Monday 29 February 2016

MADरास ४

मागच्या दोन तीन लेखांमध्ये मद्रासला आल्यानंतरचे झालेले त्रासच बरेचसे लिहिले गेलेत. जसे वाईट अनुभव आले तसे चांगलेही अनुभव आलेच, पण वाईट अनुभव कधीही मनावर जास्त रूजले जातात. चांगले अनुभव मात्र सटीसमाशी कधीतरी आठवलेच तर अन्यथा कडू अनुभवच जास्त मनात रेंगाळतात.


पहिला महिनाभर मंगलोरवरूनच आणलेला किराणा संपल्यावर “किराणा भरणे” या लढ्याची सुरूवात झाली. तेव्हा गावामध्ये किराणा-वाणसामानाची एकूणात चार दुकानं होती. चार दुकानांपैकी दोन दुकानदारांनी “तमिळ तेरीम्मा?” या प्रश्नावर नकारार्थी उत्तर दिल्यावर “घ्यायचं तर घ्या, नाहीतर चालते व्हा” टाईप उत्तर दिलं. अजून एका मारवाड्याच्या दुकानामध्ये अळ्याकिड्यांच्या वसाहतीमध्ये काहीबाही तांदळाचे आणि डाळीचे वगैरे दाणे दिसत होते. एवढे पैसे देऊन किडे विकत घ्यायचे नसल्याने मोर्चा चौथ्या दुकानात वळवला. या अंकलना अजिबात हिंदी येत नव्हतं, पण मदत करायची इच्छा मात्र होती. त्यांनी सरळ काऊंटरवरची फळी काढून मलाच दुकानात बोलावलं आणि काय काय हवं ते डब्यांमधून दाखवायला सांगितलं. हे एक बरं झालं. भाजीच्या दुकानामध्ये हीच ट्रीक कामी येत होती. पण किराण्याचा एक मोठा प्रॉब्लेम होता, तो म्हणजे मला असलेले सर्वच आयटम्स या दुकानामध्ये उपलब्ध नव्हते.


मी स्वयंपाकघर चालवायला शिकले ती २००५ नंतर. तोपर्यंत आई जिंदाबाद. नंतर हॉस्टेल झिंदाबाद! नंतर बेलापूरला एकटं रहायला लागल्यावर रोजच्या रोज बाहेरून ऑर्डर करून जेवणे इथपासून ते रोजच्या रोज घरी स्वयंपाक करणे हा प्रवास मी एकटीनंच केलाय. इतरांसारखे आईबाईंच्या हाताखाली स्वयंपाकाचे धडे न घेतल्यानं माझा किचनवावर हा मुख्यत्वेकरून पॅक्ड फ़ूड्स, रेडीमेड आणि इन्स्टंटवर राहिला होता. लग्न झाल्यावर आणि मंगलोरला गेल्यावरही यातलं काहीच बदललं नव्हतं. महिन्याचा किराणा म्हणजे मॉलमध्ये जाऊन सुपरमार्केटमधून भसाभसा पिशव्या उचलून कार्टमध्ये टाकणे. मनाली न्यु टाऊन हे काळाच्या वीस वर्षं मागं असल्यानं इथं असले चोचले नव्हते. रीडीमेडमध्ये मिळणारे पाकिटं ठराविकच होती. पास्ता, नूडल्स, वेगवेगळे सॉस, तयार जॅम, जेली, मेयॉनिज, सॅलड ड्रेसिंग, चीज, बटर, फ्रोझन मटार, भाज्या  वगैरे काहीही इथं मिळत नव्हतं. हा वेगळाच मोठा प्रॉब्लेम होता. परिणामी, इथून जवळ्पास कुठला मॉल आहे याची चौकशी सुरू केली. “किराणासामान घेण्यासाठी या बाईला मॉलची काय गरज?” हा प्रश्न तिथं बहुतेकांना पडत होता. माझ्याकडं उत्तर नव्हतं. इथं बहुतेक घरांमध्ये वर्षाचे डाळ तांदूळ भरायचे, आणि महिन्याला लागेल तेवढंच सामान आणायचं अशी पद्धत. जेवणामध्ये भात-सांबार-रस्सम, आणि भाज्यांचे कूटू पोरीयल वगैरे प्रकार महत्त्वाचे. आहारामधला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे इडली डोसा इत्यादि आंबवलेले पदार्थ. पोळी-पुरी हे मुख्य जेवणाचे भाग नाहीत तर ते “टीफीन आयटम्स” म्हनजे नाश्त्याचे प्रकार. अशावेळी आमचं सामान नक्की हवं म्हणजे सांगणार कसं? शिवाय बर्‍याच गोष्टी ज्या मला हव्या तशा मिळत नव्त्या. इथं सर्रास दुकानांमधून मिळणारं तेल तिळाचं किंवा सूर्यफुलाचं. शेंगदाण्याचं तेल अजिबात मिळायचं नाही (ब्रॅंडेड, नॉन ब्रॅंडेड दोन्हीही)



 परीणामी, अण्णानगरच्या मॉलमध्ये कार भाड्यानं घेऊन गेलो आणि हवं ते सामान घेऊन आलो. हे दर महिन्याला अर्थात परवडण्यासारखं नव्हतं. तरी सध्या इलाजच नसल्यानं गाडं असंच ओढत होतं. मग कार घेऊन नुसतं किराणा आणण्यापेक्षा दिवसभर मद्रास फिरणे, बाहेरच मस्तपैकी जेवणे आणि संध्याकाळी मॉलमध्ये जाऊन जमके शॉपिंग करना असा कार्यक्रम आम्ही सुरूवातीचे काही महिने आखला. नंतर तो कार्यक्रम का बंद पडला ते नंतर सांगेनच.



पण आजचा विषय तरी मद्रासची तोंडओळख हाच-
पूर्व किनारपट्टीवर बंगालच्या उपसागराजवळ बसलेलं हे भलंमोठं शहर म्हणजेच मद्रास उर्फ चेन्नई. याचं ब्रिटीशांनी ठेवलेलं नाव मद्रास. नंतर बर्‍याच वादविवादग्रस्त विचारांती याचं नाव बदलून ठेवलं चेन्नई. मद्रास हे नाव खरंतर ब्रिटीशांनी इथं शहर वसवण्याआधीपासूनच प्रचलित आहे. चेन्नई ही भारतामधलं सेकंड इंडस्ट्रीयल कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहे. डॅट्रॉइट ऑफ इंडिया असंही या शहराला कौतुकानं म्हट्लं जातं इतके इथं गाड्यांचे कारखाने आहेर्त.



खरंतर मद्रास हे नाव जास्त प्रचलित होतं, पण १९९६ मध्ये तत्कालिन शासनाने हे नाव बदलून चेन्नई हे नाव औपचारिकरीत्या रूढ केल. पण प्रश्न हा की, या गावाचं मूळ नाव चेन्नई की मद्रास? यामागे अनेक थेअरीज आहेत त्यापैकी, मद्रासपट्टणम हे सेंट जॉर्ज फोर्टजवळचं एक छोटंसं खेडं होतं. इथली मुख्य वस्ती ही मासेमार लोकांची होती, ही जास्त प्रसिद्ध आहे त्याखेरीज. हे नाव पोर्तुगीजांनी दिलं. फ्रेंचांनी दिलं, इथल्य स्थानिक राजांनी दिलं, हा मद्रसाचा अपभंश आहे वगैरे अनेक् थेअरीज इथं प्रचलित आहेत. यामधेय चेन्नी म्हणजे चेहरा हे तमिळ नाव इथपासून ते पोर्तुगीज, फ्रेंच, तेलुगु वगैरे कित्येक शब्दांवरून ही नावं पडली असावीत असं विकीपीडीया सांगतंय. सध्या तरी या सर्वच थेअरीज आहेत आणि नक्की इतिहास कुणालाच माहित नाही. थेअरीज मांडणं आणि खोडणं हा इतिहासकारांच्या कामाचा विषय आहे, आपला नव्हे. त्यामुळे आपण तरी या शहराचं नाव मद्रास आणि चेन्नई असं दोन्ही धरून चालूया. मी राहत असलेला भाग हा मद्रासपट्टणम या खेड्याच्या आसपासचा असल्यानं मी मद्रास म्हणणं जास्त योग्य ठरतं.  मद्रासला दक्षिण भारतामधलं सर्वात महत्त्वाचं शहर म्हणायला हवं. भारताच्या पूर्वकिनार्‍यावर (कोरामंडल किनारा असंही म्हणतात) वसलेलं हे शहर लांबच लांब पसरलेलं आहे. चेन्नईचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे इथं मुंबईसारख्या इमारतींची जिचकीगर्दी जाणवत नाही. जितक्या इमारती दिसतात त्याही अशा मोठ्यामोठ्या उंच टॉवर्स नसलेल्या. हे अर्थात साऊथ चेन्नईसाठी खरं नाही. हा आयटीहबचा भाग. कुठल्याही मोठ्या शहरातली ही आयटी हब्ज एकाच रंगारूपाची दिसतात, त्यामध्ये वेगळेपणा असा काही नसतोच. पण शहराचा जर आत्मा बघायचा असेल तर त्या शहराच्या जुन्या भागांतून फिरावं, मग ते शहर अस्सल चेहरा घेऊन सामोरं येतं. प्रत्येक वेळी हा चेहरा भावेलच असं नाही, पण त्याची अस्सलता मात्र अनुभवण्यासारखीच असते.



जुन्या चेन्नई शहराचे मुख्य भाग म्हणजे फ़ोर्ट सेंट जॉर्ज, पॅरीज वगैरे उत्तर चेन्नईकडचा भाग. मायलापोर हादेखील चेन्नईचा महत्त्वाचा भाग. या भागात एकेकाळी खूप मोर होते म्हणून त्याचं नाव मायलापोर. मायिल म्हणजे तमिळमध्ये मोर. (यावरूनच इथल्या प्रसिद्ध लोकनृत्याचं नाव मायिलअट्टम- यामधेय नर्तक मोरासारखा पिसारा लावून नाचतात. अट्टम म्हणजे नृत्य. हे असंच उगाच आपलं माहितीसाठी!) मी जास्त फिरले तो भाग फोर्ट सेंट जॉर्ज, पॅरीज वगैरे. मी जिथं राहते तिथून हा भाग जवळ आहे, आणि या भागात बरीच दुकानं आहेत. 


चेन्नईमधला उन्हाळा हा सर्वांसाठी महत्त्वाचा “इशू” असतो. इथलं वातावरण वर्षभर साधारण सारखंच अस्तं. मे आणि जून हे सर्वात गरम महिने. इथं त्यांना “अग्नि नक्षत्रम” असंच म्हणतात. अंगावर अक्षरश: गरम गरम वार्‍याचे झोत जाणवतात. तापमानाचा आकडा सहजपणे चाळीशी पार करतो. इतकं ऊन असताना दुपारच्यावेळी बाहेर पडणं मूर्खपणाच असतो. कोकणात आयुष्य काढलेलं असल्यानं मे महिन्याच्या गर्मीची आम्हाला चांगलीच् सवय होती. पण गमतीची गोष्ट म्हणजे कोकणापेक्षा इथला उन्हाळा सुसह्य वाटला. कोरडसर वातावरण असल्यानं घाम जास्त येत् नाही. आमचं कोकण निसर्गसौंदर्यानं नटलेलं वगैरे आहे, पण इथली आर्द्रता प्रत्येकाला सहन होतेच असं नाही. चेन्नईचा उन्हाळा भाजून काढतो, पण खूप पाणी घामावाटे गेल्यानं जो मरगळलेपणा जाणवतो तो इथं जाणवत नाही (तरीही... उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही क्कोकणात जातोच! बात हककी भी तो है) ऑक्टोबर ते डिसेंबर इथं पावसाळा असतो. पण परत एकदा कोकण किंवा मुंबईच्या पावसाळ्याशी तुलना केली तर हा पाऊस म्हणजे विनोदच. कोकणात एकदा पाऊस लागला की आठआठ दिवस उसंत घेत नाही सूर्याचं दर्शन मुश्किल होतं. इथे पाऊस जेमतेम दोन तीन तास धुवांधार कोसळतो आणि लगेच आकाश मोकळं होतं. अर्थात याला सणसणीत अपवाद म्हणजे २०१५ च्या  नोव्हेंबरमधेय झालेला प्रचंड पाऊस आणि चेन्नई  पूर्मय झालेली. त्यावर सविस्तररीत्य अनंतर लिहिणारच आहे.


चेन्नई सर्वात सुंदर असतं ते डिसेंबर ते फेब्रूवारीमध्ये. तापमान साधारण वीसपेक्षा कमी होतं. चेन्नईच्या संगीत कचेरींचा, लग्नांचा आणि अनेक कार्यक्रमांचा सीझन चालू होतो. रस्ते कांजीवरमनी, जाईमोगर्‍याच्या गजर्‍यांनी, सोन्याच्या दागिन्यांनी भरून जातात. चेन्नईचं सोशल लाईफ एकदम हॅपनिंग होतं. अशावेळी चेन्नई फिरायला फार मजा येते.

चेन्नई शहरांमधून दोन नद्या वाहतात, अड्यार नदी (तुम्हीजर तमिळ सिनेमा पाहत असाल तर बर्‍याच सिनेमांमध्ये पाहिला असेल) दुसरी नदी कूवम नदी. या दोन्ही नद्यांना जोडलेला कालवा म्हणजे बकिंगम कालवा. सध्या हे सर्वच प्रकरण नदी-कालवा म्हणायच्या लायकीचं राहिलेलं नाही, मोठमोठी गटारं म्हणता येतील. तिसरी नदी कोर्तालैयार नदी आमच्या गावाजवळून वाहते आणि एन्नोरच्या समुद्रामध्ये जाऊन मिळते. तोची खाडी आमच्या घरापासून जवळच आहे, तिथे कधीमधी आम्ही संध्याकाळी भटकंतीसाठी जातो.



चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी असल्याने तमिळ भाषा ही इथली प्रमुख भाषा. त्याहीखेरीज तेलुगु, कानडी, इंग्रजी या भाषा बहुतेकांना बोलता येतात. इथला हिंदीविरोध हा जगप्रसिद्ध असलातरी बदलत्या काळानुसार हिंदी हीदेखील इथे बर्‍यापैकी बोलली जाते. चेन्नईमधला एक व्यापारी भाग सावकार पेट म्हणून ओळखला जातो. (पेठा फक्त पुण्यातच आहेत असा अभिमान बाळ्गणार्‍यांसाठी खास माहिती: चेन्नईमधेय बहुतेक ठिकाणांची नावे अमुकपेठ वगैरे आहेत. तमिळमध्ये ठ नसल्यानं ट लिहिलं आणि बोललं जातं) हा सावकार पेट प्रामुख्यानं मारावडी गुजराती व्यावसायिक लोकांचा भाग आहे. इथल्या दुकानदारांबद्दल आणि अफलातून खाद्यसंस्कृतीबद्दल नंतर सेपरेट भाग टाकण्यात येतील.


जशी चेन्नईमध्ये फिरायला, इथल्या स्थानिक लोकांशी बोलायला आणि एकंदर जीवनशैलीसोबत जुळवून घ्यायला सुरूवात झाली तसं राहणं अधिकाधिक सुखकर होत गेलं.


मद्रासमध्ये येऊन हळूहळू इथल्या वातावरणाशी, भाषेसोबत, लोकांसोबत परिचय होऊ लागला आणि “हे वाटलं होतं तितकं वाईट नाही” अशी भावना मनात येऊ लागली. हे गावच आता काही दिवस “आपलं” आहे हे मनाला पटायला लागलं आणि इथलं राहणं अधिक सुखकर होत गेलं.

शेवटी म्हट्लंच आहे. जहां पे बसेरा हो सवेरा वही पे.



No comments:

Post a Comment