Tuesday 27 September 2016

रहे ना रहे हम (भाग १९)

निधीसोबत आफताब सध्या फारच स्टेडी रिलेशनशिपमध्ये होता. गंमत म्हणजे, माझ्यासोबत निधी फारशी बोलायची नाही. इन फॅक्ट, जर मी मुंबईत कुणाला निधी आणि मी एकाच वर्गात होतो, आणि आफताब वेगळ्या वर्गात होता हे सांगितलं तर खरंसुद्धा वाटलं नसतं. मला गावामध्ये खबर मिळाली होती की, निधीच्या घरचे तिच्यासाठी स्थळ शोधत आहेत तेपण एकदम फुल फोर्समध्ये. तिचंही मास्टर्स संपलं होतं. तिला पुण्यातच जॉब लागला होता, पण ती दर शनि रवि हल्ली आफताबच्याच घरी होती. आफताब आधी दोन तीन रूममेट्ससोबत रहायचा, पण त्यांच्यासोबत त्याचं फार काही पटलं नाही आणि आता तो एकटाच राहत होता. वीकेंडला निधी येतच होती. एकंदरीत मला तरी त्या दोघांच्या वागण्य़ाबोलण्यावरून ते लग्नाचादेखील विचार करत होते असं वाटत होतं. आय वॉज हॅपी फॉर बोथ ऑफ देम. माझ्या मनात अजूनही आफताबबद्दल फीलींग्स होत्या, पण त्या अशा होत्या की आहेत तर खर्र्‍या पण असून नसल्यासारख्या! मला त्यांचं हल्ली काही वाटतच नव्हतं. चुकूनमाकून माझ्या मनात कधी यावर वादंग माजलाच तर मी स्वत:लाच “यु लव्ह आफताब. सो व्हॉट! ही डझण्ट लव्ह यु” हे ऐकवून गप्प बसवायचे. आजही तेच करायचा आटोकाट प्रयत्न करते. स्वत:ला फसवण्याचा अजून एक प्रयत्न.
माझी आई माझ्यासाठी स्थळं शोधायच्या विचारात होती, मला म्हणाली तुझ्या काही अटी आहेत का? अटी घालून काय डोंबल लग्न करणार? चांगलासा आणि छानसा नवरा हवा होता. समजूतदार आणि कमवायची अक्कल असलेला हवा. कमवत नसेल तरी चालेल, मी बर्‍यापैकी कमावत होतेच पण दिसायला हॅंडसम हवाच. इतकंच काय ते.
मी पनवेलला शिफ्ट होऊन जवळजवळ सहा महिने झाले होते. मध्येच सुट्टी असली की गावी जायचे, किंवा कधीमध्यी आईबाबा येऊन रहायचे. बाबानं हा फ्लॅट खूप आधी एकदम स्वस्तात घेतला होता. तेव्हा पनवेल म्हणजे कंप्लीट मुंबईच्या बाहेर होतं, आता नवी मुंबई असलं फाफट्यासारखं वाढलं होतं की पनवेलच काय, थोड्या दिवसांनी पेण पण लोकांनी मुंबईतच धरलं असतं असं बाबा गमतीनं म्हणायचा. पेणमध्ये आमची थोडी जमीन होती म्हणे!! म्हणजे काकानं घेतली होती.काकूचं गाव असल्यानं तिथं हॉस्पिटल काढायचा प्लान होता. पण ते काही झालं नाही. पण जमीन पडून होती.
एके दिवशी शुक्रवारी ऑफिस संपवून घरी यायला निघाले होते, तेव्हा आफताबचा फोन आला. लोकलमध्ये असल्यानं नीट ऐकू आलं नाही. घरी आल्यावर त्याला लगेच फोन केला.
“स्वप्नील, उद्या काय करतेस?”
“काही खास नाही, जानेमन रीलीज होतोय. तिकीटं मिळाली तर बघेन. का रे?”
“ओह! तुझा पक्का प्लान ठरलाय का?”
“नाही. तिकीटं मिळाली तर ना. सलमानभाईचा पिक्चर आहे. ऍडव्हान्स बूकिंगपण मिळालं नाहीये. पण का विचारतो आहेस?”
“उद्या जरा  माझ्याबरोबर येशील?”
“कुठे?”
“जमेल का ते सांग आधी. माझ्यासाठी तुझे काही मेजर प्लान्स चेंज व्हायला नको”
“आता फटके खाशील. बोल कुठे जायचंय?”
“उद्या चार वाजेपर्यंत बांद्रा स्टेशनला पोहोच. मी येईन तिथं. मगच सांगेन.”
त्यानं फोन कटसुद्धा केला. आफताब इतक्या घुमवून फिरून काय विचारत होता, कुणास ठाऊक! एरवी मी फार विचार केला नसता, पण आज एकंदरीत त्याच्या बोलण्याचा टोन थोडा उदास वाटला.
दुसर्‍या दिवशी त्यानं सांगितल्यासारखं मी बांद्रा स्टेशनवर पोचले. सकाळपासून त्याचे नुसते मेसेजेस चालू होते. “अमुक वाजता येच” “लंच करून ये” “तुझा तो लाल रंगाचा सलवार सूट घालून ये” म्हटलं कशाला? एक तर मला तो लाल ड्रेस अजिबात आवडत नाही. खरंतर तो ड्रेस आमच्याकडे कामाला येणार्‍या कविताने तिच्या लेकीच्या लग्नांत मला दिला होता. मला अजिबात आवडला नाही, पण आई म्हणे कसाही असला तरी तिनं मायेनं दिलाय. घालायचाच.. मुंबईच्या गर्मीमध्ये इतका अंगभर कपडे घालून फिरणे म्हणजे मुश्किल. तरी म्हटलं जवळ ठेवून घेऊ. लालभडक रंगाचा ड्रेस. मुश्किल दिनो में काम आता हय. पण आफताबनं अगदी हाच्च ड्रेस घालून ये म्हणून सांगणं म्हणजे काय तर प्रचंड भानगड असणार!
तसंही शनिवारी दुपारच्या वेळेला लोकलमध्ये इतकी गर्दी नव्हती. मी लेडीज फर्स्ट डब्यात असल्याचं मेसेजवर कळवल्यानं आफताब समोरच उभा होता. “काय रे?कशासाठी बोलावलंस?” मी लगेच विचारलं.
“तूपण विसरलीस ना? आजची तारीख?” मला तारीख लक्षात होती, पण आजच्या तारखेचा सिग्निफिकन्स लक्षात येईना. माझा वाढदिवस नक्कीच नाही. आफताबचाही नाही. निधीचा असेल, तर मला कशाला बोलावलं?
“स्वप्निल, आज अरिफचा बर्थडे. मला वाटलं तुझ्या लक्षात असेल!”
खरंच, कशी काय विसरले मी? अरिफला जाऊनच इतकी वर्षं झाली. कमवायला लागल्यापासून आफताब अरिफच्या आणि अम्मींच्या वाढदिवसाला कुठल्याशा अनाथाश्रमामध्ये देणगी द्यायचा. अझरभाईंना ते फारसं आवडायचं नाही, म्हणायचा की आपल्याला जेव्हा पैसे द्यावेसे वाटतात तेव्हा द्यावे. ऑकेजनची वाट कशाला बघायची. पण आफताब म्हणायचा की  किमान त्या निमित्ताने आपल्याला आठवण राहते. तसं बघायला गेलं तर अरिफला तसं आम्ही कुणीच विसरलो नव्हतो. ऑफिसमध्ये कंप्युटरवर प्रेझेंटेशन बनवताना विनॅम्पमध्ये हळू आवाजात रफीची गाणी चालू रहावीत तसा अरिफ मनाच्या कोपर्‍यामध्ये कुठंतरी कायम होताच.
स्टेशनबाहेरच्या मॅक्डोनाल्डमध्ये बर्गर खाताना आफताबनं मला सर्व सविस्तर सांगितलं. त्यानं कुठल्याशा आश्रमामध्ये देणगी म्हणून काही कपडे आणि वस्तू दिल्या होत्या. आपण उचलून पैसे दिले की, त्याचं पुढे काय होतं ते समजत नाही मागच्या एक दोन वर्षांच्या अनुभवानंतर म्हणून यावर्षी त्यानं स्वत:च ड्रेस मटेरीअल फ्रॉक आणि शाळेसाठी स्टेशनरी आणल्या होत्या.
“मग माझी काय गरज?”
“फक्त मुलींसाठी जो सेक्शन आहे तिथं  जेंट्स लोकांना आतमध्ये एंट्री नाही. त्यामुळे तुला आत जाऊन प्रत्येक मुलीला तिच्या मापानुसार फ्रॉक अथवा मटेरीअल द्यावं लागेल. शिवाय इतर सामानपण. प्रत्येकीच्या हातात सामान दिलं तरच ते त्यांच्यापर्यंत पोचेल असं मलातरी वाटतंय.”
“ओह, म्हणून मला हा फुल ड्रेस घालायचा हुकूम झाला का?”
“ताई, ड्रेस फुल किंवा हाफचा प्रश्न नाही. तुम्ही ब्रॅंडेड कपडे वापरणार. अनाथ गरीब लोकांसमोर आपण महागडे कपडे घालून फिरणं ठिक वाटलं असतं का?” आता माझ्या लक्षात आलं, खुद्द आफताबनंसुद्धा कॉटनचा शर्ट आणि साधी जीन्स घातली होती. शिवाय हातामध्ये कायम अस्तं ते फंकी घड्याळ आणि गळ्यामधली सोन्याची चेन सुद्धा नव्हती.. कसं याला इतक्या बारीकसारीक गोष्टींचा विचार करायला कायम जमतं?
“मी येणार हे तिथं आधीच कळवलंय. त्यामुळे ते वाट बघत असतील. थोडेफार स्नॅक्स वगैरे असतील पण फार ग्रेट नसेल. कदाचित तुला आवडणार नाही, म्हणून इथंच पोटभर खाऊन घे. संध्याकाळ तर होईल सर्व कार्यक्रम आटपेपर्यंत. खूप उशीर झाला तर मी कारने सोडीन”
“काही गरज नाही. मी लोकलने जाईन. शिवाय शनिवार संध्याकाळी पनवेल हायवेवर भयंकर ट्राफिक असतं. पण मला एक सांग. वीकेंड असून निधी आली नाही? मला बोलावलंस ते.” तो दोन सेकंद काहीच बोलला नाही. मला वाटलं परत ब्रेकप झाला की काय!
“मीच सांगितलं तिला येऊ नकोस म्हणून!” शेवटी तो म्हणाला. “इन फॅक्ट, आधी ठरलं होतं की आम्ही दोघंपण जाऊ. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, ती माझ्यासोबत फक्त मजा म्हणून येतेय. अरिफ कोण आणि काय होता हे तिला माहितच नाही. मी कितीहीवेळा सांगितलं तरी तिच्या दृष्टीने अरिफ कधीच जिताजागता माणूस असणार नाही. तिच्यासाठीच काय, माझ्या आजूबाजूला सध्या जे कोण आहेत त्या सर्वांसाठी अरिफ म्हणजे केवळ पास्ट आहे. भूतकाळ जो कधीकाळी घडून गेलाय. फक्त तू आणि मी, स्वप्निल! आपण दोघंच असे आहोत ज्यांच्यासाठी अरिफ एखाद्या ऍबस्ट्रॅक्ट कल्पनेपेक्षा किंवा एखाद्या फोटोमधल्या थिजलेल्या स्माईलपेक्षा जास्त आहे. तो माझ्यासाठी भाऊ होता, तुझ्यासाठी फ्रेंड! त्याला ओळखणारं या जगात आता आपल्या दोघांशिवाय कुणीही नाही..”
“अझरभाई आहे ना...”
“अझर!! तो ऋषीमुनी व्हायच्या कॅटेगरीमधला माणूस आहे हे तुला माहित आहे ना. त्याला काही फरक पडतो का? मी त्याला महिनाभर आधी सांगितलं होतं! तू ये म्हणून रोज फोन केला, पण तो आला नाही. त्याच्यादृष्टीनं विषय संपतात गं. अब्बा, अरिफ, अम्मी. एकदा मूठमाती दिली की विषय संपला. नंतर तो आठवणही काढत नाही, रडतही नाही आणि त्यांच्याविषयी बोलतही नाही. सुखानं हसत नाही आणि दु:खानं रडत नाही. नि:संग म्हणतात बघ. तसा आहे. आणि आय ऍम शुअर, आज अरिफ असता ना, तर त्याचा हा बर्थडे आपणच तिघांनी सेलीब्रेट केला असता. आठवतं! अम्मीच्या बर्थडेला आपण केक बनवला होता... आणि त्यानं बिर्याणी. किती धमाल केली होती.”
ऍक्चुअली मला खरंच असं वाटलं नाही, पण त्याचं बोलणं ऐकताना डोळे किंचित ओले झाले. एरवी मी तशी कधीच रडत नाही पण त्या क्षणी मात्र रडू आलं. अरिफचं जाणं पुन्हा एकदा मनाच्या तळापर्यंत जाऊन सगळ्या आठवणी ढवळून आलं.
“स्वप्निल, तू माझी फ्रेंड आहेस ना?” म्हणणारा माझा मित्र. मृत्यू कसला क्रूर डाव टाकतो. आम्ही तेव्हा आठवी नववीत होतो. आता मोठे झालो, नोकरी करून स्वत: एकटे रहायला लागलो. आणि अरिफ, तो मात्र तेवढाच राहिला. त्याच्या आयुष्यामध्ये पुढे काहीच घडलं नाही, ना बरं ना वाईट. आयुष्यच संपलं! तिथल्या तिथंच साचून राहिल्यासारखं!
“हे!!रडू नकोस प्लीज. तू रडलेली, तेही माझ्यासमोर. तो मला म्हणेल की मीच तुला रडवतोय. कायम मला म्हणायचा, किती तुडतुड भांडतोस तिच्यासोबत. तुझी होणारी भाभी आहे, जरा रिस्पेक्टने बात कर”
“काय?” डोळे पुसत असताना मला एकदम ठसका आला. “काय?”
“अरे, हा आमच्या दोघांचाच फंडा होता. तुला नक्की कुणी पटवायची यावर आम्ही चिक्कार वाद घातलेत. मी म्हणायचो की तुला प्राजक्ता आहे ना. तुझा टाका सेट झालाय, आता स्वप्निल माझी.” मला खरंच एकदम हसू आलं. इतकावेळ गंभीर असलेला विषय त्यानं शिताफीनं बदलला होता.
“तू खरंच असं म्हणालास? निर्लज्जा!!”
“लहान होतो यार. स्कूलमध्ये. तेव्हा अशी कितीशी अक्कल असणार. तर अरिफभाई म्हणायचे की असं नाही. मीच स्वप्निलला पटवणार..मग मी वाद घालायचो. मग मी प्राजक्ताचा मुद्दा काढला की तो म्हणायचा काय फरक पडतो.. आपल्यात तश्यापण चार अलाऊड आहेत! तू दुसरीकडे कुठेतरी शोधाशोध कर. पण स्वप्निल माझीच होणार”
मी त्याला एक फटका मारला. “लाज वाटते का रे? एखादं खेळणं असल्यासारखं तुझं माझं करायला!”
“मारतेस काय? खडूस!!! बीलीव्ह मी फार काही सीरीयस प्रकरण तसंही नव्हतं. माझं पण आणि अरिफचं पण. तू तेव्हा काय जाडू आणि खडूस होतीस. आठवतं का? “बोर्नविट्या च्यालेल?” करून मला टोमणे मारायचीस. अशीच गंमत चालायची गं! चल, ते लोकं आपली वाट बघत आहेत. लेट होईल”
आफताबची कार अख्ख्या सामानानं भरली होती. त्यानं हा कार्यक्रम अचानक ठरवलेला नव्हता, तशी कुठलीच गोष्ट तो कधीच इंपल्सने करत नसणार. बांद्याच्या कुठल्यातरी चाळीचाळीच्या भागामध्ये हा अनाथश्रम होता. मुख्यत्वे मुस्लिम लोकांनी चालवलेला हा आश्रम फार मोठा नव्हता. तरीही, छोट्याश्या जागेमध्ये किमान पंचवीस तीस मुली राहत होत्या. आम्ही मुलीसाठी कपडे आणि खाऊ घेतला होता. शिवाय काही पुस्तकं वह्या आणि इतर सामान. मी आयुष्यामध्ये पाहिलेलं हे पहिलंच अनाथाश्रम. पिक्चरटीव्हीमध्ये पाहिलेली अनाथाश्रम बर्‍याचदा एकदम हॅपी हॅपी प्लेस तरी होते, किंवा प्रचंड छळवणूक करणारे तरी. समोरच्या या खोलीमध्ये वाढलेली ही खुरटी मुलं पाहताना तसं काहीच वाटत नव्हतं. मुलं इथं तशी नीट होती. करता येतील तितक्या सोयी केल्या जात होत्या खाण्यापिण्यामध्ये आबाळ नव्हती, पण तरी या सर्व वास्तूला एक भावनाशून्य, कोरडा रखरखीत भाव होता. आश्रमाच्या व्यवस्थापकांनी आम्हाला सगळीकडे फिरून दाखवलं. मुलींच्या खोल्यांमध्ये आफताबला प्रवेश नव्हता. तिथं एकटीनं फिरताना माझ्या घश्यात काहीतरी अडकल्यासारखं झालं. तेरा वर्षांच्या मुलीपासून ते सहा महिन्याच्या बाळापर्यंत सर्वांचं हे घर. आईवडील नसलेल्या या मुली. कुणाला नको झाल्या म्हणून सोडल्या, कुणाला पोसायची ताकद नव्हती म्हणून सोडल्या. आपल्याला ज्यानं शरीर दिलंय, ज्याच्या मुळे अस्तित्व झालंय, त्यालाच आपण नको हवे आहोत ही भावना किती कोलमडवणारी असेल! मी माझ्या बापावर राग ठेवून आहे कारण त्यानं बाहेर कुठंतरी लफडं केलंय. पण या मुलींना बापाचा किती राग येत असेल. आईचा किती राग येत असेल. आई आणि बाप यांचा द्वेष करण्यासाठीसुद्धा त्यांना आईबाप माहित नाहीत.

आफताबनं दिलेल्या सूचनांप्रमाणे मी प्रत्येक मुलीला तिच्या मापानुसार कपडे दिले. त्यांच्या वयानुसार पुस्तकं आणि स्टेशनरी दिली. एका चार वर्षाच्या बाळाला क्रेयॉन्स दिल्यावर जो काही आनंद झाला की ते नाचायलाच लागलं. इतर प्रत्येक मुलीच्या चेहर्‍यावरचा आनंद दिसतच होता, पण मला तो आनंद फार बघवेना. “कुणीतरी” आपल्याला काहीतरी दिलंय याबद्दल लाचारी अथवा वाईट वाटण्यापेक्षा त्यांना आनंद वाटत होता. या मुलींना संभाळणारी पन्नाशीची एक बाई होती. ती म्हणे, “नया कपडा कब्बीच मिलता है. नही तो सब आके पुराना कपडा देके जाते. सेकंडहॅंड सामानमे तो हमारा काम चलता है”
“आपलं” स्वत:चं हक्काचं असं काहीच नाही. जे काही आहे, ते दुसर्‍यानं दिलेलं...
मला या खोलीमध्ये अचानक घुसमटायला लागलं. मी बाहेर आले, ऑफिसमध्ये आफताब मॅनेजरला काही सांगत होता. “काय झालं?” मी बाहेर आलेली पाहून त्यानं विचारलं.
“कसंतरी होतंय!”
“इथे थोडावेळ बस. मी इथं पहिल्यांदा आलो तेव्हापण मला असंच वाटलं होतं. आपल्याला कल्पनाच नसते ना, आपल्या विश्वाखेरीज अजून किती विश्वं आहेत या जगामध्ये.” मला खुर्चीमध्ये बसवून हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाला. “म्हणूनच मी इथं वरचेवर येतो. आपला पैसा किती क्षुल्लक आहे, आणि आपलं जगणंच किती कवडीमोल आहे ते मला इथं येऊन जाणवतं. अल्लाची मर्जी म्हणून मी आईबाप भाऊ घर या सर्वांसोबत वाढलो. नाहीतर काय माहित! असल्याच एखाद्या आश्रमामध्ये वाढलो असतो” त्याक्षणी मला त्याचं पूर्ण बोलणं समजलंच नाही. मीच त्या मन:स्थितीमध्ये नव्हते. नंतर खूप दिवसांनी हा प्रसंग आठवला तेव्हा जाणवलं कदाचित त्याला खरं काय ते माहित असावं. पण मी त्याला विचारलं नाही. विचारावंसंही वाटलं नाही. आज इतक्या वर्षानंतरही मी याबद्दल त्याच्याशी काहीच बोललेली नाही.
थोडावेळ त्याच्याशी बोलून कपभर गोडंमिट्टं चहा पिऊन मी परत कामाला गेले. सर्व मुलींची नावं विचारून घेतली, काहींसोबत फोटो काढले. रात्रीचं जेवण आम्ही त्या मुलींसोबतच केलं. आफताबनं मिठाई मागवली होती. मुलींनी आवडीनं गोडाधोडाचं खाल्लं. मी एरवी दुध्याची भाजी कधीच खात नाही त्यादिवशी गुपचुप खाल्ली.

सगळा कार्यक्रम संपेस्तोवर जवळजवळ साडेआठ वाजले. स्टेशनवर आलो ते ही ऽऽऽ गर्दी उसळलेली. हार्बर लाईन बंद होती. सायनला कुठेतरी ओव्हर हेड वायर तुटली होती. अजून दोन तास लोकल सुरू व्हायचे काही चान्स नव्हते.
“चला, कारने सोडू”
“ट्राफिक असेल वेड्यासारखं त्यापेक्षा दादरला सोड, तिथून एस्टीची बस पकडून जाते”
“एकटीच?”
“नाही! डीजे मागव, नाचत वरात घेऊन जाईन. काय एकटी एकटी लावलंयस? मी काय फिरत नाही का?? चांगली सवय आहे मला. डोंट वरी”
“नऊ वाजत आलेत. तशीपण दमली आहेस. उद्या संडे आहे. बेस्ट वे, माझ्या फ्लॅटवर चल. सकाळी उठून जा. लोकलने गेलीस तर प्रॉब्लेम नव्हता, पण बसने वगैरे एकटी जाऊ नकोस.”
“वेडा आहेस का? तुझ्या फ्लॅटवर आणि मी?”
“का? मी काय रात्रीचा ड्रॅक्युला होत नाही. चल लवकर. स्टेशनवर गर्दीत बसण्यापेक्षा घरी जाऊ”
मी याआधी एक दोनदा त्याच्या खोलीवर आले होते. छोटासा वन बीएचके फ्लॅट. टिपिकल बॅचलर लोकं राहतात तसलाच. पण आफताब टचने. इथेही पुस्तकांचे गट्ठे होते. शिवाय लॅपटॉप, टीव्ही आणि असलंच इतर सामान. किचनमध्ये चहा कॉफी करता येईल इतपतच किराणा. बाकी सर्व मामला विकतच्या खाऊचा. शिवाय कॅबिनेटमध्ये असलेल्या दारूच्या बाटल्या. हा पितो हे माहित होतं पण इतकं कलेक्शन असेल असं वाटलं नव्हतं. भयंकरच दर्दीमाणूस!! भलत्याच गोष्टींमध्ये.
“मी अशी आले, तर तुला बिल्डींगमध्ये कुणी काही बोलणार नाही” लिफ्टमधून बाहेर पडताना त्याला विचारलं.
“बोलतील ना. सगळे विचारतील. का हो, तुमच्याकडे येणारी मुलगी आज बदलली की काय!! तू पण ना स्वप्निल, इथं कुणाला माहित आहे! निधी नेहमी येतेच की. कुणी काही बोलत नाही. तू कॉफी घेणारेस की ड्रिंक्स?”
ओह, मी निधीबद्दल इतकावेळ खरंच विसरले होते. इतकावेळ मी ज्याला आफताबचं घर समजत होते ते खरंतर आफताब-निधीचं घर होतं. आज ना उद्या तिचं झालं असतं. “आपलं” स्वत:चं हक्काचं असं नाहीच. जे आहे ते दुसर्‍याचं!!! “ऑफकोर्स ड्रिंक्स”
“फ्रेश होऊन घे. कपाटामध्ये निधीचे ड्रेस असतील त्यातला एखादा घाल. भूक लागली असेल तर बाहेरून मागवूया” तो नेहमीसारखाच बोलत होता.
“मला भूक् नाहीये, निधीचे ड्रेस मला नको! नीट बसणार नाहीत त्यापेक्षा हाच राहू देत.” निधी माझ्यापेक्षा बुटकी आणि जाड. म्हणजे आधी मी जाड होते, पण आता गेल्या काही वर्षांमध्ये निधी माझ्या जवळाजवळ दुप्पट झाली होती, आणि मी “हेल्दी” म्हणता येईल अशी.
“माझा टीशर्ट घालशील का?” मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. त्याची कुठलीही वस्तू मला हवी होत्ती. किंबहुना तोच तर मला हवा होता. इतके दिवस मला त्याच्याबद्दल ज्या काही भावना वाटत होत्या, त्या अगदीच सटल होत्या. आज मात्र त्या भावना इतक्याही सच्च्या राहिल्या नाहीत. मला तो हवा होता, आणि नक्की कशापद्धतीने हवा होता हे माहित होतं.
“स्वप्निल, काय झालं? एकदम गप्प गप्प झालीस!”
“काही नाही, दमले पण खूप आणि या अशा गोष्टी मला खूप ओवरव्हेल्मिंग होतात. सवय नाही ना! शिवाय नाही म्हटलं तरी आज आरिफची, चाचींची आठवण येतेय, अरिफ असता तर...”
“असायला हवा होता, मी सीए झालेलं बघायला, अझरभाईचा बिझनेस इतका मोठा झालेला. तू अशी नोकरी वगैरे करत असलेली बघायला. आय ऍम शुअर, तो कायम माझ्या आजूबाजूला असतो, माझा एंजल असल्यासारखा. तुला गंमत सांगू, मला आजवर कधीही खूप उदास वाटलं की हमखास अरिफचा आवाज ऐकू येतो. आज तर सतत वाटतंय की तो इथंच आहे. तो गेल्यानंतर मी जो एकटा पडलो ते तसाच आहे. निधीला ही गोष्ट कधीच समजत नाही. तिला वाटतं की मी खूप् माणूसघाणा आहे, पण मी तसा नाहीये, अरिफसोबत मी जितक्या मोकळेपणानं वागूबोलू शकतो तसा इतर कुणाहीसोबत नाही. अपवाद फक्त तू!”
“माझ्याशी कधी मोकळेपणानं बोललास? महिनोनमहिने फोन सुद्धा करत नाहीस!”
“पण ज्यावेळी मला खरंच कुणासोबततरी बोलायचं असतं तेव्हा तुझ्याचकडे येतो ना! आज तुलाच फोन केला ना. माझ्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे, किंवा काय आहे ते तूच समजून घेशील याची खात्री होती.”



>>>>>>>>>>

तुला ना हल्ली काही कामंच करायला नको हवी अस्तात,” आई मला बडबडत होती, एक तर ऑफिसमध्ये तीन दिवस सुट्टी होती म्हणून मी घरी आले होते. त्यात परत सकाळीच टीव्हीवर मस्त गाणी लावून बसलेली असताना आईचं एकच एक पालुपद केव्हाचं चालू होतं. “जाशील ना? नाहीतर मीच जाते सरळ” आई आता ओरडलीच.
“आई, अगं दहानंतर जाऊ ना. आताशी साडेनऊ वाजलेत”
“महामाये, मग उठ, देह धू, कपडे बदल आणि बाहेर पड तोपर्यंत दहा वाजतीलच ना! नऊशे रूपयांची पर्स आहे म्हणून जीव थोडाथोडा होतोय. जाशील ना राणी?” श्या! ओरडणारी, करवादणारी आई परवडली पण ही अशी जवळ येऊन केसांतून हातबीत फिरवून लाडानं बोलणारी आई म्हणजे आपण शरणागतीच पत्करणे हितकर.
गावामध्ये कसलंतरी हॅंडलूमचं प्रदर्शन लागलं होतं. दोन दिवसांपूर्वी आईनं तिथून कसलीतरी पैठणीची पर्स आणली होती. पर्स मस्तच होती, आईकडून ढापणे यात शहाणपणा होता. पण नीट बघताना लक्षात आलं की त्याचा पट्टा थोडा उसवलाय. आता ही पर्स बदलून आणायची तर आजच जावं लागणार होतं कारण प्रदर्शन संपणार होतं. पर्स मलाच हवी असल्यानं मलाच बदलून आणावी लागणार.  तेही संध्याकाळची गर्दी व्हायच्या आत पण दुपारचं ऊन चढायच्या आत. असा माझा हिरण्यकशिपु झाला होता. लवकर आवरलं पाहिजे.
 बाबा स्कूटी घेऊन दुकानावर गेला होता, त्यामुळे मला कार घेऊन जावं लागलं. प्रदर्शनामध्ये सकाळी दहा वाजता पण बर्‍यापैकी गर्दी होती. आईनं सांगितलेल्या सूचनांप्रमाणे त्या पैठणी वस्तूंच्या स्टॉलवर जाऊन त्यांना ही पर्स बदलून द्या, अहो मीच तुमच्याकडून घेतली आहे, काल आठशेमध्येच दिली होती की, आज नऊशे काय म्हणताय, साडे आठशेमध्ये आम्हाला नको का परवडायला, मला हा रंग नकोय, पट्टापण उसवलाय काल गर्दीत नीट पाहिलं नाही आता बदलून द्या सेम रंगाची नकोय जरा हटके रंग दाखवा वगैरे मंत्रोच्चार करून वेगळी पर्स घेतली, शिवाय आवडला म्हणून एक पैठणी स्टाईलचा स्टोलपण घेतला. फॉर्मलस वर असे एथनिक स्टोल्स मस्त दिसतात.
त्यानंतर घरीच जायचं असं काही नव्हतं, म्हणून थोडावेळ प्रदर्शनामध्ये इकडे तिकडे फिरले. दोन चार कुर्ती, कानातले, ब्रेसलेट वगैरे काहीबाही खरेदी केली. प्रदर्शनाच्या शेवटी खाऊपिऊचे स्टॉल्स होते. सध्या अजिबात गर्दी नसल्याने हे सर्व लोक अगदी निवांत बसले होते. मी पाणीपुरीवाल्याला एक प्लेटची ऑर्डर दिली. पनवेलला गेल्यापासून रोजच्या रोज पाणी पुरी खाणं व्हायचंच नाही. हॉस्टेलवर असताना लतिकाचे डायेट सूचना कंप्लीट झिडकारून मी एकदातरी पाणीपुरी खायचेच. पण नोकरी सुरू झाल्यावर मार्त रोज जमायचं नाही.
आता पाणीपुरीचा स्टॉल दिसल्यावर राहवलं नाहीच. मस्त चव होती, कधी नव्हंते पाणीपुरीचं पाणी केवळ तिखट झणझणीत नाहीतर आंबट-तिखट-गोड असं परफेक्टली बॅलन्स केलं होतं. पण पैसे देताना उगाच घेतली पाणीपुरी म्हणायची वेळ आली.
“तेरा रूपये असा कधी रेट असतो का? सरळ दहा-पंधरा असा रेट का ठेवत नाही? आणि ठेवला तर सुट्टे पैसे ठेवा ना” मी त्या स्टॉलवाल्यावर खेकसलेच. नेमकी माझ्याकडची चिल्लर संपली होती, दहा रूपयाच्या दोन नोटा होत्या तर हा बाब्या म्हणे, सुट्टे नाहीयेत. मी पर्समध्ये इकडेतिकडे शोधाशोध करून एक-एक रूपयाची दोन नाणी काढली. तर तो म्हणे, अजून एक रूपया द्या.
“अरे नाहीये. दहाची नोट आहे तर उरलेले पैसे परत दे, नाहीतर हे बारारूपये ठेवून घे. नाहीतर मला अजून सात रूपयाची पाणी पुरी दे. विषय खतम.” त्या मठ्ठाडाच्या डोक्यात गणित शिरतच नव्हतं. एका रूपयाने असा काय फरक पडला असता? बरं, ठिक तो रूपया मी द्यायला हवा, पण आता सुट्टे नाहीत तर काहीतरी कर ना. बरं मी जाऊन आणते म्हटलं तर तेही नको. “मग तुम्हाला आम्ही कसे शोधणार?” जणू याचा एक रूपया घेऊन मी पळून जाणारे.
“ताई, पैसे द्या हो” तो ओरडला.
“अरे पण नाहीयेत ना. कुठून आणू?” मी पण आवाज चढवला. चढलेला आवाज ऐकून आजूबाजूचे आमच्याकडे वळून बघायला लागले.
“पैसे नाहीत तर खाता कशाला?” त्याच्या बाजूचा एक माणूस काहीही माहित नसताना मध्ये पडत म्हणाला.
“पैसे आहेत, पण त्याच्याजवळ सुट्टे नाहीत.” मी हातामधले बारा रूपये त्याच्या काऊंटरवर ठेवले. “अजून एक रूपया हवा असेल, तर मला चिल्लर परत दे. तुझ्याशी इथं वाद घालत बसायला मला वेळ नाहीये. सुट्टे पैसे नसतील तर दुकानं उघडता कशाला? आणि एका एका रूपयासाठी इतका वाद घालताय! मूर्ख!”
तितक्यात माझ्या बाजूला आलेल्या कुणीतरी त्या पाणीपुरीवाल्याच्या हातात एक रूपया ठेवला. “हे घे, झाले ना? हिशोब पूर्ण? आता आवाज बंद!” मी वळून त्या माणसाकडे पाहिलं. खरंतर एका क्षणासाठी विश्वासच बसला नाही. केदार! केदार उभा होता. “सॉरी! हा स्टॉलवाला खरंच मूर्ख आहे, संध्याकाळी याचा मालक आला की त्याला सांगतोच. वागायची पण अक्कल नाही या पोरांकडे”
“इट्स ओके. पण थॅंक्स आणि तू इथे कसा काय? खरेदीला?” मी बडबडत सुटले. खूप नर्व्हस झालं की मला असंच होतं. “नाही गं! मी ऍक्चुअली आयोजकांमध्ये आहे. म्हणून तर सकाळपासून आहे. तू इथं कशी? ते ही इतक्या सकाळी?”
मी गेल्या कित्येक वर्षामध्ये केदारला भेटले नव्ह्ते, एक दोनदा गावात आल्यावर त्याला पाहिलं होतं, तेही दुरून. आज मात्र अगदी अनपेक्षितरीत्या तो माझ्यासमोर उभा होता. अगदी जवळच. त्याच्या हातामध्ये दोन अडीच वर्षाचं बाळ होतं. काहीतरी हिशोब चुकलाय माझा किंवा ते बाळ लहान असावं. मला अशी बाळांची नक्की वयं ओळखता येत नाहीत.
“एक पर्स बदलून घ्यायची होती, मग नंतर गर्दी होते म्हणून आताच आले.”
“पर्स बदलण्याव्यतिरीक्तही इतर बरीच खरेदी झालेली दिसतेय!” तो माझ्या हातामधल्या बॅगच्या ढिगार्‍याकडे बघत म्हणाला. “स्कूटीवरून इतकं नेणार आहेस की... रिक्षा करून देऊ?”
“नको, कार आणलीये.” त्याच्या कडेवरचा बाळ काहीतरी हात पुढे करून सांगत होता. “तुझा?”
“नाही गं, ताईचा. आयुष नाव आहे. तुझं काय चालू आहे?” केदारचं नक्की काय चालू आहे हे जसं मला माहित होतं तसंच, माझं काय चालू आहे ते त्याला माहित असेलच ना पण तरी विचारायची पद्धत असते. हां! आठवलं या कडेवरच्या बाळाच्या डीलीव्हरीसाठी केदारची आई तेव्हा कॅनडाला जाणार होती. मेंदूच्या कप्प्यांमध्ये आपण किती क्षुल्लक माहिती गोळा करून ठेवलेली असते. नको तेव्हा ती माहिती अचूक आठवते कशी!
“मुंबईला आहे, जॉब करतेय. तुझा बिझनेस कसा चालू आहे?”
“तो जर धड चालू असता, तर अशी प्रदर्शनं वगैरे केली असती का?” तो किंचित हसत म्हणाला. केदार खूप बदलला होता. अवघ्या तीन वर्षापूर्वीचा केदार आणि हा समोर उभा असलेला केदार यामध्ये बराच फरक होता. आधीसारखा उत्साही नव्हता तर जबाबदारीच्या अणि एकंदरीत परिस्थितीमुळे दबला गेला होता. किंवा कदाचित मला तसं वाटत असेल. दृष्टीकोनाचा फरक.  “मी येऊ का तुझ्यासोबत? कारपर्यंत? एवढं सामान घेऊन जाशील ना?”
“नो, थॅंक्स. मी जाईन.”
तितक्यात त्याला कुणीतरी आवाज दिला, प्रदर्शनाच्या दुसर्‍या बाजूकडून ती आली. मला तिचं नाव माहित नव्हतं, पण ही केदारची बायको इतकं नक्कीच समजलं. ती आमच्या अगदी समोर आली. खरंतर ती येण्याआधी मी तिथून जायला हवं होतं. पण आता तिच्यासमोरून लगेच निघून गेले असते तर ते अगदीच वाईट दिसलं असतं. हा तरी बायकोसोबत इकडे आलाय हे मला कसं माहित असणार!
“सौम्या, ही स्वप्नील! स्वप्नील, ही सौम्या.” केदारने ओळख करून देण्याचा क्षीण प्रयत्न केला. खरंतर ती काय आणि मी काय एकमेकींना माहित होतोच. चेहर्‍यानं आज ओळख झाली असेल, पण याआधी ती आल्यामुळे माझं आयुष्य किती उद्ध्वस्त झालं म्हणून तिला शिव्या घातल्या, आणि तिच्या नवर्‍याच्या आयुष्यात तिच्याआधी मी आलेली असल्यामुळे तिनं मला किती शिव्या घातल्या असतील...
मात्र एक गंमत झाली हां. मी कोण आहे हे समजल्याबरोबर ती एकदम नवर्‍याच्या बाजूला सरकली आणि अल्मोस्ट तिनं केदारचा दंडच पकडला. जणू काही ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे असं मला सांगितल्यासारखं. मला हे बघून खरंच हसू आलं. अरे, ही काय मला नवराचोर समजते की काय. जणू हिचा नवरा मी पळवून नेणार आहे. आणि पळवून करणार काये? मी याआधी केदारचा मनसोक्त उपभोग घेतला होत्ता. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात आफताब आला होता. आता तीन वर्षानंतर मी परत याला घेऊन काय करणार होते? त्याचे आणि माझे रस्ते वेगळे झाले होते. हे त्याला माहित होतं. मला माहित होतं.  एकमेकांसमोर येऊन कितीहीवेळा भेटलो, तरीही आता आम्ही अनोळखी म्हणूनच जगणार  होतो. काही नाती तुटली की मरतात. त्यानंतर त्याचं फक्त श्राद्ध घालता येतं. बाकी काही नाही.
पण तिच्या या पझेसिवपणावर हसणारी मी कोण? तिच्याकडे तर सबळ कारण होतं. मनाविरूद्ध लग्न झाल्यामुळे तिचा नवरा कित्येक दिवस तिच्याशी बोलत नव्हता, नुकतीच कुठेतरी त्यांच्यामध्ये दिलजमाई झाली होती, आता कुठे तिला बायकोपणाचं सुख मिळत होतं. अशावेळी मी म्हणजे नवर्‍याची एक्सगर्लफ्रेंड भेटली म्हणून तिला थ्रेटनिंग वाटणं सहज आहे. मला निधीमुळे किती इन्सीक्युअर वाटलं होतं, माझ्याबाबतीत तर आफताब तिला स्वत:हून सोडून माझ्याकडे आला होता, तरीही निधीचा संशय माझ्या मनामध्ये कायम राहिलाच. अगदी माझं आणि आफताब दोघांचंही आयुष्य पाचोळ्यासारखा उडवून गेला तो संशय!

मी काय अथवा सौम्या काय... आमचं वागणं काही फार वेगळं नव्हतं. अगदी टिपिकल म्हणावं असंच आम्ही वागलोय. पण अशावेळी शाहीन मला हमखास आठवते. ती खरंच अतिशय प्रगल्भ विचारांची. माझं आणि आफताबचं नातं तिला माहित असूनही ती किती समजूतदारपणे सर्व निभावू शकली. “मी त्याच्या आयुष्यांमधून तुम्हाला वजा करू शकत नाही, हे मला माहित आहे, म्हणून मी तसा प्रयत्नही करणार नाही. पण यापुढे भविष्यामध्ये केवळ मीच असेन यासाठी प्रयत्न करू शकते, हो ना?” साधंसोपं सरळ सुटसुटीत आयुष्य! शाहीनला ते अगदी प्रांजळपणे जमलं! मला कधीच नाही. आजवर नाही. विनाकारण गोष्टी कॉम्प्लीकेट करून ठेवायची सवयच.
त्यादिवशी केदारला भेटल्यानंतर नक्की काय वाटलं ते सांगणं अशक्य आहे. त्याचा राग आला, तो बाय डीफॉल्ट येणारच होता. वाईटही वाटलं, त्याचवेळी बरंदेखील वाटलं. त्याचा संसार व्यवस्थित चालू होता. कदाचित अजून वर्षभरात मुलं होतील (आपल्याकडे नै.... संसार व्यवस्थित म्हणजे मुलं असा नियमच आहे. नवरा बायको एकत्र नांदत नसतील, तर एखादं मूल होऊ द्यासर्व नीट होईल असा आचरट सल्ला आपल्याचकडे मिळू शकतो.) पण आज बघताना तरी दोघं एकमेकांशी व्यवस्थित बोलताना दिसत होते. मी त्याला बाय म्हणून पुढे निघाले. त्यानं हातातलं बाळ तिच्याकडे दिलं आणि माझ्या हातातली पिशवी घेतली. “मी येतो कारपर्यंत. इतकं ओझं घेऊन एकटीच कशाला चालतेस?”
मिस्टर केदार, केवळ दोन कुर्ती आणि असल्या सटरफटर सामानाच्या वजनाला तुम्ही “इतकं ओझं” म्हणताय, मग मनामध्ये जो इमोशनल बॅगेज तुम्ही दिला आहे त्याचं काय? अर्थात हे मी त्याला काही म्हटलं नाही. दोन जुने प्रेमी खूप वर्षांनी भेटल्यानंतर लंबेलंबे फिलॉसॉफिकल डायलॉग मारतात हे गुलझारच्या पिक्चरांमध्येच होतं. प्रत्यक्षामध्ये आपण बोलत राहतो. एकमेकांची चौकशी करतो वगैरे. पण संवाद काही साधला जात नही. तो दुवा निखळतोच.
कारमध्ये बॅग ठेवताना तो सहज म्हणाला. “कधीतरी घरी ये. आहेस ना दोन चार दिवस?”
“नाही.  परवा निघेन. जास्त सुट्टी नाहीये.”
“जॉब कसा चालू आहे?”
“एकदम इंटरेस्टिंग.”
त्याला यानंतर पुढे काहीतरी बोलायचं होतं, पण त्याआधीच मी कार स्टार्ट केली. मला काहीच बोलायचं नव्हतं, काहीच सांगायचं नव्हतं. जे घडलं तो सर्व भूतकाळ. आता मला ते गढे मुर्दे खणायचे नव्हते. केदार या व्यक्तीखेरीज माझ्या आयुष्यामध्ये बरंच काही होतं. तो एक रूपया त्याच्यावर उधार राहिलाच, पण त्यानं केलेल्या इतक्या सार्‍या गुन्ह्यांचं काय?
संध्याकाळी नेहमीप्रमाणे अझर घरी आला. हल्ली तो संध्याकाळीपण रोज बाबांसोबतच जेवायचा. बाबांना डॊक्टरांनी साडआठपयंत जेवायला सांगितलं होतं. अझर आणि त्याच्या “कार्यक्रमावर बंदी आणून” आईनं हा टाईम कंपलसरी डिनरसाठी केला होता. एकटंच कुठं जेवायचा म्हणून अझरभाईपण आमच्याकडे यायचा. येताना काहीतरी भाजी नाहीतर चटणी वगैरे बनवून आणायचा.
मी त्याला घडलेला सगळा प्रसंग सांगितला. माझं ना हेच असतं, मला कुणालातरी सांगितल्याशिवाय चैन पडत नाही. निधी तिचं आणि आफताबचं अफेअर आहे हे वर्षानुवर्षे कसं काय लपवून ठेवू शकते कुणास ठाऊक. त्यारात्री मी त्याच्या समोर माझ्या भावना लपवू शक नाही... केदारला मी आफताबबद्दल सांगायला हवं होतं का? त्यानं काय फरक पडला असता म्हणे... तर ते एक असोच.
“मग? कधी जातेस त्याच्या घरी?” माझं भडाभडा बोलून झाल्यावर अझरभाई मला चिडवत म्हणाला. जेवणं झाल्यावर आम्ही घरासमोरच्या बागेमध्ये गप्पा मारत बसलो होतो. या बागेला सोसायटीनं नुकतंच नाव दिलं होतं. अरिफ गार्डन!!
“जादू! चेष्टा करू नकोस. मी इतक्या सीरीयसली सांगतेय..”
“मग मी पण सीरीयसलीच विचारतोय. म्हणाला ना, कधीतरी घरी ये. आपण जायचं बिनधास्त. त्याच्या घरचे काय एक्स्प्रेशन्स देतील?”
“मला त्याच्या घरी जाण्यात काही इंटरेस्ट नाही. तसंही तो आता जॉइंट फॅमिलीमध्ये राहत नाही. वेगळं घर भाड्यानं घेतलंय” हे वाक्य बोलताना किती नाही म्हटलं तरी नजरेसमोर तो केदारच्या मित्राचा फ्लॅट “तुझंमाझं” घर तरळून गेलंच. क्षणभरासाठी का होईना पण तरीही.
“बरीच माहिती आहे की. एकीकडे म्हणायचं आता माझा काही संबंध नाही आणि तरी इतकी माहिती!”
“जादू, तू मला काय क्रॉस् एक्झामिन करतो्यस? मी त्याच्याबद्दल कुणाला विचारत नाही. लोकं सांगतात, मी ऐकते. मनामधून मी कितीहीवेळा त्याला काढून टाकलं तरी आठवणी नावाची चीज असते. ती तुम्ही डीलीट करू शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी. मी मागेही तुला सांगितलं होतं.”
“तेव्हाही मी हेच सांगितलं होतं आठवणी डीलीट करायच्या नाहीत. पण आपल्यापासून दूर नेऊन ठेवायच्या. अशा ठिकाणी जिथं काही घडलं तरी आपल्यावर परिणाम होणार नाही.”
“माझ्यावर काही परिणाम झालाय का? मी फक्त तुला काय घडलं ते सांगतेय. आणि मला एक सांग! तू नूरीला असा विसरलास? सोपं असतं का? सांग ना?”
“मी नूरीला विसरणार नाही. माझं तिच्यावर प्रेम वगैरे काही नव्ह्तं. पत्नीचा दर्जा होता आणि मी त्यासाठी कधीही तिचा अपमान केला नाही. पण तिनं मला कधीही समजून घेतलं नाही हे खरंय. नको असलेलं नातं केवळ पुढं रेटायचं म्हणून रेटत होतो. एनीवेज, आता मी एकटाच आहे आणि खर्ंच ही फेज खूप एंजॉय करतोय.”
“आय नो! मी पण ही फेज खूप एंजॉय केली होती.” प्रेमभंग झाल्यानंतर जो एकटेपणा येतो त्याला लोकं उगाच दु:खाची वगैरे किनार देतात, दु:ख असतंच पण त्याहून अधिक स्वातंत्र्याची एक वेगळीच जाणीव पण असते. हे असलं एकटेपणा तुम्हाला फार स्ट्रॉंग बनवतं. तुमच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा देतं.
“केली होती? म्हणजे आता अजून एका हीरोची एंट्री झालीये का?”
“ते मी तुला का सांगू?”
“मग कुणाला सांगणार?”
“तो हीरोच सांगेल की तुला!”
“वाट बघतो”
“वाटच बघ तू”

 (क्रमश:) 

Friday 23 September 2016

शब्द- माहेरवारी

एशानची ही कथा मी पहिल्यांदा मायबोलीवर लिहिली होती. त्यानंतर याच जोडीच्या अजून काही प्रेमकथा लिहिल्या आहेत, त्यापैकी  एक दोन मासिकांमधून प्रकाशित झालेल्या आहेत.. त्या हळूहळू इथे माझ्या ब्लॉगवर टाकेन. ही कथा मात्र अप्रकाशित आहे, पहिल्यांदाच ब्लॉगवर टाकत आहे. कथा कशी वाटली ते नक्की सांगा. :) 


तू आधी प्रॉमिस कर. काहीही आगाऊपणे वागणार नाहीस. अजिबात पुढेपुढे बोलणार नाहीस. विचारतील तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं देशील. कुणालाही काहीही स्वत:हून बोलायला जाणार नाहीस. एखादी गोष्ट पटली नाही तरी उलट उत्तरं देणार नाहीस. खायला प्यायला जे देतील ते गुपचुप खाशील. रेसिपी विचारत बसणार नाहीस..” माझं लेक्चर अजून चालू राहिलं असतं, पण एशाननं माझ्या तोंडावर हात ठेवला.
समजलं!! समजलं!! किती वेळा तेच तेच सां गशील? सासरी जाणार्‍या सुनेला इतके उपदेश दिले जात नसतीलजितके जावयाला देते आहेस.. सकाळपासून तेच पुराण चालू आहे
काय करू? लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जात होते.. माझ्या गावाला लग्न ठरवायला म्हणून एशान आईबाबांसोबत आला होता, तेव्हाही कही फार चांगलं वातावरण नव्हतं. लग्न रजिस्टर हवं हा त्याचा हट्ट, धार्मिक पद्धतीनं व्हायला हवं असा माझ्या आजोबांचा हट्ट. शेवटी वैदिक पद्धतीनं पण अगदी साध्या पद्धतीनं लग्न असा तोडगा निघाला. माझ्या घरी हा जावई जातीबाहेरचा वगैरे म्हणून जरा नापसंतीचाच, शिवाय एशानच्या वडलांनी लग्न अगदी साधेपणानं हवं असं सांगितल्यानंतर आईवडलांनी फार काही नातेवाईकांना बोलावलेलं नव्ह्तं, जे आले होते ते लग्नाच्या दिवसाभरात असं कितीसं बोलणार? त्यामुळं लग्नाला सहा महिने झाले तरी एशान माझ्या नातेवाईकांना खर्‍या अर्थानं पहिल्यांदाच भेटणार होता. माझ्या घरामध्ये त्याचे उच्च विचारऐकून काहीतरी गडबड व्हायची शक्यता जास्त होती. मीच काय, पण कंचन- म्हणजे एशानची आईसुद्धा इतकीच धास्तावलेली होती. तिनं पण त्याला अमुक बोलू नकोस तमुक विचारू नकोसअसल्या सूचना देऊन ठेवल्या होत्या. खरंतर माझी जायची इच्छा नव्हतीच पण यंदाच्या कुलदेवाच्या पूजेला यायचंच असा आजोबांकडून सज्जड दम आलेला. आमच्या घराण्यामधलं हे पूजेचं प्रस्थ फार मोठं. चांगले साताठ दिवस कार्यक्रम चालायचे. आमचं गावचं घर भलंमोठं. सगळे नातेवाईक जमले की पन्नाससाठ माणसं सहज जमायची. तसं फारसं काही अडलं नसत त्यानं व्यवस्थित जुळवून घेतलं असतं. मला एकत्र कुटुंबाची चांगलीच सवय, पण एशान एकुलता एक. त्याला असं एकत्र रहायची वगैरे अजिबत सवय नाही पण त्याहून जास्त भिती याचे भलतेसलते क्रांतीकारी विचार ऐकून घरात काय महाभारत होइल याची. आणि एशानचे विचार म्हणजे काय साधंसरळसोपं काम नाहीच. बघू. जे काय होइल ते होइलच
मुंबईवरून पहाटेच कारने निघालो होतो, त्यामुळे ट्राफिकचा कसलाही त्रास न होता दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत गावात पोचलो. बरेचसे नातेवाईक माझ्याआधीच आले होते. घरी गेल्यावर काय गं कशी आहेस? जाड झालीस. बारीक झालीस. कसा झाला प्रवास? ही आली नाही का? तो कधी येणार आहेअसल्या निरर्थक प्रश्नोत्तरांमध्ये वेळ गेला. अगदी ठरवून असं नाही, पण पद्धतच म्हणायला हवी, पण घरात गेल्यापासून मी आतल्या खोल्यांमध्ये माजघरात नाहीतर किचनमध्ये आणि एशान इतर पुरूषमंडळींसोबत बाहेर हॉलमध्ये. मी पण खूप दिवसांनी घरी आल्याने आईसोबत किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. एशान बाहेरच रमला होता.
जेवायच्या पंगती बसायला सुरूवात झाली आणि आम्ही बाया माणसं वाढायला. घरामध्ये आईला आणि काकूला या जावयाला जमीनीवर मांडी घालून बसता येईल की नाही की टेबल खुर्चीची काहीतरी सोय करायची असा प्रश्न पडला होता. एकंदरीत  घरामधल्या इतर बायकांना एशान मिरचंदानीचं जरा टेन्शनच आलं होतं ते बघून मला मज्जा वाटत होती. “त्याला आपलं जेवण नीट होइल ना? वेगळं काहीतरी करायला हवंय का? तूच बघ बाई त्यांना वाढायचं, काय आणि कसं हवं ते. त्याला वेगळं त्याच्या पद्धतीचं काही बनवयाचं असेल तर बनव हांइत्यादि सूचना माझ्यापर्यंत येत होत्या. मी निर्धास्त होते. मी काही बनवतेय म्हटलं असतं तर त्यानं सरळ उपास आहे असं जाहीर केलं असतं.  एक तर किचनकामाला मेड होती शिवाय इतरवेळी ते डीपार्टमेंट तोच सांभाळत होता. माझ्या कूकिंग स्किलची कमाल मर्यादा त्याला आधीपासून माहित होती. उलट किचनमधला त्याचा इंटरेस्ट माहेरी समजला वगैरे तर काय म्हणतील याची चिंता जास्त! रोज पहाटे तासभर प्राणायाम वगैरे भानगडी करत असल्याने मांडी घालूनबसेल का?” वगैरे चिंता तर अजिबात नव्हती. पण त्याला माझी बरीच काळजी लागली असणार कारण मी जेवण वाढताना मात्र त्यानं अचानक मला सगळ्यांसमोर तुझं जेवण झालं?” असं विचारलं. पंगतीमधले इतर सगळे हसायलाच लागले. “का हो जावईबापू? बायकोची फार चिंता लागली आहे?” कुणीतरी चेष्टेने म्हणालं. “बायकोला उपाशी ठेवलं तर जगणं मुश्किल व्हायचं!!त्यानं लगेच उत्तर दिलं. आजूबाजूला बसलेले खिदळायला लागलेच. त्यातल्या त्यात सभ्य सोज्वळ उत्तर. हुश्श!!
मी किचनमध्ये आले. “बोलायला भारीच चाप्टर दिसतात हां तुझे यजमानताईनं चिडवलं. याचा चाप्टरपणा सांगायला पुस्तकांची चाप्टरं कमी पडतील. म्हणून तर इथं यायला निघाल्यापासून त्याला काय काय उपदेश देत आणलं होतं ते माझं मला माहित.  गप्प आहे तोपर्यंत परवडला, एकदा बोलायला लागला की समोरच्याला तोंडाला फेस आणणारच.

खरं तर सर्वात महत्त्वाची भिती वेगळीच. इथं कुणीतरी देवाधर्माचा विषय काढला की संपलंच. एशानचे डॅड आणि कंचन दोघेही पक्के नास्तिक. देवधर्म, पूजापाठ, सणवार असल्या गोष्टींना अजिबात थारा नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी एशानला माहितच नव्हत्या, आणि त्यामध्ये त्याला फारसा इंटरेस्टही नव्हता. त्याउलट माझं घर. अख्खं घर दिवसभर हलायचं ते केवळ देवाधर्मासाठी. घरात पाणी भरायचं देवांसाठी. जेवण करायचं नैवेद्यासाठी. अंघोळी करायच्या पूजेसाठी. आजोबा म्हणजे कर्मठपणाचा परिपाक. बाबा आणि काका तेवढे देवदेव करणार्‍यांतले नव्हते, पण आई काकू आत्या वगैरे सर्व आजोबांच्या हाताखाली तयार. पाळीच्या वेळेला चार दिवस बाजूला बसायचं, अंघोळ केल्याखेरीज स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही, देवाचा स्वयंपाक करताना साडीच नेसायची, अमुक व्रत तमुक उपास असले नियम घरात असोशीनं पाळले जात होते. मी लहानपणापासून यातच वाढलेली त्यामुळे वाण नाही तर गुण लागला या नात्यानं मी पण थोडीफार कर्मठच. लग्नानंतर मी एशानच्या फ़्लॅटवर छोटंसं देवघर बनवून घेतलं. एशानचा सोवळंओवळं वगैरेशी दूरान्ययेही संबंध नाही. एखाद्याचा देवावर विश्वासच नसू शकतो, याची सुरूवातीला मला जरा गंमतच वाटायची.. तसा त्याचा नास्तिकपणा मला फारसा त्रास देणारा नव्हता. माझ्यापुरतं काही केलं तरी त्याचं काही म्हणणं नसायचं. तशीही मी काही घरातल्यांसारखी अतिदेवभक्त नव्हते, पण तरी रोजच्या रोज दिवा लावणे वगैरे इतकेच. मला सासरचे कुलाचार वगैरे काहीच भानगडीच नसल्यानं उलट बरं होतं. ताईच्या सासरी गणपती-नवरात्रीमधून तिचा अक्षरश: पिट्ट्या पडायचा, त्यामानानं आपल्याला काही टेन्शन नाही.
दुपारची जेवणं झाल्यावर मी सगळ्या बायांसोबत आतल्या खोलीतच लवंडले होते. एशान एका बाबतीत प्रचंड सुखी आत्मा आहे, कुठंही पडल्यापडल्या पाचव्या मिनिटाला त्याला झोप लागू शकते. गादी-उशी वगैरे काही हवंच असं नाही. त्यामुळे त्यानं हॉलमध्येच किंवा वरच्या मजल्यावरच्या एखाद्या खोलीमध्ये पथारी पसरली असणार.

आता आलेल्या बहुतेक बायांनी माझी उलटतपासणी चालू केली होती. नवरा नक्की काय करतो? किती कमावतो? मग तरी मी नोकरी का करते? त्याचा बिझनेस आहे मग मी त्याच्याच ऑफिसमध्ये काम का करत नाही? मी ईव्हेंट मॅनेजमेंट करते म्हणजे नक्की काय करते? आम्ही सासूसासर्‍यांसोबत का राहत नाही? घरात स्वयंपाकाला बाई का ठेवली? दोघांचंच करायला तुला कितीसा त्रास होतो? किती दिवस प्लानिंग करणार? लवकर काय ते होऊ द्यात. एक ना दोन अनेक प्रश्न. मी शक्य होइल तितक्या शांतपणे उत्तरं देत होते. पण नंतर कंटाळा आला. सरळ डोळे मिटून झोपायचं नाटक केलं, मग त्यांनी चर्चा करायला दुसराच कुठलातरी विषय घेतला.
आतापर्यंत बरेचसे नातेवाईक येऊन पोचले होते. संध्याकाळी भावोजी आलेले बघताच ताईनं लगेच त्यांना चहा नको, कॉफीच लागते बैम्हणत गरमागरम कॉफी केली. ते बघून आईनं मला लगेच बघ तिला किती काळजी आहे नाहीतर तू टोणगी असा एक कटाक्ष टाकलाच. मी लगबगीनं चहा करतेय, एशान हॉलमध्ये निवांत बसलाय आणि मी त्याच्या हातात चहाचा कप देतेय वगैरे स्वप्नरंजन ठिक आहे. प्रत्यक्षात  शानमहाराज चहात आलं का नाही घातलंस? साखर कमी घातलीस! चहा कितीवेळ उकळलासवगैरे चालू करतात, मी त्याला उलट काहीतरी ऐकवणार. तो मला काहीतरी बोलणार. मग आम्ही रीतसर भांडणार. त्यापेक्षा तुझा चहा तूच करून घे. मला बापडीला तुझ्याच कपामधले दोन-तीन घोट चहा पुरे अशी आमची रोजची मांडवली परवडली.

नेहमीसारखे दुपारची झोप आटोपून बरोबर साडेचार वाजता आजोबा खाली आले. मघाशी जेवणाआधी त्यांनी एशानकडे फारसं लक्ष दिलं नव्हतंच. आता मात्र, भावोजींना आवर्जून कसा प्रवास झाला वगैरे प्रेमानं विचारलं. हा नातजावई आजोबांचा फार आवडता. त्यांनी स्वत: पसंत केला होता ना!
चहा झाल्यावर आजोबांनी घरातल्या सर्वांना एकत्र बोलावलं. सर्व बायकांना उद्या काय स्वयंपाक करायचा, काय नाश्ता करायचा वगैरे सूचना दिल्या. घरामध्ये पाहुणे जास्त झाल्यानं झोपण्यासाठी काय काय व्यवस्था तेही सांगितलं. पूजेचा कार्यक्रम संपेपर्यंत हे रोजचंच लेक्चर. आम्हाला दरवर्षीचं माहितच असलंतरी सगळेजण लक्ष देऊन ऐकायचं काम करत होते. आजोबांचं बोलून झाल्यावर माझा मोठा चुलत भाऊ काहीही गरज नसताना एशानला म्हणाला. “जिजू, आपण जेन्ट्स लोकं वरच्या मजल्यावर आणि लेडीजबायका इथं खाली हॉलमध्ये? तुम्हाला चालेल ना?”
मला कुठंही चालेल.” एशाननं उत्तर दिलं.
नाही म्हणजे, मधु इथं आणि चंद्र तिथं अशी अवस्था. तुम्हाला मुंबईच्या घरात सवय नसेलच..तिथं काय तुम्ही दोघंच.” उगाचच परत चिडवत त्यानं तोच विषय काढला. हा आता गप्प बसला तर बरं होइल असं वाटलं... पण एशान? एवढा फ़ुलटॉस मिळाल्यावर सोडणार आहे?
सवयीचं काय? आम्ही तिथंही वेगळे झोपतो.अतिशय शांतपणे तो म्हणाला आणि अख्ख्या घरावर शांतता पसरली. “म्हणजे?” कुणालातरी आवाज सापडला.
हो. काय करणार? तिला एसी सहन होत नाही. मला एसीशिवाय झोप येत नाही. मग  वेगळ्या खोल्यांमध्ये झोपणं बेस्ट नाही का?” एशान अजूनही आधीच्याच शांत टोनमध्ये बोलत होता. घरामधला प्रत्येकजण हे काय भलतंच विचित्र?” असा चेहरा करून होतं. आई दचकून माझ्याकडे बघायला लागली होती. आजोबा रागानं इकडंतिकडं बघत होते. चेष्टामस्करीचा हा विषय त्यांना अजिबात आवडलेला नव्हता. एशानला जेव्हा अनंत सूचना दिल्या तेव्हा हे वेगळ्या खोलीत झोपतोय वगैरे बोलू नकोस, हे सांगायला विसरले होते. पण नेमका हाच विषय येईल असं वाटलंही नव्हतं.. “रीलॅक्स. वेगळ्या खोलीत झोपतो म्हणजे एकमेकांच्या खोलींमध्ये जायला काय बंदी वगैरे नाही. बाकीचं सर्व व्यवस्थित चालू आहे. एकदमच जोशात!” शेवटचे शब्द बोलत एशान उठला.
घरातली सगळी पोरंपोरी लगेच खिदळायला लागली. मागे उभ्या असलेल्या बायकापण खुसखुसायला लागल्या. मी किचनमध्ये येऊन चहा गरम करायला ठेवला. “काय गं? तुझ्या नवर्‍याला काही अक्कल वगैरे आहे की नाही?” धाकट्या आत्यानं येऊन मला विचारलं.
आंद्याला अक्कल आहे का? कशाला कायपण चिडवायला गेला?” मी चूक लगेच भावावर ढकलत म्हटलं. आई आणि काकू अगदी गडबडीनं आत आल्या. “काय गं? जावईबापू हे काय म्हणत होते? वेगळ्या खोल्यांमध्ये वगैरे!!काकू एकदम भोचक मोडामध्ये. आई तिच्या टिपिअकल अतिधास्तावलेल्या मोडमधे. “पाहिलंत वन्सं! मी आधीपासून म्हणत होते. काहीतरी गडबड आहे! उगाच का एवढा श्रीमंत असूनपण इतक्या लांबची मुलगी केली...” काकू आत्याला म्हणाली. आईच्या डोळ्यांत पाणी.
आई, उगाच ड्रामेबाजी करू नकोस. काही गडबड नाही. त्यानं सांगितलं ते ऐकलं नाहीस का? एसीचा मला त्रास होतो. सर्दी होते तसंही घरामध्ये दोन बेडरूम आहेत, म्हणून!”  याहून जास्त आईला काय सांगणार?
आईवर डाफरून मागच्या अंगणात आले खरी. पण मग अचानक एक जाणवलं. तरीच सगळे आल्यापासून माझ्याकडे असे बघत होते. एशानसारख्या श्रीमंत देखण्या आणि सर्वगुणसंपन्न माणसानं माझ्याशी लग्न काय म्हणून केलं असावं हा प्रश्न प्रत्येकाच्या नजरेमध्ये होताच, तो मला आता नीटच समजला. मी रंगानं सावळी. घरातल्यांच्या लेखी काळीच. त्यात परत बाकीचे मेडिकल, इंजीनीअरिंग असा रस्ता पकडून गेलेले, मीच एकटी मास कम्युनिकेशनसारख्या अगम्य करीअरची वाट पकडलेली. बाकीचे जेव्हा ऑनसाईट-ऑफसाईट करत देशपरदेश फिरत होते तेव्हा माझं अजून स्ट्रगल चालूच होतं. अशावेळी एशानसारख्यानं मला लग्नासाठी विचारणं, तेही स्वत:हून म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असणारच ना?
मला खरंतर मनापासून या सर्वांचं हसू आलं. मी एशानला कॉलेजपासून ओळखत होते. त्यानं लग्नासाठी मला विचारणं हे कितीही आश्चर्याचं असलं तरी त्याच्या प्रेमाच्या सच्चेपणाची मला खात्री होती. त्याच्याशी लग्न करायचा निर्णय घेतला तो फक्त आणि फक्त त्याच्या प्रेमाच्या शब्दांवर पण माझ्या घरातल्यांना कोण समजावणार? त्यांचे स्वत:चे वेगळेच आडाखे होते. आधी मुळात मी प्रेमविवाह करून खड्ड्यात पडले होते, आता बरेचसे नातेवाईक माझी फजिती बघायला उत्सुक!!!
माझ्या माहेरपणाचे पहिले दोन- तीन दिवस असेच गेले. सगळीच गडबड चालू असायची. मी अर्ध्याहून जास्त वेळ स्वयंपाकघरात नाहीतर वरच्या खोलीमध्ये काहीतरी कामात. एशान माझ्या चुलत भावांसोबत काहीतरी टंगळमंगळ करण्यामध्ये गुंग. गेल्या दोन दिवसामध्ये त्याच्याशी दोन वाक्यंपण बोलले नसेल. एकाच घरात राहूनपण लांब राहणं. आंद्या म्हणाला तशी खरंच मधु इथं आणि चंद्र तिथं असली सिच्युएशन.
त्यादिवशी खालच्या हॉलमध्ये आम्हा सर्व भावंडांचा दंगा चालू होता. खूप दिवसांनी असे निवांत एकत्र आलो होतो. त्यामुळे लहानपणाच्या गमतीजमती, आठवणी असंच काहीसं चालू होतं. एशान आमच्या सर्वांमध्ये अगदी आरामात गप्पा मारत होता. ताईच्या लग्नाला दोन-तीन वर्षं होऊनसुद्धा भावोजी असे कधीच मिक्स झाले नाहीत, पण एशान मात्र वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखा आमच्यामध्ये कधीचाच सामील झाला होता. त्यानं त्या दिवशी आंद्याला ऐकवलेलं एकदम जोशातहे वाक्य आमच्या घरात एकदम जगप्रसिद्ध!!!.
तेवढ्यात आजोबांची दणदणीत आवाजात हाक आली. त्यांनी मला आणि एशानला वरच्या मजल्यावरच्या खोलीत बोलावलं होतं. एशान बिनधास्त होता- असणारच त्याचं लहानपण काय आजोबांच्या शिस्तीमध्ये गेलेलं नाही. मी मात्र मनातून घाबरलेले होते.
तुमच्या लग्नाला सहाएक महिने झाले असतील ना?” खोलीत गेल्यावर आजोबांनी मला विचारलं. मी नुसती मान डोलावली. “लग्न झाल्यावर यांच्याकडे काही सत्यनारायण वगैरे झाला नसेलच!” आजोबा म्हणाले.
त्यांच्यात तसली काही पद्धत नसते. बाकी गृहप्रवेशाचे विधी झाले होते.” मी उत्तर दिलं. खरंतर आजोबांना अपेक्षित असलेले धार्मिक वगैरे काहीच विधी झाले नव्हते, फक्त एशानच्या काही नातेवाईकांसाठी एक भलीमोठी पार्टी तीपण हॉटेलात इतकंच काय ते. पण आता ते सांगत बसायची काही आवश्यकता नव्हती.
हरकत नाही. त्यांच्यात नसली तरी आपल्यांत पद्धत असते, त्यामुळे उद्या घरात सत्यनारायण होणार आहे. तुम्ही जोडीनं करायचाय. तुमच्या यजमानांना सोवळं वगैरे नेसता येतं ना?” मी हो-नाही-माहित नाही टाईप मान हलवली. “नाहीतर तुझ्या बाबांना सांग, तो नेसवेल. उद्या सकाळी नऊ वाजता गुरूजी येतील. तूपण साडी नेसून तयार रहा. आज संध्याकाळी जाऊन हातभर बांगड्या भरून ये. सवाष्णीनं एवढ्या भुंड्या हातानं फिरू नयेआजोबा करवादले.
एक्स्युजमी,” एशान हळू आवाजात म्हणाला. “सत्यनारायणाचं काय म्हणालात?”
आजोबांनी त्याच्याकडे एकवार पाहिलं. “उद्या  सत्यनारायणची पूजा आहे. नवदांपत्य म्हणून ती पूजा तुम्हाला करायची आहे
कशाबद्दल?”
सत्यनारायण कशाबद्दल करतात? लग्न झालं की सर्व सुखसमृद्धी लाभू देत, वंश वाढू देत म्हणून. गुरूजी सांगतात तसं करायचं.”
सॉरी. पण मी पूजा करणार नाही.” एशाननं बॉम्ब टाकला. आजोबांना असं कुणी आपल्याला उत्तर देऊ शकतं यावर विश्वासच बसेना. “का करणार नाही?”
कारण माझा देवावर विश्वास नाही. त्यामुळे मी कसलीही धार्मिक विधी, पूजा वगैरे करणार नाही. विधीवत लग्नाला तयार झालो ते हिच्यामुळे. तेव्हा तुमच्या विनंतीला मान दिला होता, पण आता शक्य नाही. एस्पेशली हे वंश वाढू देत म्हणून तर बिलकुल नाही. सॉरी!” तो नजर ताठ ठेवत शांतपणे म्हणाला. एशानचा हा थंड आवाज म्हणजे दगडाचा आवाज. आजोबांना काही समजावणं शक्य नव्हतं, एशानकडून थोडीफार तडजोडीची अपेक्षा होती ती त्याच्या एकंदर या अविर्भावाकडे बघता फोल. मुंबईहून निघाल्यापासून मला सर्वात जास्त भिती होती तेच घडत होतं. मी मध्ये काही बोलायचा प्रयत्न केल्यावर आजोबांनी मला हातानंच थांब म्हणून इशारा केला. “तुमचा विश्वास नसला तरी आमचा आहे. तुम्ही या घरचे जावई आहात. आमच्या नातीचे अर्धांग आहात. त्यामुळे उद्या ही पूजा करायलाच हवी.”
पण मी कसल्या धार्मिक कार्यात भाग घेणार नाही हे तुम्हाला माहित आहे.. पूजा वगैरे मेरे बस की बात नही! इथं केवळ तुम्हा सर्वांना भेटायच्या निमित्तानं मी आलोय.” एशान जितक्या शांतपणे हे बोलत होता, त्याच वेगानं आजोबांचा पारा चढत होता, हे असं उत्तर देणारा त्यांचा नातवंडं, मुलगा किंवा सून वगैरे कुणी असतं तर एव्हाना दोन खणखणीत थोबाडावर बसल्या असत्या. पण हा काही झालंतरी जावई होता. “मी तुमचा मान राखण्यासाठी घरामधलं कुठलंही काम करेन. पण पूजा वगैरे करणार नाही.”
हे बघा,” आजोबा आवाजावर शक्य तितकं नियंत्रण ठेवत म्हणाले. “तासाभराचा प्रश्न आहे. तुमचा विश्वास नसला तरी पूजा करायला काय हरकत आहे? काय गं?” त्यांनी माझ्याकडं बघत विचारलं. मी परत एकदा हो-नाही-माहित नाही टाईप मान डोलावली. “तिथं मुंबईत काय करता ते आम्ही बघायला येत नाही. इथं किमान आमच्या सर्वांच्या समाधानासाठी तरी...”
शक्य नाही. माझा विश्वास नाही, मी पूजा करणार नाही.” तो निर्धारानं इतकंच म्हणाला आणि सरळ मागे वळून खोलीबाहेर पडला. नक्की काय करावं ते न सुचल्यानं मी तिथंच उभी राहिले.
सांग तुझ्या नवर्‍याला.” आजोबांनी माझ्याकडं मोर्चा वळवला. “उद्या गुरूजी येतील. घरभर पाहुणे आहेत. भलते तमाशे नकोत. तुझ्या मर्जीनं लग्न करायची परवानगी दिली म्हणजे इथं घरात पण हवं तसं वागायचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. नवीन जावई म्हणून घरचा सत्यनारायण त्याच्या हातून करावं म्हणून कौतुक करायला गेलो तर मलाच विश्वास नाही म्हणून ऐकवून गेलाय. हल्लीच्या पोरांना शिस्तच नाही.मी परत नुसती मान डोलावली आणि खोलीबाहेर आले. एशान खोलीबाहेरच्या बाल्कनीमध्येच उभा होता.
एशान, असं काय करतोस? प्लीजमी त्याच्याजवळ जात हळूच म्हणाले. “मी तुला मुंबईमधून निघतानाच काय सांगितलं होतं?”
बर्‍याच सूचना केल्या होत्यास. त्या सर्व मी पाळल्यात. पण त्यामध्ये तुला पोरं होण्यासाठी तासभर फुलं वाहत पूजा करावी लागेलहे सांगितलं नव्हतंस. सांगितलं असतंस तरी हेच उत्तर दिलं असतं. आय ऍम नॉट डूइंग इट. कळलं?” त्याचे निळेहिरवे डोळे माझ्यावर रोखत तो म्हणाला. माझा चेहरा बहुतेक फारच रडवेला झाला असावा कारण, एशान पायरीवरून उतरताना माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला. “कमॉन, इतकंपण वाईट वाटून घेऊ नकोस. एव्हरीथिंग विल बी ऑलराईट!” पण माझ्या चेहर्‍यावर काही हसू आलं नाही.
आई स्वयंपाक घरामध्ये खोबरं खवणत बसली होती. मी आजोबांचं आणि एशानचं बोलणं सगळं तिला जाऊन सांगितलं. “अगं पण, आजोबा आम्हाला कुणालाच काही बोलले नाहीत, अचानक स्वत:च असे निर्णय का घेतात कुणास ठाऊकआई आश्चर्यानं म्हणाली.
मला माहित नाही. पण तो म्हणतोय की पूजा करणार नाही. आजोबांचा इगो तुला माहित आहेआमचं खुसफुसत चाललेलं बोलणं ऐकून उरलेल्या सर्व बायका तिथंच आल्या. काय विषय झाला ते आईनं लगेच सांगूनपण टाकलं. या बायका चर्वितचर्वण करायचा एवढी चांगली संधी सोडणार आहेत?  ऊतच आला म्हणायला हरकत नाही.
त्यांच्यात नसेल पद्धत म्हणून माहित नसेल. तू सांग त्याला
बंगालात पण करतात सत्यनारायण
हो, पण हिचा नवरा  सिंधी आहे
मग काय झालं? पंजाबी लोकं देवीची जगराता करतात की, आमच्या कॉलनीमधले खत्रा तर नवरात्रपण करतात
हो, पण एशान सिंधी आहे
असू देत ना, लग्नाच्या दिवशी एवढे सगळे विधी केलेच होते ना. तेव्हा काही म्हणाला नाही.”
कारण, लग्न माझ्यापद्धतीने असं ठरलं होतं ना
मग आतापण लग्नाचाच एक विधी राहीलाय म्हणून सांग आणि पूजेला बसव
अगं, पण तो हिंदूच आहे ना
“अगं तो सिंधी आहे”
मला माझं कपाळ कुठंतरी नेऊन थडाथडा आपटावंसं वाटलं. आईशी बोलून आता काही उपयोग नव्हता, सरळ किचनमधून उठून मागच्या अंगणात जाऊन बसले.
परत किचनमध्ये आले तोपर्यंत हा सत्यनारायणाचा विषय आईकडून बाबांपर्यंत गेला होता. आता बाबांनी मला आणि एशानला बोलावून घेतलं. काहीतरी समजवण्यासाठीच वगैरे. बाबांच्या खोलीमध्ये मी, आई, मोठी काकू, बाबा आणि एशान.

हे बघबाबांनी एशानला समजावलं. “तुझा विश्वास नाही हे मला पटतंय. पण काय आहे. म्हातारं माणूस आहे. जेमतेम तासाभराचं काम. तितकंही नाहीच खरंतर. तुला सोवळं वगैरे नेसायचं नसेल तर झब्बा पायजमा घाल. चालेल की
बाबा, मला व्यवस्थित धोतर नेसता येतं! तुमच्या लेकीला साडी नेसायला मीच मदत करतो, पण प्रश्न तो नाही. मघाशी पण आजोबांना जे संगितलं तेच तुम्हाला सांगतो. मी पूजा करणार नाही. कारण माझा विश्वास नाही. सिम्पल
पण माझ्या विश्वासाचं काय?” मी तोंड उघडलं. “कायम म्हणतोस ना, वी आर लाईफ पार्टनर्स. एकमेकांना सांभाळून घेतलंच पाहिजे. एकमेकांचा आदर केलाच पाहिजे. मग माझा विश्वास असताना.... तू त्या विश्वासाचा एकतर्फ़ीच अनादर करून कसं चालेल?”
मी तुझ्या विश्वासाचा अनादर करण्याचा प्रश्नच कुठं येतोय?”
एशान, लग्नानंतर सत्यनारायण घालायची पद्धत असते. तुझ्या घरी आल्यावर पद्धत नाही म्हणून मी एका शब्दाने तुला काही बोलले नाही... पण आता जर आजोबा सांगत आहेत.. तर किमान मोठ्यांच्या मनाचा आदर राखण्यासाठी तरी....”
मला परत परत तेच सांगायचं नाहीये.. तुझा विश्वास आहे ना तर तू पूजा कर
असं करून कसं चालेल?” काकू म्हणाली. “सत्यनारायण जोड्यानं घालायचा असतो.
एशान क्षणभर माझ्याकडे रोखून बघत राहिला आणि मग बाबांना म्हणाला. “ठिक आहे. उद्या दोघं मिळून पूजा करू.” आईबाबांच्या चेहर्‍यावर एकदम हायसं का काय ते आलं.  मात्र काहीतरी नक्की गोची आहे, हे मला माहित होतं.“पण...” एशान पुढं म्हणालाच. “ही पूजा तुमची मुलगी करेल. मी तिच्या बाजूला बसेन. म्हणजे तिच्या विश्वासाचा अनादर होणार नाही आणि माझ्या विश्वासाचा प्रश्न उद्भवणार नाहीहे ऐकून काकूचा चेहरा हे काय भलतंच!!!
अरे, असं कसं चालेल?” आईला आवाज सापडला. बाबा आता काही बोलावं की नाहीया मन:स्थितीमध्ये होते.
का नाही चालणार? पूजा नवराबायकोनं मिळून करायची आहे. मग तिनं केली आणि मी तिच्या हाताला हात लावून ममम्हटलं तर काय बिघडतंय? आफ़्टर ऑल देवावर विश्वास तिचा आहे, मग तिनंच पूजा करणं योग्य ठरेल ना?” एशान आपला तर्क सोडायला तयार नव्हता. शेवटी सर्वांनी याला समजावण्यात काही अर्थ नाहीअसा निष्कर्ष काढला असणार कारण त्याच वेळी बाबांना कुणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं. आई आणि काकू काहीतरी काम आठवलं म्हणून बाहेर पडल्या. खोलीमध्ये मी आणि एशान दोघंच राहिलो.
एशान व्हॉट्स रॉंग विथ यु? तुला कुणी मला उचलून शंभर पायर्‍या चढ किंवा दोन दिवस उपास कर म्हणत नाहीये. एक तासभराची पूजा. तेही आपल्या संसाराला आशीर्वाद मिळावा म्हणून. मोट्ठ्यांचं मन राखावं म्हणून... तुला माहित आहे ना... आपल्या लग्नासाठी आजोबा तयार नव्ह्ते... त्यांच्या मनाविरूद्ध लग्न झालंय म्हणून तरी किमान...”
म्हणून मी माझ्या मनाविरूद्ध वागू? तासाभराच्या पूजेपुरतं का होइना मी माझी तत्त्वं गुंडाळून ठेवू??”
तुला जसं वागायचं तसं वाग. मी काही जबरदस्ती करू शकत नाही. इथं घरात कुणी काही बोलणार नाहीच. पण आता विषय बास. ज्या माणसाला माझ्या मताची श्रद्धेची विश्वासाची काडीमात्र काळजी नसेल त्याच्यासोबत मला रहायचं नाही. तू एकटाच परत जा.
तोंडाला येईल ते बडबडत सुटू नकोस.. आणि मी...” आईनं मला हाक मारली. “आता वाद घालू नका. उद्याचं उद्या बघू. आजोबांनी तुला हिरवा चुडा भरून यायला सांगितलंय. पटकन तयार होऊन जा. उगाच त्यांना बोलायला अजून एक निमित्त देऊ नकोस.” आई मला काकुळतीला येऊन म्हणाल्यासारखी म्हणाली.
मी बांगड्या भरायला निघालेलं बघून घरामध्ये अजून कुणाकुणाला काय काय कामं आठवायला लागली. कुणाला मेंदी घ्यायची होती, कुणाला मॅचिंग कानातले, कुणाचे ब्लाऊज आणायचे होते. तू येते मी जाते आम्ही निघतो तुम्ही थांबतो करत करत दहाबाराजण मिळून बाजारात जायला निघालो. बाजारातून परत येईपर्यंत मला काय एशानशी बोलता आलं नाही. बोलायचं काय होतं? मला त्याचा स्वभाव माहित होता, एकदा नाही म्हणजे नाहीच. तो उद्या सत्यनारायणाची पूजा करणार नाही, हे घरामध्ये एव्हाना इतरांना समजून चुकलेलं होतं. बाजारामध्ये त्यानं माझ्यासाठी आईस्क्रीम घेतलं, चॉकलेट घेतलं, पण किती लाडेगोडी लावायचा प्रयत्न केला तरी माझा मूड गेलेलाच होता. आम्ही परत येईपर्यंत आजोबांनी ताई आणि भावोजी पूजा करतील असं ठरवून टाकलेलं होतं. प्रश्नच मिटला.
पण असेच प्रश्न मिटत असतात का? माझी नुसती चिडचिड होत होती. तसंपण घरामध्ये भावोजींच्या कौतुकाला उधाण आलं होतं... त्यांचं शांत वागणं, सगळ्यांना आदर देऊन बोलणं, सगळ्या रीतभाती माहित असणं या सर्वांचं अगदी मनसोक्त कौतुक चाललं होतं. माझा नवरा मात्र पैसेवाला असला तरी अगदीच संस्कारहीन आहेया पदवीला पात्र झाला होता.
एकदोनदा वाटलं की आपल्या बॅगा भराव्या आणि मुंबईला निघून जावं. आजोबा काय बडबडतील ते बडबडतील. झक मारलं आणि या पूजेच्या निमित्तानं गावी आले. वास्तविक, ताईचं आणि भावोजींचं लग्न झाल्यावर ताई पहिल्यांदा माहेरपणाला आली तेव्हा तिचं कितीतरी कौतुक झालं होतं. माझ्या वाट्याला तितकं कौतुक आलंच नाही, उलट लग्नानंतर आम्ही दोघं पहिल्यांदाच आलो आहोत असंदेखील कुणी म्हणायला तयार होइना.
चार दिवसांनी गावामधले सगळे कार्यक्रम आटोपून आम्ही मुंबईला परत निघालो. निघताना आईने मला साडी आणि एशानच्या हातात पाच हजार रूपये ठेवले. “तुम्हाला काय घ्यायचं ते घ्याम्हणत. भावोजी आणि ताई पहिल्यांदा आले तेव्हा भावोजींना सोन्याचं ब्रेसलेट दिलं होतं, आमचे तसले काही चोचले नाहीत. प्रश्न दागिन्याचा नव्हता, कोडकौतुकाचा होता. माझा चेहरा तेव्हाच जो पडला तो पार अगदी पोलादपूर जाईपर्यंत. एशानसुद्धा काही बोलत नव्हता.
शेवटी वाट बघून बघून माझा उद्रेक झालाच. “पण तुला माझ्या मतानं जरा तरी वागायला काय धाड भरली होती?” एशान तरीही शांत बसून गाडी चालवत राहिला. मी तशीच धुसफुसत राहिले. पाचेक मिनिटांनी त्याला कुणाचा तरी फोन आला म्हणून त्यानं गाडी हायवेमधून बाजूला काढून उभी केली.  फोनवर पुढच्या आठवड्यात गोव्याचा प्लान ठरत होता, इतकंच मला समजलं. “हे गोव्याचं काय अचानक?” त्यानं फोन कट केल्यावर मी विचारलं.
आमचा एक मित्रांचा ग्रूप आहे. दरवर्षी सुट्टीसाठी गोव्याला जातो त्याचंच प्लानिंग चालू आहे
कोण मित्र? इतक्या दिवसांत गोव्याचं कधी बोलला नाहीस...”
तुला हे फ्रेण्ड सर्कल माहित नाही. फक्त मॅरीड लोकांची ही सुट्टी असते. आता माझंपण लग्न झालंय म्हणून या क्लबमध्ये मलाही सामिल केलं गेलंय. माझ्याबरोबर तुलाही... मला वाटतं दहा मिनिटं इथं रेस्ट घेऊ. थोड्यावेळानं ऊन चढेल..” म्हणतो तो गाडीखाली उतरला.. “हा मित्रांचा ग्रूप खूप एक्स्लिसिव्ह आहे. तुला आवडतील... आणि हां..  महत्त्वाचं सांगायचं राहिलं. ही गोव्याची ऍन्युअल ट्रीप खूप स्पेशल असते. तिथं सगळे मिळून वाईफ स्वापिंग करतात... मज्जा!” तो एक डोळा मारत हसत म्हणाला.
म्हणजे?” अर्थ समजूनपण मी हादरलेच होते.
चिठ्ठ्य़ा टाकून उचलायच्या. याची बायको त्याच्याकडे, हिचा नवरा तिच्याकडे. पूर्ण तीन दिवस दोन रात्री
एशान, गंमत करतोयस का? असले जोक अजिबात चांगले वाट्त नाहीत. रीडीक्युलसमी चिडून उत्तर दिलं.
यात रीडीक्युलस काय आहे? पद्धत आहे आमच्या ग्रूपमधे. इतके दिवस मी अनमॅरीड होतो तरी त्यांच्यासोबत जात होतो. आता लग्न झालंय तर माझी बायको त्यांना अव्हेलेबल...” एशानचं वाक्य संपायच्या आत माझा हात त्याच्या गालावर चालला होता.
मारतेस काय?” तो चिडून ओरडला. “तुला हे करावंच लागेल
एशान, मी असलं काहीही करणार नाही.”
का?”
मला आवडत नाही, मला पटत नाही
कमॉन, मी तुला कुठं कायम कर म्हणतोय. फक्त तीन दिवसांचा तर प्रश्न आहे. त्यानंतर परत नेहमीसारखंच...”
एशान, तुला समजतंय तरी का तू काय बोलतोस ते? पहिल्यांदा मी तुझ्या तोंडून् इतकं घाणेरडं काहीतरी ऐकतेय. आय डोण्ट बीलीव्ह की हे एशान मिरचंदानी बोलतोय. मी हे असलं काही करण्याऐवजी सरळ माहेरी निघून जाईन. मी फार जुन्या मतांच्या घरातली मुलगी आहे आणि असलं वागणं मला पटणं शक्यच नाही.”
पण आता तुझं माझ्याशी लग्न झालंय. वी आर लाईफ पार्टनर्स. मग एकमेकांच्या मताचा आवडीचा आपण आदर करायलाच हवा ना? मग माझी आवड म्हणून तू थोड्यावेळांसाठी तुझी ही तत्वं गुंडाळून ठेवू शकत नाहीस? तुला माझ्या मतानं वागायला जरातरी काय धाड भरतेय?”
मुंबई गोवा हायवेवर सकाळी साडेनऊ वाजता कुठल्यातरी एका झाडाच्या खाली गाडी थांबवून एशाननं मला शेवटी माझ्याच शब्दांची मलाच फास लावला.
सो दिस इज अबाऊट.....”
येस्स.. आता तुला समजलं असेल की माझ्या दृष्टीनं तासभर पूजेला बस हे किती  रीडीक्युलस असू शकेल? मला ते का पटलं नसेल?”
 तू या दोन गोष्टींची तुलनाच कशी करू शकतोस?”
मी तुलना करतच नाहीये. किंबहुना मी जे बोललोय ते चुकीचं आहे आणि म्हणूनच आय डीझर्व दिस थप्पड. आणि  सीरीयसली, माझा असल्या मित्रांचा काही ग्रूप नाही. एका क्लायंटसाठी गोव्याला जायचंय. पण यामध्ये एखादी गोष्ट तुला पटत नसताना केवळ माझ्या आवडीसाठी कर हे म्हणणं किती चुकीचं आहे तुझ्या लक्षात येतंय का?”
एशान, मी फक्त माझ्या आवडीसाठी कर म्हणून साम्गितलं नव्हतं. माझा देवावर विश्वास आहे. मला जेन्युइनली असं वाटतं की सत्यनारायणाच्या पूजेनंतर आपल्याला काहीतरी चांगलं मिळेल. ऍट लीस्ट पूजा केल्याचं समाधान मिळेल...”
त्यात मला काहीच म्हणायचं नाहीये. तुझा विश्वास, तुझी पूजा, तुझं समाधान यांत मी आजवर कधीच आलो नाही. यापुढेही येणार नाही. माझा नास्तिकपणा जसा मी तुला पटवायला जात नाही, तसाच तुझा अस्तिकपणा माझयवर लादू नकोस इतकं सिंपल माझं म्हणणं आहे
म्हणजे एकमेकांच्या मताची काहीच किंमत आपण ठेवायची नाही?”
किंमत ठेवणं इज सच अ रॉंग टर्म. आपल्याला एकमेकांच्या मतासाठी किती झुकायचं ते ठरवावं लागेल. त्याशिवाय या नात्याला काहीच अर्थ राहत नाही. मी तुझ्या मताप्रमाणं किंवा तू माझ्या मताप्रमाणं राहत नाहीस, म्हणजे आपलं एकमेकांवर प्रेम नाही असा अर्थ होत नाही. तुला जसं हवं तसं वागायचं स्वातंत्र्य आहे, मलादेखील आहे. तू काय वागावं हे जसं मी ठरवत नाही तसं मी काय वागावं हे तूदेखील ठरवू शकत नाहीस. तुझा देवावर विश्वास आहे. फाईन. माझ्या दृष्टीनं विषय तिथं संपतो. मी आजवर तुझ्या विश्वासावर अथवा श्रद्धेवर कधीच काही प्रश्न उठवलेला नाही. मग तोच न्याय मलापण लागू व्हायला हवाय. माझा विश्वास नाही. तुझ्या दृष्टीनं विषय इथंच संपतो. तुला बरं वाटावं म्हणून आज सत्यनारायण करेन. उद्या दरवर्षी नवरात्रीच्या दर्शनाला जाऊ. परवा म्हणशील चालत सिद्धीविनायकाला चल. माझा विश्वास नसतानासुद्धा केवळ तुझ्या मताचा आदर म्हणून मी माझी तत्त्वे नक्की कूठल्या क्षणाला गुंडाळायची आणि कधी थांबायचं हे कसं ठरवणार? मग सुरूवातीपासूनच का नको?”
पण तुझ्या अजून लक्षात कसं येत नाहीये? आजोबांनी...”
त्यांना फक्त त्यांच्या मताप्रमाणं मी वागायला हवं होतं. दुसर्‍याच्या इगोसाठी आपल्या नात्यंमध्ये क्लॅशेस का यावेत?... सीरीयसली विचार करून बघ. मी मनाविरूद्ध त्या पूजेमध्ये बसणार. ते तुला जाणवणार. अर्ध्याहून जास्त वेळ तुझं लक्ष माझ्याकडे रहणार.. मी उगाच कठपुतळीसारखा बसणार. त्यात सतत तुझा राग येत राहणार. तुझ्यावर चडफडाट होत राहणार. यामधे तुझा देव आणि तुझ्या विश्वासाचा मजाक होइल नाही तर काय...”
एशान, तुला वादावादी करायचीच असेल तर चिकार पॉइण्ट्स आहेत. माझी फक्त एक छोटीशी मागणी होती. माझ्यासाठी केवळ तू ही पूजा केली असतीस तर...”
तर माहेरी माझी इज्जत वाढली असती. आता जे लोक मला हसत आहेत ते हसले नसते. कमॉन, तुला काय वाटतं हे माझ्या लक्षात आलं नसेल. त्यानं काय फरक पडतोय.. आपण दुसर्‍यासाठी लग्न नाही केलंय. तुझ्या आणि माझ्यासाठी केलंय. हे आपलं आयुष्य आहे, तुझे किंवा माझे नातेवाईक काय म्हणतील यावरून आपण कसं जगायचं ते ठरवू शकत नाही.”
उद्या आपल्या मुलांचं काय? त्यांना काय शिकवणार आहोत?”
जे तुला पटेल ते. जे मला पटेल ते. मुलं मोठे होतात, त्यांना जेव्हा अक्कल येईल तेव्हा त्यांना पटेल ते. त्याचा आतापासून विचार का करायचा?”
मी काही न बोलता हाताची घडी बांधून उभी राहिले. सांगितलं ना, एशानसोबत बोलण्यात कुणी जिंकूच शकत नाही. एशान माझ्या जवळ आला, वार्‍यानं उड्त असलेले केस माझे केस त्यानं हलक्या हातानं दूर केले.
एक सांगू? सॉरी!!! मी इतक्या हट्टीपणानं वागायला नको हवं  होतं. थोडं तुझं ऐकलं असतं तरी चाललं असतं पण...”
आता घडून गेल्यावर बोलून काय उपयोग आहेनकळत डोळे भरून आले. “एशान, मला कुणी काही बोललं तर मला काहीच फरक पडत नाही. याआधी घरात सगळ्यांनी मला चिक्कार टोमणे मारून झालेत. रंगावरून, शिक्षणावरून... झालंच तर लव्ह मॅरेज केलं म्हणूनसुद्धा. आय रीअली डोण्ट केअर. पण तुला कुणी काही बोललं तर... तेही असल्या इतक्या फालतू कारणावरून
 त्यानं मला जवळ घेतलं. “अरे! आता तुझं तुलाच पटलं ना... की मुळात हे भांडणाचं कारणच फालतू आहे. मलासुद्धा कुणी काही बोललं तर काही फरक पडत नाही. पण जर तू अशी रडका चेहरा करून, चिडचिड करत राहीलीस तर मात्र मला फरक पडतो.. तू तुझ्या घरातल्यांच्या मनाविरूद्ध माझ्यासोबत आलीस ते मला माहित आहे. तुझ्या आनंदाची, तुला कसलंही दु:ख न पोचवण्याची जबाबदारी माझ्यावर. तू गावाला जाताना किती खुश होतीस पण माझ्या असल्या हट्टीपणामुळे तू चेहरा पाडलास.. प्लीज असं करू नकोस. माझ्यावर कितीही रागव, ओरड, त्रागा कर. पण माझ्या कसल्याही वागण्यामुळे तू दु:खी होऊ नकोस. प्लीज... हे नातं आपल्याला आयुष्यभर निभ्वायचं असेल तर आपले आनंद समाधान एकमेकांसाठी. पण एकमेकांमुळे दु:ख नको
म्हणजे किमान कबूल तरी कर की तुला मी दु:ख देतोय.”
येस. कबूल करतो” इतकावेळ चेष्टेत बोलणारा एशान अचानक गंभीर झाला. “इतक्या दिवसांत कधीच जाणवलं नाही, पण आज अगदी मनापासून जाणवतंय. तुला तुझ्या घरामधून माझ्या घरात घेऊन येणं, आणि या घरात तू अगदी पहिल्या दिवसांपासून घरचा मेंबरच होऊन रहा अशी अपेक्षा ठेवणं... दिस इज सो रॉंग. गेले चार दिवस मी तुझ्या घरात जावई म्हणून होतो... तेव्हा विचार केला हेच रोल जर रीव्हर्स असते.. तर.. कधी असा विचार केलाच नव्हता..”
“म्हणजे मला नक्की कळ्लं नाही.”
“बघ ना, तुझ्यासाठी हे एक्स्पेक्टेड आहे, तू लग्न झाल्यावर माझ्या घरी येणार. माझ्याच घरात सेट होणार. माझ्या घरच्या सवयींनुसार तू वागणार. मला एसी हवाच म्हणून मी वाद घालणार तुझं डोकं दुखलं तरीही माझी अपेक्षा अशी की, तूच ऍडजस्ट कराअला हवं.... मी आजवर हे कधी विचारात घेतलंच नाही की पंचवीस वर्षं तू ज्या घरात लहानाची मोठी झालीस, ज्या वातावरणात वाढलीस, तिथून पूर्णपणे एका दिवसांत उचलून मी तुला माझ्या घरी आणलं.”
“कमॉन तुज्या घरात ऍडजस्ट व्हायला काहीच त्रास झाला नाही. हॉस्टेलमुळे वगैर सवय होतीच मला...शिवाय आपण दोघंच होतो”
“.. आणि ज्यांना अशी सवय नसते त्यांचं काय? म्हणजे समजा तू मुलगा असतीस आणि मी तुझ्याशी लग्न करून तुझ्या घरी आलो असतो तर चार दिवसांत पळून आलो असतो. कितीही प्रेम असो वा नसो. जमलंच नसतं मला, हे असं सारखं सतत “आमच्या घरात.. आमच्या पद्धतीमध्ये” ऍड्जस्ट करणं....”
“ट्रान्झिशन फेज असते.”
“तुझ्यासाठी! माझ्यासाठी नाही. मी फक्त आपल्याबद्दल बोलत नाहीये. एकूणातच या लग्न नावाच्या सिस्टीमबद्दल बोलतोय. अरेंज मॅरेजबद्दल बोलतोय. ज्यामध्ये एका मुलीनं टोटली अपरिचित घरामध्ये रहायला यावं आणि त्या घराचा मेंबर व्हावं अशी अपेक्षा केली जाते. माझ्यासाठी माझं घर बदलत नाही, नाव बदलत नाही, नाती बदलत नाहीत. तुझ्यासाठी मात्र अख्खं विश्वच बदलतं. दिस इज सो क्रूएल”
“एशान, तू कुठल्याही गोष्टीचा किती विचार करतोयस?”
“तुझ्या घरी चार दिवस राहिल्यावर मगच हे शहाणपण सुचतंय. आय ऍम सॉरी. आय ऍम रीअली सॉरी. मी कधी असा विचार केलाच नव्हता, पण तरीही कळतानकळत आपल्या लग्नानंतर जर मी कधी असा तुल गृहित धरून वागलो असेल तर मला माफ कर. यापुढे मात्र मी हे कायम लक्षात ठेवेन. माझ्या घरात.. नाही! परत सॉरी! आपल्या घरात तुला काहीही त्रास होणार नाही याची काळजी घेईन.”
“आणि रात्री एसी बंद ठेवशील..” मी त्याचे केस विस्कटत म्हटलं.
“मी तुला काही त्रास होऊ देणार नाही असं म्हटलंय. मला त्रास करून घेईन असं म्हटलेलं नाही” तो हसत म्हणाला.
काय असतं खरंच लग्न करणं? एक सामाजिक सोय? एक धार्मिक बंधन? एक मानसिक गरज... या सर्वांहून वेगळं काहीतरी असणं म्हणजे खर्‍या अर्थानं नातं असणं. एशान परफेक्ट नवरा नाही, मी परफेक्ट बायको नाही. पण आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट होण्याचा प्रयत्न करतोय. कधी जमतंय तर कधी नाही. थोडेफार अडथळे येणारच, पण एकमेकांचा हात धरून ते अडथळे पार करणं म्हणजेच तर जगणं. या जगण्यात क्वचित कधीतरी समजतं, त्याची मतं भिन्न आहेत माझी भिन्न. मग असा काय फरक पडतो. दोन भिन्न विचारसरणीच्या लोकांनी एकत्र राहणं, तेही आनंदात इतकंसं कठीण असतं का?
.... त्या दिवशी त्या क्षणी तरी मझ्यापुरतं या प्रश्नाचं उत्तर नाही असंच होतं.
पण मग मला भविष्य समजत नाही हेही खरंच!!
 (समाप्त)