Friday 13 June 2014

दरवाजा (भाग १)

सकाळी स्कूलबसमधून जाणार्‍या चैत्रा आणि अश्विनला रेश्माने बाय करून हात हलवला आणि निवांतपणे तिच्या बिल्डिंगकडे परत निघाली. दिवसाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला. आता दुपारी तीनपर्यंत निवांतपणा.
बिल्डिंगजवळ आल्यावर सवयीने लिफ्टजवळ गेली. तेवढ्यात मागच्या महिन्यांत उसवायला लागलेले दोन ब्लाऊज डोळ्यासमोर आले, आणि तिने जिन्याने वर चढायला सुरूवात केली. चार मजले म्हणजे काही फार नाही. नवरा तर रोज म्हणायचा, "घराबाहेर पडत असलीस तर समजलं असतं, इथे प्लॅटफॉर्मचे जिने केव्हा चढतो आणि केव्हा उतरतो आम्हाला समजतदेखील नाही. तुला या चार जिन्यांचं एवढं कौतुक." बिल्डिंगमधल्या बाकीच्या बायका जिमला वगैरे जायच्या, पण जिमची महिना दीड हजार फी ऐकून तिने तो बेत कॅन्सल केला होता. "तेवढ्यात घरांत व्यायाम होइल" असा तिचा इरादा, पण त्या व्यायामाला मुहूर्त काही मिळत नव्हता हे नक्की.
दोन मजले चढून झाले होते तेवढ्यात केतकरांचा दरवाजा उघडा दिसला. केतकरवहिनी हॉलमधेच उभ्या होत्या. "मीरावहिनी, तुम्ही आहात होय! तरी मी म्हटलं जिन्यातून कोण चाललंय" तिला बघताच तोंडभर हसत म्हणाल्या.
"हो, चैत्रा अश्विनच्या शाळेची वेळ. बाकी, काम झालं?" तिने बोलायचं म्हणून बोलायचं असतं असलं एक वाक्य म्हटलं.
"कामाचं काय होतच राहतं. तुमचे नवीन शेजारी आले की नाही?" केतकरवहिनी म्हणाल्या.
"काय की, गेले महिनाभर रिनोव्हेशन चालू आहे. पेण्टिंग झालं, आणि काय काय बरंच केलंय. मी काय आत जाऊन पाह्यलं नाही"
"अहो, ते सर्व झालंच. मला भुरेवहिनी म्हणाल्यात की, आज उद्यांत राह्यला येणार आहेत. नवरा बायको दोघंच आहेत. अद्याप अपत्य वगैरे नाही... म्हणजे तुम्हाला तशी चांगली सोबत म्हणायची"
मागच्या महिन्यांत तिच्या फ्लॅटसमोर राहणार्‍या कामत आज्जी वारल्यावर त्यांच्या परदेशांत स्थायिक झालेल्या मुलाने फ्लॅट विकला होता. नवीन मालक कोण ते अद्याप तिने एकदाही पाहिलं नव्हतं. केवळ फ्लॅट रिनोव्हेशनला येणारे कामगार वगैरे सोडल्यास दोघेही कधी दिसले पण नव्हते.
"आजी होत्या तेव्हा बरं होतं. आता नुसते नवरा बायको म्हणजे कठीणच. त्यात नोकरी करणारी वगैरे मुलगी असली तर कसली सोबत नी कसलं काय." ती म्हणाली.
"हो, तेही आहेच. पण पार्टी चांगली मालदार आहे हां! फ्लॅट पूर्ण चेक देऊन घेतला. एकही पैसा ब्लॅकने देणार नाही असं सांगून. शिवाय कालपासून सामान येतंय ना ते सगळं शोरूममधूनच. अगदी भांडीसुद्धा नवीकोरी आली आहेत." केतकरवहिनी बहुतेक कालपासून याच ड्युटीवर असाव्यात.
"नवीन संसार असेल. चला, येऊ मी. गीता कामावर यायची वेळ झाली. परत घर लॉक दिसलं की दांडी मारून पळेल" म्हणत ती जिन्याने वर निघाली.
चौथ्या मजल्यावर जिन्यामधेच ठेवलेल्या सामानाने वाट अडवली होती. बाजूला उभा असलेला कामगाराने ते बघताच पुढे येऊन "सॉरी" म्हणत त्याने भराभरा सामान बाजूला केलं. केतकरवहिनी म्हणाल्या तसं सगळंच सामान नवंकोरं दिसत होतं.
दरवाज्याजवळ येऊन कुलूप उघडणार एवढ्यात कानांवर आवाज आला. "अरे, काय पेंटचा वास येत नाही. बास झाली तुझी नाटकं. सगळं सामान आज रात्रीपर्यंत लावून होइल. तू उद्या दुपारच्या फ्लाईटने परत ये"
रेश्माच्या हातातली चावी खाली पडली. इतका ओळखीचा आवाज!!!
"बिल्कुल नाही. किती दिवस राहणार आहेस? ताबडतोब परत ये. तुझ्याशिवाय कंटाळा आलाय!!"
शक्य नाहीये रेश्मा. तो इथे येणं शक्य नाही. तिने परत एकदा स्वतःला सावरलं. धडधडत्या अंत:करणाने तिने दरवाजा उघडला आणि ती तिच्या घरामधे आली.
हे शक्य नाही.
चेहर्‍यासारखा चेहरा असतो, मग आवाजासारखा आवाज का नसेल?
दिवसभर ती घराबाहेर पडली नाही. अगदी चैत्रा अश्विनला आणायलासुद्धा गीताला पाठवून दिलंय. "माझं डोकं दुखतंय" असं खोटंच सांगत.
संध्याकाळी मोहित परत आला तोपर्यंत समोरच्या फ्लॅटमध्ये पूर्ण शांतता होती. दुपारी आलेले कामगार परत गेले असावेत, घराचं कुलूप लावलेलं नव्हतं पण घरामध्ये पूर्ण काळोख मात्र दिसत होता.
"आले का हे नवीन लोक रहायला?" मोहितने विचारलं.
"हो, आजच,," तिने तुटकपणे सांगितलं. मोहितला तसाही फार जास्त इंटरेस्ट नव्हता, त्याने बातम्यांचे चॅनल लावलं आणि रोजच्यासारखा चैत्रा अश्विनबरोबर मस्ती करण्यामध्ये रंगून गेला.
दोन-तीन दिवसांनी रेश्मा या नवीन शेजार्‍यांबद्दल सगळं विसरून पण गेली होती. तो ओळखीचा वाटलेला आवाजसुद्धा.
नेहमीसारखी मुलांना शाळेत पोचवून आल्यानंतर ती किचनमधलं आवरत होती, एवढ्यात बेल वाजली.
गीता एवढ्या लवकर कशी आली असा विचार करत तिने दरवाजा उघडला, पण समोर गीता नव्हती.
"हाय! आय अ‍ॅम माही, हम लोग रीसेण्टली यहापे शिफ्ट हो गये." समोरच्या मुलीने हसत ओळख करून दिली.
"हाय, आय अ‍ॅम मिसेस मीरा. कम इन..." तिने लगेच म्हटलं. "मुझे तो लगा आप लोग रहने आये ही नही. घर तो बंद था.."
"हां.. वो मे गांव गयी थी, और ..उसको तो वैसेभी ऑफिसमे रहने का बहाना चाहिये"
इतक्यात तिला आठवलं, तो फोनवर बोलणारा... मराठी आवाज. "तू मराठी आहेस ना?" रेश्माने विचारलं.
"अरे, आप भी मराठी.. सॉरी. तुम्हीपण मराठी?" माहीने एखादं अद्भुत आश्चर्य असावं असा चेहरा केला "काय मज्जाय ना? बरं, मी कशाला आले होते, तेच विचारायचं विसरले. मला ना प्लीज दूधवाला, पेपरवाला आणि कामवाली वगैरेचे नंबर हवेत. प्लीज द्याल का?"
"एवढंच ना?" रेश्माने टेबलवरचा मोबाईल उचलून त्यामधले नंबर सांगायला सुरूवात केली. "गीता म्हणून माझ्याकडे कामाला येते, तुझ्याकडे पण तिलाच सांगेन. स्वच्छ काम करते आणि मुख्य म्हणजे दांडी मारत नाही,. कुठल्या वेळात तुझ्याकडे यायला हवी?"
"कधीही चालेल. .... माझी जनरली नाईट शिफ्ट असते. त्यामुळे मी दिवसभर घरी असते"
"नाईट शिफ्ट म्हणजे? कॉल सेंटरमध्ये वगैरे काम का?"
"तसंच, पण मी काम करत नाही. आय मीन... मी कॉल सेंटरची ओनर आहे... टेक सपोर्टचा छोटासा सेटप आहे"
रेश्माला मनातल्या मनात खूप आश्चर्य वाटलं, तीशी बत्तीशीची.... अवघ्या तिच्याच वयाची असेल ही मुलगी.
"दॅट इज व्हेरी गूड. म्हणजे गीता कधीही आली तरी चालेल. तुला स्वयंपाकाला कुणी हवंय?"
"नको. दोघांचाच स्वैपाक मॅनेज होतो..."
"तुला फुलवाल्याचा पण नंबर हवाय का? रोज पहाटे येऊन फुले देऊन जातो. पूजेसाठी वगैरे"
"नको आम्ही दोघंही पूजा वगैरे काही करत नाही. असिफचा तर विश्वासच नाही, आणि त्याच्यासोबत राहून राहून....पण हा फुलवाला रोज मोगर्‍याची किंवा चाफ्याची फुलं देईल का? असिफला फार आवडतात..."
पण माही काय म्हणतेय त्याकडे रेश्माचं लक्ष नव्हतं. असिफच्या उल्लेखासरशीच ती केव्हाच हरवून गेली होती. नजरेसमोर दिसत होता तो पंधरा वर्षापूर्वीचा असिफ. रोज पहाटे त्यांच्या बंगल्यामध्ये येणारा. लोखंडाच्या सळीने चाफ्याच्या झाडवर चढून फुलं तोडून घेणारा. मोगर्‍याच्या सर्व कळ्या संध्याकाळी तोडून न्यायचा, आणि मग त्याचे गजरे करून देवीच्या देवळासमोर विकायला.
"कधीतरी झाडावर एक तरी फूल वासासाठी म्हणून तरी ठेव रे." एकदा ती वैतागून त्याला म्हणाली होती.
"एक रूपया दे, दहा फुलं ठेवीन. एक रूपयाला दहा तेवढीच या फुलांची माझ्या दृष्टीने किंमत. आणि फुकट नेत नाही. तुझ्या वडलांना महिन्याचे दोनशे रूपये देतो" एवढंच बोलून तो सरळ निघून गेला होता.
समोर बसलेली माही काहीतरी बोलत होती. अचानक भानावर येत रेश्माने माहीला विचारलं, "चहा घेशील?" आता या क्षणी तिला असिफबद्द्ल काहीही बोलायचं नव्हतं. "चहा नको.. चला मी निघते."
"बस गं, चहा नको तर सरबत तरी घे" म्हणत ती किचनमध्ये गेली. नंतर माही कितीतरी वेळ बसून गप्पा मारत राहिली. माहीला कदाचित तिच्याबद्दल माहीत नसाव,, आणि माहित असलं तरी रेश्माबद्दल माहित असेल, मी तर मोहितची मीरा आहे.... तिने स्वतःचीच समजूत घातली.
पण माही गेल्यावर परत एकदा असिफचा विषय मनामध्ये यायला लागलाच.
असिफ इथेच पलीकडच्याच घरात रहायला आला होता, नक्की कशाला? सूड उगवायला, मी तुझ्यापेक्षा किती सुखी आहे हे सांगायला, तू ज्याला सोडून दिलंस, तो तुझ्याशिवाय देखील किती पुढे गेलाय हे ठसवायला...
पण हे असिफचं वागणं नव्हे. असिफ असा कधीच वागला नसता.
चार-पाच दिवसांत असिफ-माहीच्या घरामधे गीता कामाला यायला लागली. दूध, पेपर आणि फुलांचे रतीब चालू झाले. शिवाय रोजच्या रोज गाडी धुवायला म्हणून गीताच्याच भावाला सांगितलं. गीताकडून अलगदपणे तिने असिफच्या जाण्यायेण्याच्या वेळा कुठल्या हे विचारून घेतलं. तो सकाळी सात साडेसात वाजता जायचा आणि रात्री नऊनंतर घरी परत यायचा.
या दोन्ही वेळांमध्ये रेश्माला दरवाज्यामध्ये यायचं काही कारणच नव्हतं. माही मात्र, अधून मधून दुपारच्या वेळेमध्ये येऊन गप्पा मारायची. असिफने माहीला निवडलं होतं यात काहीच आश्चर्य नसावं, इतकी ती असिफसारखीच होती. स्वावलंबी, स्वतःचे न्निर्णय स्वतः घेणारी. शक्यतो समोरच्याला न दुखावता स्वतःचं काम करून घेणारी, हुशार. फार लहान वयापासून जबाबदारी घेणारी. माहीचं मूळचं गाव तमिळनाडूमधलं. घरामध्ये प्रचंड गरिबी पण चर्चच्या मदतीने शिकायला म्हणून चेन्नईला गेली, तिथून बंगळूरू आणि मग मुंबईमध्ये चार वर्षं नोकरी करून हे स्वतःचं छोटासा बिझनेस चालू केला होता.
आणि असिफ तिचा नवरा नव्हता, दोघांनीही अजून लग्न केलेलं नव्हतं.
माही असिफबद्दल काही बोलायला लागली की रेश्मा मुद्दाम वेगळा विषय काढायची.
ही दोघं तिथे रहायला येऊन महिना झाला तरी रेश्माने एकही दिवस असिफला पाहिलेलं नव्हतं. त्याला आपण इथे राहतोय की नाही तेच कदाचित माहित नसावं. त्याने आपल्या घरासमोर अरहायला येणं हा निव्वळ योगायोग. तिने स्वतःलाच सांगितलं.
पण महिन्याच्या पहिल्या रविवारी हा फुगा फुटलाच.
सकाळीच मोहितने दोन्ही मुलांना त्याच्या बहिणीकडे नेऊन सोडलं होतं. परत आल्यावत तिने बनवलेला थालिपीठाचा नाश्ता खाऊन तो टीव्हीवर लागलेली मॅच बघत होता. ती आतमध्ये संडे स्पेशल स्वयंपाकाची तयारी करत होती.
दरवाज्याची बेल वाजली म्हणून मोहितने दरवाजा उघडला, "मीरा, ए मीरा!! पेपरवाला आलाय.... बिल न्यायला. किती पैसे द्यायचेत?"
"आलेच" म्हणून हात धुवून ती बाहेर आली. दरवाज्यात असिफ उभा होता.
(क्रमशः)


दरवाजा (भाग २)

Tuesday 3 June 2014

दुपार

गणपतीपुळ्यामध्ये दर्शन घेऊन परत निघाले. येताना आपल्या जुन्या कॉलेजवरून जाता यावं आणि जरा वेगळा रस्ता म्हणून माझ्या घराला जवळ पडणारा निवळीचा हायवे न पकडता चाफ़्याकडून शिरगांवला जाणारा रस्ता पकडला. मे महिन्यातली दुपारची टळटळीत वेळ. खरंतर मे महिना म्हणजे आमच्या गावाकडे पूर्वी आंबे काजू फ़णसाचा आणि त्याचबरोबर चाकरमान्यांच्या पाहुणचाराचा महिना. पण हल्ली हाच महिना “टूरीस्ट सीझन” असतो. कुठून कुठून लोकं “कोकण फ़िरायला” म्हणून येतात. इथल्या समुद्राची, निसर्गाची आणि माशांची अप्रूपाने स्तुती करतात. स्थानिक बापडे त्यांची निव्वळ मजा बघत असतात. त्यांना या कशाचं काहीही कौतुक नसतंच. मुळात कोकणी माणसाला कौतुक कशाचं असतं हा एक संशोधनाचा विषय. इतके दिवस गावात असताना आम्हाला तरी कधी कौतुक होतं या सगळ्याचं. पण गेले कित्येक वर्षं मी कोकणाबाहेर असल्यापासून मात्र मलादेखील अधूनमधून नॉस्टॅल्जियाचे झटके येत असतात. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी...
सुट्टीत गावाला गेलं की एकदा तरी पुळ्याच्या गणपतीला जाऊन येणं होतंच. श्रद्धा म्हणण्यापेक्षा सवय किंवा परंपरा!! परंपरा म्हटलं की कसा भारदस्त शब्द वाटतो. खरंतर, कॉलेजमधे असताना “गणपतीपुळे हायवे” आमचा हॅंगआऊट पॉइन्ट होता. त्यामुळे रस्ताभर काहीनाकाही आठवणी जोडलेल्या आहेत, त्या आठवणी जागवत आणि एकटीने भटकायचं म्हणून हे फ़िरायला जाणं. नाहीतर कुटुंबकबिला घेऊन बाहेर पडलं की आपलं फ़िरणं कमी आणि इतर गडबडच जास्त!
दुपारची वेळ असल्याने आज रस्ता अगदी मोकळा होता. कसलंही ट्राफ़िक नसताना गाडी चालवायला जरा बरं वाटत होतं. वाटेमधले चुकारमुकार आंबे विकायला उभे असलेल्या माम्या सोडलं तर अजून कुणी दिसत नव्हतं. आमच्या कोकणातला उन्हाळा नुसता भाजत नाही, उकडूनपण काढतो. त्यातून पुळ्यासारख्या समुद्राच्या खूप जवळ असलं तर घाम विचारायलाच नको. असल्या घामट आणि चिकट वातावरणामधे दुपारच्या वेळेला ताणून देणे हा सगळ्यांत वेळेचा खरा सदुपयोग. त्यामुळे सर्वत्र निवांतपणा असतो. या रस्त्याला चढ चढून आल्यावर एक मोठाच्या मोठा माळ लागतो, पुळ्याचा समुद्र खाली दिसायला लागतो.. आजूबाजूला नुसता विस्तीर्ण पसरलेला माळ. याचंच नाव बहुतेक ढोक्याचा माळ. ही अशी चित्रविचित्र नावं कशी मिळत असतील एखाद्या ठिकाणाला कुणास ठाऊक. सहज गाडी थांबवली आणि खाली उतरले. खरंतर गाडी चालवायचा कंटाळा आला होता असं नाही, पण तरी थांबावंसं वाटलं. आकाशातला सूर्य आग ओकत होता असं म्हणणं म्हणजे फ़ार मवाळ ठरलं असतं. अख्खं आकाश त्या आगीने खरंतर पेटून उठलं होतं. माथ्यावर आलेल्या त्या सूर्याकडे बघणं अशक्य होतं, अगदी गॉगलच्या काचेआडूनसुद्धा. आजूबाजूला कुठेही एक झाड दिसत नव्हतं. सगळा कोरडा भाग. कातळी परिसर. पावसाळ्यांतून याच माळावर छान हिरवं पोपटी गवत उगवलेलं असतं. आणि मग साधारण पावसाळा संपत आला की गवतांवर कोवळी कोवळी फ़ुलं आलेली असतात. रंगीबेरंगी. त्यादरम्यान याच रस्त्यावरून जाताना किती नाही म्हटलं तरी पाचसात मिनिटं थांबणं होतंच. असल्या पावसाळी गवतामधून पायांत चप्पल न घालता धावणं हे माझं खूप आवडतं काम. नवरा मात्र “जनावर वगैरे येईल पायांमधे” असं ओरडत असतो. पण आज सोबत नवरा आलेला नव्हता, आणि समोर हिरवं गवत नव्हतं. होतं ते निव्वळ पसरलेलं भगभगीत काळं कातळ. चटका देण्याइतपत तापलेलं. आणि त्या कातळाला मधेमधे पॅचवर्क केल्यासारखे दिसणारे सुकलेल्या गवताचे पांढरट पिवळे पुंजके. अगदी दूरवर कुठेतरी करवंदीची भलीमोठी जाळी होती. पण तिथपर्यंत चालणं जीवावर आलं होतं. तसंपण सीझनमधे मुलं पहाटेच करवंदं तोडून नेतात विकण्यासाठी.
माझी नजर फ़क्त समोरच्या आकाशावर लागली होती. खालच्या काळ्या कातळाचं वर असलेलं हे निळं प्रतिबिंब म्हणावं असं आकाश. पण कातळ जितकं खडबडीत होतं तितकंच आकाश तलम. मुळात आकाश असतं का तिथे? पृथ्वीच्या आजूबाजूला पसरलेल्या या विशाल अवकाशामधला आपल्या नजरेला जो चिमुकला तुकडा दिसतो त्यालाच तर आपण आकाश म्हणतो. आज त्या तुकड्याकडे नजर टाकता येत नव्हती इतकं ते जळजळीत दिसत होतं. जिथवर आपली नजर जाते त्याला क्षितीज म्हणायचं की आपली नजर क्षितीजापर्यंतच जाते असं म्हणायचं माहित नाही. पण नजरेच्या त्या टप्प्यापलिकडे एक वेगळंच विश्व असलं तरी सध्या नजरेला दिसते त्या क्षितीजाचीच सीमारेषा खरी. आता अजून तीन चार तासांमधे सूर्यनारायण थोडे निवळतील. शांत होतील. थकल्या भागल्या हळूहळू क्षितीजाकडे सरकत जातील. त्यावेळी मात्र याच क्षितीजाकडे हजारो नजरा लागलेल्या असतील. मावळत्या आणि उगवत्या सूर्याला पाहणं लोकांना आवडतं पण जेव्हा तोच सूर्य आकाशामधे आपल्या खर्‍या शक्तीचं प्रदर्शन करत असतो, ती वेळ मात्र कुणाच्याच आवड्डीची नाही. आपलं पण असंच असतं ना... जेव्हा अंगात जोश असतो धमक असते तेव्हा सोबत कुणी नको हवं असतं, आपणच एकटे आपल्या साम्राज्याचे सम्राट. आणि जशीजशी ही धमक कमी होत जाते तेव्हाच कोणतरी सोबत असावंसं वाटतं, आपल्याला सांभाळून घेणारं, आपल्या पावलासोबत पाऊल टाकून चालणारं. आणि मग मनाच्या याच अवस्थेमधे तर रंगाची उधळण होते. संध्याकाळी क्षितीजावर झालेली असते तशी. लाल, तांबडा, केशरी, गुलाबी. सॉरी मी अजून म्हातारी वगैरे झालेली नाही. तरी उगाच असं वाटलं खरं.
मी जिथे उभी होते तिथून पुळे खालच्या बाजूला राहिलं होतं. मागे वळून पाहिलं तर खाली समुद्र दिसत होता. दिवसाच्या रात्रीच्या कुठल्याही वेळेला मला समुद्र कायम राजबिंडाच दिसतो. आता तरी का अपवाद? त्याच्या पोटामधे काय रत्नं बित्नं असतील ती असो, पण अंगावर आज राखाडी रंगाची कांती उन्हामुळे जी काय चमकत होती त्याला उपमा नाहीच. आणि अगदीच उपमा द्यायची झाली तर याच समुद्राच्या लेकींच्या अंगासारखा चमकत होता हा समुद्र. किंवा मग असंही असेल की समुद्राचा हाच रंग घेऊन मासोळ्यांनी आपला मेकप केला असेल. वार्‍याच्या प्रत्येक लहरीवर शांत हिंदकळणारं पाणी त्या पाण्यावर पडलेले उन्हाचे किरण, सोनेरी-चंदेरी रंगाचे. संथ एकाच लयीत. पण हे असं इतकं शांतगंभीर असणारं प्रकरण किनारा जवळ आला की अवखळपणे शुभ्र रंगामधे फ़ेसाळत धावत पुढे येणारं. शाळेमधे अगदी “शांत” असलेलं टिल्लू घरी जाताना आई दिसली की जसं धावत जातं अगदी तसंच. आणि मग त्याची आई कशी दोन्ही हात पसरून त्याला कवेत घेते, तशी समोरची जमीन येणार्या प्रत्येक लाटेला तितक्याच उत्साहाने आपल्या कुशीत घेतेय. इथून इतक्या वरून हा खेळ बघणं ही एक वेगळीच गंमत. आजूबाजूला असलेली सुरूची हिरवी झाडं, किनार्‍यावरची फ़िक्कट पांढरी वाळू, धवल रंगाच्या उफ़ाळलेल्या लाटा आणि त्यामागे पसरलेलं ते काळसर राखाडी पाणी आणि त्यावर चमकणारं चंदेरी ऊन. एखाद्या चित्रासारखं दिसत होतं हे दृष्य.
किती वेळ मी इथे उभी आहे कुणास ठाऊक? भान हरपले असणार माझे नक्कीच. नाहीतर या असल्या टळटळीत दुपारच्या ऊन्हामधे कोण शहाणं माणूस असं रस्त्यावर उभं राहणार आहे? एवढा वेळ आहे तरी एकदेखील गाडी गेली नाही.... इतकं सुनसान, निर्जन, एकाकी!!
किती दिवसांनी अशी मी स्वत:सोबतच होते... कायम माणसांच्या गराड्यात राहिलं की आपणच हरवून गेलेलो असतो. असा निवांतपणा मिळतात कुठे जगायला? आपल्याच स्वत:च्या धुनकीमधे जगायची एक नशा असते.. मी कुणाहीसाठी नाही.. कुणीही माझ्यासाठी नाही. मी स्वतंत्र, मी माझी... असे लख्ख जाणवून देणारे काही क्षण असतात आयुष्यामधे. असाच हा एक क्षण. स्वत:साठी स्वत:सोबत स्वत:भोवती, जगण्याचा, अनुभवण्याचा.
कुणाच्या तरी येण्याने ती जादू हरवली. रस्त्यावरून एक बाईक येताना दिसली.
“काही प्रॉब्लेम आहे का? गाडी वगैरे बंद पडलीये का?” बाईकवर बसलेल्या दोन तरूणांपैकी एकाने विचारलं. असतील पंचवीस सव्वीसची. बाईकची नंबरप्लेट पुण्याची, म्हणजे हे कोकण फ़िरायला म्हणून आलेले असणार.
“नाही, तसं काही नाही. सहज थांबले होते” मी उत्तर दिलं.
“मॅडम, काहीही प्रॉब्लेम असेल तर सांगा, आम्ही नक्की मदत करू. आम्ही चांगल्या घरातली मुलं आहोत.” आता दुसरा म्हणाला.
मला हसू आलंच. अगदी मनापासून. “खरंच काहीही प्रॉब्लेम नाहीये. गाडी व्यवस्थित आहे, थोडा वेळ कंटाळा आले म्हणून थांबले होते. डोंट वरी, मी याच गावाची आहे. आता घरीच निघतेय. विचारल्याबद्दल थॅन्क्स!!”
दोघांनाही मी हात हलवून बाय केलं. दोघं आपल्या वाटेने निघून गेली. दूरवर जाताना त्यांची बाईक धुरकट दिसत दिसत नाहीशी झाली.
“आम्ही चांगल्या घरातली मुलं आहोत” या वाक्याने मला परत एकदा हसू आलं. रस्त्यामधे एखादी मुलगी उभी आहे, आपण तिला मदत करावी असं ज्यांना वाटलं त्यांना परत आम्ही चांगल्या घरातली मुलं आहोत असं का सांगावंसं वाटलं असेल? किंवा मग दुपारच्या अशा वेळेला एखादी मुलगी रस्त्यामधे काहीही कारण नसताना थांबलीच कशी असेल हा प्रश्न पडला असेल का त्यांना? हे असं “मै और मेरी तनहाई” टाईप मोमेंट्स फ़क्त कथा कादंबयामधेच असतात असं लोकांना का वाटत असतं कुणास ठाऊक?
ही दोन्ही मुलं निघून गेल्यावर आजूबाजूला पुन्हा एकदा ती शांतता पसरली. दूरवर कुणीही नाही, मी, कातळ, समुद्र आणि आकाश सोडल्यास. आणि या सर्वांसोबत मी होते. कशासाठी थांबले होते मी? निसर्गसौंदर्य अथवा सृष्टीसौंदर्य बघण्यासाठी नक्कीच नाही? कारण डोळ्याच्या समोर होता तो कोरडाठाक माळ. बघण्यासारखं काहीही नसलेला, तरी या सगळ्या रूक्षपणामधे एक आगळा डौल होता, बेफ़िकीरी होती, एक माज होता.
मनाला जे कायम आनंद देतं असं दृष्य कायम बघावंसं वाटतं यात नवल ते काय...पण त्याहून जास्त मनाला ज्याची हुरहुर लागते असं दृष्य कायम नजरेसमोर हवं असतं. समोरचा निसर्ग पण असाच होता, उघडाबोडका, पण तरीही मला कोड्यात टाकणारा. काहीतरी अपूर्ण असलं की पूर्णत्वाची लागलेली आस का हवीशी वाटते? मध्यान्हीचा सूर्य त्याच्या शेड्युलप्रमाणे चालला होता. उन्हाळा त्याच्या शेड्युलप्रमाणे चालला होता. दुपारनंतर संध्याकाळ येणार, उन्हाळ्यानंतर पावसाळा येणार... हे त्यांना चांगलंच माहिती होतं. आपल्यानंतर काय या प्रश्नाचं उत्तर माहित असलं की या चक्रावरचं हे धावणं सोपं पडतं का? मुळात या चक्रावर सतत धावत रहायला हवंच का? या दुपार उन्हाळा वगैरे मंडळीचं जाऊन द्या, पण आपण? आपण तरी थांबू शकतो ना असं धावणं. हे झालं की ते झालं मग परत हे हवं म्हणून त्याच्यापाठी. धावत रहायचं. सतत धावत रहायचं. अजिबात कधीही न थांबता..
जगातले सगळे तत्त्वज्ञ कायम सांगत असतात, आयुष्य एकदाच मिळतं ते उपभोगून घ्या. पण आम्ही उपभोगापेक्षाही सेव्हींगवर जास्त नजर ठेवणारे लोक. आज कमावून घेऊ. उद्या म्हातारपणी आयुष्याचा आनंद घेऊ. म्हातारपण येतं की नाही त्याची कल्पनासुद्धा नसताना वर्तमानकाळाला दूर सारत भविष्यासाठी जगणारे. पण आजचा हा वर्तमान आणि त्या वर्तमानातला हा क्षण किती सुंदर आहे, किती महत्त्वाचा आहे याची जरादेखील तमा न बाळगता.
आज जर मी या अशा दुपारी इथे न थांबता गाडीच्या काचा वर चढवून एसी लावून या रस्त्यावरून या माळावरून निघाले तर या माळाला काही फ़रक खचितच पडणार नाहीये. मी इथे थांबून या उन्हामधे अशी एकटीच उभी राहून माझ्यापण आयुष्यामधे काही फ़ार मोठा फ़रक तसाही पडत नाहीये तरी मी इथे उभी आहे. स्वत:चीच सोबत घेऊन. स्वत:शीच संवाद साधत. हा क्षण महत्त्वाचा. संवादाचा. स्वत:शीच चालणार्या संवादाचा. आपल्याच मनाच्या डोहाचा तळ गाठत जाण्याच. स्वत:चीच ओळख करून घ्यायचा. हा क्षण महत्त्वाचा.
अजून जगण्यासाठी. अजून धावण्यासाठी. अजून प्रश्न पडण्यासाठी. अजून उत्तरं शोधण्यासाठी.
महत्त्वाचा आहे तो हा क्षुल्लक क्षण. या कडकडीत उन्हाच्या दुपाराने मला हा क्षण दिला.
गाडीत वाजलेल्या मोबाईलने माझी तंद्री भंग पावली. आईचा “कधीपर्यंत येतेस?” विचारायला फोन.
“निघालेच आहे. वाटेत आहे” मी उत्तर दिलं.
वाटेत तर आपण सारेच आहोत, प्रश्न हा आहे की वाटेवरून बाजूला सरून आजूबाजूला बघणार आहोत की नाही.
गाडी चालू केली, आणि माळावरून पुढे आले. हा सरळ रस्ता संपला, कोकणातल्या गर्द झाडीने वेढलेला वळणावळणावरचा रस्ता चालू झाला. पण ती दुपार तशीच तिथेच त्या माळावर पडून राहिली. त्या उन्हासकट, कातळासकट, निळ्या तलम आकाशासकट आणि चमचमणार्‍या समुद्रासकट.
फ़क्त मीच एकटी पुढे निघून आले होते.