Monday 28 August 2017

रहे ना रहे हम (भाग ३०) – समाप्त

 “थॅंक्स, यार. तू नसतीस तर..”
“बस्स काय? आता पैसेही पाठवणार आहेस का?”
“तसं नाही गं... पण... बाबांसाठी..”
“स्वप्निल, माझे सासरे महिन्यातून दोनदा तरी हॉस्पिटल गाठतात, त्यांच्यासाठी डबा करतेच ना. एरवेही त्यांचं डायेट फ़ूडच बनवते गं. मग त्यातच थोडंसं तुझ्या बाबांना दिलं तर लगेच थॅंक्स... जाम अमेरिकन झालीस हां!” वेदा माझ्यासोबत व्हीडीओ चॅटवर म्हणाली.
गेले आठ दिवस बाबा हॉस्पिटलमध्ये होता, आणि त्याला वेदा रोज डबा नेऊन देत होती. लांब असलं की अशा गोष्टींचं खरंच जाम वाईट वाटतं, म्हणजे मी काय डबा वगैरे बनवला असता असं नाही... तरीही!
“तरीही तुला थोडासा का होईना त्रास..”
“काही त्रास होत नाही बायो. रोज दहा वाजता तुमचा ड्रायव्हर येऊन डबा नेतो. चार वाजता छान घासून पुसून आणून देतो. तसंही हार्ट पेशंटला काय... कमी तेलाची भाजी, वरण आणि भात. मी तर काकूंसाठी पण डबा देत होते. पण त्याच नको म्हणाल्या. तुझा शेजारी आहे ना, तो त्यांच्यासाठी काहीतरी आणतो.”
“अझरभाईला आईसाठी डबा बनवता येतो, आणि बाबासाठी नाही? तसाही तो कायम काहीतरी हेल्दी खात असतो.”
“येडू! त्याला वेळ कुठाय! चार चार कन्स्ट्रक्शन साईटवर इकडून तिकडे उड्या मारत असतो शिवाय नगरसेवक. रोज पेपरांत फोटो असतोच. जाम बिझी माणूस झालाय. त्याची बायकोपण नेमकी ट्रेनिंगला गेलीये.” वेदा जरा आवाज विनाकारण कमी करत म्हणाली. “निधीचा बॉयफ्रेंड गं, आफताब. त्याची बायको. ती काकूंना डबा बनवून देते”
वेदाला अधलेमधले काय किस्से माहित नाहीत, त्यामुळे तिला या सर्वांमागची इमोशनल हिस्ट्री माहितच नाही. त्यामुळे मला एखादं गॉसिप सांगत असल्यासारखं ती म्हणाली, “काय नमुना आहे, म्हणजे, तशी वागाबोलायला बरीये, पण जरा एक आटा कमीच आहे. अगं, पहिल्या दिवशी डबा दिला तर त्यात अंड्याची भुर्जी. तीपण हे तेल घातलेली. म्हणून काकू म्हणाल्या, की मी सरळ हॉस्पिटलमधलंच जेवण घेत जाईन. तिला डबा देऊ नको असं तरी कसं म्हणणार ना? तशी एकदम सिंपल आहे गं. त्या टोणग्या आफताबला असलीच गरीब गाय बरोबर शोभते. मग मीच काकूंना म्हटलं कशाला? मी काकांपुरता पाठवते. त्याचा मला काही त्रास नाही.”
“म्हणूनच म्हटलं ना...”
“ए परत आता थॅंक्सचा जप करू नकोस हां! अति होइल”
“मी आता तिथं असायला हवं होतं ना. पण येऊही शकत नाही गं.. परीक्षा, असाईनमेंट्स, आणि.. एकुलती एक मुलगी आहे मी. बाबाला किती वाईट वाटत असेल.”
“खरं सांगू? त्यांना तुझा जाम अभिमान आहे गं. हॉस्पिटलमध्ये कोण ना कॊण भेटायला आलं की सांगतात, माझा लेक दूर गेलाय पण सायन्समध्ये पीएचडी करतोय. खूप हुशार आहे... काय मस्त वाट्तं ऐकायलाही, आपल्या अख्ख्या ग्रूपमध्ये तूच एकटी अशी वेगळी निघालीस. शाळेत असताना कधीच वाटलं नव्हतं की तू इतकी पुढे जाशील. आम्ही तर अड्कलो गं, घर नोकरी मुलं प्रमोशन अशा चक्करमध्ये. तू मात्र सुम्मडीत झपकन पुढे गेलीस. काका मला परवा म्हणाले की, एकच मुलगी आहे पण काय खणखणीत नाणं आहे.”
चश्म्याचा नंबर बहुतेक वाढला असावा, खूप वेळ लॅपटॉपकडे पाहिलं की डोळ्यांतून असं अचानक पाणी येतंय हल्ली... “वेदा, ऐक ना. मी नंतर कॉल करते. मीनव्हाईल प्लीज टेक केअर. काही लागल्ं तर सांग”
“कशाला काळजी करतेस? तुझ्या बाबांनी खूप माणसं जोडलीय. सतत कुणीनाकुणी अस्तंच... चल, नंतर बोलू या. तुला वेळ असेल तेव्हा कॉल कर”
मी कॉल कट केला, तेव्हा आमच्याकडे नुकतं उजाडत होतं. अमेरिकेत उजाडणारी सकाळ यावर दहाबारा ओळींचं काहीतरी खरडलं आणि फेसबूकवर टाकलं. हे एक नवीनच. हल्ली जरा लिहायचा छंद लागला होता. गौतमीचं ब्लॉग वगैरे वाचल्यापासून आपणही लिहायला सुरूवात करावी असं फार वाटत होतं. वेळही मिळायचा, म्हणून अधूनमधून काहीतरी लिहायचं. लोकं पण लाईक वगैरे करतात.
माझ्या प्रत्येक पोस्टला शाहीनचा लाईक असणारच. अधूनमधून कधीतरी मेसेजपण. कमेंट मात्र कधीच नाही. आफताब आणि शाहीनच्या लग्नाचा अफलातून किस्सा अजून आठवला की मला आधी हसू येतं आणि मग तिच्यासाठी वाईट वाटतं. बिचारी शाहीन.
मला इकडे येऊन जेमतेम वर्ष झालं होतं. बर्‍य़ापैकी रूळले होते. मी लॅबमधून बाहेर येत होते तेव्हा मला अझरभाईचा फोन आला. खरंतर मी फोन घेतलाच नसता पण इंडियामध्ये तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजलेले असतील... इतक्या उशीरा का फोन म्हणून की कॉल घेतला. तर पलिकडे आफताब.
“हॅलो” मी युएसला आल्यापासून आलेला हा पहिला फोन. “बोलायला वेळ आहे का?”
“बोला!” दोन गोष्टी क्लीअर होत्या, त्यानं मुद्दाम अझरच्या फोनवरून फोन केला होता, म्हणजे मी कॉल घेणार आणि दुसरं म्हणजे प्रचंड प्यायलेला होता. आफताब दारू पिऊन बरळत नाही. उलट स्पष्ट आणि एक एक शब्द व्यवस्थित उच्चारत बोलतो. त्याला ओळखत नसणार्‍या माणसाला समजणारही नाही, की हा माणूस पिऊन बोलतोय. पण अर्थात मी त्याला व्यवस्थित ओळखते आणि मला त्याचा हा आवाज चांगलाच चिरपरिचित आहे. “वेळ आहे. इतक्या रात्री कॉल केलास?”
“परत कधी येशील?”
“मला इथं येऊन अवघं वर्ष झालंय. अजून माझं रीसर्च चालू आहे... आणि...”
“परत. कधी. येशील?”
“आफताब, रीअली, मी आता काहीच सांगू शकत नाही...”
“सांग ना. परत येणारच नाहीस ना? तिकडेच राहयाचं ठरवलंयस. हो ना?”
“हे बघ, मी नाही सांगू शकत. मी तितका विचारही केला नाहीय आणि आता असं अचानक कसं सांगू?” अचानक पलिकडून अझरचा आवाज आला. त्यानं बहुतेक आफताबच्या हातामधला मोबाईल घेतला. अगदी अस्पष्ट तरीही व्यवस्थित मला इकडे ऐकू आलं. “इडियट! किया उतना कांड कम नही था क्या? बोला ना उसको फोन मत लगाव, इसिलिये तेरा मोबाईल ले लिया तो मेरे फोन से....” दोनेक क्षण शांतता आणि मग अझरचा आवाज आला. “हॅलो स्वप्निल, मी तुला नंतर कॉल करू का? जरा इकडे थोडा प्रॉब्लेम झालाय”
“नंतर नाही, आताच सांग. काय झालंय? किती प्यायलाय... काय केलंय त्यानं?”
“ड्रिंक्स जास्त नाही पण रेग्युलरच. आणि... स्वप्निल, उद्या त्याचं लग्न आहे.”
“काय?” मी एकता कपूरची हिरॉइन आहे असं समजा आणि हे “काय” वेगवेगळ्या रंगामध्ये आणि ढनाणट्याण म्युझिकमध्ये इमॅजिन करा. सीरीयसली मेंदूमध्ये ठिकर्‍या उडाल्या होत्या. “हे कधी ठरलं?”
“आज दुपारी.. उद्या निकाह”
“त्याला अभिनंदन सांग.”
“स्वप्निल, प्लीज ट्राय टू अंडरस्टॅंड. मलाही अपेक्षा नव्हती की अस्ं काही घडेल.. शिट यार. दिस इज अ कंप्लीट मेस..”
“आता जरा इतकं सांगतोच आहेस तर जरा सविस्तर मला समजेल असं सांग”
परत पलिकडे क्षणभर शांतता. आणि मग आफताबचा आवाज.
“स्वप्निल, सॉरीपण... मी आयुष्यभर तुझी वाट नाही बघू शकत. खूप प्रयत्न केला मी. स्वत:ला हे सांगण्याचा... की यु लव्ह हर. यु लव्ह स्वप्निल. आफताब लव्ह्ज स्वप्निल. हे खरंच आहे. आय लव्ह यु. पण माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी एकटा नाही ना जगू शकत. आय नीड समबडी. आय नीड अ फ्रेंड, अ कंपेनियन..... एकटं राहण्यापेक्षा...म्हणून मी आज हा डीसीजन घेतलाय..”
“आज?”
“ऑफ कोर्स. गावामधली मुलगी आहे. दूरच्या सही पण रिश्त्यातली आहे. मला ठिक वाटली. उद्या निकाह”
“अभिनंदन”
“साला, काय पोरगी आहेस. सीने में दिल है भी या नही... एकक्षण वाटलं होतं तू म्हणशील असं करू नकोस”
“मी सांगितलं तर तू निर्णय बदलणार आहेस का?”
“सांगून तर बघ..”
“आणि त्या मुलीचं काय? जी तुला आज ठिक वाटली, तिचं काय... तू उद्याच्या लग्नाचं प्रॉमिस केलंस ना? मग ते मोडशील? पुढं काय... मी अजून दोन चार वर्षं तर येणार नाही... तू इकडे येशील? नंतर काय... आपलं नातं संपलंय हे तुला अजून समजत नाहीये का? आफताब, आयुष्यात तुला सोडल्याचा पश्चाताप करत शंभर नरकात जळेन, पण एखाद्या मुलीचं लग्न मोडणार नाही... गॉट इट! कमीने मेरेको पूछ्ता है सीने मे दिल है या नही... सीने मे दिल नही होता तो भी किसीका सपना नही उजाडती.. फोन ठेव आणि झोप. किमान निकाहसाठी मशीदीत जाशील तेव्हा तरी शुद्धीत आलेला असशील..” त्यानं फोन कट करण्याऐवजी मीच कट केला.
रूमवर येऊन फरीदा खानुमचं आज जाने की जिद ना करो ऐकत बसले. बाईंचा आवाज आहे की सरळ सुरी! चिरत चिरत आतपर्यंत जाणारा आवाज... तासाभराने पण अझरचाच फोन. “डिस्टर्ब करतोय का?” अझरचा आवाज.
“ऑलरेडी प्रचंड डिस्टर्ब्ड आहे, तरी बोल ना”
“बोलायचं काय... मला काहीच सुचत नाहीये. एक तर इतक्या तडकाफडकी डीसीजन घेतला, मला न सांगता आणि आता लगेच उद्या लग्नपण...”
“मग माझ्याशी का बोलत बसलायस. लग्नाची तयारी कर जा...”
“काय तयारी? नवीन कपडे पण  आता संध्याकाळी आणलेत. नवरीला साडी घेतली तर ब्लाऊस वगैरे भानगडी करायला वेळ नाही म्हणून रेडीमेड घागरा घेतला.”
“तुमच्यांत तेच घालतात ना?”
“आमच्यात? छान! परके झालो का आम्ही? एनिवेज, ये तो होना ही था! अम्मीचे दागिने लॉकरमधून आणलेत. त्यावरच वेळ निभवू.. नंतर काय जमेल तसं. छोटेमियांकडे काय पैशाला कमी नाही. करतील बायकोची हौस.”
“तू इतका सॅड का?”
“कमॉन!! आनंदानं नाचू का? आफताबच्या लग्नाची चिकार स्वप्नं पाहिली होती. त्या प्रत्येक स्वप्नांमध्ये फक्त एक गोष्ट कॉमन होती. माझ्या घराच्या गेटपासून ते शेजारच्या घराच्या गेटपर्यंत घातलेला मांडव. त्याचं आयुष्य त्याचा निर्णय हे मान्य आहे. पण हे जाम खटकतंय. स्वप्निल, ती मुलगी खूप गरीब आहे. कमी शिकलेली आहे. दिसायला खास नाही पण ठिकठाक”
“ओके”
“ओके काय! कान्ट यु सी समथिंग?  शाहीन वाईट नाहीय, पण बारावी नापास! एकदा नाही दोनदा. अभ्यासांत कमी म्हणून घरचे लग्न लावून देत होते. बरेच दिवस कुणीही पसंद केलं नाही. न जाणो कसं काय आमच्याकडे रिश्त्यासाठी बात आली. खरंतर जाणारच नव्हतो पण हा एवीतेवी गावी आला होता म्हटलं घरात दारू पित बसेल त्यापेक्षा तिकडे तर जाऊ. आयते पोहे आणि मिठाई खाऊ. गेल्यानंतर पाचच मिनिटंत यानं मुलगी पसंद आहे सांगितलं. वर म्हणाला, उद्याच्या उद्या निकाह करत असाल तरच मी तयार आहे. काहीतरी कामाचा कॉल आला म्हणून मी नेमका बाहेर अंगनात गेलेलो. तोपर्यंत छोटेमिया सर्व ठरवून मोकळे झाले....”
“एकदम फिल्मी स्टोरी आहे...”
“अरे, नुसती पसंद आहे म्हट्लं तर बात अलग. हा सरळ मामुजान, कल का दिन अच्छा है. निकाह कर लेते है म्हणून मोकळा! अल्लाकसम, स्वप्निल, मी जागच्या जागी गरगरलो. काय बोलावं सुचेना. अफताब कुठल्याही गोष्टीचा असा आततायी निर्णय घेत नाही.”
“असं तुला वाट्तं. मी ज्या आफताबला ओळखते त्यानं सर्वच निर्णय असेच घेतलेत. रात्री माझ्या घरून निघून जाणं, किंवा एखाद्या रात्री माझ्या फ्लॅटवर येणं... तो इमोशनली खूप अन्स्टेबल आहे. खूप सारे इशूज आहेत... काहीही असो. त्याचा डीसीजन झालाय. त्याला निभवावा लागेल. तू का टेन्शन घेतोस?”
“स्वप्निल, दोघांमध्ये काहीही कॉमन नाहीये, आणि अशा लग्नांचा अंजाम काय होतो ते माहित आहे ना?”
“जे तुझ्या बाबतीत घडलं ते फारच वाईट होतं, लेट्स होप ही शाहीन काहीतरी वेगळी असेल.”
“आमेन.”
“स्पीकींग अबाऊट वेडिंग्ज, राही कशी आहे? तीपण येईल ना उद्या?”
“ओह! मी मेलो! ठार मेलो” मला एकदम हसू आलं. आफताबचं लग्न हा प्रश्न जणू मी आणि अझर दोघांनीही क्षुल्लक करून टाकला. अजून दुसरं काय करणार?
“तू तिला अजून सांगितलंच नाहीस?”
“कंप्लीट विसरलो. दिवसभर इतका फिरलोय.. तिला मेसेज करेन म्हटलं आणि राहिलं. आता रात्रीचे बारा वाजलेत. झोपली असेल. पण मेसेज करून ठेवतो... उद्या मी मार खाणार.”
“भोग आपल्या भावाच्या कर्माची फळं.”
“नाहीतर काय... मी तिला सांगितलं की आपण दोन तीन महिन्यांत लग्न करू. जरा थोडं सेटल होऊ देत. हा एक देवदास संभाळायचा होता.... पण आता छोटेमियां स्वत: सेहरा बांधतायत आणि आम्ही मागेच!!”
राहिला शेखला मी लहान पणापासून ओळखते. माझ्याच शाळेत होतीपण मला खूप सीनीअर. बाबांच्या दुकानाजवळच तिच्या वडलांचं दुकान होतं. अतिशय हुशार आणि शांत मुलगी. ती आर्ट्स कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होती. चार-पाच वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. महिन्याभरातच तिचा नवरा बाईकच्या ऍक्सिडंटमध्ये गेला. लग्नानंतर कधी सासरी राहिलीच नाही, माहेरी परत आली. दुसरं लग्न करायला तिची स्वत:चीच तयारी नव्हती.  हे तिचं लव्ह मॅरेज होतं. पण कुणीतरी योग्य जोडी जमतेय हे बघून अझरची आणि तिची ओळख करून दिली. सुदैवानं दोघं एकमेकांना आवडले. थोडे दिवस भेटून स्वभावचा अंदाज घेऊन त्यांनी नुकताच लग्नाचा डीसीजन वगैरे घेतला होता. फार भपकेबाज लग्न करायची इच्छा दोघांचीही नव्हती तरी काल ठरवलं आणि आज लग्न केलं असं कोण करतंय का? एक आपले सन्माननीय हीरो सोडल्यास!!!
खरंतर मला वाटलं होतं की त्याचं लग्न झाल्यावर मला फार वाईट वगैरे वाटेल. अगदी खरं सांगू. तसं काही वाटल्ंच नाही. मनानं कुठंतरी मी त्याच्यापासून विभक्त झाले होते. आता केवळ त्या विभक्तपणाला सबळ कारण मिळालं. नवरा म्हणून आफताब वाईट कधीच वागला नसता. केदारसारखं वर्षभर बायकोला दुसर्‍या खोलीत झोपायला लावून नंतर दोनेक वर्षांनी “नातवंड हवंच” या आचरट सल्ल्यामुळे (किंवा फिजिकल नीड्सही असतील. त्याला जाऊन कुणी विचारलंय!!) मुलगा जन्माला घालणे वगरे प्रकार त्यानं केले नसते. (केदारच्या पर्सनल लाईफचे भलतेसलते डीटेल्स मला मिळतच होते!!आपल्या समाजाचा हा एक फार प्लस पॉइंट असतो. गॉसिपिंगला लोकं एव्हररेडी असतात. असो. ) आफताबला शाहीन आवडली होती की नाही माहित नाही. पण एका गोष्टीची खात्री होती, एकवेळ त्यानं तिच्यावर प्रेम केलं नस्तं पण त्यानं तिला कधीच वाईट वागवलं नसतं.
अझरभाई एका अर्थानं म्हणत होते ते बरोबर होतं, तरी मला हल्ली हे पटत नाही. दोन व्यक्तींनी एकत्र जगायला त्यांच्यात काहीतरी कॉमन असायलाच हवं का? मी आणि मार्टिन एकत्र राहतोय. एका धर्माचे काय एका भाषेचे पण नाही. तरी दोघं एका घरात राहतो. वेळ पडेल तसं सांभाळून घेतो. त्याच्या घरून फोन आला तर मी दोनेक मिनिटं बोलते. एकत्र जेवतो. म्हणायला आम्ही एका घरात राहतो, पण तरीही स्वत्तंत्र जगतो कारण आमच्यात कसलंही सेक्शुअल बॉंडिंग नाही. आमच्या या घराच्या पलिकडे मार्टिन काय करतो याचं मला देणंघेणं नाही. सेम तेच त्याच्याहीबाबतीत. आमच्यामध्ये कसलंही रिलेशनशिप नाही तरीही वेळ पडलीच तर आम्ही एकमेकांचे आधार बनतोय.
मग रिलेशनशिप्स का इतकी कॉम्प्लीकेटेड असतात. त्यामध्येच ऑनेस्टी, लॉयल्ट्री, बीट्रेयल अशा संकल्पना का असतात... दोन वेगवेगळ्या व्यक्ती ठराविक काळापुरत्या एकत्र असतात, त्यावेळी दोघांमध्ये काहीही इमोशनल, मेण्ट्ल किंवा फिजिकल इंटरऍक्शन असेल... पण एकदा का त्या दोन व्यक्ती एकमेकांपासून वेगळ्या झाल्या की स्वतंत्र जगू शकत नाहीत का? किंवा त्यामध्ये एखादी व्यक्ती चुकूनमाकून धोका देत असेल तर समोरची व्यक्ती त्याची चूक माफ करू शकत नाही का? अगदी सत्य सांगायचं तर हे प्रश्न आता पडून काही उपयोग नाही. आणि त्यांची उत्तरं मिळवूनही काही उपयोग नाही.
आफताबच्या लग्नाचे फोटो मी फेसबूकवर पाहिले. एकदम छोटासा घरगुती समारंभ होता. त्यानं व्हाईट शेरवानी घातली होती. शाहीनचा फोटो मात्र त्यात नव्हता. नंतर दोन चार दिवसांनी मुंबई की पुण्यामधल्या कुठल्याशा (काय फरक पडतो? सगळे मॉल एकसारखे तर दिसतात) मॉलमध्ये दोघांचा सेल्फी पाहिला. नवरी अशी वाटलीच नाही. अझरभाई म्हणाला तशी त्याला अजिबात न शोभणारी होती. गबाळी अजागळ नव्हती, पण किंचित बावळट होती. खरं सांगायचं तर, आफताबच्या बाजूला कुठलीही मुलगी बावळटच दिसते. यांच्या देखण्या चेहर्‍यावर बुद्धीमत्तेचं तेज वगैरे.

मला आफ़ताबनं मी युएसला गेल्यावर (त्याच्या लग्नाच्याही खूप आधी) कधीतरी फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली होती. मी ती ऍक्सेप्ट केली. पण त्याच्या वॉलवर शक्यतो कधीच काही लिहिलं नाही. बाबांच्या आजारपणामध्येच आम्ही एकमेकांशी परत बोलायला लागलो. सुरूवातीला एकदम फॉर्मल. नंतर हळूहळू काहीतरी चेष्टामस्करी.
बाबाला आता बरं वाटत होतं, घरी आला होता. आठवड्यामधून एकदा तरी माझ्याशी बोलायचा. मीपण हल्ली त्याच्याशी बरंच काहीबाही बोलत होते. आईसोबत रोजचा एक फोन कॉल चालूच होता. आईबाबा दोघांनाही माझी काळजी होतीच, पण त्याहून जास्त अभिमान होता असं वेदा म्हणाली ते खरंच होतं. बाबानं एके दिवशी मला फेसबूकवर फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली (आणि वर फोन करून सांगितलं!). “निल्या, अधिकृतरीत्या आपण आता फ्रेंड्स झालो हां” तो मला फोनवर म्हणाला. मी रीक्वेस्ट ऍक्सेप्ट केल्यावर लगेचच.
पण नुसता फ्रेंड राहिला तर मला काहीच हरकत नव्हती, बाबाच्या अचाटपणाला सीमाच नाही. माझी प्रत्येक पोस्ट शेअर करायचा, वर त्यात मलाच टॅग करायचा. सोबत अजून कोणकोण गावामधले. बरं, या टॅग करण्यामध्ये काय लॉजिक असेल तर तेही नाही. मी सहज एकदा कुठल्यातरी पेजवरच्या ज्वेलरीची जाहिरात आवडली म्हणून मी शेअर केली. बाबानं ती जाहिरात शेअर केली ते केलीच वर त्यात केदारला टॅग केलं. हसावं की रडावं?? आधी मुळात केदार बाबाच्या फ्रेंडलिस्टीत कसा काय जाऊन बसला हा मला पडलेला ब्लॉकबस्टर प्रश्न. त्याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.
एकूणात इकडे गावाकडे सर्व मज्जा चालू होती. आणि या सर्व घडामोडी मला तिकडे दूर युएसमध्ये बसूनही आरामात समजत होत्या-आईमार्फत!. बाबा नगरसेवक म्हणून इलेक्शनला उभा राहणार होता.  त्याच्या पार्टीकडून त्याला तिकीट मिळालं होतं म्हणून विरूद्ध पार्टीनं अझरभाईला तिकीट द्यायचं ठरवलं. तेव्हा अझरभाईनं नको म्हणून सांगितलं. मग बाबानं अझरभाईला घरी बोलावून “खुळा आहेस का?” असं विचारलं. तो म्हणाला. “मी तुमच्याविरूद्ध कसा लढणार?” तर बाबा म्हणाला, “अरे शाण्या, मी जिंकलो तरी वॉर्ड आपल्या हातात आणि तू जिंकलास तरी वॉर्ड आपल्याच हातात. काही झालं तरी फायदा आपलाच ना!” असं सांगितलं. “तरूण तडफ़दार नेतृत्व म्हणून तुझे जिंकायचे चान्स जास्त आहेत, बिनधास्त उभा रहा, काय प्रचाराला पैसा बिसा कमी पडू देऊ नकोस!”
अझरभाई जिंकला आणि बाबा हरला. तरी बाबाचं फार काय नुकसान झालं नाही. त्याला हवी ती कामं अझरभाईनं करून दिलीच. आईनं हा किस्सा मला अगदी रंगवून सांगितला. एकूणात भारतीय लोकशाही नक्की कशी चालते याचं थोडंफार प्रात्यक्षिक बघायला मिळालं असं पण आई म्हणाली. आमच्या आईला टोमणेबहाद्दर किताब आज्जीनं फार आधीच का दिला होता ते आता पटलं.
आफ़ताबच्या लग्नानंतर तीन महिन्यांनी अझर राहीचं पण लग्न झालं. एकदोनदा राहीसोबत मी व्हीडीओ चॅटही केलं. आईनं मला सांगितलं की खूप चांगली आहे, शांत आणि समजूतदार आहे. आफताबच्या बायकोशी पण नीट वागते. तिला सांभाळून घेते. आईलाही आता ही सोबत चांगली झाली होती.
आफताबच्या लग्नांतर दोन तीन महिन्यांनी मला फेसबूकवर मेसेज आला. शाहीनचा, “तुमचा व्हॉट्सएप नंबर द्याल का?” मला प्रायव्हसीचं इतकं काही अडलेलं नाही. तसंही आफताबकडे माझा नंबर होताच, तरी तिनं मागितला म्हणून मी दिला. दोन चार दिवसांनी तिचा मेसेज आला. “हॅलो” इतकाच. मी पण तेवढाच रीप्लाय केला. मग परत आठेक दिवसांनी तिचा मेसेज आला. “मी तुम्हाला मेसेज केला म्हणून राग नाही ना आला?”
“नाही, त्यात राग येण्यासारखं काय आहे? आणि मला सरळ स्वप्निल म्हण, अहोजाहो नको”
त्यावर तिनं केवळ एक स्मायली पाठवली. मग परत चार दिवसांनी मेसेज. “मी तुम्हाला फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली नाही, कारण म्युचुअल फ्रेंड्समध्ये आफताबना तुम्ही दिसाल. प्लीज रागावू नका” आता यात रागावण्यासारखं काय आहे ते मला समजलंच नाही त्यामुळे मी ही थंब्जअप आणि स्मायली पाठवली. नंतर हळूहळू तिचे मेसेजेस येत राहिले. अर्थात आफताबच्या नकळत. मग एके दिवशी मी तिला मेसेज करून मग कॉल केला.
“मला  लग्नाच्या दिवशी आफताबनी तुमच्याविषयी सर्व सांगितलंय. म्हणाले की, तुम्हाला कधी विसरणार नाहीत...”
“शाहीन, जे घडलंय ते होऊन गेलंय. हे बघ, माझ्याकडून मी तुला पूर्ण खात्री देते की मी कुठलाही संबंध त्यच्याशी ठेवणार नाही. तुला जर तसं काही वाटत असेल तर मी त्याला ब्लॉक करेन आणि फोन नंबर डीलीट करेन”
“तसं काही नाही! त्यांनी आणि तुम्ही काय करावं हा तुमचा प्रश्न आहे. मी त्यात पडणार नाही, माझा काय संबंध?”
आईशप्पथ! हातातनं मोबाईल खाली पडता पडता राहिला. कुठल्या जगामधली ही मुलगी आहे? वयानं माझ्यापेक्षा कमी. शिक्षणानं कमी. एकूण जगरहाटीलाही कमी पण काय खणखणीत बोलते.
“असं काहीही नाहिये. इन फ़ॅक्ट, त्यानं तुला नक्की काय सांगितलं ते मला माहित नाही पण सध्या गेली दोनेक वर्षं तरी तो आणि मी सेपरेट आहोत”
“सेपरटे असणं वेगळं आणि सेपरेट होणं वेगळं. सच्ची बात हीच की ते तुम्हाला विसरलेले नाहीत. कधी विसरतील असं वाटतही नाही.”
“शाहीन, आफताबच्या लाईफमधली मी एकमेव गर्लफ्रेंड नाही हे तुला माहित असेलच! सांगितलंय ना त्यानं? भलीमोठी लिस्ट आहे, काही नावं तर त्याला आठवतही नसतील.”
हो, पण इतर कुणाहीपेक्षा तुमच्याविषयी अधिक बोलतात. कायम सांगतात की स्वप्निल माझी एकमेव बेस्ट फ्रेंड होती. ब्रेकपचं दु:ख कसंही कमी होतं, पण इतका जिवलग फ्रेंड गमावल्याचं दु:ख मात्र कधीच कमी होणार नाही.”
“ग्रेट! म्हणजे हे बघ, तो आता मला फ्रेंडसुद्धा मानत नाही. याऊप्पर तुला काय हवंय?”
“काहीच नकोय. खरंतर मी तुम्हाला फोन का करावा हेही मला माहित नाही. पण सतत वाटत राहतं की मी या सर्वांमध्ये अगदी चुकीच्या ठिकाणी आलेय. इथं मी असणं हेच गलत. पण या सगळ्यामधून स्वत:ला बाहेर कसं काढायचं हेही मला कळत नाही. इतका हुशार पैसेवाला सुंदर नवरा मिळाला म्हणून सगळे माझ्या किस्मतची वाहवा करतात. हे स्वत: कित्येकदा म्हणतात की हे सगळं इतकं आता फक्त तुझं आहे.  पण मला वाटत राहतं की या सर्वांवर माझा अधिकार नाही. कुण्या दुसर्‍याचं काहीतरी बळकावल्यासारखं वाट्तं. मी तुमच्याइतकी किंवा यांच्याइतकी शिकलेली नाही. मला तर तो फूड प्रोसेसर का काय ते वापरायचा कसा तेही माहित नव्हतं. राहीभाभी मला सारखं काही शिकवत असतात. त्यांत चूक नाही, पण मग मला काहीच येत नाही, हे सारखं जाणवतं. मी तर यांना म्हट्लंपण मला गावाकडेच राहू द्या, मुंबईमध्ये मला कंटाळा येतो.”
“मग?”
“चिड्ले. म्हणाले, मला कंटाळा येतो म्हणून तर मी लग्न केलं... तुला गावाकडे ठेवायची तर मी लग्नच कशाला केलं असतं?”
क्षण असाच शांततेमध्ये गेला. “सॉरी, मी तुम्हाला फोन करून हे सर्व सांगणं म्हणजे.... पण अजून कुणाकडे बोलू ते कळत नाही.”
“डोन्ट वरी, मला नक्की काय बोलायचं ते सुचत नाहीय. अक्च्युअली, इतकं कॉम्प्लीकेटेड खरंच नाहीये. तुला वाटलं तर तू मला मेसेज कर, कॉल कर. पण त्याच्यापासून लपवून करू नकोस. त्यानं उगाच घोळ जास्त होतील. थोडा वेळ दे,स्वत:लाही आणि त्यालाही. स्वत:ला इतकं कमी लेखणं बंद कर. त्यातून हाती काहीच लागणार नाही. मी मुंबईला आले तेव्हा माझीही हीच हालत झाली. लहानपणापासून गावातच राह्यलेय. एकदम इतक्या मोठ्या शहरामध्ये खूप गोंधळायला होतं, मी पण गेलेय यामधून”
याला खरंतर आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी म्हणतात. शाहीनला नक्की काय म्हणायचंय ते मला माहित होतं. मुंबईमध्ये कंटाळा येतो किंवा गोंधळल्यासारखं होतं वगैरे गोष्टी उगाच सांगण्यासाठी. ती मला फोनवर सुरूवातीला म्हणाली तेच एक खरं. आपण दुसर्‍याच्या अधिकारावर अधिक्रमण करतोय, असं जर तिला वाटत असेल तर त्यात तिचं काहीच चुकीचं नाही. हा विश्वास तिला आफताबनं द्यायला हवा, त्यानं केवळ माझं आधी एका मुलीवर प्रेम आहे हे सत्य सांगून काहीच उपयोग नाही. यापुढे मी काय वागेन याचा विश्वास त्यानं द्यायला हवा. पण विश्वास आणि आफताब म्हणजे.. सलमान आणि शर्ट. एक असला तर दुसरा असेलच याची खात्री नाही...
शाहीनच्या या प्रश्नावर मी इकडे हजारो मैल लांब राहून काय करणार होते? एकवेळ मी केवळ त्याची मैत्रीण असते तर शाहीनला काहीतरी मदत करू शकले असते... किंवा केवळ आफताबची एक्स गर्लफ्रेंड असते तर सर्व संबंध तोडून सुखानं जगले असते, जसं केदारसोबत केलं होतं. पण इतकं सोपं नव्हतंच ना.
एके दिवशी, आफताबचा मेसेज आला. “टीव्हीवर खुशी लागलाय, बघणार का? की ब्लॅकने तिकीटं काढू परत?” नुसता मेसेज वाचला तरी तासभर हसत बसले. त्यानं आणि मी ब्लॅकने तिकीटं काढून पाहिलेला पिक्चर. आता सांगायलाही लाज वाटते पण त्याकाळी मला फरदीन खान आवडायचा. त्याचा नवीन पिक्चर म्हणून अगदी कौतुकानं गेलो होतो. पिक्चर वाईट नव्हता, पण करीनाची ओव्हरॅक्टिंग बघून डोकं दुखलं. आफताब नंतर कितीतरी दिवस तिला करीना कमर म्हणत होता. आठवणींचे हे असले गुंते मनातून काढता येत नाहीत, कुणी किती प्रयत्न केला तरीही. अशावेळी त्या आठवणींसोबत जगण्यातच शहाणपणा असतो. मी इतकी का हसतेय हे मार्टिनला कळेना, शेवटी या पिक्चरचा रेफ़रन्स दिल्यावर तो पण चिक्कार हसला. त्यानं तमिळ खुशी पाहिला होता, दोन्ही पिक्चरमध्ये आचरटपणा सेम लेव्हलला होता!
मार्टिन आणि मी काय कमी लग्नत्रस्त नव्हतो.  मार्टिनच्या  घरून रोज फोन यायचे. त्याच्या घरच्यांनी मुलगी पसंद केली होती. याला केवळ जाऊन लग्न करायचं होतं. त्याच्याकडचे हुंड्याचे (म्हणजे “गिफ़्ट्स”चे) आकडे ऐकले तरी मला भोवळ येत होती. एकदा आईला फोनवर बोलता बोलता सांगितलं की, मार्टिनला लग्नांत मुलीकडचे ऐंशी तोळं सोनं घालणार आहेत, म्हणजे किती गं? तर आई म्हणाली. आठशे ग्राम. बापरे!!! सरळ लिलावच का करत नाहीत हे लोकं लग्नाऐवजी?
मार्टिन मात्र जाम वैतागलेला होता, एक तर त्याचा थिसीस विनाकारण अडकला होता. शिवाय, घरून रोज एक दडपण. आज काय आजी जेवली नाही. उद्या आजोबा घर सोडून जातो म्हणाले. रोज प्रचंड वैतागलेला असायचा.
“घरून कॉल आला की वाटतं, फोन घेऊयाच नको. रोज तेच तेच टेन्शन. तमिळ फिल्म्स बघून यांना वाटतं की आम्ही इकडे अमेरिकेत मजा मारतोय. पैसे कमावतो पण वाचवून खर्च करतो ते त्यांना समजतच नाही.” एरवी कधीही न चिडणारा मार्टिन त्यादिवशी मात्र प्रचंड भडकला होता. “मी माझ्या मेन्टॊरसोबत बोलत होतो. माझा प्रॉब्लेम झालाय, थिसीसचा. ते सर्व सुटायला अजून चार दोन महिने जातील. हे मी बोलत असताना अम्माने मला पंचवीस मिसकॉल दिलेत. वर म्हणे, संध्याकाळी आठ वाजता तू कुठे होतास? घरी का आला नाहीस! म्हणून तुझं लग्न लावून द्यायला हवंय. जरातरी लॉजिक लावून बोला. मला लग्नच करायचं नाही इतकीशी गोष्ट त्यांना का कळत नाही?” मी हातातली सिगरेट त्याच्या पुढ्यांत धरली. त्यानं ती घेतली, “स्वप्निल, आय ऍम नॉट गोइंग बॅक. दॅट इज फ़ॉर शुअर” युएसमध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार एकदाना एकदा तर येतोच, कित्येकांच्या मनात कायमचाच.
“इतकं सोपं नाहीये, आपण आपल्या घरच्यांपासून दूर राहू शकत नाही”
“तू नाही राहू शकणार. मी राहू शकेन. इन फ़ॅक्ट मी इकडे यायचं कारणही हेच आहे, मला घरापासून दूर  जायचंय. माझा दम घुसमटतो. कितीहीवेळा एकच गोष्ट त्यांना सांगितली तरी ती पटत नाही, समजत नाही. मला सायकॉलॉजिस्टकडे जायचा सल्ला देतात, आय मीन, ब्लडीहेल, आय ऍम वन ऑफ द बेस्ट स्टुडन्ट्स ऑफ इंडिया. पण माझ्या फॅमिलीला ती गोष्ट अभिमानाची वाटत नाही. दे आर अशेम्ड ऑफ मी. ऑफ हू आय ऍम. वाटल्यास काहीही ट्रीटमेंट घे, पण एकदाचं लग्न कर आणि सर्व काही नीट होईल, हीच एक कॅसेट लावून ठेवलीये”

“ऍक्च्युअली, आपल्याकडे ही कन्सेप्ट फार भारीये, लग्न झालं की सर्व नीट होईल. आणि दुर्दैवानं माझ्या दोन्ही सीरीयस एक्सच्या बाबतीत ते खरंय. केदार इज हॅपी, आफताब तो अल्वेज हॅपी.”
“ऍंड यु?”
“आय डोंट मेजर माय हॅपीनेस इन अ मॅरेज. आय ऍम हॅपी. माझ्या आयुष्याचं सुख किंवा दु:ख मी लग्नाच्या परिमाणांत मोजत नाहीये. एकेकाळी मी भरभरून प्रेम केलंय. आता कुणाचीही गरज नकोशी वाटते. नंतर कधी थोड्या वर्षांनी तशी गरज भासलीच तर... पुढ्चं पुढे. पण म्हातारपणी कुणाची तरी सोबत हवी म्हणून आतापासून गळ्यांत धोंडे बांधून घेणार नाही पण माझ्याही घरचे सेम विषय लावून आहेत, मुलं बघ. आवडला तर लग्न कर. नाहीतर मग बघू!! माझी ना एक फ्रेंड बॉलीवूड स्ट्रगलर होती,  ती फिल्म्सच्या ऑडिशनचं सांगायची, आत गेलं की तिथं बसलेली एक बाई अथवा बाबा यांच्याकडे आपादमस्तक निहाळून बघायला आणि लगेच म्हणायचा “नेक्स्ट” थोडक्यात तुम्ही रीजेक्टेड. हे अरेंज मॅरेजकरता मुलं बघताना मी स्वत:ला त्या बाईच्या खुर्चीत इमॅजिन करते. तासाभरात भेटून हा माणूस आयुष्यभर आपल्यासोबत राहू शकेल का? आपली मुलं सांभाळू शकेल का? जेनेटिकली हा आपल्यासाठी योग्य जोडीदार आहे का? इमोशनली सपोर्ट देईल का? फिजिकली खुश ठेवील का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवायची. क्रुएल प्रॅक्टीस!!”
“लकी फ़ॉर यु,  किमान तुला हे सगळं समजून घेणारे पॅरेण्ट्स आहेत. आमच्याकडे मी जर परत गेलो तर मद्रास एअरपोर्टवरच ब्राईडला आणून उभं करतील. इतकी तयारी करून ठेवलीये पण मला नाही ना करायचंय. ऍट लीस्ट आस्क मी, मला कुणासोबत आयुष्य काढायला आवडेल?”
“कुणासोबत?” मी दुसरी सिगरेट पेटवत विचारलं.
“तुझ्यासोबत! इथं आमच्या अख्ख्या लाईफची सॅड स्टोरी ऐकवायची आणि तुम्ही वाईट पीजे मारायचे. चलो, इट्स लेट. उद्या पहिलं लेक्चर आहे. गूड नाईट”
“गूड नाईट आणि लवकर झोप. उगाच अभ्यास करतो म्हणत सिगरेटी फुंकू नकोस.”
“सेज द चिमनी” मार्टिन आपल्या बेडरूममध्ये निघून गेला. गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये आम्ही जरा तरी निवांतपणे बोलायला लागलो होतो. त्याच्या कामाचा लोड प्रचंड वाढला होता, पण मुळातच थोडा घुमडतोंड्या असल्याने फार कुणाशी बोलायचा नाही. सुरूवातीला तर अगदी केवळ फॉर्मॅलिटीपर्यंतच. खरंतर तो माझ्याशी जास्त बोलत नव्हता तेव्हाच नॉर्मल वाटायचा, आताचा त्याच्या बोलण्यामध्ये कितीही मोकळेपणा आला असला तरी मला तो मोकळेपणा नाटकी वाटायचा. मार्टिन वाईट नव्हता, पण या अश्या अत्यंत स्ट्रेसफ़ुल वातावरणामध्ये तो तग धरून राहू शकला नसता. त्याला जबरदस्त इमोशनल सपोर्टची गरज होती... हे मला दिसत होतं, पण काही करता येत नव्हतं. मार्टिनच्या रूममधून थोड्याच वेळांत सीडीवर कूठलंतरी अगम्य तमिळ गाणं ऐकू यायला लागलं. मी आईने इतका वेळ व्हॉट्सऍप वर पाठवलेले मेसेजेस डाऊनलोड करायला घेतले. हा आमचा या आठवड्याचा होमवर्क. यामधल्या मुलांचे फॊटो बघा, माहिती वाचा आणि त्यावर मत प्रदर्शन करा!

>>>>>>>>>>>>>>> 
खरंतर कितीही वर्षांनी घरी परत आलं की घर हे घरासारखंच वाटायला हवं, पण आज तसं वाटत नव्हतं.
बाबा आता बर्‍यापैकी थकलेला दिसत होता. आई मात्र अजून आहे तशीच होती.  दोन वर्षांनी परत आले होते, पण सगळंच बदलल्यासारखं वाटत होतं. आमच्या घरासमोरचा रिकामा प्लॉट विकला होता आणि तिथे तीन मजली बिल्डिंग उभी राहिली होती, त्यामुळे आमचा हॉल आणि आईबाबांच्या रूममध्ये काळोख भासत होता. त्यामानानं माझी खोली बरीच उजेडाची राहिली होती, म्हणून आईबाबांनी त्यांची खोली माझ्या खोलीत शिफ़्ट केली होती, हे मला माहित होतं तरी चिडचिड झालीच.
मुंबई एअरपोर्टला आईबाबा मला न्यायला आले होते. तिथून काकाकडे गेलो, एक दिवस तिथेच थांबलो आणि दुसर्‍या दिवशी कारने घरी आलो. आल्यान्ंतर दोन दिवस मी एकच काम केलं- झोपणे.
आई तर ओरडली. “किती वर्षांच्या झोपेचा कोटा पूर्ण करायचाय?” मी दोन थालीपीठं आणि लोण्याचा गोळा मटकावल्यानंतर अशा प्रश्नांना माझ्या कानांपर्यंत येऊच देत नाही.

 “उठ! बाजारात जा. नवीन ड्रेस घेऊन ये! दिवाळी जवळ आलीये, फटाके आण. मी फराळ यंदा करणार नाहीये. रानड्यांच्या दुकानांत ऑर्डर दिलीये, ती घेऊन ये. ऐकलंस का?” लेक येऊन दोन दिवस  लाडबिड झाल्यावर आईबाई एकदम नॉर्मल मोडात आल्या होत्या. “आता उठतेस का की फटका देऊ?” अशी परवानगी वगैरे विचारायचं नाटक करून नंतर फटका जिथं द्यायचा तिथं देत आई ओरडली. “ताबडतोब”
“झोपू दे ना गं” मी पांघरूण तोंडावर घ्यायचा प्रयत्न केला. आईनं एखाद्या मार्शल आर्ट्सवाल्या माणसाला लाज वाटावी अशा चपळाईनं ते पांघरूण माझ्या हातातनं खस्स्कन ओढून घेतलं. आता नाईलाजच झाला.
“बाबा कुठाय?”
“दुकानांत गेलाय. दुपारी जेवायला येईल. उठ, पाच मिनिटांत शॉवर घेऊन ये. चांगले कपडे घाल”
“का? कुणी मला बघायला येणार आहे?”
“येतील ना! लवकरच तुला बघायला लोक येतील. हा कोण नमुना आलाय यांच्या घरी म्हणून, आणि काय गं! ए टवळे!” आता आईचा टोन बदलला होता, काहीतरी घणाघाती विषयांची सुरूवात होती, आधीच उठून बाथरूममध्ये घुसणं शहाणपणाचं. पण बॅट्समन की जोरदार कोशीश पर नाकामयाब “बस इथं, तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? आं!! ते लग्नासाठी स्थळं पाठवते त्या प्रत्येकाला काय स्टोरी ऐकवतेस? तुझं एक लग्न मोडलंय आणि दुसरं होता होता मोडलं! तुझ्या जीभेला काही हाड!”
“मग? खॊटं बोलून लग्न करू? हे आहे ते सत्यच सांगते ना?”
“सत्य सांगायलाही वेळ्काळ  नको? आधी मुलगा बघ, भेट, काय ते तुमचं स्काईप का काय ते करा, आणि मग नंतर सर्व योग्य वाटलं तर सांग! पत्रिका जमते म्हणून मेसेज आला की तुला लगेच आत्मचरित्र सांगायची गरज नाही. तो भास्कर मुलगा काय चांगलाय. त्याची आई आणि मी एकाच वर्गात होतो. सेम आईसारखाच दिसतो. शिवाय अतिशय शांत आणि चांगला वागणारा मुलगा. त्याला किमान भेटायला तरी हवं होतंस, तुझ्यासारखाच हुशार आहे. लंडनला असतो”
“आई, आता मला प्लीज ही ऍडिशनल माहिती देऊ नकोस. विषय मिटलाय.”
“हो, आता इतकं मोठं रामायण ऐकवल्यावर अजून काय होईल? पण याद राख! परत असला आगावपाणा करू नकोस. चल, आवरून घे”
चांगल्या झोपेचं खोबरं केलं असलं तरीही त्या दिवशी आईनं रगडा पॅटीस करायचं ठरवलं होतं म्हणून मी निमूट आवरून ब्रेकफास्टला किचनमध्ये आले. समोर ताटलीत कांदेपोहे.
“का गं आई? असा अन्याय का करतेस?”
“आव्वाज बंद. बाबासाठी गरमगरम पोहे केलेत ते खा. थोड्यावेळात रगडापॅटीस करेन. आणि हां, एक काम कर. राहिलाकडे जा. तिनं काल बोलावलं होतं तर तू हातभट्टीची झोकल्यासारखी बेशुद्ध.” ताटलीत पोहे पण आईच्या भाषेत काय खत्तरनाक उपमा!
पण कांदेपोहे हा पदार्थ जगामध्ये बॅन करायला हवाय. एक तर काय चव नाही, शिवाय विनाकारण त्याला आलेल्ं ग्लॅमर. आयुष्य म्हणजे चुलीवरचे पोहे म्हणे. तुमची आयुष्यं असतील अशी फुळकट बेचव. आमचं आयुष्य म्हणजे झणझणीत कट मारलेलं मिसळपाव.
मी अझरभाईंच्या घराकडे जायला निघाले तर आई परत ओरडलीच. “गडगा ओलांडून काय जातेस? नीट गेटकडून जा. पहिल्यांदाच भेट्तेस ना तिला?”
“काहीही! राहीभाभीसोबत रोज गप्पा मारते. आणि अझरभाईला भेटायला काय फॉर्मऍलिटी.” मी हट्टानं गडगा ओलांडूनच गेले. किचनचा दरवाजा पुढे ढकललेला होता.
“भाभी?” मी दार ढकलत विचारलं.
“कौन?” आतून आवाज आला.. फोटोमध्ये कित्येकदा पाहिलं असलं तरी समोर उभ्या असलेल्या शाहीनला मी पटकन ओळखलंच नाही.
“या! आत या” माझं येणं तिच्यासाठीही तितकंच अनपेक्षित होतं. तीही गडबडली.
“राहीभाभीला भेटायला आले होते...”
“त्या कॉलेजला गेल्यात. घंट्याभरात येतील.”
“ठिक आहे, मी नंतर येईन”
“आत तरी या. चाय ठेवलीच आहे”
“चहा नको, आता जस्ट ब्रेकफास्ट झालाय” मी डायनिंग टेबलची खुर्ची ओढून बसले. आता परत जाणं वाईट दिसलं असतं. ही होती म्हणजे हीरो असतीलच घरात. “कधी आलात?”
“काल रात्री! तुम्ही आज मुंबईला परत जाणार होतात ना?”
“हो, प्रोग्राम तसाच होता. पण कॅन्सल झाला” खरंतर आम्हाला मुंबईला तोच भास्कर मुलगा बघायला जायचं होतं. मी सुट्टीसाठी पंधरा दिवस आले तरी आईनं भरगच्च प्रोग्राम ठेवला होता. पण मी परस्पर मुलांना मेसेज करून आईच्या भाषेत “आत्मचरित्र” कळवलं होतं त्यामुळे हे सारे प्रोग्राम आपसूक कॅन्सल झाले होते. ही आयडीया खरंतर मार्टिनची. त्यानं घरच्यांना कंटाळून फोन करून त्यांनी ठरवलेल्या मुलीला फोन करून सांगितलं होतं, ते ऐकून अर्थात लग्नाला नकार आलाच. “दुनिया ना सच्चई से बओत डरती हय” मार्टिन त्याच्या टिपिकल तमिळ उच्चारांमध्ये मला सांगत होता. “सत्य सांगितलं नाही तर उलट जास्त प्रॉब्लेम येतात, खरं काय ते सांगितलं की प्रॉब्लेम उलट लव्कर सॉल्व्ह होतात.” मीही मार्टिनचा कित्ता गिरवला होता. त्यावरून आताच आईकडून चिकार बोलणीपण खाल्ली होती.
“पण बरं झालं ना. मुंबईत काय आपण भेटलो नसतो, इथे आलात म्हणून भेटले तरी. सुट्टी कशी चालू आहे?”
“आईची बोलणी खात आणि बाबाकडून ज्ञान ऐकत... अशीच सुट्टी संपणार”
“तुमचं तिकडचं काम झालं?”
“अजून नाही. दोन वर्षं शिल्लक आहेत...”
“खूप अभ्यास करावा लागत असेल ना. मला अभ्यास करायचा फार कंटाळा. हे म्हणतात घरात इतकी पुस्तकं आहेत तर वाचना... पण मला माही आवडत. मग वैतागतात. चायमध्ये शुगर किती?”
“एक चमचा” शाहीनला खरंतर पहिल्यांदा भेटतेय असं वाटलंच नव्हतं, याआधी फोनवर बोलले होतेच. मुळात तिचा स्वभाव फार एकमार्गी होता. या मुलीला कुणीही दोन चार गोड शब्द बोलून फ़सवलं असतं, इतकी साध्यासरळ स्वभावची होती. आफताबसारख्या मुलाला अशीच बायको आवडावी यात नवल ते काय...
“अझरभाई कुठं गेलेत?”
“मटण मार्केटला. हे दोघंही तिकडेच गेलेत. खरेदी आटोपून येतीलच. आज आमच्याकडे बिर्याणी बनवायचीय.”
“कमॉन शाहीन, आफताब मटण मार्केटला गेला असेल, अझरभाई चुकून तिकडे फिरकत नाही” यावर ती हसली. “तुम्ही इकडून गेल्यापासून बरंच बदललंय. अझरभाई हल्ली रोज मटण मार्केट नाहीतर मच्छी मार्केटला जातात.”
“लहानपणापासून बघतेय तो व्हेज आहे, मध्यंतरी तो व्हेगन झाला होता.”
“आतापण व्हेगनच आहे. मटण मासे मात्र रोज आणतो. कशासाठी बघायचंय? या इकडे”
तिनं किचनचा दरवाजा उघडला, या घराच्या पलिकडच्या भागामध्ये आधी नुसती झाडं आणि बाग होती. बहुतेक झाडं आफताबनं लावलेली. आता त्यामधली निम्मी झाडं गायब होती आणि नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेली झापांची झोपडीसारखं काहीतरी बांधलं होतं. “हे टेम्पररी आहे हां. लवकरच इकडे खोली काढणार आहोत” तिनं त्या झोपडीचं दार उघडलं. अझरभाईनं इथं लिटरली कोंडवाडा उघडला होता.
“रस्त्यावर लोकं कुत्र्यांमांजरांना सोडून जातात, कुणी गायीबैल सोडून जातात. मुक्या प्राण्यांना कोण बघणार? हे वर्षभरापासून चालू केलंय. अझरभाईंचंच काम! आता तर लोक स्वत: घेऊन येतात. सध्या पाच शिकारी कुत्रे आहेत, त्यांच्यासाठी मटण आणतात. अझरभाई नगरसेवक म्हणून झाल्यापासून याच कामांत फार बिझी असतात. लोक तर चिडवतात पण तुम्ही आमचे कमी आणि प्राण्यांचे जास्त लाड करता”
हे अस्लं तिरपागडं काम करणारा माणूस अझरभाई असू शकतो.  
“आमच्याकडे गावात मोप गुरंढोरं आणि पक्षी, त्यामुळे इकडे सांभाळायला मीच मदत करते. आठवड्यातून एकदा तरी येतेच. जीव खरंतर जास्त इकडंच अडकलाय”
“पण आफताबची झाडं कापली म्हणून चिडला असेल ना?”
त्यावर ती काही बोलली नाही, मीपण बोलले नाही. दोघी परत येऊन किचनमध्ये बसलो. “चाय सोबत काही देऊ? आज ब्रेकफास्टला चॉकलेट पॅनकेक बनवलेत. राहीभाभींची रेसोपी”
“अज्जिब्बात नको. माझं आणि चॉकलेटचं वाकडं आहे”
“मग काय देऊ?”
“नुसता चहा चालेल. तू पण बैस. केव्हाची उभी राहून काम चालू आहे, पाय दुखत वगैरे नाहीत का?” ती हसली. आईला विचारलं तर आईनं बरोबर सांगितलं असतं, पण मला या प्रकाराच्या अंदाजांची फार सवय नाही पण पाचवा किंवा सहावा महिना नक्कीच चालू असावा. वेल डन आफताब!
“मला उलट कामाची सवय आहे, नुसतं घरात बसून राहिलं की कंटाला येतो. त्यापेक्षा इकडे चार कामं जास्त केली तर परवडतं.”
“बाळंतपण कुठे?”
“इकडेच. माहेरी कोण करणार?”
“म्हणजे?”
“आई लहानपणीच गेली. बाबांनी दुसरं लग्न केलं पण ती बाई “आई” कधीच नसते. मग काय.... आता तर मी माहेरी गेले की मला चिडवतात... काय जादू केली आणि असला नवरा मिळाला... मी कधीच मागितला नव्हता, पैसेवाला, शिकलेला वगैरे असल्या काही मागण्याच नव्हत्या. तरी मिळाला. पण त्यावरूनही टोमणे. त्यापेक्षा मी तिकडे जातच नाही. इथे राहीभाभी म्हणाल्या की मी सर्व करेन. शिवाय मदतीला गौरीकाकी आहेतच.”
“गूड” काहीतरी बोलावं म्हणून मी बोलले. गौरीकाकींचा एकंदरीत बाळंतपणाचा अनुभव चहा पित बसलाय इथं समोरच. “चहा ऑस्सम केलायस.”
“तुम्ही दुपारी जेवायला पण या ना.”
“बिर्याणी तू करणार आहेस की आफताब?”
“त्यांना थॊडीच बनवता येते?” एका क्षणामध्ये त्याच ठिकाणी बसून मी अलमोस्ट पंधरा वर्षं मागे गेले. इथंच मी अरिफ आणि आफताब चाचींसाठी सरप्राईझ बर्थडे मेनू बनवत होतो. अचानक, केकची रिबन कन्सिस्टन्सी म्हणजे टेबलावर पीठ पसरून रिबन तयार होते का असं विचारणारा आफताब डोळ्यांसमोर आला आणि फिस्स्कन हसू आलं.
“काय झालं?” शाहीननं विचारलं.
“काहीतरी आठवलं. आम्ही एकदा इथे चाचींसाठी बर्थडे सेलीब्रेट केला होता. त्यादिवशी बिर्याणी बनवली होती.”
“यांनी?”
“नाही, अरिफने. तुम्हाला कदाचित माहित असेल..”
“बोलतात कित्येकदा. त्यांच्या डेथमुळे खूप डिप्रेस झाले होते ना?”
“हं!”
“हे मागेच बोलले होते, मुलगा झाला तर नाव अरिफच ठेवायचं..” आणि मुलगी झाली तर परी! मी आणि आफताब एकमेकांच्या प्रेमात पडण्यापूर्वीच त्यानं हे स्वत:शी ठरवलेलं होतं. अरिफच्या जाण्यामुळे त्याचं उद्ध्वस्त होणं मी पाहिलं होतं. अरिफच्या जाण्यानं आफताबला संपूर्ण बदललं, कमी वयांत आलेली जबाबदारी, एकटेपणा, घरामध्ये कायम स्वत:ला परकं मानायची वृत्ती, लवकरात लवकर पैसे कमावणे इतकंच साध्य ठेवून केलेले जीवापाड कष्ट. अरिफ गेला नसता, तर कदाचित आफताब वेगळाच झाला असता, सतत सहार्‍यासाठी या खांद्याकडून त्या खांद्याकडे जात राहिला नसता.
“अरे, हिरॉइन इकडे आली?” दारातून आवाज आला. मान वळवून बघायचीही गरज नाही.
“तुला भेटायला म्हणूनच आले तर तू गायब!” मी टोमणा रीटर्न केला, आणि उभं राहून मागे पाहिलं. अगदी निमिषभराचाच विश्राम, त्यानं आणि मी एकमेकांना पाहिलं, मग तो हसला, कुजकट किंवा छद्मी नाही तर अगदी मनमोकळेपणानं, मीही हसले. एकमेकांना प्रत्यक्ष भेटताना कधीकाळचे प्रेमी म्हणून भेटायचं की लहानपणचे मित्र म्हणून हा प्रश्न दोघांनाही एकाच क्षणी पडला, आणि त्याचक्षणी उत्तरही देऊन गेला. आम्ही एकमेकांचे मित्र आधी, मग बाकीचे काय इमोशनल झोल असतील ते.
“शाहीनची ओळख झाली?” त्यानं विचारलं.
“हो, चहाच घेतोय”
“अझरभाई किधर?” शाहीननं विचारलं. त्यानं हातातली पिशवी तिच्या हातात दिली. “क्या पागलपंती मालूम नै. उसको किसीका फोन आया, किधरतोभी पानी नही आया करके लोग गाली दे रहे थे. वो माजरा देखनेको गया. घंटेभर मे वापस आया बोला है. चाय बनाया?” म्हणत त्यानं शाहीनचा तिथं ठेवलेला कप उचलला आणि तोंडाला लावला.
मघाशी म्हटलं तसं मला शाहीन आणि आफताबबद्दल कधीच जेलसी वाटली नाही, पण त्याक्षणी मात्र वाटली. त्यानं तिचा कप उचलून सहज चहाचा घोट घ्यावा, यात इतकं वाटण्यासारखं काय आहे ते मला माहित नाही, पण मला वाईट वाटलं हे नक्की.. ऍक्चुअली वाईट पण नाही वाटलं, काहीतरी एकदम खळबळजनक वाटलं, तेवढंच, तेवढ्यापुरतंच. पण काहीतरी मनामध्ये हडबडून गेलं हे मात्र नक्की. आफताब इतका सहज वागलेला मला फारसा आठवत नाही... मग अचानक डोक्यात क्लिक झालं. शाहिन आणि अरिफ. दोघंही एकाच घडणीचे. सावत्र आई, कमी शिक्षण त्यामुळे आलेला न्युनगंड.. आफताबनं हा निर्णय आततायीपणा मुळे घेतलाच नव्हता. कुठंतरी त्याला शाहीनमध्ये अरिफ भासला होता, जाणवला होता. हे लग्न केवळ त्यानं स्वत:ची सेक्शुअल सोय म्हणून केलं नव्हतं, तर मनापासून त्याला शाहीनबद्दल काहीतरी जाणवलं म्हणून केलं होतं.
“ठंडी हो गयी तो फिर बनाऊ?” तिनं त्याला विचारलं.
“नही, रहने दो! चाय बनाया के मस्करी. कितनी कम शक्कर डालते!” त्यानं उत्तर दिलं. नंतर मोर्चा माझ्याकडे वळवला. “कधी आलीस?”
“दोन दिवस झाले.”
“अझरभाई म्हणालेला. बाकी युएस काय म्हणतंय?”
“ते ओबामाला विचार. मला काय माहीत?”
“खडूसपणा गेला नाहीच ना तुझा?”
“तुझ्याचकडून शिकलेय. सहजासहजी थोडीच विसरेन”
“मी इतका खडूस अजिबात् नाही. का गं शाहीन?”
“तू तिची साक्ष घेऊ नकोस. ती जितके महिने तुला ओळखते ना, तितकी वर्षं मी तुला ओळखते”
“तुमच्या दोघांची भांडणं चालू द्या, मला मोप कामं आहेत, मी आलेच पाच मिनिटांत.” शाहीन ती मटणाची काळी पिशवी घेऊन किचनमधून बाहेर गेली. मी आणि आफताब दोघंच राहिलो. माझ्या समोरची खुर्ची ओढून तो बसला.
“जाड झालीस!”
“बायको चांगली आहे. नीट वाग तिच्यासोबत”
“मी नीट वागणार नाही असं तुला वाटलं कसं काय? आय हॅव अल्वेज बीन अ गूड बॉय”
“असं तुला वाटतं!”
“शाहीनला पण असंच वाटतं... विचार वाटल्यास”
“मी कशाला विचारू? क्लीअरली तुझ्यापेक्षा जास्त अक्कल तिच्याकडे आहे, आपल्या दोघांना बोलायला मिळावं म्हणून ती बाहेर गेली.”
“हाच सीन तीन वर्षांपूर्वी घडला होता, स्वप्नील. पण त्यावेळी तुझ्या मनांत जो संशय आला तो शाहीनच्या मनात शंभर वर्षांत येणार नाही.”
“मी खोटं बोलून आली नाही, आणि येणारही नाही. गरीब गाय आहे ती, तुझ्यासारख्या कसायाच्या हाती सापडलीय”
“असेलही, पण या कसायाला तिनं कायमचं बांधून ठेवलंय हेच एकमेव सत्य..”
“जे कदाचित मला जमलं नाही”
“जमलं असतं पण तुझा विश्वास नव्हता, माझ्यावरही आणि स्वत:वरही”
“आता यावर चर्चा करून उपयोग काय आहे?”
“तेव्हा तरी चर्चा करून काय उपयोग होता?” त्याचा मोबाईल वाजला. तो मेसेज वाचत असतानाच मी उठले.  
“चलो, मी निघते. आई वाट पहात असेल.”
“हं!” त्यानं मान वर न करता म्हटलं. “शाहीनला बाय सांग. नंतर निवांत येईन” त्याचं लक्ष नव्हतं.
मी बाहेर पडताना किचनमधून बाहेर न पडता पुढच्या दरवाज्यानं बाहेर आले. खरंतर मला त्या गेटमध्ये दोन क्षण थांबावंसं वाटलं, अरिफसाठी. तो पहिल्यांदा इथंच भेटला. त्याही दिवशी आईनं कांदेपोहेच केले होते आणि पातेलंभर पोहे घेऊन मी इथंच तर उभी होते. अरिफची आठवण एरवी कधीच येत नाही. पण जेव्हा कधी येते तेव्हा या माणसानं आपल्या आयुष्यात काय भलीमोठी पोकळी सोडली आहे याची जाणीव होते.. आफताबला खरं कधीतरी विचारायला हवं, अजूनही तो स्वप्नांत येतो का म्हणून...
विचार करत मी गेटबाहेर आले. इथून मोजून पंचवीस तीस पावलांवर माझं घर. हे घर नक्की कुणाचं? इथे कधीकाळी शास्त्रीकाकू रहायच्या, मग हे चाचींचं घर झालं, थोडे दिवस अरिफचं होतं, मग कधीतरी ते आफताबचं झालं, मग नंतर ते अझरभाईचं झालं. आता मात्र हे घर राहीचं आणि शाहीनचं. चाचींना आई कधीतरी चिडवायची, तीन तीन सुना आल्या की तुमची सद्दी संपलीच. तीन नाही तर दोन सुना या घरात आल्याच. आपापल्या परीनं घराला सावरणार्‍या. राही आणि अझरचा प्रश्नच नव्हता, परिस्थितीनं होरपळलेले दोघंहीजण, एकमेकांना सावरून घेत होते. शाहीन आणि आफताब दोघं दोन ध्रुवावरचे प्राणी. लग्नाच्या गाठी म्हणे, स्वर्गात बांधतात. यांची गाठ बांधताना देवाजीमहाराज नक्की तारक मेहता का उल्टा चष्मा बघत बसले असणार. तरीही, दोघं सुखी होते.
आयुष्याकडून अजून दुसर्‍या अपेक्षा तरी काय असतात.... गोष्ट संपत आल्यासारखी का वाटतेय? खरंतर गोष्ट कधीच संपत नाही. माझी गोष्ट तरी का संपावी? कालच फेसबूकवर गौतमीनं पोस्ट टाकली होती की, तिच्या पुस्तकाला प्रकाशक मिळालेला आहे. तिच्या इतक्या दिवसांच्या कष्टाचं सार्थक झालं वगैरे वगैरे. तिचीतरी गोष्ट कुठं संपली आहे? तरी तिनं संपवली. बाबानं ठेवलेली बाई दोन वर्षांपूर्वी मेली. तिचा अंत्यसंस्कार बाबानंच केला. त्या नात्याची गोष्टही संपली. नूरीनं दुसरं लग्न केलंय, अझर आणि नूरीची गोष्ट संपली. अरिफ आम्हा सर्वांना सोडून अचानक गेला, त्याची गोष्टही संपली. पण अजून काही दिवसांनी अरिफची गोष्ट परत सुरू होईल, शाहीन आणि आफताबचा मुलगा म्हणून. नाती संपतात, नात्यांची गोष्ट संपते. चालू राहते... ती मात्र एक जिवंत रसरशीत कहाणी.
खरंतर माझ्या कहाणीमध्ये वेगळं काय आहे? कसलाही संघर्ष वगैरे नाहीच. समाजाच्या उच्च मध्यमवर्गामध्ये जन्माला येऊन शिक्षण नोकरी करीअर कशाही बाबतीमध्ये मला त्रास झाला नाही. अगदी परधर्मीय व्यक्तीबरोबर लग्न केलं असतं तरी माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला असता. जातधर्मलिंग याहून अधिक काहीतरी जास्त महत्त्वाच्या गॊष्टी जगण्यामध्ये असतात... सुदैवानं हे ओळखणारे लोकंच आजूबाजूला कायम भेटत गेले. मग तरी माझी कहाणी मी का सांगतेय? वयाची तिशी जवळ आली, बहुतेकांच्या दृष्टीनं हा “सेटल” होण्यासाठी अगदी योग्य वय. मी अजून सामाजिक मान्यतेच्या चौकटींमध्ये बघितलं तर “सेटल” झाले नाही. पुढे मागे कदाचित होईनही. इथवर येऊन पोचेन असं कधी वाटलंच नव्हतं त्यामुळे इथून पुढे कुठे जाईन तेही माहित नाही. पण जिथं कुठं जाईन तिथं मात्र माझ्या मर्जीनं माझ्या निर्णयानं इतकं मात्र निश्चित.
मी घराकडे चालत असतानाच पाठीमागून आफताबचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं. “मोबाईल विसरलीस”
“थॅंक्स” शाहीनशी बोलता बोलता टेबलावर ठेवला होता तो तिथंच विसरले.
“कुणाचा तरी कॉल आला, म्हणून मला समजलं की तुझा मोबाईल राहिलाय. कमॉन, आता तरी ही रिंगटोन चेंज कर”
“गेल्या बारा वर्षांत केली नाही. यापुढेही कधी करणार नाही..”
“अशीच हट्टी रहा! मी मघाशी जास्त बोललो नाही म्हणून प्लीज रागावू नकोस. खरंतर समोरासमोर बसून बोलण्यासारखं काही राहिल्ंच नाहीये असं मला का कुणास ठाऊक वाटलं.”
“आय नो, तरीही, मेसेंजरवर बोलूच”
“आय रीअली प्रेफर दॅट. संवादही राहतो, आणि डिस्टन्सही.”
“संवाद बंद होणारच नाही ना?”
“का? का बंद करायचाय? स्वप्नील, यु आर माय ओन्ली फ्रेंड. फेसबूकच्या लिस्टमध्ये हजारो लोक आहेत, पण तू माझा एकमेव मित्र आहेस. ही वेवलेंग्थ इतर कुणाशीही जुळली नाही, यापुढे जुळणार नाही. माझ्यासाठी तू एक ओऍसिस आहेस. मिळणार तर कधीच नाही... पण किमान समोर आहे म्हणून चालत तरी राहीन” मी काही बोलायच्या आत माझा मोबाईल परत वाजला, अननोन नंबर! मी कॉल कट केला.
“मी घरी सोडू का तुला?” त्यानं विचारलं.
“आता असं अंतर किती राहिलंय? निम्मं अंतर एकटीनंच पार केलं” मी जायला निघाले. परत मघासच्याच नंबरवरून कॉल आला. रहे ना रहे हमची रिंग टोन परत वाजायला लागली. समोर उभा असलेला आफताब गुणगुणत राहिला. “महका करेंगे, बनके कली बनके सबा बाग ए- वफामे...”
“खरंच ही रिंगटोन कधीच बदलू नकोस” तो म्हणाला. “बाय!”
मी कॉल ऍक्सेप्ट केला, आणि मागे वळून त्याला बाय केलं. त्यानं उगाचच जरा झुकून वगैरे मला आदाब केला आणि तो मागे फिरला.
पलिकडे एकदम सेक्सी कुणीतरी बोलत होतं. “हॅलो.. मला जरा स्वप्निलसोबत बोलायचं होतं!” काय आवाज आहे. बेनेडिक्ट कंबरबॅच एकदम शुद्ध पुणेरी उच्चारांत बोलला तर कसं वाटेल. सेम तेच फीलिंग. “हॅलो... मिस स्वप्निलचा नंबर आहे ना?”
“बोलतेय”
“तुमच्याकडे आता बोलायला जरा वेळ आहे का? मी डिस्टर्ब तर करत नाहिये ना?”  
“नक्की कशासंदर्भात बोलायचंय?”
“मी भास्कर. माझ्या आईनं तुमचा फोटो आणि इतर माहिती पाठवली होती, तुमचे एक दोन मेसेज पण आलेत” मी चालत चालत घराच्या गेटपर्यंत पोचले होते. आईच्या जगप्रसिद्ध रगडा पॅटीसचा वास अंगणभर येत होता. खरंतर आता या इसमाला अजिबात वेळ नाही अजून अर्ध्या तासाने फोन कर असं सांगावं वाटलं. पण त्याचा तो आवाज!!! मी गेटपासून परत मागे फिरले आणि रस्त्यावरून चालत राहिले. आईसमोर याच्याशी बोलायचं वगैरे म्हणजे ती शकुनाच्या करंज्याच करायला घेईल!!
“बोला ना, सुट्टीवरच आलेय त्यामुळे चिक्कार वेळ आहे.”
“तसं फार महत्त्वाचं काही नाही. पण तुमचे मेसेजेस वाचले पण त्याचा कंटेक्स्ट मला समजला नाही. जर आपण आता अरेंज मॅरेज या कन्सेप्टला शरण जाऊन एकमेकांना जाणून घेणार असू तर आय विल बी मोअर इंटरेस्टेड इन यु. तुमच्या लाईफमध्ये आधी काय घडलं याची चर्चा करून काय उपयोग? तुम्हाला अधिक जाणून घ्यावंसं वाटेल.... तुमची काही हरकत नसेल तरच हां....”
“माझी कशाला काय हरकत.. पण बेसिकली, मला काही लपवून ठेवायला आवडत नाही. आणि असाच प्रामाणिकपणा मलाही अपेक्षित आहे...”
तो हसला, “माझ्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही... तरी तुम्हाला विचारा काय हवं ते..”
मी त्याच्याशी बोलत राहिले... मनाच्या कुठल्यातरी एका कोपर्‍यात गाणं वाजतच राहिलं.
खोये हम ऐसे, क्या है मिलना क्या बिछडना नही याद हमको,
कूंचे मे दिल के जबसे आये सिर्फ दिल की जमीं है याद हमको
इसी सरजमीं पे हम तो रहेंगे, बनके कली....
रहे ना रहे हम महका करेंगे बनके कली बनके सबा....

(समाप्त)


1 comment: