Thursday 28 November 2013

समुद्रकिनारा (भाग ८)

साराने परत एकदा मागे वळून पाहिलं. वीरची कार पुढे जाऊन थांबली होती. सारा गेटमधून आत गेली की नाही ते बघायला. तिला वाटलं त्याला परत फोन करावा, आणि त्याच्यासोबत इथून निघून जावं. पण आता तसं केलं तर वीर नक्की चिडला असता. साराने हिंमत करून गेट उघडलं. समोर निरनिराळ्या फ़ुलांची बाग होती. एकीकडे आंब्याचं, फ़णसाचं झाड होतं. बंगल्याकडे जाताना परत एकदा साराच्या मनामधे भिती दाटून आली. मागच्या वेळेला तिचं आणि वीरचं भांडण झालं होतं तेव्हा रसिका तिला वाट्टेल ते बोलली होती. वीरने लग्नाबद्दल तिला सांगितल्यावर तिने सगळं ऐकून घेतलं आणि नंतर शांतपणे “एक दिवस तुझ्या होणार्‍या बायकोला माझ्या पुण्याच्या घरी यायला सांग. एकटीच” एवढंच सांगितलं होतं. याआधी रसिकाला बर्‍याचदा भेटलेली असली तरी इथे पुण्याला पहिल्यांदाच आली होती.
पण सारा यायला तयारच नव्हती, वीर आला तरच ती येईन, असा तिचा हट्ट. कसंबसं वीरने तिला समजावलं. पुण्यापर्यंत तिच्या सोबत म्हणून तो आला, पण रसिकाच्या घरी मात्र तिने एकटीनेच जायला हवं होतं.
तिनं घाबरतच बंगल्याच्या दाराची बेल वाजवल्यावर जवळ जवळ पाच मिनिटांनी दरवाजा उघडला, समोर प्रसन्न चेहर्‍याने हसत रसिका उभी होती. पन्नाशीचं वय गाठूनदेखील तुकतुकीत आणि स्वच्छ चेहरा, तेजस्वी डोळे, आणि वीरसारखीच समोरच्याला आपल्या मनामधे नक्की काय चालू आहे ते एका क्षणात सांगणारी नजर. तिच्या हसर्‍या चेहर्‍याकडे पाहून साराची भीड जरा चेपली, रसिका तिला पाहून नक्कीच खुश होती.
“ये गं, घर सापडायला प्रॉब्लेम नाही ना झाला?” रसिकाने विचारलं. “पहिल्यांदाच आलीस ना तू इथे?”
“नाही, तसं लगेच मिळालं” सारा आत येत म्हणाली.
“बरंय, नाहीतर वीर इकडे वर्षातून एकदा येतो आणि नेमका रस्ता चुकतो.. मग मला फोन करून कसा येऊ म्हणून विचारत बसतो.... यावेळेला मात्र बरोबर घेऊन आला ना तुला?” रसिका म्हणाली. साराला क्षणभर काय बोलावं ते सुचेना.. “मला माहितेय गं, वीरसोबत आलीस तू. मी टेरेसवर होते, तेव्हा त्याची कार पाहिली. आधी खाली उतरलीस, गेटपर्यंत आलीस, मग परत गेलीस. मग वीरची आणि तुझी बोलाचाली झाली, मग परत गाडीत चढलीस, परत उतरलीस, मग तू इथे घरात येइपर्यंत तो त्या रस्त्याच्या कोपर्‍यावर उभा राहून बघत राहिला... मी टेरेसवरून सगळी गंमत बघत होते. कैदाशिणीच्या घरी चालल्यागत भेदरायला काय झालं तुला? आणि तो दीडशहाणा आला असता तरी मी काही नको म्हटलं नसतं”
“पण मॅम म्हणजे... ते असं झालं... की....” सारा गडबडली.
“एरवी चांगली पटपट बोलत असतेस की, मग आज का गाडी अशी अडखळतेय? मी म्हटलं होतं एकटीच ये म्हणून कारण तुझ्याशी थोड्या गप्पा मारायच्या होत्या.. वीर आला असता तर त्याच्या कौतुकातच सगळा वेळ गेला असता, आणि मला तुझ्याशी पोटभर बोलणं झालंच नसतं..” रसिका म्हणाली, “चहा घेतेस का? आणि ब्रेकफ़ास्टला काय बनवू ते सांग”
“मॅम, तुम्ही बनवणार? आय मीन...”
“आज सगळ्यांना सुट्टी दिलीये. हे निवडणुकीचं काम चालू झाल्यापासून निवांतपणा असा नाहीच. आज म्हटलं काही गडबड नको... निवांत राहू दोघी. तुझ्या वीरला सगळा स्वयंपाक मीच शिकवलाय, त्यामुळे घाबरू नकोस माझ्या कूकिंगला. आणि हे मॅम काय नवीन? आई म्हण सरळ मला. तो एक शहाणा मला सरळ रसिकाच म्हणतो हल्ली. संध्याकाळी तुमचे होणारे यजमान तुम्हाला घेऊन जाणार आहेत का?”
रसिकाच्या या बोलण्याचं साराला हसू आलं. “नाही, ते.. आय मी तो.. म्हणजे गेले लगेच मुंबईला परत. मी बसने जाईन.”
“घे फ़िरून बसने वगैरे. एकदा मिसेस सुपरस्टारचा शिक्का बसला की मग असं राजरोस फ़िरणं मुश्किल व्हायचं. बरोबर ना?”
“तसं काही नाही म्हणा....” सारा बोलता बोलता बंगल्याचं निरीक्षण करत होती. समोरच्या भिंतीवर वीरचे लहानपणापासूनचे सर्व फोटो लावलेले होते. बंगला खूप साधेपणाने तरी निगुतीने सजवला होता. हा रसिकाच्या आईवडलांचा आणि नंतर भावाचा बंगला, तो युएसला सेटल झाल्यवर वीरने दुप्पट किंमत घेऊन विकत घेतला, याच घरातून एकदा रसिकाला बाहेर काढलं होतं म्हणे.
थोडावेळ रसिका आणि ती इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिल्या. रसिकाने चहा आणि सोबत खायला म्हणून असंच काहीबाही आणून ठेवलं. गप्पा मारता मारता हळू सारापण मोकळेपणाने बोलायला लागली.
“मग लग्नाची तारीख ठरली की नाही तुमची?” रसिकाने किचनमधे कामाला सुरूवात करत म्हटलं.
“हो. पुढच्या महिन्यात सोळा. वीरने सांगितलं आहे ना तुम्हाला...”
“म्हणाला तो असंच काहीतरी. अगदी आठवणीने लग्नाला ये असंसुद्धा म्हणालाय बरं का..” रसिका हसत म्हणाली.
“आई, प्लीज. वीरने तुमच्याशी डिस्कस केल्याखेरीज इतका मोठा निर्णय घेणार नाही हे माहित आहे मला...”
“मागच्या वेळेला केली होती चर्चा, तेव्हाच मला काय वाटतं ते मी सांगितलं होतं, पण मग तुमचं लग्न मोडल्यावर.. लग्न नाही पण साखरपुडा मोडल्यावर इथेच आला होता दोन तीन दिवस. तेव्हापण बरंच काही बोलला. आतापण रोज फोन येतोच त्याचा.... पण यावेळेला मला तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणून तुला इथे बोलावलं. सरस्वती, तू एकदा माझ्या मुलाला लग्न करते असं सांगून मग नातं तोडलं होतंस. आठवतंय ना? परत तसंच करणार नाही हे कशावरून?”
“नाही, प्लीज. खरंच तसं काहीही नाही. मागच्याही वेळेला वीर आणि माझं भांडण झालं होतं हे खरं आहे.. पण त्याला सोडून द्यायचं वगैरे असलं काहीही नव्हतं, परिस्थितीच अशी होती की.....”
“हे बघ, सरस्वती, मी तुलाच काय पण जगात कुणालाही कसल्याही नातेसंबंधाबद्दल कसलाही सल्ला देऊ शकत नाही, एक वीर सोडला तर मला माझ्या जवळचं दुसरं कुणीही नाही, त्याला कसल्याही बाबतीत दुखावलेलं मला सहन होणार नाही.... म्हणून इतकंच सांगेन, की एकदा वीरचा हात धरशील तो सोडू नकोस. विनंती समज खरंतर”
“आई, एवढ्या चढ उतारानंतर आता कुठे आमचं नातं नीट सुरू होतंय. मला जर वीरचा हात सोडायचा असता तर खूप आधी सोडला असता मी.... पण मला ते खरंच करायचं नाही, वीरने जे माझ्यासाठी केलं ते मी कधीच् विसरू शकत...”
“मुली, अगं उपकाराच्या ओझ्याने प्रेमाची नाती बनत नसतात. प्रेम मनामधून यावं लागतं.”
“ही सगळी पुस्तकी भाषा आहे. असं खरंच जगात काहीही नसतं, प्रेम वगैरे ऐकायला ठिक आहे, प्रत्यक्षात समजा असलं तरीही... “
रसिका हसली. “याबाबतीत तुझे आणि माझे विचार खरंच जुळतात... फ़रक एवढाच आहे की माझ्या आयुष्यात कुणी आलंच नाही.. प्रेम वगैरे काय आहे ते सांगायला... आणि तुझ्या आयुष्यात वीर आहे..” एक सेकंदभर थांबून ती म्हणाली, “... साहिल आहे...”
सारा काही न बोलता शांत बसून राहिली.
“काय गं? गप्प का बसलीस?” रसिकाने दोनेक मिनिटांनी विचारलं. “पोहे चालतील ना तुला? की वीरसारखे तुझेपण काही डायेटचे नखरे आहेत?”
“मला टपरीवरचा वडापाव पण चालेल, पण पोहे बेस्ट आहेत... काही मदत करू का?”
“नको. बस निवांत.”
सारा किचनच्या जवळ एक खुर्ची घेऊन बसली “काय चिरायचं वगैरे असलं तर द्या”
“खरंच नको गं. काही मदत लागली तर सांगेन मी तुला.. बरं, महत्त्वाचं बोलू, आता लग्नाचं काय काय ठरलंय तुमच्या?”
“अलिबागजवळ एक छोटंसं गाव आहे. तिथे राजन एक बंगला बूक करतोय. सगळी मिळून पन्नास साठ माणसं असतील आणि साधं लग्न करायचं. माझी इच्छा आहे म्हणून वैदिक पद्धतीने पण लग्न. नाहीतर वीर रजिस्टर लग्नावर अडून बसला होता, थोडक्यात करणार सगळे विधी. कन्यादान सुधीर देशमुख करणार, नाव काय बदलणार ते वीरने सांगितलं का तुम्हाला?
“बोललाय तो मला. पर्सनली, मला ते खूप आवडलंय, इन फ़ॅक्ट तीच पद्धत बरोबर आहे, आणि तुझ्या घरचं कुणी येणार नाही?”

साराने मान हलवली. “तू बोलावणार तरी आहेस का?”
“कुणाला बोलावणार? काका मरून गेला. काकू आली तर येईल कदाचित पण चुलत भावंडांशी काही संपर्कच नाही, गावामधेच आहेत ते. शिकले नाहीत आणि गावगुंडागर्दीत रमलेत. लग्नाला बोलावलं तर स्टार गेझिंगसाठी येतील ते. माझ्यासाठी येणारं कुणी नाही...” सारा हळू आवाजात म्हणाली.
“आणि साहिल? तो नाही का येणार?” रसिकाने अचानक विचारलं. साराने चमकून पाहिलं.
“तो आला तर वीरला चालणार आहे का? साहिलच्या नावाने सुद्धा राग येतो त्याला. साहिलला मी केव्हाच माफ़ केलंय खरंतर.. पण वीर!! तो अजून काहीच विसरला नाही... तुम्हाला माहितच असेल तुमचा मुलगा किती पझेसिव्ह आहे ते” सारा विषय बदलत म्हणाली, “शिवाय हे लग्न करून माझ्यावर उपकारच करतोय तो” ती चेहर्‍यावर मुद्दाम हसू आणत म्हणाली. “काय करायचं नाही याचीच यादी मोठी झाली आतापर्यंत. जास्त लोक नको, म्युझिक नको, लाईटींग नको, चकमकीत ड्रेस नको, इंडस्ट्रीमधलं कुणी यायला नको, हनिमूनला जायला नको, मी काम करणं सोडायला नको...”
“काही चिंता करू नकोस, तुमच्या या लग्नाचा फ़ार्स एकदा संपला की मी इथे पुण्यात मोठी पार्टी करणार आहे. सगळी साग्रसंगीत आणि व्यवस्थित, माझ्यासमोर त्याची ही नको नकोची तुणतुणी काही चालणार नाहीत. तेव्हा करेन तुझी हवी तशी हौस. बरं आठवलं मला, तुला लग्नाच्या विधीसाठी कसली साडी घ्यायची आहे?”
“छान दिसेल अशी, मराठी पद्धतीने नेसतात ना.. तसली, असा इकडचा पदर तिकडे घेऊन आणि इथे अशी पिनप करतात तसली साडी...पण ते टिकल्या जरी लावलेली नको हां,.. वीर त्याला डिस्को लाईट्स म्हणतो..” रसिकाला अचानक हसू आलं “बरंच द्न्यान आहे गं तुला साडीबद्दल..”
“प्लीज चेष्टा करू नका...” साराचा आवाज थोडा दुखावलेला होता.

“ठिक आहे, आपण जाऊ दोघी शॉपिंगला, मला तुझ्यासाठी पैठणी घ्यायची आहे... दागिने पण मीच घेईन. तुला चालेल ना?” रसिका अजून हसत होती.
“साडीमधे वगैरे... मला खरंच त्यातलं काही जास्त माहिती नाही. कुणाकुणाचे जुने कपडे घालत माझं लहानपण गेलं त्यामुळे...”

“अगं, सरस्वती” रसिकाने येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला, “खरंच, मी काही चेष्टा करत नाही बाळा तुझी. तुला जशी हवी असेल तशीच साडी आपण घेऊ की. तू पण असशीलच ना माझ्यासोबत? मला तरी काय गं, वीर एकटाच! त्याच्या सुखामधेच मला सुख. त्याने तुझ्यासारखी मुलगी निवडली याचंच मला अजूनही कौतुक आहे. ग्लॅमरमधल्या नुसत्या शोभेच्या कचकड्या बाहुल्यांपेक्षा तू... स्वत:चा निर्णय स्वत: घेणारी आणि त्याहून फ़ार महत्त्वाचं म्हणजे त्याच्या स्टारडमला न भुलणारी. चुकून तुला दुखावलं असेल तर आय ऍम सॉरी बेटा..”
“एवढी पण काही मी सेम्टीमेंटल नाहीये.” सारा अचानक हसत म्हणाली, “हे असं सॉरी वगैरे म्हणू नका, आणि अगदी खरं बघायला गेलं तर त्यामधे असं वाईट वगैरे वाटून घेण्यासारखं पण काही नाही. मला खरंच काही माहित नाही त्यामधे. फ़ॅशनच्या बाबतीत कंप्लीट ढ आहे मी... दागिन्यांवरून आठवलं... वीरने खरंतर तुम्हाला सांगू नको असं बजावलं आहे, पण...” साराने तिच्या बॅगमधून एक ज्वेलरी बॉक्स काढून रसिकाच्या हातात दिला. “इंडस्ट्रीच्या सुपरस्टारने हे म्हणे त्याच्या फ़ेवरेट जर्नालिस्टला लग्नानिमित्त दिलेले गिफ़्ट आहे.”
रसिकाने बॉक्स उघडून पाहिला, “रोहितने दिलं हे तुला?”
“हो! वीर तर घराबाहेर फ़ेकायला निघाला होता. पण मी म्हटलं राहू देत. तुम्ही जे म्हणाल तसं. खरंतर मला नेकलेस वगैरे आहे हे माहित नव्हतं. इंटरव्ह्युला गेले होते तेव्हा निघताना त्यांनी दिलं. फ़िल्म प्रमोशनचं मटेरीयल असेल म्हणून मी घेतलं. घरी आल्यावर बघितलं. सोबत एक छानशी नोटसुद्धा आहे.”
“बरं केलंस. वीरने तुला सांगितलं की नाही माहित नाही, पण गेले कित्येक दिवस रोहित वीरसोबत पॅच-अप करायच्या मार्गावर आहे. त्याला भेटतोय, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. वीर आहे तसाच अडेलतट्टू. पण रोहित... रोहितपण अक्षरश: त्याच्यापाठी लागलाय. इतक्या वर्षानंतर त्याला मुलाचा कळवळा आलाय...”
“मागे ते त्याला भेटले होते तेव्हा त्यानेच लग्नाचं सांगितलं. त्यांना असं वाटतंय की वीर बोलावेल म्हणून पण वीरने त्यांना लग्नाला बोलवायचं नाही असं स्पष्ट सांगितलंय.. पण मी इंटरव्युच्या वेळेला भेटले तेव्हा ते म्हणाले की आता तू माझी फ़ॅमीली मेंबर आहेस...”
“आता म्हणून काय उपयोग? जेव्हा म्हणायचं होतं आणि ज्याला म्हणायचं होतं… तेव्हा खरं महत्त्व होतं, नाही? ” रसिका म्हणाली.
सारा क्षणभर गप्प राहिली. “मी एक विचारू तुम्हाला? तुम्हाला कधीच असं वाटत नाही की मागे जाऊन आपला भूतकाळ बदलावा? एखादी अशी गोष्ट...”
“खूप वेळा वाटतं की गं. शेवटी मी पण माणूसच आहे, अगदी वीर लहान होता ना... तेव्हा तर रोज वाटायचं.. काय मिळालं मला? माझा हट्ट होता, म्हणून वीर जन्मला. माझा हट्ट होता, म्हणून मी इंडियात परत आले... पण या सगळ्यामधे माझ्या स्वत:च्या आयुष्याचं किती नुकसान झालं.... त्याचा ताळेबंद मांडायची आता वेळ नव्हे.. पण तरी...” रसिका थांबली.
“तुम्ही मागे पण एकदा या विषयावर बोलता बोलता थांबला होतात.. आज सांगा ना.. मला खरंच जाणून घ्यायचंय.. जेव्हा… जेव्हा साहिलने मला सोडलं तेव्हा तुमच्या एवढी तर होते मी वयाने..... मी तेव्हा जीव द्यायला निघाले होते... पण तुम्ही हा सगळा प्रवास एकटीने केलात. कुणाचीही काही मदत न घेता.. मला शक्य नाही झालं ते. वीरच्या कुबड्या घेऊनच जगतेय आजपण.”
“आणि मी कुणाच्या कुबड्या घेऊन जगतेय गं? वीर होता म्हणूनच... वीरचा जन्म होइपर्यंत मात्र मलाच खात्री नव्हती. तो अगदी तीन चार वर्षाचा होईपर्यंत दिशाहीनच होते मी.. काय करू आणि काय नाही. तिथे दूर लंडनमधे होते, इथल्या कुणाशीही संपर्क नव्हता. माझ्या आईवडलांनी तर बोलणं पण नव्हतं.... तिथे राहून कामं मिळालीच असती. इथे भांडण कुणाशी तर इंडस्ट्रीच्या राजकुमारासोबत. एका फ़टक्यात मी बाहेर फ़ेकले गेले… परत आले तरी सर्वांच्या नजरेत गुन्हेगार मीच. पण एकदा मनाशी निश्चय केला.. किती दिवस पळायचं आपण आपल्यापासूनच लांब. परत यायचं. वीरला इथेच लहानाचं मोठं करायचं, मग त्यासाठी काय वाटेल ते करायला लागलं तरी चालेल. पण कुणाची मदत घ्यायची नाही, आपण आणि आपला मुलगा एवढंच विश्व ठेवायचं… हिंदीचा रस्ता तर केव्हाच बंद झाला होता. मराठीमधे काही नाटकं आणि थोडेफ़ार साईड रोल्स मिळाले, सुदैवाने तेव्हा ते मालिका वगैरे चालू झाल्या आणि मग बरंच काम सुकर झालं... प्रश्न पैशाचा नव्हता, समाजाकडून सतत मिळणार्या अपमानाचा होता, तुला माहितीये मी तेव्हा जर कधी कुठल्या फ़ंक्शनला गेले तर सगळ्या बायका जाऊन आधी आपापल्या नवर्याच्या बाजूला जायच्या, जणू काही तिथल्या तिथे मी यांचे नवरे पळवणारच होते… आणि रोहित!! तो मात्र अशा ठिकाणी ताठ मानेने फ़िरायचा… मधेच कधीतरी जास्त प्यायला की मला फोन करून माफ़ी मागायचा. वीरच्या शिक्षणाचा खर्च करेन वगैरे काय काय बडबडायचा, पण मला त्याची कधीच गरज भासली नाही… मी स्वतंत्र होते, एकटी होते, तरीपण माझं आयुष्य परीपूर्ण होतं. पण हे सगळं झालं.. केलं.. कारण वीर माझ्यासोबत होता म्हणून. आज सुखाने जगतेय. वीर आयुष्यात सेटल झाला. सगळं सुंदर झालं... आता काहीच चिंता नाही. ही निवडणूक वगैरे सर्व आता मनाच्या समाधानाचे सोहळे....निवांत जगायचं आता.” रसिका म्हणाली, “आता तर काय, सासूबाई होणार... त्या सीरीयलमधे गोड गोड आईचा रोल करून वैतागली आहे. आता प्रत्यक्षात एकदम खडूस सासू म्हणूनच वागणार..” आणि हसली. हसता हसता डोळ्यांत आलेलं पाणी तिने हलकेच पुसलं.
साराचा पण आवाज भरून आला होता, “तुम्ही जितक्या खडूसपणे वागू शकाल त्याच्या दसपट तुमचा मुलगा खडूस आहे... आणि तुम्ही किती प्रयत्न कराल तरी तुम्हाला कजाग सासू वगैरे होणं जमणार नाही..पण आई, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात… मला तुमच्यासारखं व्हायला कधीच जमणार नाही!!..”
“असं का वाटतं गं तुला? माझ्यासारखीच तर आहेस की तू. जेव्हा वीरने मला तुझी ओळख करून दिली आणि तुझ्याबद्दल सर्व सांगितलं तेव्हापासून कित्येक वेळा तुझ्यामधे मला माझाच भास झालाय..”
“खरं?? माझ्यासाठी माझी वीरशी ओळख होण्याआधीपासून तुम्ही फ़ार मोठ्या रोल मॉडेल आहातच.. तुम्हाला एक विचारू?”
“आता अजून जर्नालिस्ट आहेस का? विचार ना काय विचारायचे आहे ते, मोकळेपणाने बोलत जा, वीरसारखं मनात ठेवू नकोस सर्व.”
“मी वीरशी अजून या संदर्भात बोलले नाही. पण मला तुमच्यासोबत निवडणुकीमधे काम करायला आवडेल. म्हणजे, तुमचा स्टाफ़ म्हणून. सेक्रेटरी, प्रेस सेक्रेटरी असं काहीही काम चालेल....”
“सरस्वती? हे ऐकूनच बरं वाटलं मला... अगं, तुझ्यासारखी हुशार आणि चलाख मुलगी मला माझ्या टीममधे आलेली आवडेल, तसंही तुला पॉलिटिक्समधे आधीपासून इंटरेस्ट होता ना? स्टाफ़मधे कशाला? माझ्यासोबतच काम कर. मी बोलेन वीरशी. त्यालापण आवडेल उलट...”
नंतर लग्नाच्या गोष्टी ठरवण्याऐवजी कितीवरी वेळ दोघीजणी बसून रसिकाच्या निवडणुकीबद्दलच चर्चा करत बसल्या.
प्रभात रोडकडून निघून वीर औंध रस्त्याने हायवेला आला, हिंजवडीच्या फ़्लाय ओव्हरखालून उजवीकडे मुंबईला जायला वळण्याऐवजी अचानक डावीकडे वळाला आणि चांदनी चौकापर्यंट उलटा जाऊन मुळ्शी रस्त्याला निघाला. त्याच्या आवडत्या निवांत जागेकडे.
कधीतरी शाळेमधे असताना तो इकडे आला होता, तेव्हापासून जी काय त्याला इथे आवडलं होतं.. पण ही जागा त्याला सोडून अजून कुणालाच माहित नव्हती.
गाडी साईडला थांबवून तो खाली उतरला. थंड मोकळी हवा एकदम येऊन बिलगली.
इथे यायचं म्हणजे निरूद्देश बसून रहायचं, स्वत:शीच विचार करायचा. पण आज वीर इथे नुसता विचार करायला आला नव्हता.
त्याने कारच्या डिकीमधून सरस्वतीची डायर्‍यांचं बाड बाहेर काढलं. मागच्याच महिन्यामधे साराने त्याला हे पब्लिश करू का असं विचारलं होतं आणि वीरला ही डायरी कथा म्हणून किंवा सत्य म्हणून कुणाहीपुढे आणायची काहीही इच्छा नव्हती. त्याने सावकाशपणे खिशातला लाईटर काढला आणि डायरीचं एक एक पान जाळायला सुरूवात केली.

सर्वात पहिलं त्याने जे पान जाळलं त्यावर दोनच ओळी होत्या. अगदी गिचमिड अक्षरामधे आणि डोळ्यातल्या पाण्यांनी चिंब झालेल्या...
“साहिल, तू हे जग सोडून गेलास, तर मी कशाला जगू? मी पण तुझ्यापाठोपाठ येत आहे..”

भुरूभुरू जळत त्या पानाची राख होऊन गेली. असंच एक एक करत प्रत्येक पान जाळत वीर तिथे उभा राहिला.
फ़क्त एक पान सोडून!! ते पान जे साराच्या किंवा साहिलच्या आयुष्यात कदाचित खास नसेल.. पण वीरच्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं पान!!


आज कितीतरी दिवसांनी डायरी लिहितेय. दिवसांनी इज रॉंग. महिन्यांनी लिहितेय. पण आज लिहिणार आहे, या रात्रीमधला एकही क्षण माझ्या स्मृतींमधे पुसट होण्याआधी मी हे लिहून ठेवणार आहे. जे मला आठवत नाही ते अर्थातच इतरांनी सांगितलंय मला... आजपासून पाच वर्षांनी मी कुठे असेन काय असेन माहित नाही... पण तरी ही रात्र खूप स्पेशल!

त्यादिवशी डायरीमधे एकच शेवटचं वाक्य लिहिलं आणि घराबाहेर पडले. कुठे जायचं, कसं जायचं आणि काय करायचं काहीही ठरवलं नव्हतं. आयुष्य संपवणे ही एकच गोष्ट लक्षात होती. रात्रीचे अडीच तीन वाजून गेले असावेत. घरापासून निघून चालत चालत कार्टर रोडवरून जात होते. असंच पुढे चालत जाऊन समुद्रामधेच जीव द्यायचा होता... आता आठवलं तरी हसू येतंय.. पण तेव्हा खरंच किती सीरीयस झाले होते. मरायचंच. मरायचंच.


आदल्या दिवशी दुपारी फोन आला होता. साहिल गेला. कायमचा. त्या आधी जवळ जवळ सहा महिने आधी त्याने मला शांतपणे “मी तुझ्या आयुष्यातून कायमचा जात आहे, कारण आता आपलं नातं संपलं” हे सांगितलं होतंच. आणि तितक्याच शांतपणे तो निघूनही गेला होता, माझा जराही विचार न करता. नातं संपलं तरी साहिल होता. आता तो साहिलच नाही. इतक्या दिवसांत तो कुठे आहे आणि कसा आहे तेपण मला माहित नव्हतं. काल फोनवरून समजलं तो गेला, ज्याच्यासोबत आयुष्याची इतकी स्वप्नं रंगवली तो गेला... मग कशाला आपण तरी जगायचं?

रस्त्याने चालता चालता मधेच एका हवालदाराने टोकलं. त्याला खिश्यातलं प्रेस कार्ड दाखवलं. “एवढ्या रात्री एकट्यानं फ़िरू नका, दिवस चांगले नाहीत” एवढंच म्हणून तो गेला. दिवस-रात्र काहीच चांगलं नाही. म्हणून तर मरतेय.
कार्टर रोडला येऊन एका टपरीवर सिगरेट घेतली. “कुछ और माल है क्या?” त्याला विचारलं. इतक्या रात्री दुकान उघडून बसलाय म्हणजे याच्याकडे नक्कीच काहीतरी नशापानी असणार.
“क्या मॅडम? लेट हो गया आपको. थोडी देर पहले आते तो एक नंबरका माल दे देता” तो लोचटपणे हसत म्हणाला. खोटारडा साला!! 


“देना है तो दे, नही तो भडवे और भी है इस एरीया मे” त्या दिवशी मी बार्गेनिंगच्या मूडमधे नक्कीच नव्हते. जिथे लाईफ़च संपवायचं तिथे पैशाची काय चिंता. तशीपण मी तेव्हाही आणि आजही काय गर्दुली नव्हते. अधून मधून कधीतरी मजा म्हणून पार्टीमधे वगैरे तेवढ्यापुरतंच. पण आज नशा हवीहवीशी वाटत होती. मनामधे सतत येणारा साहिलचा चेहरा कुठेतरी हरवून टाकायचा होता. 

“गांजा है, अच्छी क्वालीटी नही है! चलेगा?” मी पुढे गेल्यावर त्याने विचारलं. आपल्याला आज काहीही चालेल, पळेल, उड्या मारेल.

मरायचं तर आहे.
रस्ता पूर्ण सुनसान होता. अजून दहा मिनीटे चालायचं आणि समुद्रात उडी मारून जीव द्यायचा. सिम्पल प्लान.
चालताना अचानक बाजूने एक काळी गाडी जोरात गेली. काळीच गाडी आहे ते आता माहित आहे म्हणून पण तेव्हा दिसली नाही. पुढे गेलेली गाडी अचानक थांबली आणि रीव्हर्समधे मागे आली.
“सरस्वती?” गाडीची खिडकी खाली करत आवाज आला. “इतक्या रात्री इथे?”
गाडीमधे कुणीतरी ओळखीचं होतं बहुतेक, कोण ते आठवेना. “मरायला चाल्लेय. निघाले तेव्हा दुपार होती. पण वाटेत रात्र झाली”
“इज शी ऑन हाय?” पॅसेंजर सीटवरून आवाज आला. 


“हॅलो, वीर कपूर. हाऊ आर यु? आपकी नयी फ़िल्म फ़्लॉप हो गयी. सुनके बहोत बुरा लगा, ओके, चलो बाय. मुझे जाके मरना है. वेरी आय एम पी वर्क!! ” मी पुढे चालत निघाले. वीर आणि राजन दोघे एकमेकांशी बोलत राहिले. राजनच्या मते, मला असं रस्त्यावर सोडून जाणं चुकीचं होतं, पण तो मला त्याच्या घरी घेऊन जाऊ शकला नसता, कारण मागच्याच महिन्यात कुठल्या तरी एका लेनी नावाच्या मुलीशी – तीच मुलगी आता वीरची मेकपमन आहे. सॉरी मेकपवूमन किंवा मेकपगर्ल. तिच्याशी लफ़डं केल्यावरून त्याची बायको त्याला सोडून गेली होती, आणि आता परत तो अशी नशेतली एखादी मुलगी घरी घेऊन गेला असता तर अजूनच प्रॉब्लेम झाला असता. वीरला मला घरी न्यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण मीडीयामधल्या एका मुलीने याचा फ़ायदा घेऊन त्याच्यावर आरोप केले असते तर!! त्याचा पॉईन्ट चूक नव्हता.

पाचेक मिनिटे त्यांची चर्चा चालू असेपर्यंत मी सरळ चालत निघून गेले. मला काय पर्वा होती? पण नक्की काय ठरलं दोघांमधे मला माहित नाही, पण वीरने मला गाडीत बसायला सांगितलं.
“नो थॅंक्स. मला इथून पुढे जायचंय.. आय नीड टू डाय. लाईक टूडे, लाईक नाऊ! साहिल इज डेड, ही इज ऑलरेडी डेड, माय हजबंड, सॉरी, एक्स हजबंड इज डेड... आणि मला त्याच्यासोबत जायचंय. जर मी आता मेले नाही, तर तो कदाचित पुढे निघून जाईल... समजतंय का मी काय म्हणतेय ते? लेट मी गो!”


इतका वेळ राजनने आणि वीरने मला पोलिस स्टेशनवर सोडायचं ठरवलं होतं, पण माझी अवस्था बघून मला दोघे वीरच्या फ़्लॅटवर घेऊन गेले. राजन आम्हाला सोडून लगेच निघून गेला, रात्रभर घराबाहेर राहून त्याला चालणार नव्हतं. वीर आणि मी दोघंच होतो. वीर आणि मी त्याआधी कितीतरी वेळा पार्टीमधे, प्रेस कॉनमधे भेटलो होतो. त्याचे कित्येक एक्स्क्लुझीव इंटरव्ह्यु पण मी केले होते, पण तेवढीच ओळख होती तेव्हा. 

लिफ़्टमधून त्याच्या फ़्लॅटवर गेल्यावरपण “वीर, लेट मी गो. मला मरायचं आहे” एकच वाक्य मी पुन्हा पुन्हा म्हणत राहिले. वीरने घरात गेल्या गेल्या बाल्कनीच्या दरवाज्याला कुलूप घातलं आणि माझ्यासाठी एक भलंमोठं सॅंडविच करून आणलं. सोबत वीर स्पेशल कॉफ़ी.

“का मरायचं आहे तुला?” त्याने मला हळूच विचारलं.
आणि मी त्याला सगळं सांगितलं. माझ्याबद्दल, आईबद्दल, उस्मानबद्दल, काकाबद्दल, साहिलबद्दल आणि साहिलबद्दल... रात्रभर मी बोलत राहिले. झोपणं शक्यच नव्हतं.
रात्रभर वीर फ़क्त मला ऐकत राहिला.
आज या घटनेला आठ महिने झाले. आठ महिने. वीर त्या दिवसापासून माझ्यासोबत आहे. त्याने माझ्यासाठी ग्रिफ़ काऊन्सिलर अरेंज केला. माझं मन रमावं म्हणून माझ्यासोबत गोव्याला फ़िरायला आला. तिथल्या बीचेसवर फ़िरताना मला आजही त्या रात्रीचा माझा मरण्याचा निश्चय आठवतो. पण आता मला मरायचं नाही...


नक्की कशासाठी माहित नाही, पण आता हळूहळू जाणवतंय. हे नुसतं आकर्षण नाही. त्याहून जास्त आहे. आधीची नुसती प्रोफ़ेशनल ओळख होती, आता ती तेवढीच राहिली नाही. वीर कपूर इज माय बॉयफ़्रेंड. मी आजवर हे कुणालाही सांगितलं नाही, आज पहिल्यांदा लिहितेय. आय ऍम इन लव्ह विथ हिम. साहिल माझ्यासाठी आयुष्याचा आधार होता.. पण वीर!! वीर माझा हात हातात घेऊन सोबत चालणारा सखा आहे.

वीर माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. साहिलपेक्षाही.

समुद्रकिनारा (भाग ७)

“पन्नास,” वीर पुन्हा ठाम्पणे एकदा म्हणाला, “पन्नासच्या वर एकही माणूस चालणार नाही”
राजन त्याच्यासमोर डोक्याला हात लावून बसला होता. “अरे, कसं शक्य आहे? आपला रीलीज आहे पुढच्या महिन्यांत, त्यासाठी हा ईव्हेंट परफ़ेक्ट होइल. शिवाय आधीचे प्रोड्युसर, दिग्दर्शक, कास्ट, क्रू आणी तुझा स्टाफ़, रसिकामॅमच्या सर्कलमधले लोक, शिवाय साराच्या घरचे, आय मीन गावाकडून तिचे कुणी नातेवाईक, तिचे कलीग्ज...”
“तिच्या साईडने फ़क्त तिचे तीन चार कलीग्ज आणि सुधीर देशमुख येतील. कन्यादान वगैरे भानगड पण तेच करणार आहेत. रसिकाकडून कुणी येणार नाही. ऑलरेडी सांगितलंय तिला, त्यामुळे टोटल पन्नास माणसं झाली पाहिजेत, जास्त नको.” वीर ट्रेडमिलवर धावत म्हणाला.
“प्लीज हट्ट करू नकोस. तुला हवं तर लग्नाच्या विधीसाठी घरचीच माणसं थांबू देत, पण नंतर एखादी पार्टी तरी....”
“राजन, मी तुला एकदा सांगितलं ना? पार्टी वगैरे काही भानगड नको. गेस्ट लिस्ट तू बनव. नाहीतर मी बनवेन, पण मला जास्त गर्दी नको. लग्न हा माझा प्रायव्हेट मामला आहे. त्यामधे प्रोफ़ेशनसंबंधी लोक आले नाही तरी चालेल.”
“आणि मीडीयाचं काय?”
“मीडीयाला नो एन्ट्री. एकपण मीडीयावाला व्हेन्युवर दिसता कामा नये”
राजन हसला, “आणि तू लग्न कुणाशी करणार?”
“काहीतरी जोक करू नकोस” वीर म्हणाला तरीदेखील तो हसलाच. “पण सारासमोर ही लाईन जरूर ऐकव. मस्त वैतागेल ती.”
“वीर, अजून एक महत्त्वाचं......” राजन अचानक गंभीरपणे म्हणाला.
“नाही. आपण रोहित कपूरला इन्व्हाईट करणार नाही,” राजनने काही विचारायच्या आधी तो म्हणाला.
“ते मलाही माहित आहे, पण आता माझा प्रश्न वेगळा आहे. काल तू रोहित कपूरची मीटींग रेकॉर्ड केलीस त्याची ओरिजिनल टेप......”
“डोन्ट वरी.. साराजवळ आहे.”
“काय?? साराजवळ?? वीर शुद्धीत आहेस ना तू?” राजन ओरडलाच.
“त्यात एवढं ओरडण्यासारखं काय आहे?” वीर हळू आवाजात म्हणाला.
“वीर, ती ओरिजिनल टेप आहे, कॉपी दिली अस्तीस तर ठिक.. पण ओरिजिनल टेप? उद्या ती कुणाच्या हाती पडली तर?? साराने कुणाला दिली तर?? साराकडून कुणी चोरली तर?”
वीर हसला, “राजन, तुला काय वाटतं रे? मी इतका भोळाभाबडा दिसतो तसाच डोक्याने पण आहे की काय? त्या टेपच्या शेवटी मी मुद्दाम रोहित कपूरसमोर साराशी लग्न करण्याबद्दल बोलून ठेवलंय. इन फ़ॅक्ट, साराला लग्नासाठी त्या टेपमधून विचारलंय मी काल.”
“याला कुठल्या भाषेत रोमॅन्टिकपणा म्हणतात?” राजन अविश्वासाने म्हणाला.
“ते रोमॅन्टिकपणा वगैरे ठिक आहे, पण समजा उद्या साराने ही टेप पब्लिक करायचीच म्हटली तर तिला जशी आहे तशी पब्लिक करता येणार नाही. तिला लास्ट पोर्शन एडिट करावा लागेल. आणि एडिटेड टेपची क्रेडीबीलीटी कुणीही कधीही धोक्यात आणू शकतोच की.”
“हे ठिक आहे, पण तरी तू टेप सारालाच का दिलीस?”
“कारण, मला तिला दाखवायचं आहे की माझा तिच्यावर किती विश्वास आहे. सिम्पल.” वीर शांतपणे म्हणाला, “ जेव्हा कधी ही टेप ती बघेल तेव्हा तेव्हा तिला जाणवत राहिल की मी तिच्यावर किती मोठा विश्वास टाकलाय, दुसरं काही नाही तर त्या विश्वासासाठी ती माझ्या विश्वास्घात कधीच करणार नाही. राजन, साहिल परत आलाय! त्याच्या आणि तिच्या नात्यामधे अजून काही नवीन होण्याआधी मी साराशी लग्न करणार आहे, आणि त्यासाठीच मी एवढ्या लवकर इतका मोठा निर्णय घेतलाय... मला आता मागच्या वेळेसारखं काही भांडणं वादावादी व्हायला नको. साराला त्यासाठी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायलाच हवाय, त्या धनुयारिणीच्या लफ़ड्यापासून तिला अजून माझ्यावर आधीइतका विश्वास नाही.”
“पण साहिलचा फ़क्त एकदा फोन आला होता ना तिला? आणि तो इकडे आलाय कुठे?”
“नाही, तो इथे मुंबईतच आहे. साताठ दिवसांपूर्वी ती भेटली पण होती त्याला. रोजचे फोन तर चालूच आहेत. आय कान्ट बीलीव्ह, पण तो आता परत का आला त्याचं एकच कारण असू शकतं.”
“वीर...” राजन भितीने म्हणाला, “यू मीन टू से?”
“येस्स.... मलापण तेच वाटतंय. पण अजून नक्की माहिती समजली नाही मला.”
“वीर, तू परत एकदा तिच्या मागे कुणालातरी ठेवलंयस का? तुमचं आधीचं भांडण आणी त्यानंतरचा ब्रेकप यामुळेच झालं होतं ना? आणि आता तू हे.... मला वाटतं तू पुन्हा एकदा या सर्वांचा विचार करावास?”
“काय विचार करणार तो करून झालाय, आता विचार पुरे. कारण, काहीही झालं तरी मी साराला माझ्याशिवाय दुसर्‍या कुणासोबत इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. साहिल.... मरत पण नाही साला, खरं तर असं बोलायला नको हे मलाही समजतं पण काय करू?” वीर संतापाने म्हणाला, “काय मिळतं त्याला माझ्या आयुष्यामधे माती कालवून? मागच्या वेळेला साराला एकटा सोडून गेला होता तसाच कायमचा गेला असतातर? दर वेळेला परत येतो आणि माझ्या लाईफ़मधे प्रॉब्लेम करून जातो. पण यावेळेला नाही... राजन! आणि आज ना उद्या सारा मला खरं काय ते सांगेलच. कधीच खोटं बोलत नाही ती... पण खरं सांगू? मलाच भिती वाटते... सारा जर माझ्या आयुष्यातून गेली तर...माझं काय होइल?” बोलता बोलता अचानक वीर थांबला, “असो. आज संध्याकाळपर्यंत गेस्ट लिस्ट बनवून दे. व्हेन्युसाठी प्लीज मुंबईच्या बाहेर ठिकाण बघ. पुणे किंवा लोणावळा वगैरे. त्याहून दूर शक्य असेल तरी चालेल. रसिकाची ती मैत्रीण आहे ना, तिला विचारून घे, इव्हेंट मॅनेजमेंट करते ती.”वीर विषय बदलत म्हणाला.
“आणि बाकी सगळी तयारी?”
“अजून काय तयारी राजन? ते फ़ूड, ड्रिंक्स, थीम्स, डेकोरेशन वगैरे सगळं तूच बघ. मला त्यात काही समजत नाही. ज्वेलरी वगैरे रसिका बघेल.”
“ठिक आहे, आणि वीर तुला कितीही प्रायव्हेट लग्न करायचं असलं तरी मला तीन-चार मीडीया चान्स दे. तुझ्याच फ़िल्म्साठी मदत होइल,”
“ओके! तू काय माझ्या लग्नाला मीडीया सर्कस बनवल्याखेरीज थांबणार नाहीस, पण पन्नास... पन्नासच्या वर एक माणूस नको.” वीर हसत म्हणाला.
======================================================================

नेत्रा थोडीशी नाराज होती, काल पहाटे मेल पाठवल्यावर दिवसभर तिने धवनच्या फोनची अथवा मेसेजची आतुरतेने वाट पाहिली होती. पण काल त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. उलट संध्याकाळी घरी निघताना देशमुख सरांनी तिला बोलावून “तुझं कामात लक्ष नाही असं एच आरचं म्हणणं आहे. त्यांनी उद्या सकाळी अकरा वाजता तुला बोलावलंय. ऍडमिन डीपार्टमेंटला जाऊन भेट” असं तुटकपणे सांगितलं होतं.
“कामात लक्ष नाही. मी केलेली स्टोरी धवनने नीट वाचली असती, तर एव्हाना प्रमोशन दिलं असतं मला,” मनातल्या मनात ती पुन्हा एकदा चरफ़डली.
आज सकाळी दहा वाजता ऑफ़िसमधे येताना ती तोच विचार करत होती. सरस्वती केळकर ते सारा व्ही के असा एक वादळी प्रवास. घरांतून पळून गेलेली, महिलाश्रमात राहून नादारीवर शिकणारी सरस्वती, अठरा वर्षं झाल्यावर गावांतल्या कुणाचा तरी हात धरून पळून गेलेली सरस्वती- हा जो कोण होता तो “साहिल” नक्कीच नव्हता, कारण तिच्या ओळखीमधे या नावाचा कुणी मुलगाच नव्हता हे तिला परवाच्या भेटीमधे नक्की समजलं होतं. ती कुणासोबत पळाली होती, तिचं मूळ गाव कुठलं ते मात्र कुणी सांगत नव्हतं. महिलाश्रमापासून ते मुस्लिम मोहल्ल्यामधे सर्वत्र फ़िरलं तरी सरस्वती केळकरबद्दल कुणीही धड माहिती सांगायला तयार नव्हतं. उलट “आम्ही तिला ओळखतसुद्धा नाही” हेच प्रत्येकाने सांगितलं होतं. पण एक दुवा नेत्राच्या हाती लागला होता. साराच्या सीव्हीमधे तिने लंडनच्या एका कॉलेजमधे जर्नालिझम केल्याचा उल्लेख होता, तेवढी तीन वर्षे ती गावामधल्या एका स्थानिक वर्तमानपत्रामधे काम करत होती चक्क. म्हणजे तिने डिग्रीचं सर्टिफ़िकेट खोटं जोडलं असणार. या ऑफ़िसमधे मात्र प्रत्येकजण सरस्वती किती हुशार, किती गुणाची आणि कीती सीन्सीअर याच गुणगानामधे व्यस्त होता. साराच्या पर्सनल लाईफ़बद्दल मात्र त्यांना काही माहित नव्हतं.
इथे मुंबईत आल्यावर तिला मिळालेल्या एक सो एक ब्रेकिंग न्युज, फ़िल्म-टीव्ही पर्सनॅलीटीजबरोबर वाढत जाणारी ओळख... हे तर सगळंच अविश्वसनीय होतं. पण त्याहून आश्चर्यकारक होतं ते तिचं आणि वीरचं प्रकरण.... पण नेत्राच्या स्टोरीचा आता तो मुख्य विषय राहिलाच नव्हता. सारा व्ही के बनण्याआधी सरस्वती केळकरने काय काय दिवे लावले होते ते इथे कुणालाच माहित नव्हते....
सकाळचे साडेदहा वाजले तरी ऑफ़िस एकदम शांत होतं. एवढ्या लवकर कुणी येणार नाही याची तिला पूर्ण खात्री होती. पण तरी डेस्कवर बसलेली सारा पाहून ती एकदम चपापलीच.
“सारा, तू इतक्या लवकर?”
“हो. थोडं काम होतं. तू कशी काय लवकर?” सारा समोरच्या स्क्रीनवरून नजर न हटवता म्हणाली.
“माझंपण थोडंकाम होतं,” हातातली बॅग डेस्कवर ठेवत ती म्हणाली. “सारा, आज तू रोहित कपूरचा इंटरव्ह्यु घेणार आहेस ना? मी येऊ सोबत?”
“हो, चालेल! आज दुपारनंतर जायचं आहे, तेव्हा ऑफ़िसमधे असलीस तर चल!” सारा शांतपणे म्हणाली.
साराच्या या उत्तराने नेत्रा खुश झाली. एवढ्यात एका शिपायाने येऊन “सारा मॅडम, आपको एच आर मे बुलाया” सांगितलं. साराला जणू काही हे अपेक्षित असल्यासारखं ती लगेच गेली पण. आणि नेत्रा प्रचंड खुश झाली.
फ़ायनली... तिच्या जबरदस्त इन्व्हेस्टीगेशन जर्नालिझमचा काहीतरी जबरदस्त परिणाम झालाच होता!!!
सुमारे अर्ध्या तासाने परत एकदा शिपायाने येऊन तिला सोबत यायला सांगितलं “किधर एच आर मे?” तिने त्याला विचारलं. तो तिच्या सोबतच लिफ़्टमधे शिरला.
“नही, बारा मंझिलपे”
“पण बाराव्या मजल्यावर तर...” ती पुढे काही म्हणायच्या आत लिफ़्ट थांबली.
“आप इधर रूको. अंदरवाले साब बुलायेंगे तो जाना” एवढं म्हणून तो परत गेला. नेत्रा तिथल्याच एका सोफ़्यावर बसली. बाकीच्या पूर्ण ऑफ़िसपेक्षा हा मजला सर्वात वेगळा. वर्तमानपत्राच्या मालकांची ऑफ़िसेस होती या मजल्यावर. समोर बसलेली एकमेव रिसेप्शनिस्ट तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून काहीतरी टाईप करत होती. बाकीचा बंद केबिनमधे कोण होतं कुणास ठाऊक.
इथे आल्यावर नेत्राच्या घश्याला जवळजवळ कोरड पडली होती. ज्युनिअरमोस्ट असल्याने क्वचित धवनच्या केबिनमधे जायची वेळ यायची तिच्यावर. आणि आज तर डायरेक्ट ओनर ऑफ़िसमधेच.... कशासाठी? एका कलीगची चुगली केली म्हणून की साराची असली कहाणी समोर आणली म्हणून.
पाचेक मिनिटं बसून झाल्यावर समोरच्या रिसेप्शनिस्टने तिला बाजूच्या एका केबिनमधे जायला सांगितलं.
नेत्राने धडधडत्या अंत:करणाने दरवाजा उघडला. भलीमोठी प्रशस्त केबिन होती आणि समोर तिशीचा एक माणूस बसला होता. बघताक्षणी तरी तो तिला अजिबात आवडला नाही. काळासावळा आणि दिसायला जरा विचित्रच होता तो.

“तुम्ही मिस नेत्रा का?” तिने काही बोलायच्या आत तो म्हणाला.
“हो,”
“या, बसा आतमधे!” तो रूक्षपणे म्हणाला. नेत्राला अजून नक्की काय चालू आहे त्याचा अंदाज लागत नव्हता.
“तुम्ही क्राईम रीपोर्टंग बघता का?”
“नो, सर. मी जनरल रिपोर्टिंग बघते”
“एनी आय एम पी स्टोरीज?”
“अं.... सर, आय डिड दॅट स्टोरी ऑन...” नेत्रा गडबडली. तिने तिच्या नावाने एकही उल्लेखनीय स्टोरी अजून केलीच नव्हती, करणार कशी? आतापर्यंत तिला तसा चान्सच मिळाला नव्हता.
“हे तुम्ही लिहिलं आहे?” तिच्या उत्तराच्या पूर्ण होण्याची वाट न बघता त्याने समोर एक कागद टाकला.
बघ़ताक्षणी नेत्राला तो तिचाच काल धवनला मेल केलेल्या कागदाचा प्रिण्ट आऊट आहे ते समजले.
“हो”
“नुसते हो म्हणू नका, नीट वाचून घ्या. आणि मग या इथे या कागदावर” त्याने तिच्या पुढ्यात दुसरा एक कागद टाकत म्हटले, “इथे सही करा. हा लिहिलेला मजकूर मीच लिहिला आहे म्हणून”
“पण का सर?”
“नेत्रा, तुम्ही जिथे काम करता तिथल्या एका कलीगवर अत्यंत भयानक आरोप लावले आहेत, तेदेखील खोटे. असं करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे वगैरे मी विचारत बसणार नाही. पण कायदेशीररीत्या तुम्हाला या लिखाणाची जबाबदारी घ्यावीच लागेल.”
“सर, प्लीज!! मला एकदा एक्स्प्लेन करायची एक संधी तरी द्या. मी जे काही केलं त्यामधे सारावरती कसलेही आरोप लावलेले नाहीत. खरं काय तेच मी सांगितलं आहे. मी प्रत्यक्ष तिच्या गावामधे गेले होते. तिथल्या लोकांना भेटलेय. तिथून माहिती गोळा केली आहे. सरस्वती केळकर मुंबईला येण्याआधी एका साध्या गावातल्या शाळेत शिकत होती. आईवडील कुणीही नव्हतं तिला. ती गावातल्याच कुठल्यातरी एका मुलासोबत पळून आली मुंबईला. त्यानंतर ती जॉइन झाली इथे. इथे जॉइन होताना तिने लंडनच्या कॉलेजचं सर्टीफ़िकेट दिलंय. ते तिला कसं शक्य झालं मला माहित नाही. पण ते सर्टिफ़िकेट खोटं असणार. कारण तेवढी वर्षं ती गावामधेच काम करत होती. इकडे आम्हाला सगळ्यांना तिने साहिल म्हणून कुणी बॉयफ़्रेन्ड असल्याचं खोटंच सांगितलंय. पण असं कुणीच तिच्या लाईफ़मधे नव्हतं. सर, तिचा तो बॉयफ़्रेन्ड आहे, त्याबद्दल गावात कुणीच नीट सांगत नाही. सगळे घाबरतात त्याला. बहुतेक गुंड मवाली वगैरे असावा आणि इथे प्रत्यक्षात तिचं वीर कपूरसोबत अफ़ेअर आहे. पण हे तिने कुणाला सांगितलं नाही. ती हे सर्व लपून का करते माहित नाही. नक्की कशासाठी... म्हणून...”
“म्हणून तुम्ही वीर आणि सरस्वतीचे एकत्र फोटो काढलेत, त्यांच्या नकळत, त्यांच्या घरामधे? आणि ते या मेलसोबत जोडलेत. सरस्वती तुमच्यावर आता इन्व्हेजन ऑफ़ प्रायव्हसीच्या नावाखाली केस ठोकू शकते.... नशीब समजा तुमचं... ती असं करत नाहीये.”
“म्हणजे सर?”
“येस्स, तिने ते फोटो पाहिलेत, तुमची ही घटिया स्टोरी पण वाचली, म्हणून सल्ला देईन, की अजून महिनाभर तरी तिच्या समोर जाऊ नका, इतकी चिडली आहे ती.....” नेत्रा जणू गर्भगळित झाली.
“सर पण...”
“प्लीज स्टॉप कॉलिंग मी सर... मी तुमचा बॉस नाही. जरी इथे ओनर केबिनमधे बसलो असलो तरी माझा या वर्तमानपत्राशी काहीही संबंध नाही... ”
“ओके, पण मग...”
“नेत्रा, लेट मी बी व्हेरी क्लीअर. मला व्यक्तिश: तुमच्या या ऑफ़िस पॉलिटिक्समधे काडीचाही इंटरेस्ट नाही. हे असं करण्याआधी जरा तरी विचार केला होता का तुम्ही? तुमच्या या कामामुळे तुम्ही सरस्वतीला किती दुखवलं असेल याचा विचार करा. आणि त्यातून तुम्हाला नक्की काय मिळणार आहे? इथे कामाला जॉइन होण्याआधी, वीर कपूरशी कसलंही नातं जोडण्याआधी तिने या वर्तमानपत्राच्या मालकांना सत्य काय होते ते सांगितलेले आहे. म्हणूनच तुमच्या या आगाऊपणामुळे तिचे काहीच नुकसान होत नाहीये. पण तुम्हाला मात्र किंमत मोजावी लागेल. तिने तिचा भूतकाळ तुमच्यापासून लपवला असेल त्याला काहीतरी कारण असेलच ना? आणि तुम्हाला खरं सांगितलं नाही, याचा अर्थ प्रत्येकाला खोटं सांगितलं असा होत नाही,”
“पण सर प्रश्न लपवण्याचा नाही, खोटं बोलण्याचा आहे. मला तिच्या गावामधे समजलं होतं की सारा लग्न करून पळून गेली होती... पण मग ती तिच्या नवर्‍याबद्दल का सांगत नाही? तिचं एच आरमधे रेकॉर्ड अनमॅरीड असं काय दिलंय तिने? मी तिचा पासपोर्ट पाहिलाय एकदा, पण पाच वर्षापूर्वी ती लंडनला गेल्याचा काहीच पुरावा नाही, मग तिने तो कोर्स कसा केला असेल? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्य़ासाठी मी ही स्टोरी केली.”
तो हसला. “बरीच इन्व्हेस्टीगेशन केलेली दिसतेय तुम्ही सरस्वतीवरती. पण काही गोष्टी क्लीअर करतो. तो कोर्स डिस्टन एज्युकेशन मोडमधे होता. वाटलं तर तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन अजून याबद्दल माहिती बघू शकता. तिचं जर्नालिझमचं सर्टिफ़िकेट पूर्णपणे खरं आहे, जरी ती शिकायला परदेशी गेलेली नसली तरी. त्याच वेळेला तुम्ही म्हणालात तसं ती स्थानिक पेपरमधे लिहत होतीच आणि सरस्वती पळून गेली होती हे खरं आहे, पण तिने लग्न वगैरे अजिबात केलं नाही. तिला मुंबईत तुमच्या देशमुख सरांच्या मदतीने नोकरी मिळाली होती पण ती ज्या आश्रमात राहत होती त्यांनी तिला जायची परवानगी दिली नाही, म्हणून ती पळून गेली.”
नेत्रा आश्चर्याने ऐकत होती. “सर, हे तिने खरं सांगितलं कशावरून? कदाचित ती खोटंही बोलली असेल'
“मला याबाबतीत खरं-खोटं करायची गरजच नाही, मिस नेत्रा. कारण मीच तो माणूस आहे ज्याच्यासोबत सरस्वती पळून म्हणा किंवा निघून म्हणा, मुंबईला आली होती.” खुर्चीवरून उठत तो म्हणाला, “तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, हे म्हणायला बरं वाटलं असतं. पण खरं सांगायचं झालं तर अजिबात आनंद झाला नाही, उलट सध्या प्रचंड पेशन्सने माझा संताप आवरण्याचा प्रयत्न करून तुमच्याशी बोलतोय... जी जखम भरून येण्यासाठी मी गेले पाच वर्षं प्रयत्न करतोय, तुमच्या या एका ईमेलने ती परत भळभळली. सरस्वती माझ्यापासून दूर जातेय. गेलीच पाहिजे. पण तुमच्या या नाक खुपसण्याने मला आज इथे परत यावं लागलं. आणि तुम्ही या कागदावर लिहिलेल्या अनेक घाणेरड्या आरोपांसाठी एक वेळ सरस्वती तुम्हाला माफ़ करेल, पण मी? कधीच नाही..”
त्याच्या नजरेतला तो संताप आणि विखार आता स्पष्ट दिसत होता, “हे करून तुम्हाला काय मिळालं ते माहित नाही! सरस्वतीने नोकरी जॉइन करताना यापैकी प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण दिलेलंच आहे त्यामुळे ती खोटं बोलली वगैरे सर्व तुमच्या मनाचे खेळ आहेत. आणि खाली एच आर तुमचं टर्मिनेशन लेटर तयार करतंच आहे. नवीन नोकरीच्या शोधासाठी शुभेच्छा,”
नेत्रा क्षणभर थबकलीच. काय बोलावं ते तिला सुचेना. एच आरकडून टर्मिनेशन लेटर वगैरे तिच्या मेंदूपर्यंत पोचलंच नाही.
“तुम्ही... तुम्ही.. तुमचं नाव साहिल आहे?” तिने विचारलं.
“नाही! माझं नाव साहिल नाही. पण हो. मी साहिल आहे.” तो हसत म्हणाला आणि केबिनबाहेर निघून गेला.
================================================

ऑफ़िसमधून बाहेर पडून मी बस स्टॅन्डकडे निघाले होते. आजचा अजून एक दिवस सरला. आता थोडेच दिवस!! मग ही नोकरी सोडून द्यायची.. आणि पुढे? पुढे काय याचा अजून विचार केलाच नव्हता. काकाच्या घरून आल्यावर इथे महिलाश्रमात रहायला जागा मिळाली, शिक्षण चालू झालं, तात्पुरती का होइना पण नोकरी मिळाली, पण यानंतर पुढे काय हा प्रश्न अजून होतास. इथलं काम वाईट होतं अशातला भाग नाही. पण त्याच त्याच डबक्यात किती वर्षं रहायचं?
तंद्रीत चालत असतानाच समोरुन साहिल बाईकवरून येताना दिसला. आता हा इथे कशाला आला?

"अजीब लडकी हो.. केव्हाचा शोधतोय. गायब का होतेस?" तो माझ्यासमोर थांबत म्हणाला. "वो मामुके पास मी तुझ्या जॉबसाठी फ़िल्डंग लावली होती पण तू त्याला भेटायला आलीच नाहीस. का?" 

आसपासचे सर्वजण त्याच्याकडे बघायला लागले. एक तर हे तसं काही मोठं गाव नाही आणि त्यात अशा गोष्टी तर फ़ार लवकरच पसरतात. 
"साहिल.. प्लीज.. आपण इथे नको बोलू या... मी उद्या भेटते तुला.."
"मागच्या वेळेला पण हेच बोलून तू मला रस्त्यावर सोडुन गेली. मला भेटायचं नाहीच आहे का तुला?"
"साहिल, इथे सगळे बघतायत आपल्याकडे. पण आता नाही बोलत," मी कसंबसं म्हणाले, पण सांगितलेलं ऐकेत तो साहिल कसा?. 
"चल, बस," तो म्हणाला. 
"साहिल, एकदा सांगितलं ना मी इथे बोलणार नाही." मी परत सांगून पाहिलं. 
"तू चुपचार माझ्यासोबत येते की मी इथे जोरात ओरडून सांगू तू माझी आयटेम आहे म्हणून.. " तो शांतपणे म्हणाला. साहिल असं नक्की करू शकेल यावर माझा पूर्ण विश्वास होताच. 
त्या दिवशी अर्ध्या गावाने तरी मला पहिल्यांदा त्याच्यासोबत जाताना पाहिलं असेल. गावामधे चर्चेला नवीन निमित्त मिळालं असणार नक्कीच.

साहिलने गाडी एका सुनसान रस्त्याला घातली. 

"आपण कुठे चाललोय?" मी दोन तीनदा विचारलं. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. वैतागून त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. तसा बेफ़ाम चाललेल्या बाईकवरून पाठी वळून तो हसला.
"और बस दो कदम..." 
दो कदम? कि किलोमीटर? शेवटी त्याने एके ठिकाणी बाईक थांबवली.. दूरवर कुणी चिटपाखरू सुद्धा नव्हतं. 
"देखो.." तो म्हणाला. समुद्राकदे बोट दाखवत. आता या संध्याकाळी या समुद्रकिनार्‍यावर नक्की काय बघायचं?

सूर्यास्त होत आला होता. त्याचं एक विलक्षण प्रतिबिंब समुद्रावर पडलं होतं. 

“मला इथे येऊन सूर्यास्त बघायला फ़ार आवडतं” तो म्हणाला. समुद्रावरून येणारा वारा सहज तोंडावर बसत होता. “गावापासून लांब, एकाकी... तरीही सोबत कुणीतरी असणारा सूर्यास्त” मी काही न बोलता शांत उभी राहिले.

"सरस्वती, मुझसे दूर क्युं भाग रही हो?" त्याने माझ्या डोळ्यात बघत विचारलं. 

"काय?" ती गडबडली. 
"मी खूप दिवसापासून पाहतोय. तू माझ्यापासून लांब पळतेस. का? " 
"असं काहीही नाही. मला हल्ली दिवसभर वेळ नसतो. तू इथे गावात आहेस हे मला माहितसुद्धा नव्हतं." मी उत्तर दिलं.

"खोटं बोलत जाऊ नकोस. तुला जमत नाही." तो समुद्राकडे बघत म्हणाला. 

"खरं सांगू? अगदी खरं? मला तुझ्याशी मैत्री ठेवायची नाही." मी एकदाचं सांगून टाकलं.
"का?" 
"काहीही कारण असेल त्याच्याशी तुला काय देणं घेणं.." 
"सरस्वती, का हे विचारायचा हक्क आहे मला. आणि तू माझ्याशी मैत्री तोडून स्वत:पासून लांब जाते आहेस." तो म्हणाला.
"म्हणजे?" 
"कुठल्याही रिलेशनपासून दूर गेल्याने नाती संपत नाहीत, सरस्वती. आपण फ़क्त आपल्यापासून दूर होत जातो.."
"साहिल, असं नाही. मी तुला आताच कुठे भेटली आहे. आणि तू इतक्यात आपल्या नात्याच्या गोष्टी पण बोलायला लागलास?" 

"म्हणजे आपलं काहीच नातं नाही असं तुला म्हणायचे आहे?"

"साहिल, आपलं नातं? आपली फ़क्त ओळख आहे. तेपण मी तुला तीनचारदा भेटले आहे म्हणून. बाकी काहीही नाही."

"आणि तू ओळखीच्या प्रत्येक माणसाला सांगतेस की तू घर का सोडलस? तुझ्या आईने काय केलं.. हो ना??" त्याच्या स्वरात आतापर्यंत कधीच न जाणवलेला कडवेपणा होता. 

" मी तुला माझा भूतकाळ सांगितला कारण.... कारण, मला तुझ्याशी बोलताना तो मोकळेपणा जाणवला... पण याचा अर्थ असा नव्हे की आपण..." 
"एक मिनिट.. मी इथे वाद घालायला आलो नाही. तुझ्या भूतकाळाशी अथवा वर्तमानकाळाशी मला काही इण्टरेस्ट नाही, मला तुला फ़क्त इतकंच सांगायचं आहे, की सरस्वती, आपलं नातं आहे. तू कबूल कर अथवा करू नकोस. ती तुझी मर्जी! " 
" तू काय बोलतो तुला समजतं का रे?" हताशपणे मी म्हणाले.. 
"सरस्वती, तुझं आणि माझं नातं.... त्यासाठी कुठल्याही नावाची गरज नाही. आज या घडीला हे नातं मैत्रीचं आहे. उद्या या नात्याचे रंग काय बदलतील ते माहित नाही... तुझी सगळ्यात मोठी भिती तीच आहे ना? "

" मी स्वत्:ला त्या ठिकाणी नाही बघू शकत जिथे माझी आई आहे. हे मी तुला ऑलरेडी सांगून झालंय.." सरस्वती शांतपणे म्हणाली. 


त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. 
"माहित आहे मला. पण नात्यांपासून, जगापासून घाबरू नकोस. तु आतल्या आत स्वत्:मधे हरवत चालली आहेस. बाहेर बघायला तुला वेळ नाही. आपल्या दुनियामधे हरवू नको. जगाकडे बघ, स्वत:कडॆ बघ!! जगावर विश्वास ठेवायला शिक. " 
"विश्वास, रक्ताची नाती जेव्हा तुम्हाला पाळण्यात सोडून जातात नाहीतर तुमच्या इज्जतीला लुटतात, तेव्हा विश्वास ही गोष्टच अशक्य असते..." माझ्या डोळ्यांसमोर काका आणि आईचा चेहरा तरळून गेला.

"सरस्वती, तुझी आई कशी का असेना, कुठेतरी जिवंत आहे, केव्हातरी ती तुला न्यायला पण आली होती. आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर तू तिच्याकडे परत जाऊ शकशील.... पण माझी तर आईच नाही. मी काय करू?" 

" तुला वडील आहेत. मामा मामी काका काकी सगळे आहेत. पण मी? माझं या अख्ख्या जगात कुणीही नाही."
"मी सुद्धा?" 
“तू एकटाच तर आहेस.... मित्र म्हणून!” 
"तेच तर मी तुला सांगतोय. मीच एकटा तुझा मित्र का? बाकी कुणी का नाही. बाहेर जा, चार लोकांत मिक्स हो. खूप सारे मित्रमैत्रीण बनव...मग तुला कधीच एकटं वाटणार नाही... मी.... मी तुला सोडून गेल्यावर सुद्धा."
"बोलणं सोपं आहे. करणं कठीण आहे. " 
"काही कठीण नाही. तुझा स्वत:वर विश्वास असेल तर” . 
"माझा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे म्हणूनच मी आज इथे आहे. एवढ्या मोठ्या जगाच्या पसार्‍यात एकटी...."
"अब देखो... " त्याने बोलता बोलता मधेच आकाशाकडे बोट दाखवलं. 
सूर्य केव्हाच मावळला होता. राखाडी अंधार पसरत चालला होता. सगळीकडे काजळी पसरल्यासारखा, 
"थोड्या वेळापूर्वी इथे किती रंग होते, आता फ़क्त काळा.. "तो म्हणाला. 
"म्हणजे?" त्याने विषय का बदलला हे तिच्या ध्यानात आले नाही. 

"दुनिया बदलती है. वक्त बदलता है. रिश्ते बदलते है, पर ये नजारा वैसा ही है, अगर कुछ बदला है तो अपना नजरिया." 
"आणि या सगळ्याचा तुझ्या आणि माझ्या नात्याशी काय संबंध?" 
"काहीही नाही. आपलं नातं आहे तेच आहे. आणि राहील. सरस्वती. एक जिग सॉ पझल आहे. आपण त्याचे तुकडे आहोत. एकमेकापासुन वेगळे केले तर फ़क्त चित्रविचित्र तुकडे आणि एकत्र असतील तर चित्र.”
"आपण कधीच एकत्र असणार नाही.." 
तो हसला. "हे ठरवणारी तु अथवा मी कोण? तकदीर से जुडे है हम दोनो. चाहकर भी अलग हो ना पाओगी."

रात्र चढत होती. माझ्या मनात विचाराचे कल्लोळ उठले होते.
साहिल मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणे आकाशातले तारे बघत होता.