही आलो नाहिये. मला फक्त एक आधार हवाय. स्वप्निल, शक्य झालं तर ती रात्र आपल्या आयुष्यामध्ये आलीच नाही असं समज किंवा त्या रात्री मी तुझ्या गैरफायदा घेतला असं समज. पण आज मी इथं आलोय ते केवळ एक मित्र म्हणून!”