Thursday 28 November 2013

समुद्रकिनारा (भाग ८)

साराने परत एकदा मागे वळून पाहिलं. वीरची कार पुढे जाऊन थांबली होती. सारा गेटमधून आत गेली की नाही ते बघायला. तिला वाटलं त्याला परत फोन करावा, आणि त्याच्यासोबत इथून निघून जावं. पण आता तसं केलं तर वीर नक्की चिडला असता. साराने हिंमत करून गेट उघडलं. समोर निरनिराळ्या फ़ुलांची बाग होती. एकीकडे आंब्याचं, फ़णसाचं झाड होतं. बंगल्याकडे जाताना परत एकदा साराच्या मनामधे भिती दाटून आली. मागच्या वेळेला तिचं आणि वीरचं भांडण झालं होतं तेव्हा रसिका तिला वाट्टेल ते बोलली होती. वीरने लग्नाबद्दल तिला सांगितल्यावर तिने सगळं ऐकून घेतलं आणि नंतर शांतपणे “एक दिवस तुझ्या होणार्‍या बायकोला माझ्या पुण्याच्या घरी यायला सांग. एकटीच” एवढंच सांगितलं होतं. याआधी रसिकाला बर्‍याचदा भेटलेली असली तरी इथे पुण्याला पहिल्यांदाच आली होती.
पण सारा यायला तयारच नव्हती, वीर आला तरच ती येईन, असा तिचा हट्ट. कसंबसं वीरने तिला समजावलं. पुण्यापर्यंत तिच्या सोबत म्हणून तो आला, पण रसिकाच्या घरी मात्र तिने एकटीनेच जायला हवं होतं.
तिनं घाबरतच बंगल्याच्या दाराची बेल वाजवल्यावर जवळ जवळ पाच मिनिटांनी दरवाजा उघडला, समोर प्रसन्न चेहर्‍याने हसत रसिका उभी होती. पन्नाशीचं वय गाठूनदेखील तुकतुकीत आणि स्वच्छ चेहरा, तेजस्वी डोळे, आणि वीरसारखीच समोरच्याला आपल्या मनामधे नक्की काय चालू आहे ते एका क्षणात सांगणारी नजर. तिच्या हसर्‍या चेहर्‍याकडे पाहून साराची भीड जरा चेपली, रसिका तिला पाहून नक्कीच खुश होती.
“ये गं, घर सापडायला प्रॉब्लेम नाही ना झाला?” रसिकाने विचारलं. “पहिल्यांदाच आलीस ना तू इथे?”
“नाही, तसं लगेच मिळालं” सारा आत येत म्हणाली.
“बरंय, नाहीतर वीर इकडे वर्षातून एकदा येतो आणि नेमका रस्ता चुकतो.. मग मला फोन करून कसा येऊ म्हणून विचारत बसतो.... यावेळेला मात्र बरोबर घेऊन आला ना तुला?” रसिका म्हणाली. साराला क्षणभर काय बोलावं ते सुचेना.. “मला माहितेय गं, वीरसोबत आलीस तू. मी टेरेसवर होते, तेव्हा त्याची कार पाहिली. आधी खाली उतरलीस, गेटपर्यंत आलीस, मग परत गेलीस. मग वीरची आणि तुझी बोलाचाली झाली, मग परत गाडीत चढलीस, परत उतरलीस, मग तू इथे घरात येइपर्यंत तो त्या रस्त्याच्या कोपर्‍यावर उभा राहून बघत राहिला... मी टेरेसवरून सगळी गंमत बघत होते. कैदाशिणीच्या घरी चालल्यागत भेदरायला काय झालं तुला? आणि तो दीडशहाणा आला असता तरी मी काही नको म्हटलं नसतं”
“पण मॅम म्हणजे... ते असं झालं... की....” सारा गडबडली.
“एरवी चांगली पटपट बोलत असतेस की, मग आज का गाडी अशी अडखळतेय? मी म्हटलं होतं एकटीच ये म्हणून कारण तुझ्याशी थोड्या गप्पा मारायच्या होत्या.. वीर आला असता तर त्याच्या कौतुकातच सगळा वेळ गेला असता, आणि मला तुझ्याशी पोटभर बोलणं झालंच नसतं..” रसिका म्हणाली, “चहा घेतेस का? आणि ब्रेकफ़ास्टला काय बनवू ते सांग”
“मॅम, तुम्ही बनवणार? आय मीन...”
“आज सगळ्यांना सुट्टी दिलीये. हे निवडणुकीचं काम चालू झाल्यापासून निवांतपणा असा नाहीच. आज म्हटलं काही गडबड नको... निवांत राहू दोघी. तुझ्या वीरला सगळा स्वयंपाक मीच शिकवलाय, त्यामुळे घाबरू नकोस माझ्या कूकिंगला. आणि हे मॅम काय नवीन? आई म्हण सरळ मला. तो एक शहाणा मला सरळ रसिकाच म्हणतो हल्ली. संध्याकाळी तुमचे होणारे यजमान तुम्हाला घेऊन जाणार आहेत का?”
रसिकाच्या या बोलण्याचं साराला हसू आलं. “नाही, ते.. आय मी तो.. म्हणजे गेले लगेच मुंबईला परत. मी बसने जाईन.”
“घे फ़िरून बसने वगैरे. एकदा मिसेस सुपरस्टारचा शिक्का बसला की मग असं राजरोस फ़िरणं मुश्किल व्हायचं. बरोबर ना?”
“तसं काही नाही म्हणा....” सारा बोलता बोलता बंगल्याचं निरीक्षण करत होती. समोरच्या भिंतीवर वीरचे लहानपणापासूनचे सर्व फोटो लावलेले होते. बंगला खूप साधेपणाने तरी निगुतीने सजवला होता. हा रसिकाच्या आईवडलांचा आणि नंतर भावाचा बंगला, तो युएसला सेटल झाल्यवर वीरने दुप्पट किंमत घेऊन विकत घेतला, याच घरातून एकदा रसिकाला बाहेर काढलं होतं म्हणे.
थोडावेळ रसिका आणि ती इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिल्या. रसिकाने चहा आणि सोबत खायला म्हणून असंच काहीबाही आणून ठेवलं. गप्पा मारता मारता हळू सारापण मोकळेपणाने बोलायला लागली.
“मग लग्नाची तारीख ठरली की नाही तुमची?” रसिकाने किचनमधे कामाला सुरूवात करत म्हटलं.
“हो. पुढच्या महिन्यात सोळा. वीरने सांगितलं आहे ना तुम्हाला...”
“म्हणाला तो असंच काहीतरी. अगदी आठवणीने लग्नाला ये असंसुद्धा म्हणालाय बरं का..” रसिका हसत म्हणाली.
“आई, प्लीज. वीरने तुमच्याशी डिस्कस केल्याखेरीज इतका मोठा निर्णय घेणार नाही हे माहित आहे मला...”
“मागच्या वेळेला केली होती चर्चा, तेव्हाच मला काय वाटतं ते मी सांगितलं होतं, पण मग तुमचं लग्न मोडल्यावर.. लग्न नाही पण साखरपुडा मोडल्यावर इथेच आला होता दोन तीन दिवस. तेव्हापण बरंच काही बोलला. आतापण रोज फोन येतोच त्याचा.... पण यावेळेला मला तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणून तुला इथे बोलावलं. सरस्वती, तू एकदा माझ्या मुलाला लग्न करते असं सांगून मग नातं तोडलं होतंस. आठवतंय ना? परत तसंच करणार नाही हे कशावरून?”
“नाही, प्लीज. खरंच तसं काहीही नाही. मागच्याही वेळेला वीर आणि माझं भांडण झालं होतं हे खरं आहे.. पण त्याला सोडून द्यायचं वगैरे असलं काहीही नव्हतं, परिस्थितीच अशी होती की.....”
“हे बघ, सरस्वती, मी तुलाच काय पण जगात कुणालाही कसल्याही नातेसंबंधाबद्दल कसलाही सल्ला देऊ शकत नाही, एक वीर सोडला तर मला माझ्या जवळचं दुसरं कुणीही नाही, त्याला कसल्याही बाबतीत दुखावलेलं मला सहन होणार नाही.... म्हणून इतकंच सांगेन, की एकदा वीरचा हात धरशील तो सोडू नकोस. विनंती समज खरंतर”
“आई, एवढ्या चढ उतारानंतर आता कुठे आमचं नातं नीट सुरू होतंय. मला जर वीरचा हात सोडायचा असता तर खूप आधी सोडला असता मी.... पण मला ते खरंच करायचं नाही, वीरने जे माझ्यासाठी केलं ते मी कधीच् विसरू शकत...”
“मुली, अगं उपकाराच्या ओझ्याने प्रेमाची नाती बनत नसतात. प्रेम मनामधून यावं लागतं.”
“ही सगळी पुस्तकी भाषा आहे. असं खरंच जगात काहीही नसतं, प्रेम वगैरे ऐकायला ठिक आहे, प्रत्यक्षात समजा असलं तरीही... “
रसिका हसली. “याबाबतीत तुझे आणि माझे विचार खरंच जुळतात... फ़रक एवढाच आहे की माझ्या आयुष्यात कुणी आलंच नाही.. प्रेम वगैरे काय आहे ते सांगायला... आणि तुझ्या आयुष्यात वीर आहे..” एक सेकंदभर थांबून ती म्हणाली, “... साहिल आहे...”
सारा काही न बोलता शांत बसून राहिली.
“काय गं? गप्प का बसलीस?” रसिकाने दोनेक मिनिटांनी विचारलं. “पोहे चालतील ना तुला? की वीरसारखे तुझेपण काही डायेटचे नखरे आहेत?”
“मला टपरीवरचा वडापाव पण चालेल, पण पोहे बेस्ट आहेत... काही मदत करू का?”
“नको. बस निवांत.”
सारा किचनच्या जवळ एक खुर्ची घेऊन बसली “काय चिरायचं वगैरे असलं तर द्या”
“खरंच नको गं. काही मदत लागली तर सांगेन मी तुला.. बरं, महत्त्वाचं बोलू, आता लग्नाचं काय काय ठरलंय तुमच्या?”
“अलिबागजवळ एक छोटंसं गाव आहे. तिथे राजन एक बंगला बूक करतोय. सगळी मिळून पन्नास साठ माणसं असतील आणि साधं लग्न करायचं. माझी इच्छा आहे म्हणून वैदिक पद्धतीने पण लग्न. नाहीतर वीर रजिस्टर लग्नावर अडून बसला होता, थोडक्यात करणार सगळे विधी. कन्यादान सुधीर देशमुख करणार, नाव काय बदलणार ते वीरने सांगितलं का तुम्हाला?
“बोललाय तो मला. पर्सनली, मला ते खूप आवडलंय, इन फ़ॅक्ट तीच पद्धत बरोबर आहे, आणि तुझ्या घरचं कुणी येणार नाही?”

साराने मान हलवली. “तू बोलावणार तरी आहेस का?”
“कुणाला बोलावणार? काका मरून गेला. काकू आली तर येईल कदाचित पण चुलत भावंडांशी काही संपर्कच नाही, गावामधेच आहेत ते. शिकले नाहीत आणि गावगुंडागर्दीत रमलेत. लग्नाला बोलावलं तर स्टार गेझिंगसाठी येतील ते. माझ्यासाठी येणारं कुणी नाही...” सारा हळू आवाजात म्हणाली.
“आणि साहिल? तो नाही का येणार?” रसिकाने अचानक विचारलं. साराने चमकून पाहिलं.
“तो आला तर वीरला चालणार आहे का? साहिलच्या नावाने सुद्धा राग येतो त्याला. साहिलला मी केव्हाच माफ़ केलंय खरंतर.. पण वीर!! तो अजून काहीच विसरला नाही... तुम्हाला माहितच असेल तुमचा मुलगा किती पझेसिव्ह आहे ते” सारा विषय बदलत म्हणाली, “शिवाय हे लग्न करून माझ्यावर उपकारच करतोय तो” ती चेहर्‍यावर मुद्दाम हसू आणत म्हणाली. “काय करायचं नाही याचीच यादी मोठी झाली आतापर्यंत. जास्त लोक नको, म्युझिक नको, लाईटींग नको, चकमकीत ड्रेस नको, इंडस्ट्रीमधलं कुणी यायला नको, हनिमूनला जायला नको, मी काम करणं सोडायला नको...”
“काही चिंता करू नकोस, तुमच्या या लग्नाचा फ़ार्स एकदा संपला की मी इथे पुण्यात मोठी पार्टी करणार आहे. सगळी साग्रसंगीत आणि व्यवस्थित, माझ्यासमोर त्याची ही नको नकोची तुणतुणी काही चालणार नाहीत. तेव्हा करेन तुझी हवी तशी हौस. बरं आठवलं मला, तुला लग्नाच्या विधीसाठी कसली साडी घ्यायची आहे?”
“छान दिसेल अशी, मराठी पद्धतीने नेसतात ना.. तसली, असा इकडचा पदर तिकडे घेऊन आणि इथे अशी पिनप करतात तसली साडी...पण ते टिकल्या जरी लावलेली नको हां,.. वीर त्याला डिस्को लाईट्स म्हणतो..” रसिकाला अचानक हसू आलं “बरंच द्न्यान आहे गं तुला साडीबद्दल..”
“प्लीज चेष्टा करू नका...” साराचा आवाज थोडा दुखावलेला होता.

“ठिक आहे, आपण जाऊ दोघी शॉपिंगला, मला तुझ्यासाठी पैठणी घ्यायची आहे... दागिने पण मीच घेईन. तुला चालेल ना?” रसिका अजून हसत होती.
“साडीमधे वगैरे... मला खरंच त्यातलं काही जास्त माहिती नाही. कुणाकुणाचे जुने कपडे घालत माझं लहानपण गेलं त्यामुळे...”

“अगं, सरस्वती” रसिकाने येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला, “खरंच, मी काही चेष्टा करत नाही बाळा तुझी. तुला जशी हवी असेल तशीच साडी आपण घेऊ की. तू पण असशीलच ना माझ्यासोबत? मला तरी काय गं, वीर एकटाच! त्याच्या सुखामधेच मला सुख. त्याने तुझ्यासारखी मुलगी निवडली याचंच मला अजूनही कौतुक आहे. ग्लॅमरमधल्या नुसत्या शोभेच्या कचकड्या बाहुल्यांपेक्षा तू... स्वत:चा निर्णय स्वत: घेणारी आणि त्याहून फ़ार महत्त्वाचं म्हणजे त्याच्या स्टारडमला न भुलणारी. चुकून तुला दुखावलं असेल तर आय ऍम सॉरी बेटा..”
“एवढी पण काही मी सेम्टीमेंटल नाहीये.” सारा अचानक हसत म्हणाली, “हे असं सॉरी वगैरे म्हणू नका, आणि अगदी खरं बघायला गेलं तर त्यामधे असं वाईट वगैरे वाटून घेण्यासारखं पण काही नाही. मला खरंच काही माहित नाही त्यामधे. फ़ॅशनच्या बाबतीत कंप्लीट ढ आहे मी... दागिन्यांवरून आठवलं... वीरने खरंतर तुम्हाला सांगू नको असं बजावलं आहे, पण...” साराने तिच्या बॅगमधून एक ज्वेलरी बॉक्स काढून रसिकाच्या हातात दिला. “इंडस्ट्रीच्या सुपरस्टारने हे म्हणे त्याच्या फ़ेवरेट जर्नालिस्टला लग्नानिमित्त दिलेले गिफ़्ट आहे.”
रसिकाने बॉक्स उघडून पाहिला, “रोहितने दिलं हे तुला?”
“हो! वीर तर घराबाहेर फ़ेकायला निघाला होता. पण मी म्हटलं राहू देत. तुम्ही जे म्हणाल तसं. खरंतर मला नेकलेस वगैरे आहे हे माहित नव्हतं. इंटरव्ह्युला गेले होते तेव्हा निघताना त्यांनी दिलं. फ़िल्म प्रमोशनचं मटेरीयल असेल म्हणून मी घेतलं. घरी आल्यावर बघितलं. सोबत एक छानशी नोटसुद्धा आहे.”
“बरं केलंस. वीरने तुला सांगितलं की नाही माहित नाही, पण गेले कित्येक दिवस रोहित वीरसोबत पॅच-अप करायच्या मार्गावर आहे. त्याला भेटतोय, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. वीर आहे तसाच अडेलतट्टू. पण रोहित... रोहितपण अक्षरश: त्याच्यापाठी लागलाय. इतक्या वर्षानंतर त्याला मुलाचा कळवळा आलाय...”
“मागे ते त्याला भेटले होते तेव्हा त्यानेच लग्नाचं सांगितलं. त्यांना असं वाटतंय की वीर बोलावेल म्हणून पण वीरने त्यांना लग्नाला बोलवायचं नाही असं स्पष्ट सांगितलंय.. पण मी इंटरव्युच्या वेळेला भेटले तेव्हा ते म्हणाले की आता तू माझी फ़ॅमीली मेंबर आहेस...”
“आता म्हणून काय उपयोग? जेव्हा म्हणायचं होतं आणि ज्याला म्हणायचं होतं… तेव्हा खरं महत्त्व होतं, नाही? ” रसिका म्हणाली.
सारा क्षणभर गप्प राहिली. “मी एक विचारू तुम्हाला? तुम्हाला कधीच असं वाटत नाही की मागे जाऊन आपला भूतकाळ बदलावा? एखादी अशी गोष्ट...”
“खूप वेळा वाटतं की गं. शेवटी मी पण माणूसच आहे, अगदी वीर लहान होता ना... तेव्हा तर रोज वाटायचं.. काय मिळालं मला? माझा हट्ट होता, म्हणून वीर जन्मला. माझा हट्ट होता, म्हणून मी इंडियात परत आले... पण या सगळ्यामधे माझ्या स्वत:च्या आयुष्याचं किती नुकसान झालं.... त्याचा ताळेबंद मांडायची आता वेळ नव्हे.. पण तरी...” रसिका थांबली.
“तुम्ही मागे पण एकदा या विषयावर बोलता बोलता थांबला होतात.. आज सांगा ना.. मला खरंच जाणून घ्यायचंय.. जेव्हा… जेव्हा साहिलने मला सोडलं तेव्हा तुमच्या एवढी तर होते मी वयाने..... मी तेव्हा जीव द्यायला निघाले होते... पण तुम्ही हा सगळा प्रवास एकटीने केलात. कुणाचीही काही मदत न घेता.. मला शक्य नाही झालं ते. वीरच्या कुबड्या घेऊनच जगतेय आजपण.”
“आणि मी कुणाच्या कुबड्या घेऊन जगतेय गं? वीर होता म्हणूनच... वीरचा जन्म होइपर्यंत मात्र मलाच खात्री नव्हती. तो अगदी तीन चार वर्षाचा होईपर्यंत दिशाहीनच होते मी.. काय करू आणि काय नाही. तिथे दूर लंडनमधे होते, इथल्या कुणाशीही संपर्क नव्हता. माझ्या आईवडलांनी तर बोलणं पण नव्हतं.... तिथे राहून कामं मिळालीच असती. इथे भांडण कुणाशी तर इंडस्ट्रीच्या राजकुमारासोबत. एका फ़टक्यात मी बाहेर फ़ेकले गेले… परत आले तरी सर्वांच्या नजरेत गुन्हेगार मीच. पण एकदा मनाशी निश्चय केला.. किती दिवस पळायचं आपण आपल्यापासूनच लांब. परत यायचं. वीरला इथेच लहानाचं मोठं करायचं, मग त्यासाठी काय वाटेल ते करायला लागलं तरी चालेल. पण कुणाची मदत घ्यायची नाही, आपण आणि आपला मुलगा एवढंच विश्व ठेवायचं… हिंदीचा रस्ता तर केव्हाच बंद झाला होता. मराठीमधे काही नाटकं आणि थोडेफ़ार साईड रोल्स मिळाले, सुदैवाने तेव्हा ते मालिका वगैरे चालू झाल्या आणि मग बरंच काम सुकर झालं... प्रश्न पैशाचा नव्हता, समाजाकडून सतत मिळणार्या अपमानाचा होता, तुला माहितीये मी तेव्हा जर कधी कुठल्या फ़ंक्शनला गेले तर सगळ्या बायका जाऊन आधी आपापल्या नवर्याच्या बाजूला जायच्या, जणू काही तिथल्या तिथे मी यांचे नवरे पळवणारच होते… आणि रोहित!! तो मात्र अशा ठिकाणी ताठ मानेने फ़िरायचा… मधेच कधीतरी जास्त प्यायला की मला फोन करून माफ़ी मागायचा. वीरच्या शिक्षणाचा खर्च करेन वगैरे काय काय बडबडायचा, पण मला त्याची कधीच गरज भासली नाही… मी स्वतंत्र होते, एकटी होते, तरीपण माझं आयुष्य परीपूर्ण होतं. पण हे सगळं झालं.. केलं.. कारण वीर माझ्यासोबत होता म्हणून. आज सुखाने जगतेय. वीर आयुष्यात सेटल झाला. सगळं सुंदर झालं... आता काहीच चिंता नाही. ही निवडणूक वगैरे सर्व आता मनाच्या समाधानाचे सोहळे....निवांत जगायचं आता.” रसिका म्हणाली, “आता तर काय, सासूबाई होणार... त्या सीरीयलमधे गोड गोड आईचा रोल करून वैतागली आहे. आता प्रत्यक्षात एकदम खडूस सासू म्हणूनच वागणार..” आणि हसली. हसता हसता डोळ्यांत आलेलं पाणी तिने हलकेच पुसलं.
साराचा पण आवाज भरून आला होता, “तुम्ही जितक्या खडूसपणे वागू शकाल त्याच्या दसपट तुमचा मुलगा खडूस आहे... आणि तुम्ही किती प्रयत्न कराल तरी तुम्हाला कजाग सासू वगैरे होणं जमणार नाही..पण आई, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात… मला तुमच्यासारखं व्हायला कधीच जमणार नाही!!..”
“असं का वाटतं गं तुला? माझ्यासारखीच तर आहेस की तू. जेव्हा वीरने मला तुझी ओळख करून दिली आणि तुझ्याबद्दल सर्व सांगितलं तेव्हापासून कित्येक वेळा तुझ्यामधे मला माझाच भास झालाय..”
“खरं?? माझ्यासाठी माझी वीरशी ओळख होण्याआधीपासून तुम्ही फ़ार मोठ्या रोल मॉडेल आहातच.. तुम्हाला एक विचारू?”
“आता अजून जर्नालिस्ट आहेस का? विचार ना काय विचारायचे आहे ते, मोकळेपणाने बोलत जा, वीरसारखं मनात ठेवू नकोस सर्व.”
“मी वीरशी अजून या संदर्भात बोलले नाही. पण मला तुमच्यासोबत निवडणुकीमधे काम करायला आवडेल. म्हणजे, तुमचा स्टाफ़ म्हणून. सेक्रेटरी, प्रेस सेक्रेटरी असं काहीही काम चालेल....”
“सरस्वती? हे ऐकूनच बरं वाटलं मला... अगं, तुझ्यासारखी हुशार आणि चलाख मुलगी मला माझ्या टीममधे आलेली आवडेल, तसंही तुला पॉलिटिक्समधे आधीपासून इंटरेस्ट होता ना? स्टाफ़मधे कशाला? माझ्यासोबतच काम कर. मी बोलेन वीरशी. त्यालापण आवडेल उलट...”
नंतर लग्नाच्या गोष्टी ठरवण्याऐवजी कितीवरी वेळ दोघीजणी बसून रसिकाच्या निवडणुकीबद्दलच चर्चा करत बसल्या.
प्रभात रोडकडून निघून वीर औंध रस्त्याने हायवेला आला, हिंजवडीच्या फ़्लाय ओव्हरखालून उजवीकडे मुंबईला जायला वळण्याऐवजी अचानक डावीकडे वळाला आणि चांदनी चौकापर्यंट उलटा जाऊन मुळ्शी रस्त्याला निघाला. त्याच्या आवडत्या निवांत जागेकडे.
कधीतरी शाळेमधे असताना तो इकडे आला होता, तेव्हापासून जी काय त्याला इथे आवडलं होतं.. पण ही जागा त्याला सोडून अजून कुणालाच माहित नव्हती.
गाडी साईडला थांबवून तो खाली उतरला. थंड मोकळी हवा एकदम येऊन बिलगली.
इथे यायचं म्हणजे निरूद्देश बसून रहायचं, स्वत:शीच विचार करायचा. पण आज वीर इथे नुसता विचार करायला आला नव्हता.
त्याने कारच्या डिकीमधून सरस्वतीची डायर्‍यांचं बाड बाहेर काढलं. मागच्याच महिन्यामधे साराने त्याला हे पब्लिश करू का असं विचारलं होतं आणि वीरला ही डायरी कथा म्हणून किंवा सत्य म्हणून कुणाहीपुढे आणायची काहीही इच्छा नव्हती. त्याने सावकाशपणे खिशातला लाईटर काढला आणि डायरीचं एक एक पान जाळायला सुरूवात केली.

सर्वात पहिलं त्याने जे पान जाळलं त्यावर दोनच ओळी होत्या. अगदी गिचमिड अक्षरामधे आणि डोळ्यातल्या पाण्यांनी चिंब झालेल्या...
“साहिल, तू हे जग सोडून गेलास, तर मी कशाला जगू? मी पण तुझ्यापाठोपाठ येत आहे..”

भुरूभुरू जळत त्या पानाची राख होऊन गेली. असंच एक एक करत प्रत्येक पान जाळत वीर तिथे उभा राहिला.
फ़क्त एक पान सोडून!! ते पान जे साराच्या किंवा साहिलच्या आयुष्यात कदाचित खास नसेल.. पण वीरच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं पान!!


आज कितीतरी दिवसांनी डायरी लिहितेय. दिवसांनी इज रॉंग. महिन्यांनी लिहितेय. पण आज लिहिणार आहे, या रात्रीमधला एकही क्षण माझ्या स्मृतींमधे पुसट होण्याआधी मी हे लिहून ठेवणार आहे. जे मला आठवत नाही ते अर्थातच इतरांनी सांगितलंय मला... आजपासून पाच वर्षांनी मी कुठे असेन काय असेन माहित नाही... पण तरी ही रात्र खूप स्पेशल!

त्यादिवशी डायरीमधे एकच शेवटचं वाक्य लिहिलं आणि घराबाहेर पडले. कुठे जायचं, कसं जायचं आणि काय करायचं काहीही ठरवलं नव्हतं. आयुष्य संपवणे ही एकच गोष्ट लक्षात होती. रात्रीचे अडीच तीन वाजून गेले असावेत. घरापासून निघून चालत चालत कार्टर रोडवरून जात होते. असंच पुढे चालत जाऊन समुद्रामधेच जीव द्यायचा होता... आता आठवलं तरी हसू येतंय.. पण तेव्हा खरंच किती सीरीयस झाले होते. मरायचंच. मरायचंच.


आदल्या दिवशी दुपारी फोन आला होता. साहिल गेला. कायमचा. त्या आधी जवळ जवळ सहा महिने आधी त्याने मला शांतपणे “मी तुझ्या आयुष्यातून कायमचा जात आहे, कारण आता आपलं नातं संपलं” हे सांगितलं होतंच. आणि तितक्याच शांतपणे तो निघूनही गेला होता, माझा जराही विचार न करता. नातं संपलं तरी साहिल होता. आता तो साहिलच नाही. इतक्या दिवसांत तो कुठे आहे आणि कसा आहे तेपण मला माहित नव्हतं. काल फोनवरून समजलं तो गेला, ज्याच्यासोबत आयुष्याची इतकी स्वप्नं रंगवली तो गेला... मग कशाला आपण तरी जगायचं?

रस्त्याने चालता चालता मधेच एका हवालदाराने टोकलं. त्याला खिश्यातलं प्रेस कार्ड दाखवलं. “एवढ्या रात्री एकट्यानं फ़िरू नका, दिवस चांगले नाहीत” एवढंच म्हणून तो गेला. दिवस-रात्र काहीच चांगलं नाही. म्हणून तर मरतेय.
कार्टर रोडला येऊन एका टपरीवर सिगरेट घेतली. “कुछ और माल है क्या?” त्याला विचारलं. इतक्या रात्री दुकान उघडून बसलाय म्हणजे याच्याकडे नक्कीच काहीतरी नशापानी असणार.
“क्या मॅडम? लेट हो गया आपको. थोडी देर पहले आते तो एक नंबरका माल दे देता” तो लोचटपणे हसत म्हणाला. खोटारडा साला!! 


“देना है तो दे, नही तो भडवे और भी है इस एरीया मे” त्या दिवशी मी बार्गेनिंगच्या मूडमधे नक्कीच नव्हते. जिथे लाईफ़च संपवायचं तिथे पैशाची काय चिंता. तशीपण मी तेव्हाही आणि आजही काय गर्दुली नव्हते. अधून मधून कधीतरी मजा म्हणून पार्टीमधे वगैरे तेवढ्यापुरतंच. पण आज नशा हवीहवीशी वाटत होती. मनामधे सतत येणारा साहिलचा चेहरा कुठेतरी हरवून टाकायचा होता. 

“गांजा है, अच्छी क्वालीटी नही है! चलेगा?” मी पुढे गेल्यावर त्याने विचारलं. आपल्याला आज काहीही चालेल, पळेल, उड्या मारेल.

मरायचं तर आहे.
रस्ता पूर्ण सुनसान होता. अजून दहा मिनीटे चालायचं आणि समुद्रात उडी मारून जीव द्यायचा. सिम्पल प्लान.
चालताना अचानक बाजूने एक काळी गाडी जोरात गेली. काळीच गाडी आहे ते आता माहित आहे म्हणून पण तेव्हा दिसली नाही. पुढे गेलेली गाडी अचानक थांबली आणि रीव्हर्समधे मागे आली.
“सरस्वती?” गाडीची खिडकी खाली करत आवाज आला. “इतक्या रात्री इथे?”
गाडीमधे कुणीतरी ओळखीचं होतं बहुतेक, कोण ते आठवेना. “मरायला चाल्लेय. निघाले तेव्हा दुपार होती. पण वाटेत रात्र झाली”
“इज शी ऑन हाय?” पॅसेंजर सीटवरून आवाज आला. 


“हॅलो, वीर कपूर. हाऊ आर यु? आपकी नयी फ़िल्म फ़्लॉप हो गयी. सुनके बहोत बुरा लगा, ओके, चलो बाय. मुझे जाके मरना है. वेरी आय एम पी वर्क!! ” मी पुढे चालत निघाले. वीर आणि राजन दोघे एकमेकांशी बोलत राहिले. राजनच्या मते, मला असं रस्त्यावर सोडून जाणं चुकीचं होतं, पण तो मला त्याच्या घरी घेऊन जाऊ शकला नसता, कारण मागच्याच महिन्यात कुठल्या तरी एका लेनी नावाच्या मुलीशी – तीच मुलगी आता वीरची मेकपमन आहे. सॉरी मेकपवूमन किंवा मेकपगर्ल. तिच्याशी लफ़डं केल्यावरून त्याची बायको त्याला सोडून गेली होती, आणि आता परत तो अशी नशेतली एखादी मुलगी घरी घेऊन गेला असता तर अजूनच प्रॉब्लेम झाला असता. वीरला मला घरी न्यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण मीडीयामधल्या एका मुलीने याचा फ़ायदा घेऊन त्याच्यावर आरोप केले असते तर!! त्याचा पॉईन्ट चूक नव्हता.

पाचेक मिनिटे त्यांची चर्चा चालू असेपर्यंत मी सरळ चालत निघून गेले. मला काय पर्वा होती? पण नक्की काय ठरलं दोघांमधे मला माहित नाही, पण वीरने मला गाडीत बसायला सांगितलं.
“नो थॅंक्स. मला इथून पुढे जायचंय.. आय नीड टू डाय. लाईक टूडे, लाईक नाऊ! साहिल इज डेड, ही इज ऑलरेडी डेड, माय हजबंड, सॉरी, एक्स हजबंड इज डेड... आणि मला त्याच्यासोबत जायचंय. जर मी आता मेले नाही, तर तो कदाचित पुढे निघून जाईल... समजतंय का मी काय म्हणतेय ते? लेट मी गो!”


इतका वेळ राजनने आणि वीरने मला पोलिस स्टेशनवर सोडायचं ठरवलं होतं, पण माझी अवस्था बघून मला दोघे वीरच्या फ़्लॅटवर घेऊन गेले. राजन आम्हाला सोडून लगेच निघून गेला, रात्रभर घराबाहेर राहून त्याला चालणार नव्हतं. वीर आणि मी दोघंच होतो. वीर आणि मी त्याआधी कितीतरी वेळा पार्टीमधे, प्रेस कॉनमधे भेटलो होतो. त्याचे कित्येक एक्स्क्लुझीव इंटरव्ह्यु पण मी केले होते, पण तेवढीच ओळख होती तेव्हा. 

लिफ़्टमधून त्याच्या फ़्लॅटवर गेल्यावरपण “वीर, लेट मी गो. मला मरायचं आहे” एकच वाक्य मी पुन्हा पुन्हा म्हणत राहिले. वीरने घरात गेल्या गेल्या बाल्कनीच्या दरवाज्याला कुलूप घातलं आणि माझ्यासाठी एक भलंमोठं सॅंडविच करून आणलं. सोबत वीर स्पेशल कॉफ़ी.

“का मरायचं आहे तुला?” त्याने मला हळूच विचारलं.
आणि मी त्याला सगळं सांगितलं. माझ्याबद्दल, आईबद्दल, उस्मानबद्दल, काकाबद्दल, साहिलबद्दल आणि साहिलबद्दल... रात्रभर मी बोलत राहिले. झोपणं शक्यच नव्हतं.
रात्रभर वीर फ़क्त मला ऐकत राहिला.
आज या घटनेला आठ महिने झाले. आठ महिने. वीर त्या दिवसापासून माझ्यासोबत आहे. त्याने माझ्यासाठी ग्रिफ़ काऊन्सिलर अरेंज केला. माझं मन रमावं म्हणून माझ्यासोबत गोव्याला फ़िरायला आला. तिथल्या बीचेसवर फ़िरताना मला आजही त्या रात्रीचा माझा मरण्याचा निश्चय आठवतो. पण आता मला मरायचं नाही...


नक्की कशासाठी माहित नाही, पण आता हळूहळू जाणवतंय. हे नुसतं आकर्षण नाही. त्याहून जास्त आहे. आधीची नुसती प्रोफ़ेशनल ओळख होती, आता ती तेवढीच राहिली नाही. वीर कपूर इज माय बॉयफ़्रेंड. मी आजवर हे कुणालाही सांगितलं नाही, आज पहिल्यांदा लिहितेय. आय ऍम इन लव्ह विथ हिम. साहिल माझ्यासाठी आयुष्याचा आधार होता.. पण वीर!! वीर माझा हात हातात घेऊन सोबत चालणारा सखा आहे.

वीर माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. साहिलपेक्षाही.

No comments:

Post a Comment